‘आत्मा एकच आहे आणि केवळ त्याची रूपे भिन्न आहेत’, हे समजल्यावर द्वैत संपून ‘एकत्व साधणे’ शक्य होते !

‘देह जरी भिन्न असले, तरीही सर्वांठायी ‘ब्रह्म’ एकच आहे’, असे सांगून रेड्याच्या मुखातूनही वेद वदवणारे संत ज्ञानेश्वर म्हणतात की, ‘आत्मा हा एकच आहे. आपली वेगवेगळी देहाची रूपे त्यावर जरी असली, तरी आपल्यातील ईश्वराचे आत्मरूप एकच आहे.’ ‘सर्वत्र ब्रह्म’ या नात्याने सर्व समानच आहे. ईश्वरमय आहे.’

मग आपण तुलना करण्याचे कारण काय ? आणि कशाला तो इतरांविषयी द्वेष ? ‘माझेच एक रूप भिन्न वेशात माझ्यासमोर उभे आहे. मग माझाच द्वेष मी कसा करू शकतो ?’, याची जाणीव मनाला करून द्यायला हवी. प्रत्येक प्रकृतीतून शिकून त्यातील आनंद घ्यायला हवा. एखाद्यामध्ये काही स्वभावदोष आणि अहंचे पैलू असतील, तर ते सुधारण्यासाठी त्याला साहाय्य करणे आणि त्यानेही स्वतः तसे प्रयत्न करणे आवश्यकच आहे; मात्र अशा व्यक्तीकडे पहातांना व्यक्ती म्हणून न पहाता ईश्वराने पृथ्वीवर माझ्यासारखीच जन्माला घातलेली एक भिन्न प्रकृती आहे, हे मनाला समजवावे. ‘समोरच्या व्यक्तीत आणि माझ्यात एकच आत्मा आहे, केवळ त्याची रूपे भिन्न आहेत’, याची जाणीव झाल्यावर ‘समोरच्या व्यक्तीशी तुलना करणे, त्यांचा द्वेष करणे, पूर्वग्रह असणे आणि त्यांच्याविषयी मनात किल्मिष असणे’, असे काहीच रहात नाही. असे होणे म्हणजेच ‘एकत्व साधणे’ होय.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment