स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद

अनुक्रमणिका


 

१. स्वामी विवेकानंदांनी जीवनात ‘गुरुकृपायोग’ येण्यासाठी केलेले प्रयत्न

१ अ. नरेंद्रच्या घरची श्रीमंती झपाट्याने खालावणे,
तरीही सद्गुरूंचे कर्करोगाचे दुखणे बळावल्यामुळे नोकरी सोडून पूर्णवेळ गुरूंसमवेत रहाणे

स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरेंद्र’ असे होते. नरेंद्रला गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात त्याचे वडील निवर्तल्यामुळे त्याच्या एकट्यावर संपूर्ण कुटुंबाच्या भरणपोषणाचे दायित्व आले. वडील निवर्तल्यावर घरची श्रीमंती झपाट्याने खालावली. ती सुधारण्यासाठी नरेंद्रला नोकरी करण्याविना कुठलाही पर्याय नव्हता. नरेंद्रला वणवण फिरूनही नोकरी मिळेना. घरी खाणारी ६ माणसे आणि घरामध्ये अन्नाचा कणही नाही. पुढे उधार-उसनेही मिळणे कठीण झाल्यावर नरेंद्र सद्गुरु श्रीरामकृष्णांना शरण गेला. तेव्हा सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने त्याला शाळेत अल्प वेतनाची मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली. नरेंद्र ती नोकरी जेमतेम ४ मासच करू शकला. नंतर सद्गुरूंच्या गळ्याच्या कर्करोगाचे दुखणे बळावल्यामुळे नरेंद्रला ‘घर-दार आणि कुटुंब’ हे सर्व वार्‍यावर सोडून सतत सद्गुरूंच्या सान्निध्यात रहावे लागले. या प्रसंगी नरेंद्रने मायेतील सर्व दोर छाटून टाकले आणि केवळ गुरूंची सेवा घडावी, यासाठी तो पूर्णवेळ सदासर्वकाळ त्यांच्यासमवेत राहू लागला.

स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस
स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस

१ आ. जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची तळमळ, जिद्द, सेवाभाव आणि सद्गुरूंवरील
दृढ निष्ठा यांमुळे गुरुकृपा होऊन नरेंद्र प्रवेगे ‘सत्‌शिष्य’ या पदावर आरूढ होणे

या काळात सद्गुरूंनी त्याला ज्ञान-विज्ञानातील अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करून दाखवतांना घरगुती उपमा-दृष्टांतांच्या माध्यमातून मानवी कल्याणासाठी धर्मतत्त्वांचा उपयोग कसा करता येईल, हे सोप्या शब्दांतून शिकवले. नरेंद्रमधील जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची तळमळ, जिद्द, समर्पितभावाने सेवा करण्याची वृत्ती आणि सद्गुरूंवरील ठाम निष्ठा या गुणांमुळे श्रीरामकृष्णांची त्याच्यावर कृपा झाली आणि नरेंद्र प्रवेगे ‘सत्‌शिष्य’ या पदावर आरूढ झाला.

 

२. नरेंद्रची गुरुसेवा

२ अ. समर्पितभावाने सेवा करून गुरुसेवेचा आदर्श उभा करणे

नरेंद्रने ‘सत्‌शिष्य’ या नात्याने सद्गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांची त्यांच्या शेवटच्या रुग्णस्थितीत अत्यंत समर्पितभावाने सेवा केली होती. हे करत असतांना त्याने आपल्या पंधरा गुरुबंधूंसमोर गुरुसेवेचा आदर्श उभा केला.

२ आ. सद्गुरूंच्या असाहाय्य अवस्थेत स्वतः काहीच करू शकत नसल्याची खंत वाटणे

श्रीरामकृष्ण परमहंस गळ्याच्या कर्करोगाने मरणासन्न अवस्थेत होते. त्या दयनीय अवस्थेमध्ये त्यांना निवासासाठी कुठेही स्थान उपलब्ध होऊ शकले नाही. शेवटच्या काळात त्यांचा मुक्काम काशीपूर उद्यानामध्ये उघड्यावरच होता. त्यांच्या घशाखाली अन्नाचा एक कणही उतरत नसे. त्यांचे शरीर अत्यंत कृश झाले होते. अशा स्थितीत श्रीरामकृष्ण परमहंस नरेंद्रला म्हणाले, ‘तू मला खांद्यावरून तुझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जा. ती कुडाची झोपडी असो किंवा झाडाखालची मोकळी जागा असो, तेथे मी राहीन.’ सद्गुरूंच्या या अवस्थेकडे बघून नरेंद्रला असह्य वेदना होत असत. त्याच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वहायचे. ‘आपण सद्गुरूंसाठी काहीच करू शकत नाही’, याची खंत नेहमी त्याला वाटायची.

२ इ. असे झाले सद्गुरु श्रीरामकृष्णांचे महानिर्वाण !

सद्गुरु श्रीरामकृष्णांचा महानिर्वाणाचा दिवस आला. १५ ऑगस्ट १८८६ या उत्तररात्री पहाटे १.०२ मिनिटांनी सद्गुरूंनी देहत्याग केला. त्यांची दृष्टी नासिकाग्राकडे होती आणि मुखावर शिशुवत स्मित होते. १६ ऑगस्ट १८८६ या दिवशी संध्याकाळी ६ वाजता श्रीरामकृष्णांच्या पार्थिव देहाला अग्नी दिला. या वेळी शिष्यगणांनी कुठल्याही प्रकारे दुःख व्यक्त केले नाही. ते भजन म्हणत होते. ‘जय श्रीरामकृष्ण की जय’ असा गजर करत गंगाकिनारी वराहनगर घाटावर श्रीरामकृष्णांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

३. ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ या व्यष्टी ध्येयाकडे वाटचाल

३ अ. सद्गुरूंनी दिलेला ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा वारसा
टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी,
मठाची स्थापना करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोकळ्या पटांगणाकडे पहात रहाणे

नरेंद्र विचारमग्न अवस्थेमध्ये नदीपलीकडील विस्तीर्ण मोकळ्या पटांगणाकडे पहात उभा होता. ‘सद्गुरूंच्या अंतःकाळी त्यांना निवारा उपलब्ध करून देऊ शकलो नाही’, याचे शल्य त्याला सतत बोचत होते. ‘सद्गुरूंनी दिलेला ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, तसेच सद्गुरूंसाठी कायमस्वरूपी निवारा असावा’, या उद्देशाने त्याला मठाची स्थापना करायची होती. यासाठी तो त्या मोकळ्या पटांगणाकडे एकटक पहात उभा होता.

३ आ. सद्गुरूंसाठी मठ बांधून होईपर्यंत त्यांचे अस्थीविसर्जन न करण्याची
प्रतिज्ञा करून गुरूंच्या अस्थी एका भक्ताच्या पडक्या घरात सांभाळून ठेवणे

मठाची स्थापना करण्याचा उद्देश यशस्वी व्हावा, यासाठी त्याने मनातल्या मनात प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत मी माझ्या सद्गुरूंच्या निवार्‍यासाठी मठ बांधत नाही, तोपर्यंत मी त्यांचे अस्थीविसर्जन करणार नाही. त्याप्रमाणे त्याने सद्गुरूंचा दहनविधी आटोपल्यावर त्यांच्या अस्थी वराहनगरमधील श्रीरामकृष्णांच्या एका भक्ताच्या पडक्या घरात (सांप्रतकाळच्या वराहनगर मठात) ताम्रकलशामध्ये सांभाळून ठेवल्या होत्या. नरेंद्रने त्याच्या जीवनातील व्यष्टी ध्येयामध्ये ठरवलेल्या अनेक टप्प्यांपैकी हा प्रथम आणि प्रमुख टप्पा होता.

३ इ. सर्वसंगपरित्याग करण्यास उत्सुक असलेले
अनेक पाश्चात्त्य अनुयायी लाभल्याने स्वामी विवेकानंद
या रूपाने ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ या व्यष्टी ध्येयाकडे वाटचाल होणे

नरेंद्रने ‘सत्‌शिष्य’ या नात्याने आणि ‘स्वामी विवेकानंद’ या रूपाने जेव्हा सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या ज्ञानरूपी वारसाने ‘सनातन हिंदु धर्मा’चे तेज संपूर्ण विश्वभरात प्रस्थापित केले, तेव्हा साहजिकच त्याला अनेक पाश्चात्त्य अनुयायी सर्वसंगपरित्याग करून गुरुकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यरूपाने लाभले. यातून स्वामींच्या मनात घोळत असलेले ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ या व्यष्टी ध्येयातील ‘एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वाला जाणार’, असे त्यांच्या दृष्टीपथास आले.

३ ई. बेलूर गावी गंगाकिनारी अतिशय रम्य ठिकाणी मठ बांधण्याचे निश्चित होणे

गंगाकिनारी बेलूर गावी ७ एकर मोकळी भूमी स्वामींच्या मनात पूर्वीपासूनच भरलेली होती. ती भूमी सखल नव्हती; परंतु नदीकिनारी असल्याने आणि वृक्ष-वनस्पतींमुळे नटल्याने ते स्थान अतिशय रम्य होते. त्यामध्ये एका कोपर्‍यात एक जुनी इमारतही होती. ती तात्पुरती रहाण्यायोग्य करून स्वामींनी विस्तीर्ण भूमीवर मठ बांधायचे निश्चित केले.

बेलूर गावातील मठाचा रम्य परिसर
बेलूर गावातील मठाचा रम्य परिसर

३ उ. स्वामींच्या विदेशी अनुयायांनी मठासाठी लागणारा व्यय
अर्पण करणे आणि हरिप्रसन्न या अभियंत्याने मठाची वास्तू उभारण्याचे दायित्व घेणे

स्वामींच्या विदेशी शिष्या कु. हेन्रिएटा मूलर यांनी मठासाठी लागणार्‍या भूमीची किंमत ३९ सहस्र रुपये स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि त्यासमवेत दुसर्‍या विदेशी शिष्या श्रीमती ओलि बुल यांनी बांधकामासाठी ६० सहस्र रुपये व्यय करण्याची सिद्धता दर्शवली. साधारण १ लक्ष रुपयांची सोय गुरुकृपेमुळे झाली होती. त्याच कालावधीत सद्गुरु श्रीरामकृष्णांचे अभियांत्रिक झालेले शिष्य हरिप्रसन्न आपल्या पदाचा राजीनामा देऊन ‘श्रीरामकृष्ण मिशन’मध्ये भरती झाले होते. त्यांना स्वामींनी ब्रह्मचारी पदाची दीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामी विरजानंद’ असे केले आणि त्यांच्याकडे मठाची वास्तू उभारण्याचे दायित्व सोपवले.

 

४. व्यष्टी ध्येयाकडून समष्टी ध्येयाकडे वाटचाल

४ अ. मठाच्या बांधकामास आरंभ करतांना कलकत्त्याला
‘प्लेग’च्या साथीने माणसे मृत्यूमुखी पडल्याने व्यष्टी आणि समष्टी
ध्येयाच्या संदर्भात प्रश्न पडणे, स्वामी विवेकानंदांनी गुरूंची शिकवण
आठवून आपत् प्रसंगात व्यष्टी ध्येयापेक्षा समष्टी ध्येयाला अधिक महत्त्व देणे

स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाच्या बांधकामासाठी लागणारी पूर्वसिद्धता पूर्ण केली. बांधकामाला आरंभ कधी करायचा, याचा ते विचार करत होते. त्या वेळी स्वामींपुढे धर्मसंकट उभे राहिले. हे संकट म्हणजे त्यांची सत्त्वपरीक्षाच होती. या वेळी कलकत्त्याला ‘प्लेग’च्या साथीने थैमान घातले होते. या संसर्गजन्य रोगामुळे सभोवतालची माणसे पटापट मृत्यूमुखी पडत होती. त्यामुळे स्वामींसमोर ‘प्राप्त परिस्थितीत ‘मी गुरूंसाठी मठ बांधण्याच्या व्यष्टी ध्येयाकडे लक्ष द्यावे कि गुरूंनी शिकवल्यानुसार ‘शिवभावे जीवसेवा !’ या न्यायाने समष्टी स्तरावरील कार्याला वाहून घ्यावे ?’, असा प्रश्न पडला. स्वामी विवेकानंदांनी आपत् प्रसंग उद्भवल्यावर स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘गुरूंपेक्षा गुरूंचे कार्य करणे केव्हाही सर्वश्रेष्ठच आहे.’ त्यामुळे त्यांनी ‘गुरूंसाठी मठ बांधणे’, या व्यष्टी ध्येयाला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला.

४ आ. स्वामी विवेकानंदांनी गुरुबंधूंना समवेत घेऊन ‘प्लेग’
सारख्या संसर्गजन्य रोगाने पिडीत लोकांची सेवा करण्यास आरंभ करणे

स्वामी विवेकानंदांनी आपत् प्रसंगात गुरूंच्या कार्याला म्हणजेच ‘शिवभावे जिवसेवा !’ या समष्टी ध्येयाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि तडकपणे गुरुबंधूंना समवेत घेऊन या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. यामध्ये रुग्णांची शुश्रूषा कशी करायची, गावाबाहेर छावण्या कशा उभ्या करायच्या, औषधे, वस्त्रे इत्यादींचा पुरवठा कसा करायचा, अशा समस्यांमध्ये स्वामींनी जातीने लक्ष घातले आणि गुरुबंधूंना समवेत घेऊन ‘प्लेग’सारख्या संसर्गजन्य रोगाने पिडीत लोकांची सेवा केली.

