नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)

वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

समुद्राचे पूजन

नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.

१. नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व !

१ अ. नारळी पौर्णिमेला समुद्राला फुले आणि श्रीफळ अर्पण करण्याचे महत्त्व

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात.

१ आ. पर्जन्याची वृष्टी केल्याविषयी वरुणदेव
आणि समुद्रदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे वरुणदेवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुणदेवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

१ इ. निसर्गाचा समतोल राखल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. समुद्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त होते.

१ ई. नद्या आणि समुद्र यांच्या पूजनामुळे आपतत्त्वाच्या उपासनेचे लाभ होणे

नद्या किंवा समुद्र यांच्या पूजनामुळे वरुणदेवाची पूजा होऊन आपतत्त्वाच्या स्तरावरील साधना पूर्ण होते. आपतत्त्वाच्या उपासनेमुळे मनाची निर्मळता वाढण्यास साहाय्य मिळते. तसेच नद्या आणि समुद्र यांच्यातील औदार्य आणि व्यापकता हे गुण आपल्या अंगी वाढीस लागतात.

१ उ. अहंकाराच्या बळावर नव्हे तर,विनम्रता आणि समर्पित भावाने
महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे नारळी पौर्णिमेच्या उदाहरणातून सिद्ध होणे

कुणालाही आश्‍चर्य वाटू शकते की, विशाल समुद्राला केवळ लहानसा नारळ अर्पण केल्यावर तो त्याचे विक्राळ रूप शांत कसे करतो. ही किमया हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेत दडलेली आहे. नारळ हा श्रीफळ, म्हणजे शुभफळ असल्यामुळे त्याकडे ब्रह्मांडातील समस्त चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात. हा नारळ नुसता समुद्राला न देता, समुद्रदेवाला संपूर्ण शरण जाऊन समर्पित भावाने अर्पण केल्यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतो. यावरून आपल्या हे लक्षात येते, देव भावाचा भुकेला आहे. त्यामुळे तो वस्तूने प्रसन्न होत नसून वस्तू अर्पण करण्यामागे कार्यरत असणार्‍या भावाने प्रसन्न होतो. भावामुळे भगवंत भक्ताला वश होतो. कलियुगातील विज्ञानवादी मानव वैज्ञानिक प्रगती करून निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे निसर्ग मनुष्याच्या आधीन तर झालेलाच नाही, उलट तो मानवावर कृद्ध झालेला आहे. हिंदु संस्कृतीची शिकवण कुणावर वर्चस्व स्थापन करण्याची नसून महाशक्तीला शरण जाऊन तिचे वर्चस्व स्वीकारून तिचे पूजन करण्याची आहे. त्यामुळे निसर्गासारखी महाशक्ती निसर्गोपासक कर्महिंदूंवर प्रसन्न होऊन त्यांच्यासाठी अनुकूल बनते आणि त्यांच्या आधीन होते. अहंकाराच्या बळावर नव्हे तर, विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे मनुष्याच्या लक्षात येईल, तेव्हा खर्‍या अर्थाने मनुष्याची प्रगती झाली, असे म्हणता येईल.

१ ऊ. सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ यांचे भाष्य

‘या दिवशी अधिकाधिक प्रमाणात ब्रह्मांडात कार्य करणार्‍या आपतत्त्वाच्या लहरी वायूमंडलात (वातावरणात) भ्रमण करत असतात. वरुणदेवतेच्या पूजनाने या आपतत्त्वात्मक लहरींचा लाभ आपल्याला मिळतो. तसेच ब्रह्मांडातील चैतन्य अल्प कालावधीत या आपतत्त्वाच्या प्रवाहाबरोबर आपल्यात (देहात संक्रमित करणे) येणे शक्य होते. या दिवशी आपतत्त्वरूपी वायूमंडलाचे प्रमाण सागरी किनारा, तसेच नदीकाठ यांठिकाणी जास्त प्रमाणात असते. म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. या दिवशी वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्त्वस्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो.’ – सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सद्गुरू (सौ). अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

२.समुद्र पूजन करायची पद्धत

२ अ. समुद्राचे पूजन

श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.

२ आ. नारळी पौर्णिमच्या दिवशी करायची प्रार्थना

‘नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे, तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे, यांमुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. तसेच ‘तुझ्या रौद्ररूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे समुद्राला येणार्‍या भरतीचे प्रमाण अल्प होते.’

समुद्रदेव रत्नाकर आहे. आम्हा साधकांमध्येही सद्गुणांच्या रत्नांची वृद्धी होवो आणि समुद्रदेवाने मनुष्यासह संपूर्ण प्राणीमात्रांवर अशीच कृपादृष्टी ठेवावी, ही समुद्रदेवाच्या चरणी प्रार्थना आहे.

२ इ. समुद्राला नारळ अर्पण कसा कराल ?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; त्यामुळे तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा अन् वरील प्रार्थना करावी !

३. नारळी पौर्णिमेला नारळाचे पूजन करून
तो समुद्रदेवतेला अर्पण करणे या प्रक्रियेचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

खालील चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

१. ‘समुद्रदेवतेला भावपूर्ण वंदन केल्याने व्यक्तीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे

२. (श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यापूर्वी त्याचे पूजन करण्यात येते.) श्रीफळाचे पूजन केल्याने त्यात परमेश्वरी तत्त्वाचे वलय कार्यरत होणे

३. नारळात चैतन्याचे वलय कार्यरत होणे

३ अ. समुद्रदेवतेला शरणागत भावाने नारळ अर्पण केल्यामुळे चैतन्याचा प्रवाह समुद्राकडे प्रक्षेपित होणे

४. समुद्रदेवतेचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्त्वाचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होणे

४ अ. अप्रकट स्वरूपातील परमेश्वरी तत्त्व वलयाच्या स्वरूपात प्रकट होऊन कार्यरत होणे

५. वरुणतत्त्व वलयाच्या स्वरूपात कार्यरत असणे

समुद्रदेवतेचे, म्हणजे वरुणदेवतेचे पूजन केले जाते. त्यामुळे वरुणतत्त्व वलयाच्या स्वरूपात कार्यरत असते.

निर्गुण तत्त्व

६. निर्गुण तत्त्व समुद्रामध्ये अधिक प्रमाणात वलयाच्या स्वरूपात कार्यरत असणे

६ अ. निर्गुण तत्त्वात्मक कण वातावरणात पसरणे

७. ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह आकृष्ट होणे

७ अ. आनंदाचे वलय समुद्रात निर्माण होणे

७ आ. आनंदाचा प्रवाह व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे

७ इ. आनंदाचे वलय व्यक्तीमध्ये निर्माण होणे

८. चैतन्याचा प्रवाह ईश्वराकडून समुद्रात आकृष्ट होणे

८ अ. चैतन्याचे वलय निर्माण होणे

८ आ. चैतन्याच्या प्रवाहाचे व्यक्तीकडे प्रक्षेपण होणे

८ इ. चैतन्याचे वलय निर्माण होणे

शक्ती

९. शक्तीचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होणे

९ अ. शक्तीचे वलय निर्माण होणे

९ आ. शक्तीच्या प्रवाहाचे व्यक्तीकडे प्रक्षेपण होणे आणि शक्तीचे वलय निर्माण होणे

९ इ. शक्तीचे कण कार्यरत असणे

१०. व्यक्तीवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment