गर्भाधान (ऋतूशांती)

१ अ. महत्त्व

१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जाते. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाते.

२. भगवंताच्या सृष्टीचक्राला गतीमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व आहे. सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

१ आ. उद्देश

१. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणार्‍या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२. बीज अन् गर्भ या संदर्भातील दोष नाहीसे करणे आणि क्षेत्र (गर्भाशय) शुद्ध करणे.

एकूण शारीरिक आणि मानसिक त्रासांपैकी २ टक्के त्रास बीजगर्भदोषांमुळे होतात. त्यांतील अर्धे त्रास शारीरिक आणि अर्धे मानसिक स्वरूपाचे असतात. बीजगर्भदोषाचा परिणाम किती टक्के व्यक्तींत कधी दिसून येतो, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.

‘बीजगर्भदोषांचा परिणाम दिसून येण्याचा अवधी परिणाम होणार्‍या
व्यक्तींचे प्रमाण
(टक्के)
बीजगर्भदोषांचा
परिणाम दिसून
येण्याचा अवधी
परिणाम होणार्‍या
व्यक्तींचे प्रमाण
(टक्के)
गर्भधारणा ते १ महिना ७५ ७ ते ८ महिने
१ ते २ महिने ८ ते ९ महिने
२ ते ३ महिने जन्म ते १ वर्ष
३ ते ४ महिने १ ते ५ वर्षे
४ ते ५ महिने ५ ते १० वर्षे
५ ते ६ महिने १० ते २० वर्षे
६ ते ७ महिने पुढे
एकूण १००’

संकलक प.पू. डॉ. जयंत आठवले यांना ध्यानात मिळालेले ज्ञान

३. या संस्काराने उत्पन्न झालेल्या पुत्रामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची क्षमता असते.

४. ‘गार्भैर्होमैर्जातकर्मचौडमौञ्जीनिबन्धनैः ।
बैजिकं र्गािभकं चैनं द्विजानाम् अपमृज्यते ।। – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २७

अर्थ : गर्भाधान, जातकर्म, चूडाकर्म आणि मौंजीबंधन या संस्कारांमुळे द्विजांच्या बैजिक (बीजामुळे उत्पन्न झालेले दोष) आणि गार्भिक (गर्भावस्थेतील दोष) दोषांचे परिमार्जन होते.

गर्भाधानसंस्कार न केल्यास काय रतीसुख प्राप्त होणार नाही कि संतती होणार नाही ? संतती होईल; पण ती अत्यंत हीन, रुग्ण आणि निकृष्ट होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

१ इ. मुहूर्त

हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे.

 

१ ई. विधी

१ ई १. अश्वगंधा किंवा दूर्वा रससेवन

पतीने स्त्रीच्या पाठीमागे उभे राहून मंत्र म्हणून तिच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा किंवा दूर्वा यांचा रस पिळावा. तो रस पोटात गेल्यावर स्त्रीने आचमन करावे. उजवी नाकपुडी पिंगळानाडीची आहे. बहुतेक कार्ये यशस्वी होण्यासाठी पिंगळानाडी कार्यरत असणे पूरक ठरते. अश्वगंधा किंवा दूर्वा यांच्या रसाने ती नाडी कार्यरत होते.

१ ई २. प्रजापतिपूजन

गर्भाधान आणि विवाह या संस्कारांची प्रमुख देवता प्रजापति आहे. या देवतेच्या सुवर्णप्रतिमेची कलशावर स्थापना करून अष्टदिक्पाल आणि नवग्रहांसहित षोडषोपचारे पूजन करतात. (पाठभेद : या संस्काराला देवतास्थापन नसते.)

१ ई ३. ओटी भरणे

सूर्यस्तवन झाल्यावर पाच सुवासिनींनी फळांनी स्त्रीची ओटी भरावी आणि तिच्या पतीच्या हाती विड्याच्या दोन पानांवर ठेवलेला नारळ द्यावा. नंतर स्त्री आणि तिचा पती यांनी देव आणि वडील यांस नमस्कार करून भोजन करावे. सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. गर्भ तेजस्वी व्हावा; म्हणून सूर्यस्तवन करतात. ओटीपोटातील ओटीत स्त्रीचे गर्भाशय असते. गर्भधारणा व्हावी; म्हणून ओटी भरण्याची पद्धत आहे.

१ ई ४. संभोगविधी

रात्री स्त्रीने श्वेतवस्त्र परिधान करावे. निजण्याच्या खोलीतील मखरात पुष्पाची शेज केलेल्या पलंगावर उभयतांनी बसून विडे खाऊन स्त्रीने आडवे पडावे. पुरुषाने तिच्या नाभीप्रदेशी हात ठेवून (उपस्थस्पर्श) मंत्र म्हणून गर्भाधानविधीस प्रारंभ करावा. मंत्राचा अर्थ असा आहे : ‘गर्भधारणार्थ तुझ्या योनीला समर्थ करून, ईश्वर तुझ्या ठायी गर्भधारणा करो. गर्भाची वृद्धी सुखपूर्वक होवो आणि दहा (चांद्र) मासांचे पूर्वी तो पतन न होवो, अशी ईश्वर कृपा करो.’ यानंतर तीन बोटांनी उपस्थास (योनीस) स्पर्श करावा. नंतर स्त्रीसह संभोग करावा आणि ‘तुझ्या प्राणात (बीजात) रेत धारण करतो’, असे म्हणावे. नंतर मंत्र म्हणावा.

त्या मंत्राचा अर्थ असा आहे : ‘जशी पृथ्वी ही अग्नीने गर्भवती आहे, जशी याही इंद्राच्या योगाने गर्भवती आहे, जसा वायू हा दिशांचा गर्भ आहे, अशा रीतीने मी तुला गर्भधारणा करवितो.’ शेवटी स्त्रीच्या हृदयास स्पर्श करून आचमन करावे, म्हणजे हा विधी पुरा झाला. हृदयास स्पर्श करणे हे स्नेह आणि प्रेम यांचे प्रतीक आहे.

 

१ उ. अशुभ काळात रजोदर्शन झाले असता गर्भाधानापूर्वी करावयाची शांती

‘रजोदर्शनासाठी अशुभ काळ आला असता मोठा दोष होतो. या दोषनिवारणासाठी ‘ऋतूशांती’ नावाचा विधी करावा लागतो. (या विधीला ‘भुवनेश्वरी शांती’ असे म्हणतात.) अशुभ असणारी नक्षत्रे पुढीलप्रमाणे आहेत – भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा आणि ज्येष्ठा. अशुभ असणारे योग याप्रमाणे – विष्कंभ, गंड, अतीगंड, शूल, व्याघात, वङ्का, परीघ, व्यतीपात, वैधृती आणि भद्रा. याचप्रमाणे पुढील कालावधीही अशुभ मानलेला आहे – ग्रहणकाल, मध्यरात्र, संधीकाल, अपराह्णकाल आणि निद्राकाल.

गर्भाधानापूर्वी करावयाच्या शांतीचा संक्षिप्तरूपाने विधी असा – प्रथम भुवनेश्वरी शांतीचा संकल्प करावा. श्री गणपतिपूजन, वरुणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करावे. नंतर पंचगव्यमेलन करून स्थळाची शुद्धी करावी. तीन कलश एका ओळीत ठेवून मध्यभागी असलेल्या कलशावर श्री भुवनेश्वरीदेवी या मुख्य देवतेची प्रतिमा स्थापन करावी आणि तिची षोडषोपचारे पूजा करावी. श्री भुवनेश्वरीदेवीच्या उजव्या अंगाला असलेल्या कलशावर इंद्राणी आणि डाव्या कलशावर इंद्र या देवतांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर यज्ञकुंडात अग्नीची स्थापना करावी. नंतर इंद्राणी देवतेच्या कडेला नवग्रहमंडल स्थापन करून त्यांची पूजा करावी. नंतर यज्ञकुंडाकडे बसून पुढीलप्रमाणे अन्वाधान (आहुत्यांची संख्या निश्चित करणे) करावे. नवग्रहांसाठी अनुक्रमे रूई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, औदुंबर, शमी, दूर्वा आणि दर्भ या समिधांनी, तसेच चरु आणि आज्य यांनी २८ वेळा मंत्रांनी हवन करावे. तसेच भुवनेश्वरीसाठी दूर्वा, तीळमिश्रित गहू, पायस आणि तूप यांनी १००८ वेळा मंत्राने हवन करावे. नंतर इंद्र आणि इंद्राणी यांसाठी प्रत्येकी १०८ वेळा हवन करावे. हे शक्य नसल्यास श्री भुवनेश्वरीदेवीसाठी १०८ किंवा २८ आणि इंद्र-इंद्राणी यांसाठी २८ किंवा ८ वेळा हवन करावे. या वेळी वापरण्यात येणारे पायस होमावरच बनवलेले असावे; घरात केलेले नसावे. नंतर स्विष्टकृत् इत्यादी होमकर्म करून बलीदान, यजमान अभिषेक, विभूतीग्रहण आणि श्रेयोदान करावे.’ गर्भाधानसंस्कार प्रत्येक गर्भधारणेत पुन्हा करण्याची आवश्यकता नसते.

 

१ ऊ. अष्टमांगल्य (आठांगुळे)

ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांत हा संस्कार करतात. गर्भाधानसंस्कार न करता गर्भधारणा झाल्यास आठव्या मासात हा लौकिक संस्कार करतात. याचा विधी गर्भाधानाप्रमाणे आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’