‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘सत्ययुगात पृथ्वीवरील सर्वच लोक साधना करणारे असल्याने ते सात्त्विक होते. मृत्यूनंतर त्यांचे प्रेतही सात्त्विक असे. अशा साधना करणार्‍या आणि सोहम्भावातील जिवाला काशीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्नी दिल्यावर स्वतः शिव त्या जिवाच्या कानात ‘मुक्तीमंत्र’ सांगून त्याला मुक्ती देत असे. आता कलियुगात हा नियम लागू नाही; कारण आताचा मनुष्य सोहम्भावापासून पुष्कळ दूर आहे. देव न मानणार्‍या, देवाच्या कार्याला विरोध करणार्‍या, भ्रष्ट, स्वार्थी आणि धर्मविरोधी अशा मनुष्याला काशी वा अन्य कोणत्याही पवित्र स्थानी मृत्यूनंतर अग्नी दिला, तरी त्याला मुक्ती मिळत नाही. त्यासाठी मनुष्याने देवाप्रती भाव ठेवून तीव्र साधना करणे अनिवार्य आहे. गुरूंच्या सांगण्यानुसार झोकून देऊन साधना करणारा साधक जिवंतपणीच मुक्त झालेला असतो. त्यामुळे मृत्यूनंतर त्याला कोणत्याही ठिकाणी अग्नी दिला, तरी त्याला गुरुकृपेने मुक्ती मिळते.

साधना करून जिवंतपणीच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून स्वतःला मुक्त करून घेतले पाहिजे. ‘मी मेल्यानंतर इतर नातेवाईक अंत्यसंस्कार नीट करून मला मुक्ती देतील’, या भ्रमापासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे. कलियुगात आता श्राद्धादी कर्मांवरही लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याने मुक्तीची भाषा अशा नास्तिकांनी करूच नये. यासाठी आता स्वतःच्या मृत्यूनंतरची सोय आतापासूनच करावी, म्हणजेच कठोर साधना करून जिवंतपणीच मुक्त व्हावे. त्यामुळे ‘आपण मेल्यानंतर आपल्या अस्थी तीर्थक्षेत्री विसर्जन होऊ देत अथवा न होऊ देत, तसेच आपले श्राद्धकर्म केले किंवा नाही केले, तरी त्याची काळजी रहाणार नाही.’

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment