भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !

 

१. त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।

‘त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी (बाबांनी) एका भजनात त्यांच्या गुरूंना उद्देशून म्हटले आहे. ते भजन बाबांनाही लागू पडते. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे गृहस्थाश्रमी असूनही अंतस्थ योगीराजच होते ! साधक आणि भक्त यांचा उद्धार करण्यासाठी बाबा अवतरले. तो दिवस म्हणजे ७ जुलै १९२०.

 

२. प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्यावस्थेत तळमळीने केलेली गुरुसेवा

शिष्यावस्थेत असतांना ‘गुरु’ आणि गुरुपदावर असतांना ‘भक्त’, या २ शब्दांतच जणू बाबांचे सारे जीवन सामावले होते. शिष्य असतांना गुरु वहाणा न घालता बाहेर जायला निघाले की, लगेच त्यांच्या वहाणा काखेत धरून त्यांच्या पाठी अनवाणी चालणे, भजनांच्या कार्यक्रमात ‘गुरूंनी उठण्यास सांगितले नाही’; म्हणून सलग ८ – १० घंटे भजने म्हणणे, गुरूंसमोर तासन्तास एका पायावर उभे राहून भजने म्हणणे, रात्री गुरूंच्या झोपण्याच्या वेळी त्यांनी ‘थांब’ म्हणेपर्यंत अखंडपणे त्यांचे पाय चेपत राहणे, यांसारख्या बाबांच्या गुरुसेवेला तोड नाही. बाबांनी अशा गुरुसेवेतून शिष्यत्वाचा मोठा आदर्शच आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे.

 

३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या जीवनाची त्रिसूत्री : भजन, भ्रमण आणि भंडारा !

३ अ. भजन

प.पू. बाबा म्हणायचे, ‘भजन हेच माझे जीवन आहे.’ बाबांच्या भजनांचे वैशिष्ट्य हे की, आज इतक्या वर्षांनंतरही प्रत्येक साधकाला प्रत्येक प्रसंगात त्या भजनांतून त्याच्या साधनेसाठी आवश्यक असलेला अर्थ उलगडतो ! यासाठीच ‘बाबांची भजने’, हा अनमोल असा प्रासादिक ठेवाच आहे. बाबांनी भजनांच्या माध्यमातून केवळ भक्तीयोगाचीच नव्हे, तर नामसंकीर्तनयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आदी साधनामार्गांचीही शिकवण दिली.

‘प.पू. बाबांची भजने केवळ ऐकल्यामुळेही त्यांतील चैतन्यामुळे अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प होऊन पुढे नाहीसा होतो’, असे बर्‍याच साधकांनी अनुभवले आहे.

३ आ. भ्रमण

भक्तांना सत्संग आणि आनंद मिळावा अन् त्यांना साधनेसाठी मार्गदर्शन व्हावे, यांसाठी ऊन-पाऊस, वादळ-वारा आदी कशाचीही पर्वा न करता आणि प्रसंगी आजारपण असतांनाही प.पू. बाबा अनेक किलोमीटर प्रवास करून भक्तांकडे जात असत. प.पू. बाबांच्या या चैतन्यदायी सहवासाच्या स्मृती आजही भक्तांना भावाने रोमांचित केल्याविना राहात नाहीत.

३ इ. भंडारा

एकदा बाबांच्या गुरूंनी सर्वांना सांगितले, ‘‘कल दिनू के यहा भंडारा है ।’ (बाबांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘दिनकर’ होते. तेव्हा अनेक जण त्यांना ‘दिनू’ असे संबोधत.) बाबा मनात म्हणाले, ‘माझ्याकडे पैसे नाहीत आणि घरात भंडार्‍यासाठी लागणारे सामानही नाही. अशा वेळी भंडारा कसा करणार ?’ तरी बाबांनी ‘गुरु पाहून घेतील’, असा विचार करून भंडारा करायचे ठरवले. गुरूंनी पुष्कळ जणांना भंडार्‍याचे निमंत्रण दिले. नंतर गुरूंच्या कृपेने भंडार्‍यासाठीच्या सामानाची सर्व सोय आपोआप झाली आणि भंडार्‍यात काही अल्पही पडले नाही. गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत बाबा उत्तीर्ण झाले. पुढे बाबांनी जवळ विशेष पैसे नसतांनाही असंख्य भंडारे केले आणि भक्तांना शिकवले, ‘गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा आणि गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग करा. मग पाहा, गुरु कृपा करतातच !’

 

४. भक्तांशी समरस झालेले प.पू. भक्तराज महाराज !

सर्वसाधारणतः थोर संत-माहात्मे हे जपजाप्य, ध्यानधारणा, समाधी आदींमध्ये व्यस्त राहतात आणि काही वेळ भक्तांना मार्गदर्शन करतात. बाबांना मात्र भक्तांविना चैनच पडायचे नाही, इतके ते भक्तांशी समरस झाले होते.

 

५. भक्तांना नानाविध पद्धतींनी शिकवणारे प.पू. भक्तराज महाराज !

बहुतेक संत केवळ मार्गदर्शनाच्या माध्यमातून भक्तांना शिकवतात. बाबांच्या भक्तांना शिकवण्याच्या नानाविध पद्धती होत्या. ते मार्गदर्शनाच्या माध्यमातून तर शिकवतच; पण सहज वागण्या-बोलण्यातून, गमतीजमती करून, कधी रागावून, तर कधी शिव्या देऊनसुद्धा भक्तांना शिकवत. इतकेच नव्हे, तर कधी भक्तांनी चुका केल्या, तर बाबा त्यांना मारतही असत. असे असले, तरी भक्तांना त्यांच्या रागावण्यात आणि मारण्यात प्रेमाचा ओलावा आणि भक्तांच्या कल्याणाचीच तळमळ जाणवे. यासाठीच आजही बाबांचे नुसते स्मरण केले, तरी भक्तांचे नेत्र भावाश्रूंनी डबडबल्याविना राहत नाहीत.

 

६. प.पू. भक्तराज महाराजांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेचे ‘वाढता वाढता वाढे’ असे कार्य

प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादात सामर्थ्य किती आहे, हे कळण्यासाठी सनातन संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो.

६ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्यासाठी
दिलेले आशीर्वाद आणि त्यांची फलश्रुती म्हणून सनातन संस्थेचे वर्धिष्णू कार्य

अनेक संत आणि नाडीपट्ट्या (नाडीभविष्य) यांच्यानुसार वर्ष २००७ पासून माझा महामृत्यूयोग चालू आहे.थकव्यामुळे मी माझ्या खोलीच्या बाहेर कुठेही गेलेलो नाही. एवढेच नाही, तर मला चालणेच काय; पण आधाराविना उभे राहणेही आता अशक्य होते. अशा स्थितीत प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे संस्थेकडून जे कार्य आतापर्यंत झाले, त्याची थोडक्यात माहिती सांगतो. ही माहिती अहंकारामुळे सांगत नाही, तर प.पू. बाबांच्या आशीर्वादात किती सामर्थ्य आहे, हे लक्षात यावे, यासाठी सांगतो. वर्ष १९९१ मध्ये प.पू. बाबांच्या आशीर्वादाने सनातन संस्थेची स्थापना झाली. त्यांनीच संस्थेचे नामकरण केले होते. सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचे बीज बाबांच्या संकल्पात आहे; म्हणूनच आज सनातन संस्थेचे कार्य शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे दिवसागणिक वर्धिष्णू होत आहे. प.पू. बाबांनी सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिलेले आशीर्वाद आणि त्यांची फलश्रुती पुढे दिली आहे.

६ अ १. प.पू. बाबांची भजने

बाबांच्या भजनांतून चैतन्य मिळत असल्याने, तसेच भजनांतील चैतन्यामुळे अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प होत असल्यामुळेही साधनेला पूरक म्हणून सर्वत्रचे साधक भजने ऐकतात. त्यामुळे ते सेवा करू शकतात.

