प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !

प्रत्येक जण स्वतःच्या आध्यात्मिक पातळीचे अनुमान करू शकतो. ‘आपण या वर्षात किती मन लावून साधना केली ?’, हे सर्वांना तसे सहजच कळते. त्यामुळे आपणच आपले परीक्षक बनून आपल्या साधनेचा मागील वर्षाचा आढावा घ्यायला हवा. अगदी वर्षाच्या शेवटी, म्हणजे गुरुपौर्णिमा जवळ आली की, ‘आपली प्रगती झाली आहे कि नाही ?’, या विचाराने आपल्या मनाची घालमेल होते; परंतु असा विचार न करता आपण प्रत्येक दिवशी रात्री आपल्या दिवसभराच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे आणि दुसर्‍या दिवशी आपल्या साधनेत राहिलेली अनुसंधानाची उणीव भरून काढली पाहिजे, तरच वर्षाच्या शेवटी येणार्‍या गुरुपौर्णिमेला ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद झालेली असेल. यासाठी ‘साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे’, हा गुरुमंत्र प्रतिदिन घेऊनच साधना केली पाहिजे.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment