सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २)

Article also available in :

अनुक्रमणिका

४. व्यासांचे अमूल्य कार्य

५. महर्षि व्यासांचे महत्त्व

६. श्रीकृष्णाने व्यासांचे केलेले कौतुक


 

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. असे परमवंदनीय महर्षि व्यास यांची विविध नावे, अलौकिक ग्रंथकार म्हणून त्यांचे कार्य, त्यांचे श्रीकृष्णाने केलेले कौतुक यांविषयीचे विवेचन करणार्‍या या लेखाचा दुसरा भाग आता आपण पाहूया.

 

४. व्यासांचे अमूल्य कार्य

अ. राष्ट्रीय अभ्युत्थानासाठी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन करणारे

अज्ञात अतीतापासून वर्तमानापर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एक प्रचंड देशकाल व्यासांच्या विशाल दृष्टीपुढे उभा होता. राष्ट्र सुखी, संपन्न आणि सर्वांगी परिवर्धित व्हायचे, तर आधी राज्यातली राजनीती सुरक्षित राहिली पाहिजे. त्यासाठी राजा नीतीमान, चारित्र्यवान, समर्थ आणि सर्वार्थी सावधान असला पाहिजे. जर राजा समर्थ नसेल, तर दुष्ट-दुर्जन सज्जनांना खाऊन टाकतील आणि धर्माची नौका बुडून जाईल. राष्ट्राचा म्हणून एक सामान्य धर्म असतो आणि तो शासनाच्या दक्षतेवर आणि सुव्यवस्थेवर आधारलेला असतो; म्हणून व्यासांनी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन केले आहे.

आ. इहलोकी कर्मवाद, दैववाद आणि अध्यात्म यांचा संगम साधून धर्माची घडी बसवणारे

‘देशकालपरिस्थितीत व्यक्ती, राष्ट्र, समग्र जीवन, लोक आणि परलोक या सर्वांचे धारणपोषण करतो, तो धर्म होय’, अशी व्यासांची धर्मव्याख्या आहे. लोकस्थितीचे सनातन बीज म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे केवळ स्वर्ग-मोक्षाचा विचार नव्हे, तर या व्यावहारिक जगात लोकधारणा करतो, लोकांना सुखी, समृद्ध, परस्परपूरक, नीतीप्रवण आणि पुरुषार्थी बनवतो, तो धर्म होय. व्यास इहलोकी कर्मवाद, दैववाद आणि अध्यात्म किंवा आत्मतत्त्व यांच्यावर विश्वास ठेवतात. मानवी ऐहिक जीवनाचे वार्ता किंवा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र किंवा दंडनीती हे दोन आधारस्तंभ आहेत. अर्थावाचून जगात पान हालत नाही आणि हा मानवी अर्थ राजधर्माश्रित आहे; म्हणून राजाने योग्य प्रकारे नीतीला अनुसरून शासन चालवावे आणि माणसाने उद्यमशील रहावे. जो अर्थलाभ करून घ्यायचा तो स्वाभिमान जागृत ठेवून साधावा. अप्रतिष्ठेच्या मार्गाने माणसाने कोणत्याही वस्तूची आकांक्षा धरू नये. भीक मागणार्‍याचा मार्ग किंवा लुटारूपणाचा मार्ग अप्रशस्त होय. मग त्यात कितीही अर्थलाभ व्हायचा असो. श्रमार्जित लाभ, हेच तत्त्व माणसाने सदैव डोळ्यांपुढे ठेवावे.

इ. भिन्न लोकांचे यजनसंप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणारे कृष्णद्वैपायन

हिंदुस्थानच्याच नव्हे, तर जगाच्या वाङ्मयात अत्यंत थोर अशी व्यक्ती म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास हीच होय. वाङ्मयाद्वारे जगाचे एकीकरण घडवून आणणारा पुरुष जगात व्यासांव्यतिरिक्त दुसरा झालाच नाही.

ऋग्वेद हा पंजाबातील सोमयाजींचा (सोमयाग करणार्‍यांचा) संप्रदाय होता. यजुर्वेद हा दक्षिणेकडील पशुयाग करणार्‍यांचा संप्रदाय होता. सामवेद हा अत्यंत प्राचीन सत्रसंस्था (१३ पासून १०० दिवसांपर्यंत यज्ञयाग जिथे होतात अशा संस्था) चालविणार्‍यांचा संप्रदाय होता, तर ‘अथर्ववेद हा मगधातील प्राचीन मगांच्या परंपरेचा विकास होय’, असे शोधाअंती दिसून येईल. या भिन्न लोकांचे यजनसंप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणे, ही क्रिया व्यासांनी केली आणि त्या क्रियेचे फल म्हणजे आजची वेदचतुष्टयीची रचना हे होय. या रचनेमुळे प्रत्येक वेद भिन्न धर्म न रहाता एकाच मोठ्या समवाय (समन्वय करणार्‍या) धर्माचे अंग बनला. सर्व ठिकाणच्या लोकांचे संग्रहण, हे त्यांच्या विद्येचे संग्रहण केल्याने होते आणि ‘संप्रदायभिन्नतेमुळे होणारा विरोधसुद्धा या संग्राहक कृतीने काढून टाकता येतो’, हे समाजशास्त्रीय तत्त्व व्यासांनी जाणले आणि आपल्या थोर कार्याची उभारणी केली.

विविध उपासनासंप्रदाय अन् त्यांचे वाङ्मय यांचे एकत्रिकरण करणारे पुराणाचे आद्यकर्ते

व्यासांना असेही दिसून आले की, सामान्य लोकांत यज्ञधर्माचा प्रसार नाही, तर सामान्य लोकांचा धर्म निराळाच आहे. सामान्य जनतेस मान्य अशी विविध स्थानिक दैवते आहेत; तीर्थस्थाने आहेत; पवित्र झालेले प्रदेश आहेत; वीरकथा अन् राक्षसमर्दनाच्या कथा स्थानोस्थानी आहेत; शिव, श्रीविष्णु, देवी या तीन देवतांच्या उपासना चोहोकडे आहेत आणि या सर्व गोष्टींस साहाय्यक होईल, असे प्राचीन वाङ्मय सूतवर्गाने बरेचसे संरक्षून ठेवले आहे. या परिस्थितीत केवळ हवि अर्पण करणार्‍या लोकांच्या धर्मकर्माच्या एकीकरणाने जनतेचे ऐक्य घडविण्याचा कार्यभाग होणार नाही, तर सामान्य लोकांचे उपासनासंप्रदायसुद्धा एकत्रित केले पाहिजेत अन् त्यांचे वाङ्मयही एकत्रित झाले पाहिजे. या दृष्टीमुळे व्यासांनी चोहोकडच्या साहित्याचे एकीकरण करण्यास प्रारंभ केला. त्यांनी जे काय आरंभिले, ते कार्य अनेक अनुयायांकडून पुढे वृद्धींगत झाले अन् त्यामुळे सर्व पुराणांचे आद्यकर्ते अशी त्यांची प्रसिद्धी झाली.

 

५. महर्षि व्यासांचे महत्त्व

अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदीगुरु व्यासांचे पूजन प्रथम

व्यासांच्या महान ग्रंथरचनेमुळे त्यांना आदीगुरु म्हणतात. (शैव संप्रदायानुसार शिवाला, तर दत्त संप्रदायानुसार दत्ताला आदीगुरु म्हणतात.) आषाढ पौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिष्यमंडळी गुरुपौर्णिमा साजरी करतात. या प्रसंगी व्यासांचे पुण्यस्मरण म्हणून गुरुपूजनापूर्वी व्यासपूजन करतात.

आ. ईश्वरभक्तीरूप वाणीने सभेत बोलण्याचे स्थळ म्हणजे व्यासपीठ

सभेत बोलणारा वक्ता ज्यावर उभा असतो, त्याला व्यासपीठ म्हणतात. ‘व्यासपिठावर बसणार्‍या व्यक्तीने काही पथ्ये पाळायची असतात. सर्वांत प्रथम व्यासपिठावरून व्यासांना अमान्य असा एकही विचार बोलता कामा नये; म्हणून व्यासपिठावर बसणार्‍याने साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. व्यासपिठावरून कोणाची अकारण निंदा किंवा स्तुती करता कामा नये. व्यासपिठावर बसणारा माणूस श्री सरस्वतीचा खरा उपासक असला पाहिजे. त्याची वाणी वाङ्मयीन विलास म्हणून नव्हे, तर ईश्वरभक्तीच्या रूपात वाहिली पाहिजे. त्याची वाणी व्यासांप्रमाणे सरळ, स्पष्ट, सखोल आणि समाजोन्नतीसाधक असली पाहिजे.’

 

६. श्रीकृष्णाने व्यासांचे केलेले कौतुक

मुनीनामप्यहं व्यासः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३७’, म्हणजे मुनींमध्ये मी व्यास आहे’, असे म्हणून श्रीकृष्णाने व्यासांचे महत्त्वच दर्शवले आहे.

 

या लेखाच्या पहिल्या भागात पुढील माहिती दिली आहे –

महर्षि व्यास यांची विविध नावे

१. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड असणार्‍या व्याससाहित्याचे अलौकिक ग्रंथकार महर्षि व्यास !
२. व्यासचर्या

‘सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्मग्रंथ’

Leave a Comment