मकर संक्रांत (Makar Sankranti 2023)

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. २०२३ मध्ये मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.


मकर संक्रांतीचे महत्त्व

या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते.

‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्‍या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (२२.२.२००५, रात्री)


मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या !

दानात कोणत्या वस्तू द्याव्यात ?

‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.


वाण देणे

असात्त्विक वाण दिल्याने होणारे तोटे दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणाऱ्या अन् देणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो.

सात्त्विक वाण दिल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

वाणात सात्त्विक वस्तू देण्यासाठी पहा
SanatanShop.com


मकर संक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे


तीळगुळाचे महत्त्व

तिळाचे वैशिष्ट्य दर्शवणारे सूक्ष्म-चित्र


हळदी-कुंकू करण्याचे महत्त्व

हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणाऱ्या  जिवासाठी कार्य करते. हळदी-कुंकू करणे, म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी-कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.

हळदी- कुंकवातील पंचोपचार

अ. हळद-कुंकू लावणे

हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसऱ्या जिवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे.

आ. अत्तर लावणे

अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात, म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते.

इ. गुलाबपाणी शिंपडणे

गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आप-तत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे वायूमंडलातील देवतेच्या लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरणशुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत झालेल्या देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ अधिक मिळतो.

ई. ओटी भरणे

ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती तिच्या ओटीपोटात संपुटित आहे. ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे. श्रद्धेने ओटी भरल्याने जिवाची इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. ओटी भरणे, म्हणजेच श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे.

उ. वाण देणे

वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे. या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते.

मकर संक्रांती निमित्तचे हळदी-कुंकू रथसप्तमी पर्यंतच का करावे ?

रथसप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते, त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते.


सुगड मधील घटक कोणते ?

बोरन्हाण कसे करावे ?

मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.

प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदी-कुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

मकर संक्रातीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत !

मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात; परंतु हिंदु धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करतो. त्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. ‘मकर सक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत अथवा परिधान केली, तरी चालतील’, या सूत्राला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नसल्यामुळे या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत.

‘मकर संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत’, अशा प्रकारचा संदर्भ एखाद्या धर्मग्रंथात आढळल्यास तो कृपया [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावा.

शरशय्येवर ५८ दिवस प्राण धरून रहाणारे भीष्माचार्य

महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करणे

प्रकाशमय कालावधी

जीवनाकडे साक्षीभावाने पहाण्यास शिकवणारा सूर्याचा उत्सव

सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्कसंक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. कोणत्याही ग्रहमालेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे, म्हणजे ‘खाली जाणे’ आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे, म्हणजे ‘वर जाणे.’ कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जाणे, म्हणजे वरून खाली जाणे अन् मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जाणे, म्हणजे खालून वर जाणे.

मकर संक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणार्‍या चढउतारांकडे, सुख-दुःखांकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पहायला हवे, असाच संदेश मिळतो.

सूर्य देवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण

सूर्य देवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) चालू केली. त्या वेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्य देवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा सूर्य देवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले; म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली. रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात. याला काळच साक्षी आहे.


‘करिदिनादिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचे आधिक्य वाढण्यास आरंभ होतो. हे आधिक्य तत्त्वस्वरूपी वाढत असतांना या भारित वायूमंडलात केल्या जाणार्‍या कृती रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणार्‍या असतात. संक्रातीच्या दिवशी रज-सत्त्वातील सत्त्वलहरींचे प्रमाण करिदिनादिवशी न्यून होण्यास आरंभ झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो. हा काळ वाईट शक्तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो वाईट समजला जातो.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, ११.१५)

‘वस्तू महाग होणे, याला कोणतेही आध्यात्मिक कारण नाही. हे निवळ व्यावहारिकतेच्या स्तरावर आचरलेले एक रुढीदर्शक माध्यम आहे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८)

१३ आकडा हा दाही दिशा आणि त्यांना कार्यरत करणार्‍या तीन ब्रह्मांडातील मूळ शक्ती यांचे दर्शक मानला गेलेला असल्याने या सर्वांच्या माध्यमातून १३ संख्यादर्शक वाणे देऊन कृती (स्थळ) आणि कर्म (काळ) यांच्या स्तरावर आसक्ती त्यागण्याचे हे द्योतक आहे; म्हणून ‘१३’ या आकड्याला विशेष महत्त्व आहे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८)

मकर संक्रांतीची माहिती देणारे व्हिडिओ पहा !


सण-उत्सव आणि साधना यांविषयी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सत्संगात सहभागी व्हा !

साधना संवाद या ऑनलाईन सत्संगात सण-उत्सव आणि साधना यांविषयी माहिती दिली जाते. हे आनंदी जीवनाचे प्रवेशद्वारच आहे. आनंदी जीवन कसे जगावे आणि आध्यात्मिक प्रगती कशी करावी हे जाणून घेण्यासाठी या सत्संगात सहभागी व्हा.