६ अ २. गुरुकृपायोग

प.पू. बाबांकडून मी जे काही शिकलो, त्यानुसार मी ‘साधना कशी करायची ?’, यासंदर्भात एक ग्रंथ लिहिला. तो प.पू. बाबांना दाखवला आणि विचारले, ‘‘या साधनामार्गाचे नाव काय ठेवू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नामसंकीर्तनयोग’’ त्यावर मी त्यांना विचारले, ‘‘या साधनामार्गात स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती ही आठ अंगे आहेत. त्यांतील एक आहे ‘नामजप’. यातील सर्व प्रकारच्या साधनेमुळे गुरुकृपा लवकर होण्यासाठी साहाय्य होणार असल्यामुळे याला ‘गुरुकृपायोग’, असे नाव ठेवूया का ?’’ त्यावर प.पू. बाबा एकदम आनंदून म्हणाले, ‘‘हेच नाव ठेवा !’’ प.पू. बाबांनी दिलेल्या या आशीर्वादामुळे सहस्रो साधक आता गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत.

६ अ ३. प.पू. बाबांनी शिकवलेली व्यष्टी आणि समष्टी साधना

साधनेचे दोन प्रकार असतात – एक व्यष्टी साधना आणि दुसरी समष्टी साधना. सनातन संस्था व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवते. व्यक्तीगत साधनेसाठी, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी ‘व्यष्टी साधना’ आणि समाजातील जिज्ञासूंची प्रगती व्हावी अन् त्यातून ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी त्यांनी ‘समष्टी साधना’ शिकवली. समष्टी साधनेसाठीच त्यांनी मला भारतात अनेक ठिकाणी आणि अमेरिकेत जाण्यास सांगितले होते, हे आता माझ्या लक्षात आले. समष्टी साधनेमुळेच आता जगभरचे सहस्रो साधक साधना करत आहेत.

६ अ ४. ग्रंथलिखाणासाठी आशीर्वाद !

वर्ष १९९२ मध्ये प.पू. बाबा मला म्हणाले, ‘माझ्या गुरूंनी मला दिलेला ‘तू किताबों पर किताबें लिखेगा ।’ हा आशीर्वाद मी तुम्हाला देतो.’ त्या आशीर्वादाचे फळ म्हणूनच डिसेंबर २०१९ पर्यंत सनातन संस्थेने संकलित केलेल्या ३२२ ग्रंथांच्या ११ भारतीय आणि ६ विदेशी भाषांत ७८ लाख ५४ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. समाजात ग्रंथ आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रंथ आधुनिक वैज्ञानिक भाषेत आहेत आणि त्यांत विविध विषयांच्या संदर्भात मनात येणार्‍या प्रश्‍नांची, तसेच ‘का आणि कसे ?’, यांची उत्तरे दिली आहेत. अजून १०,००० ग्रंथ प्रकाशित होणे शेष आहे. प.पू. बाबांच्या कृपेने ते कार्य पुढील काही पिढ्या चालू राहण्यासाठी आवश्यक असे साधक प.पू. बाबांच्या आशीर्वादाने तयार होत आहेत.

६ अ ५. रामनाथी आश्रमासाठी आशीर्वाद

वर्ष १९९३ मध्ये गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात बाबांचा गुरुपौर्णिमा महोत्सव झाला. त्या वेळी श्री रामनाथ देवस्थानाच्या बाजूलाच असलेल्या जागेच्या दिशेने हात करत बाबा म्हणाले होते, ‘‘ही सनातन संस्थेच्या भावी आश्रमाची नियोजित जागा आहे. भविष्यात तो आश्रम विश्‍वदीप होईल !’’ खरंच आज याच ठिकाणी सनातन संस्थेचा आश्रम स्थित आहे. या आश्रमात भारतातील, तसेच अन्य देशांतील जिज्ञासू आणि साधक साधनेविषयीचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.

६ अ ६. ध्वनीफिती आणि ध्वनीचित्रफिती

आतापर्यंत ‘विविध देवतांचे नामजप कसे करावे ?’, हे शिकवणार्‍या मराठी भाषेतील, हिंदी भाषेतील ध्वनीफिती आणि ‘धार्मिक कृती कशा करायच्या ?’, हे शिकवणार्‍या सण इत्यादींच्या अन् ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’, ‘वाढदिवस साजरा कसा करावा ?’ इत्यादींच्या ध्वनीचित्रफिती सनातन संस्थेने तयार केल्या आहेत. त्यांतील काही ध्वनीचित्रफिती निरनिराळ्या दूरचित्रवाहिन्यांवरून दाखवण्यात आल्या आहेत.

६ अ ७. भारतभरातील धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आशीर्वाद

प.पू. बाबांनी मला वर्ष १९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत टप्प्याटप्प्याने साधनेचा प्रसार करण्याचे आशीर्वाद दिले. पुढे भारतात सर्वत्र प्रसार करण्यास सांगितले. त्यांच्या आशीर्वादामुळे आज धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढतच आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. प.पू. बाबांच्या प्रेरणेने मुंबईजवळील देवद तसेच गोवा येथे आश्रम स्थापन झाले असून त्यातून प्रेरणा घेऊन मिरज, कर्नाटक, केरळ आणि वाराणसी या ठिकाणी आश्रम निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी सेवाकेंद्रे आहेत. विदेशांतील साधक गोव्यातील रामनाथी आश्रमात येतात.

आ. भारतभरात अनेक ठिकाणी सत्संग चालू आहेत, तसेच प्रतिवर्षी समाजातील जिज्ञासूंसाठी ‘साधना-शिबिरे’ आयोजित केली जातात.

इ. प्रतिवर्षी देशविदेशांत अनेक ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरे केले जातात, तसेच ‘कुंभमेळे’ आणि राज्याराज्यांतील ‘जत्रोत्सव’ यांच्या माध्यमातून धर्मप्रसार केला जातो

ई. भारतातील विविध राज्यांत धर्मसभा होत आहेत.

उ. प्रतिवर्षी ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होते, तसेच वर्षभरात अनेक ‘प्रांतीय हिंदू अधिवेशने’ होतात.

६ अ ८. सनातन संस्थेच्या साधकांची अभूतपूर्व आध्यात्मिक प्रगती

सनातन संस्थेचा एकही साधक सकाम भक्ती करणारा नाही. सर्वांना ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आहे. ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले सनातन संस्थेचे साधक संतपदाकडे मार्गक्रमण करत आहेत. काही साधकांनी संतपद, तर काहींनी सद्गुरुपद गाठले आहे.

६ अ ९. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके

मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांत ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आहेत. दैनिकातील ८ पानांपैकी २ ते ३ पाने अध्यात्म आणि साधना याविषयी असतात.

६ अ १०. विविध संकेतस्थळे

संकेतस्थळांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर धर्मप्रसार होत आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये संकेतस्थळांना भेट देणार्‍यांची एकूण संख्या ५ लाखांहून अधिक आहे.

६ अ ११. अनेक संत सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेले आहेत.

६ आ. विदेशातील कार्यासाठी आशीर्वाद !

१९९५ या वर्षी प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘आता तू अमेरिकेला प्रसारासाठी जा.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘माझे अमेरिकेत कोणी ओळखीचे नाही आणि जाण्यासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊ दे. अमेरिकाच तुझ्याकडे येईल.’’ त्यामुळे आता अमेरिकाच काय, तर जगातील साधक साधना शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात येत आहेत.

६ आ १. विदेशांतील एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) च्या साधकांची अभूतपूर्व आध्यात्मिक प्रगती

विदेशांतील काही  साधक संत आणि सद्गुरु झाले आहेत आणि ६० टक्के अन् त्यापेक्षा अधिक पातळी प्राप्त केलेले साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत.

६ इ. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

पूर्वी भारतात नालंदा आणि तक्षशीला अशी दोन मोठी विश्‍वविद्यालये होती. ‘इतिहास सांगण्यापेक्षा इतिहास घडवावा’, अशी एक शिकवण असल्याने वर्ष २४.३.२०१४ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना करण्यात आली.

अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने केलेल्या संशोधनात बाबांच्या भजनांत पुष्कळ चैतन्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे विविध विषयांवर संशोधन चालू आहे. ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत १५ राष्ट्रीय आणि ४७ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ६२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक शोधनिबंधांचे उपस्थितांनी कौतुक केले आहे. त्यांपैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

१. ९ सप्टेंबर २०१८ (दक्षिण कॅरोलिना, अमेरिका) : ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ – सादरकर्ते – श्री. कृष्ण मंडावा

२. १६ सप्टेंबर २०१८ (पुरी, ओडिशा) : ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ – सादरकर्ते – श्री. शंभु गवारे

३. २० सप्टेंबर २०१९ (बेंगळुरू) : ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम !’ – सादरकर्त्या – सौ. शिल्पा मगदूम

४. १५ नोव्हेंबर २०१९ (जयपूर) : ‘तणावग्रस्त जगात आनंद आणि मनःशांती यांचा शोध’ – सादरकर्त्या – डॉ. स्वाती मोदी

६ ई. सनातन संस्थेच्या सकल कार्यासाठी आशीर्वाद

फेब्रुवारी १९९५ मध्ये एका भक्तांच्या समक्ष बाबा म्हणाले होते, ‘‘सनातन संस्था मी चालवीन !’’ त्यांचे ते बोल अक्षरशः खरे ठरले आहेत. आज सनातन संस्थेवर विविध संकटे येऊनही सनातन संस्थेचे कार्य वाढतच आहे आणि या कार्यासाठी कधीही काहीही अल्प पडलेले नाही.

 

७. प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेची प्रत्यक्ष साक्ष देणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण घटना

आज बाबा देहरूपात नसले, तरी आम्ही सारे जण बाबांच्या कृपेची प्रचीती घेत आहोत.

७ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात आपोआप झालेले पालट

वर्ष २००६ मध्ये सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमातील माझ्या खोलीतील देवघरात बाबांचे छायाचित्र ठेवले होते. त्या छायाचित्रात ऑगस्ट २०१० मध्ये आपोआप पालट झाले. त्या छायाचित्रातील ‘तोंडवळा पांढरट पिवळा आणि जरासा अस्पष्ट होणे’, हे निर्गुण तत्त्वाकडे होणारी वाटचाल दर्शवते, तर ‘प्रभावळ गडद आणि गुलाबी होणे’, हे धर्मप्रसारासाठी आवश्यक असणारी कार्यकारी शक्ती प्रकट झाल्याचे दर्शवते.

७ आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे पादुकांच्या रूपात रामनाथी आश्रमात आगमन

पणजी, गोवा येथील प.पू. बाबांच्या भक्त श्रीमती स्मिता राव यांनी एप्रिल २०१९ मध्ये त्यांच्याकडे असलेल्या प.पू. बाबांच्या पादुका अंतःप्रेरणेने रामनाथी आश्रमात ठेवण्यासाठी दिल्या. ‘पादुकांच्या रूपात बाबाच आले’, असा आम्हा सर्वांचा भाव आहे.

वरील घटनांवरून असे जाणवते की, प.पू. बाबा जणूकाही आम्हाला सांगत आहेत, ‘माझे तुमच्याकडे लक्ष आहे. काळजी करू नका !’

७ इ. देश-विदेशांतील साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात येणार्‍या अनुभूती

भारतातीलच नव्हे, तर विदेशांतीलही कित्येक जिज्ञासू आणि साधक यांनी बाबांना कधीच पाहिलेले नाही, तरीही बाबांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांचा भाव जागृत होतो, तसेच त्यांना प.पू. बाबांविषयी अनेक अनुभूती येतात.

 

८. श्री गुरुचरणी प्रार्थना !

श्री गुरूंची थोरवी कितीही गायली, तरी ती अल्पच असते. ‘प.पू. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच अखंड राहावी आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.’

– शिष्य डॉ. जयंत आठवले

1 thought on “भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !”

Leave a Comment