आवश्यक त्या मार्गानुसार उन्नतांंनी साधना सांगणे

एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले ‘महाराज, मुक्ती मिळवण्यासाठी वनात जायला हवे का ?’ साधू म्हणाला, ‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनकराजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. त्याने त्याला प्रश्न विचारला, ‘योगीराज, मुक्ती मिळवण्यासाठी घरादाराचा त्याग करून वनातच तपश्चर्येला गेले पाहिजे का ?’ यावर तो साधू म्हणाला, ‘अर्थातच ! नाहीतर घरादाराचा त्याग करून शुक-सनकादिकासारखे मोठेमोठे साधक मुक्तीसाठी वनात गेले, ते काय मूर्ख होते ?’

एकाच प्रश्नाला त्या साधूने दिलेली परस्परविरोधी अशी उत्तरे ऐकून त्या साधूच्या सहवासात रहाणारा त्याचा शिष्य गोंधळात पडला. तो दुसरा तरुण निघून जाताच त्या शिष्याने साधूला विचारले, ‘गुरुदेव, आपल्याकडे एका पाठोपाठ एक आलेल्या दोन साधकांना एकच प्रश्न असतांना आपण त्यांना परस्परविरोधी अशी दोन उत्तरे का दिलीत ? त्यातलं खरं उत्तर कोणतं समजायचं ?’ यावर तो साधू म्हणाला, ‘बाळा, मी दिलेली दोन्ही उत्तरं खरी आहेत. माझ्याकडे जो पहिला प्रश्नार्थी आला होता, तो एकीकडे प्रपंच करता करता जीवनमुक्तीसाठी आवश्यक असलेली साधनाही करू शकेल, अशा कुवतीचा होता; पण नंतर जो तरुण आला, त्याला घरात राहून जीवनमुक्तीसाठी करावी लागणारी आवश्यक ती साधना करणे कठीण गेले असते; म्हणून मी त्याप्रमाणे उदाहरणे देऊन त्यांना पटवून दिले’.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९१)

Leave a Comment