उद्‍घाटन

उद्‍घाटन करतांना
उद्‍घाटन करतांना

हिंदु धर्मातील प्रत्येक कृती ही अध्यात्मशास्त्रावर आधारलेली आहे. ती करण्याकडेच जिवाचा कल असला, तरच त्याला खर्‍या दृष्टीने लाभ होण्यास साहाय्य होते. कोणताही समारंभ किंवा कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद मिळणे आवश्यक असते. उद्‍घाटन केल्यामुळे देवतांच्या लहरींचे कार्यस्थळी आगमन होते आणि त्यामुळे कार्यस्थळी संरक्षक-कवच निर्माण होऊन तेथील त्रासदायक स्पंदनांच्या संचारावर बंधन येते. यासाठी उद्‍घाटन हे विधीवत, म्हणजेच अध्यात्मशास्त्रीय आधार असलेल्या विधींचे पालन करूनच केले पाहिजे.

‘उद्‍घाटन’ शब्दाची व्याख्या

‘उद्’ म्हणजे प्रकट करणे. देवतेच्या लहरींना प्रकट किंवा आवाहन करून घटात (कार्यस्थळी) स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून कार्यारंभ करणे, म्हणजे उद्‍घाटन करणे.

उद्‍घाटन करण्याच्या पद्धती

नारळ वाढवणे आणि दीपप्रज्वलन करणे, हे विधी वास्तूशुद्धीतील , म्हणजेच उद्‍घाटनातील महत्त्वाचे विधी आहेत. ‘नारळ वाढवणे, म्हणजे वाईट शक्‍तींच्या संचाराला बंधन घालणे आणि दीपप्रज्वलन करणे, म्हणजे ज्ञानपिठावरील (व्यासपिठावरील) कार्यरत दैवी लहरींचे स्वागत करून त्यांना प्रसन्न करून घेणे.

नारळ वाढवण्यामागील शास्र काय ?

व्यासपिठाची स्थापना करण्यापूर्वी (तसेच वास्तूउभारणी करण्यापूर्वी) भूमीपूजन करतांना नारळ वाढवला जातो. ज्या भूभागावर व्यासपिठाची उभारणी करावयाची असते, त्या भूभागाचे शुद्धीकरण नारळ वाढवून केले जाते आणि तेथील त्रासदायक स्पंदनांचे निराकरण केले जाते. जेथे व्यासपीठ आधीच बांधलेले असते, तेथे व्यासपिठाच्या समोर भूमीवर दगड ठेवून तेथील स्थानदेवतेला प्रार्थना करून नारळ वाढवावा.

कार्यक्रमाच्या स्थानाची शुद्धी करण्याचे महत्त्व

व्यासपिठावरील कोणत्याही समारंभाच्या सिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी स्थानाची शुद्धी करणे आवश्यक असते, नाहीतर वाईट शक्‍तींच्या अडथळ्यांमुळे कार्यक्रम नियोजित वेळेत चालू न होणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी अस्वस्थता वाटणे, कार्यक्रमाची सिद्धता करतांना थकवा जाणवणे, असे त्रास होऊ शकतात. प्रार्थना करून स्थानदेवतेला आवाहन केल्यामुळे तिच्या कृपेमुळे नारळातील पाण्यातून सर्व दिशांना स्थानदेवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी पसरतात. त्यामुळे कार्यस्थळी येणार्‍या त्रासदायक स्पंदनांच्या वेगाला बंधन घालणे शक्य होते आणि त्या परिसराच्या भोवती स्थानदेवतेच्या सूक्ष्म-लहरींचे मंडल बनल्याने समारंभाची सांगता निर्विघ्नपणे होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१.२००५)

नारळ वाढवून उद्‍घाटन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

नारळ वाढवल्याने होणारे लाभ

१. उद्‍घाटन करतांना नारळ दगडावर आपटून वाढवण्यात येतो. त्या वेळी नारळातील चैतन्य आणि शक्‍ती यांची स्पंदने वातावरणात वेगाने पसरतात आणि वातावरणाची शुद्धी होते. याच प्रक्रियेच्या वेळी नारळातील आकर्षण शक्‍तीमुळे वास्तूतील वाईट स्पंदने नारळात आकृष्टही होतात आणि नारळाच्या माध्यमातून त्यांचे विघटन होण्याचे कार्य होते.

२. नारळ वाढवतांना त्यातून निर्माण होणार्‍या ‘फट्’ अशा ध्वनीतून वास्तूतील वाईट शक्‍ती दूर होतात.

३. वास्तूभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन ईश्‍वरी तत्त्वे वास्तूमध्ये आकृष्ट होतात.

४. नारळ वाढवणार्‍या व्यक्‍तीने भावपूर्ण कृती केल्यास तिला शक्‍तीची स्पंदने प्राप्त होतात.’

व्यासपिठावरील कार्यक्रमांचे उद्‍घाटन कसे करावे ?

कार्यक्रमाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने करतांना

चर्चासत्रे, साहित्य संमेलने, संगीत महोत्सव इत्यादींचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने करतात. व्यासपिठाच्या स्थापनेच्या पूर्वी नारळ वाढवावा आणि प्रत्यक्ष उद्‍घाटनाच्या समयी दीपप्रज्वलन करावे. नारळ वाढवण्यामागे कार्यस्थळाची शुद्धी व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. व्यासपीठ हे ज्ञानदानाच्या कार्याशी संबंधित, म्हणजेच ज्ञानपीठ असल्याने तेथे दीपाला महत्त्व आहे.

विक्रीकेंद्रे (दुकाने), आस्थापने इत्यादी घटकांचे उद्‍घाटन कसे करावे ?

विक्रीकेंद्रे, आस्थापने इत्यादी घटक हे अधिकतर व्यावहारिक कर्मांशी संबंधित असल्याने त्यांचे उद्‍घाटन करतांना दीपप्रज्वलन करण्याची आवश्यकता नसते; केवळ नारळ वाढवावा.

संतांच्या हस्ते उद्‍घाटन करण्याचे महत्त्व

संतांच्या केवळ अस्तित्वामुळे ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यस्थळी आकृष्ट होऊन कार्यरत होण्यास साहाय्य होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय आणि शुद्ध बनून कार्यस्थळाच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते; म्हणून संतांनी उद्‍घाटन केल्यास नारळ वाढवण्याचीही आवश्यकता नसते.

संतांच्या हस्ते उद्‍घाटन करण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !

डोंबिवली, महाराष्ट्र येथील संत प.पू. झुरळे महाराज यांनी
चिकित्सालयाचे (दवाखान्याचे) उद्‍घाटन केल्यावर पूर्वीची त्रासदायक वास्तू चांगली वाटू लागणे

‘आम्ही कराड येथे रहात असतांना एकदा आमच्या घरासमोरच्या वास्तूत एका कुटुंबाने विवाहनिमित्त भोजन समारंभ आयोजित केला होता. त्यानंतर त्या वास्तूतील त्रास फार वाढल्याचे आम्हाला जाणवले. त्या वास्तूत गेल्यावर थकवा येणे, निरुत्साह वाटणे, ‘तेथे थांबू नये’, असे वाटणे यांसारखे त्रास आम्हाला जाणवायचे. डॉ. कुलकर्णी यांनी नंतर ती वास्तू विकत घेतली आणि तेथे चिकित्सालय चालू केला. डॉ. आणि सौ. कुलकर्णी हे प.पू. झुरळे महाराजांचे भक्‍त असल्याने चिकित्सालयचे उद्‍घाटन करण्यासाठी प.पू. महाराज आले होते. प.पू. महाराज वास्तूत आल्यानंतर वास्तूतील काळोख दूर होऊन तेथे पिवळा चैतन्याचा प्रकाश पसरतांना दिसला. आम्हाला वास्तूत फार चांगली स्पंदने जाणवली. प्रत्येक खोलीत चैतन्य पसरले आणि उत्साहही जाणवू लागला. काही वेळा तेथे गेल्यानंतर चंदनाचा मंद सुगंधही येतो. दवाखाना चालू झाल्यापासून अनेक रुग्णांना चांगला गुणही येऊ लागला आहे. संतांनी एखाद्या वास्तूचे उद्‍घाटन केले, तर त्या वास्तूवर सूक्ष्मातून किती परिणाम होतो आणि त्याची स्थुलातूनही कशी प्रचीती येते, ते अनुभवता आले.’

– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(वरील उदाहरणावरून उद्‍घाटनाला संतांना बोलावण्याचे महत्त्व लक्षात येईल. याउलट दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजकाल राजकारणी, सिनेअभिनेता, क्रिकेटपटू इत्यादींना उद्‍घाटनासाठी आमंत्रित करतात ! – संकलक)

पाश्‍चात्त्य पद्धतीप्रमाणे फीत कापून उद्‍घाटन का करू नये ?

फीत कापून उद्‍घाटन करतांना

‘कोणतीही गोष्ट कापणे, हे विध्वंसक वृत्तीचे द्योतक आहे. फीत कापणे, म्हणजेच फितीतील अखंडतेचा भंग करणे किंवा लय करणे. ज्या गोष्टीतून लय साधतो, अशी कृती तामसिकतेचे लक्षण आहे. फीत कापण्याच्या तामसिक कृतीच्या माध्यमातून उद्‍घाटन केल्याने वास्तूतील त्रासदायक स्पंदनांवर कोणताच परिणाम होत नाही. सर्वसाधारण व्यक्‍ती ही राजसिक आणि तामसिक असते. फीत कापून उद्‍घाटन करतांना तिच्यातील अहं जागृत होतो. तिच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींमुळे तिच्याभोवती असलेले वायूमंडल, तसेच तिच्या हातातील कात्रीही रज-तम कणांनी भारित बनते. अशा कात्रीच्या स्पर्शाने फितीभोवती असलेल्या वायूमंडलातील रज-तम कणांना गती प्राप्त होते आणि कात्रीने फीत कापल्यामुळे तुटलेल्या फितीतून कारंजासारख्या रज-तमात्मक गतीमान लहरींचे संपूर्ण वातावरणात प्रक्षेपण होते. ज्या कृतीतून त्रासदायक लहरींची निर्मिती होते, अशी कृती हिंदु धर्माला त्याज्य आहे; म्हणून पाश्‍चात्त्य प्रथेप्रमाणे फीत कापून उद्‍घाटन करू नये.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १८.१.२००५, दुपारी ५.५२)

फीत कापून उद्‍घाटन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र

खालील चित्र मोठे करून पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

फीत कापण्याने होणारे इतर दुष्परिणाम कोणते ?

१. कापणे, चिरणे यांसारख्या कृतींतून निर्माण होणार्‍या नादामुळे वातावरणात तमोगुणी स्पंदनांचे प्रक्षेपण होते.

२. एखाद्या शुभदिनी उद्‍घाटन करतांना अशा प्रकारे कात्रीने फीत कापून उद्‍घाटन केल्यामुळे निर्माण होणारी तमोगुणी नादाची स्पंदने त्या वास्तूमध्ये दीर्घकाळ कार्यरत रहातात. तसेच या तमोगुणी नादामुळे दशदिशांतून वायूमंडलातील वाईट शक्‍ती वास्तूवर आक्रमण करतात.

३. फीत कापून उद्‍घाटन करणार्‍या व्यक्‍तीमध्ये अहंचे प्रमाण अधिक असते. फीत कापतांना निर्माण होणारी तमोगुणी स्पंदने वास्तूमध्ये पसरण्याप्रमाणेच फीत कापणार्‍या व्यक्‍तीच्या देहातसुद्धा पसरतात आणि त्यामुळे तिच्या अहंमध्ये वाढ होते. त्यामुळे ‘मी कोणीतरी मोठा’, असे कर्तेपणाचे विचार तिच्या मनात येऊ लागतात.

४. तसे पाहिल्यास ‘फीत कापणे’, ही कृती मन आकर्षून घेणारी आहे. त्यामुळे त्यात मायावी स्पंदनेही आकृष्ट होतात. तसेच कापल्या गेलेल्या फितीच्या टोकांतून ती स्पंदने सातत्याने वातावरणात प्रक्षेपित होत रहातात.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (आषाढ शु. १२, कलियुग वर्ष ५११२ ड२२.७.२०१०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’

Leave a Comment