४ इ. समष्टी कार्यासाठी लागणारा वाढीव निधी उभा करण्याविषयी प्रश्न
गुरुबंधूंनी विचारताच मठासाठी मिळालेली भूमी विकून पैसा उभा करण्यास सांगणे, तसेच
‘संन्याशांचे जेवण भिक्षा मागून आणि विश्राम झाडाखालीच असायला हवा’, याची जाणीव करून देणे

स्वामींनी अकस्मात चालू केलेल्या या समष्टी कार्याचा आवाका फारच मोठा होता. केवळ एवढेच नव्हे, तर दिवसेंदिवस त्याची व्याप्तीसुद्धा वाढत गेली. तेव्हा ‘भावी योजना आखतांना आणि त्या प्रत्यक्षात आणतांना आवाक्याबाहेर व्यय येईल’, असे सर्वांच्या लक्षात आले. त्याप्रसंगी स्वामींना गुरुबंधूंनी ‘या कार्यासाठी लागणारा वाढीव निधी कुठून आणणार ?’ असा प्रश्न केला. यावर स्वामी ताडकन् उत्तरले, ‘का ? मठासाठी नुकतीच विकत घेतलेली भूमी आपल्याकडे आहे ना ? ती विकून आपल्याला आवश्यक असा निधी उभा करता येईल !’ शेवटी लौकिक दृष्टीने आपण कितीही मोठे दिसत असलो, तरी आपण संन्यासीच आहोत ना ? तेव्हा आपले जेवण भिक्षा मागून आणि विश्राम झाडाखालीच असायला हवा !’

४ ई. सद्गुरु श्रीरामकृष्णांनी स्वामींना अंतःप्रेरणा देऊन
समाजासमोर साहाय्यासाठी आवाहन करण्यास सांगणे आणि स्वामींनी त्यानुसार
जनसमुदायासमोर भाषण देऊन साहाय्यासाठी आवाहन केल्यावर उदंड प्रतिसाद मिळणे

स्वामींनी ‘वेळप्रसंगी गुरूंच्या मठाची जागा आवश्यकता पडल्यास विकूया’, असा धाडसी निर्णय घेतल्यामुळे गुरुकृपेचा ओघ त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात आकृष्ट झाला; पण स्वामींवर मठाची भूमी विकण्याची वेळ आलीच नाही. या वेळी सद्गुरु श्रीरामकृष्णांनी स्वामींना अंतःप्रेरणा देऊन समाजासमोर साहाय्यासाठी आवाहन करण्यास सुचवले. स्वामींनी त्यानुसार तडकपणे एक प्रकट भाषण देऊन उपस्थित जनसमुदायाकडे साहाय्यासाठी आवाहन केले. विशेष म्हणजे जनसामान्यांनीसुद्धा त्याला उत्कट प्रतिसाद दिला आणि स्वतःचा खारीचा वाटा उचलून आवश्यक ते साहाय्य तत्परतेने उपलब्ध करून दिले.

 

५. गुरुकृपेमुळे समष्टीसमवेत व्यष्टी ध्येयपूर्ती होणे

५ अ. स्वामी विवेकानंदांनी काळानुरूप घेतलेल्या अचूक निर्णयामुळे
‘समष्टी ध्येय’ साध्य करतांना गुरुकृपेमुळे ‘व्यष्टी ध्येय’ही साध्य करता येणे

स्वामी विवेकानंदांनी काळानुरूप घेतलेल्या अचूक निर्णयामुळे ‘समष्टी ध्येय’ साध्य करत असतांना कार्यासाठी लागणार्‍या आवश्यक धनाची चिंता मिटली. तसेच व्यष्टी ध्येयामध्ये आलेली अडचण म्हणजे बेलूर मठाचे बांधकाम रहित करावे लागणार होते, तेसुद्धा अल्पकाळात पूर्णत्वाला गेले. अशा प्रकारे स्वामींना त्यांची दोन्ही नियत ध्येये गुरुकृपेमुळे एकाच वेळी साध्य करता आली.

बेलूर मठ
बेलूर मठ

५ आ. स्वामी विवेकानंदांनी व्यष्टी ध्येयपूर्तीच्या
प्रसंगी गुरुऋणातून अंशतः मुक्त झाल्याचा आनंद उपभोगणे

शेवटी स्वामींच्या जीवनातील व्यष्टी ध्येय साध्य होण्याचा मंगल दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे ९ डिसेंबर १८९८ हा होय. या दिवशी स्वामींनी प्रातःकाळी गंगास्नान आटोपून रहात्या ठिकाणी देवघरात प्रवेश केला. पूजकाच्या आसनावर बसून फुलाच्या परडीतील फुले आणि बेलपत्रे एका ओंजळीत घेऊन सद्गुरु श्रीरामकृष्णांच्या पादपद्मी अर्घ्य प्रदान केले आणि थोडा वेळ ते गंभीर ध्यानमग्न अवस्थेत बसून राहिले.

५ इ. स्वामींनी ताम्रकलशामध्ये जपून ठेवलेल्या सद्गुरूंच्या अस्थी
उजव्या खांद्यावर घेऊन संन्यासी आणि शिष्यगणांसमवेत नूतन मठाच्या वास्तूकडे जाणे
अन् 
वाजत-गाजत जातांना गंगातटभूमीही त्या तालावर नृत्य करत असल्याचे जाणवणे

काय अपूर्व दृष्य होते ते ! त्या वेळी त्यांच्या आत्मप्रभामंडित स्निग्धोज्ज्वल कांतीने सारे मंदिर एका अलौकिक तेजाने भरून गेले होते. पूजन आणि ध्यान आटोपल्यावर स्वामींनी इतर संन्यासी अन् शिष्यगण यांच्यासमवेत नूतन मठाच्या वास्तूच्या ठिकाणी जाण्याची सिद्धता चालू केली. स्वामीजी ताम्रकलशामध्ये जपून ठेवलेल्या सद्गुरूंच्या अस्थी उजव्या खांद्यावर घेऊन पुढे निघाले, तेव्हा इतर संन्यासी आणि भक्तमंडळी शंख, घंटा, टाळ, मृदुंग घेऊन वाजत-गाजत त्यांच्यासमवेत नूतन मठाच्या वास्तूकडे निघाले. ‘या ध्वनीने सारी गंगातटभूमी निनादली आणि जणू ती त्या तालावर नृत्य करू लागली आहे’, असे सर्वांना जाणवू लागले.

५ ई. सद्गुरूंना अस्थीकलश स्वरूपात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नूतन मठामध्ये जाणे आणि पूर्वी सद्गुरूंनी
‘तुझ्या इच्छेनुसार खांद्यावरून कुठेही घेऊन जा’, असे सांगितल्याची आठवण होणे

या आनंदमय आणि मंगलमय प्रसंगी स्वामींनी त्यांच्यासमवेत असलेल्या एका शिष्याला त्यांचा सद्गुरूंशी झालेला संवाद सांगितला. ते म्हणाले, ‘सद्गुरूंनी सांगितले होते, ‘‘तू मला खांद्यावर घेऊन तुझ्या इच्छेनुसार नेऊन बसवशील, तेथे मी बसेन, मग ती कुडाची झोपडी असो किंवा झाडाखालची मोकळी जागा असो.’’ त्यांच्या कृपाशीर्वादाने आज मी त्यांना अस्थीकलश स्वरूपात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नूतन मठामध्ये जात आहे.’

५ उ. श्रीरामकृष्णांच्या अस्थीकलशाचे नूतन मठाच्या वास्तूमध्ये पूजन होणे

नूतन बेलूर मठाच्या वास्तूमध्ये पोहोचल्यावर स्वामींनी श्रीरामकृष्णांचा अस्थीकलश सुयोग्य जागी ठेवला. तेथे स्वतःच्या हातांनी त्यांनी अस्थीकलशाचे पूजन केले. नंतर स्वतःच्या हातांनी पायस (खीर) बनवून श्रीरामकृष्णांना नैवेद्य दाखवला. शेवटी साष्टांग प्रणिपात करून त्यांनी श्रीरामकृष्णांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त करून या मंगलमय प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून पुढील स्वरूपाचे मनोगत व्यक्त केले.

 

६. स्वामी विवेकानंदांनी व्यष्टी ध्येयपूर्तीच्या आनंद सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केलेले मनोगत !

स्वामी विवेकानंदांनी व्यष्टी ध्येयपूर्तीच्या आनंद सोहळ्याच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पुढील स्वरूपाचे उद्गार काढले. ‘जोपर्यंत श्रीरामकृष्णांच्या नावावर त्यांचे अनुयायी पवित्रता, आध्यात्मिकता आणि मानवमात्रांवरील समान प्रीतीचे आदर्श यांचे रक्षण करू शकतील, तोपर्यंत श्रीरामकृष्ण या मठाला आपल्या निवासाने धन्य करतील !’ अशाप्रकारे स्वामींनी ठरवलेल्या व्यष्टी ध्येयामधील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होत असतांना गुरुऋणातून स्वतःची मुक्तता करून घेतली.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment