एकमेवाद्वितीय महर्षि व्यास

१. महर्षि व्यास यांची विविध नावे

व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत. कृष्णद्वैपायन असेही जोडनाव रूढ आहे. त्यांनी वेदान् विव्यास म्हणजे वेदांचे विभाग केले, म्हणून त्यांना व्यास असे संबोधित. पराशरपुत्र म्हणून त्यांना पाराशर्यही म्हणत. व्यासांचा उल्लेख करतांना भगवान व्यास असे म्हणण्याचा विद्वज्जनांत परिपाठ आहे. श्री शंकराचार्य त्यांना तशाच उपाधीने उल्लेखीत. त्यांना महर्षि असेही म्हटले जाते.

 

२. अलौकिक ग्रंथकार

वेदव्यासांनी चार वेद, अठरा पुराणे, गीता, श्रीमद्भागवत, महाभारत इत्यादी रचलेली हीच ती परमपवित्र तपोभूमी जी व्यासगद्दी या नावाने ओळखली जाते.

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । म्हणजे जगातले सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे करून सोडले आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. भूमितीमध्ये व्यास म्हणजे वर्तुळातील सर्वांत मोठी आतली रेषा. व्यासांचे वाङ्मयही तसेच सर्वांत मोठे आहे. (जसे व्यासाने परिघाचे सर्व बिंदू स्पर्शिले जातात, तसाच व्यासांनी सर्व विषयांना स्पर्श केला आहे. केवळ स्पर्शच केला नाही, तर त्यांचे सखोल विवरण केले आहे.) त्यांना श्रीविष्णूचा ‘ज्ञानावतार मानतात.

वर्तुळाच्या मध्यबिंदूतून दोन्ही अंगांच्या (बाजूच्या) परिघाला जोडणारी रेषा म्हणजे व्यास. त्याप्रमाणे या सृष्टी (वर्तुळ) चक्राचा विभाजन करणारे व्यास. हे दोन्ही अंगांना स्पर्श करतात. ही दोन अंगे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृृत्ती. असे असूनही ते त्या दोन्हींपासून अलिप्त असतात; म्हणून त्यांना व्यास, असे म्हणतात.

– जगद्गुरु श्री शंकराचार्य, करवीरपीठ, कोल्हापूर.

युगायुगातून एखाद्याच वेळी अशी विभूती जन्माला येते. व्यासांचा जन्म भारतात झाला, ही गोष्ट भारतीय जनतेला अनंत कालपर्यंत अभिमानास्पद राहील. आजवर जगात असा दिव्योदात्त, विद्वान आणि साहित्यकार झाला नाही आणि होणार नाही, असे म्हटले, तर त्यात अतिशयोक्ती वाटण्याचे कारण नाही. वेदोत्तर कालापासून ते आजतागायत व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. भारतीय संस्कृतीचे सर्वांगांनी यथावत ज्ञान करून घ्यायचे, तर व्यासरचित ग्रंथांचे अध्ययन करणे अपरिहार्य आहे. व्याससाहित्य हा भारतीय संस्कृतीचा मेरुदंड आहे.

 

३. व्यासचर्या

व्यासगद्दी जवळ असलेल्या अक्षय वटवृक्षातील चैतन्य महर्षि व्यासांच्या तपश्‍चर्येची साक्ष देते

व्यासरचित आणि व्याससंपादित पुढील ग्रंथांना मिळून व्यासचर्या असे म्हणतात.

अ.   वेदविभाजन

वेदांचे विषयानुसार विभाजन व्यासांनी केले.

आ. ब्रह्मसूत्रे

महर्षि व्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्रांमध्ये उपनिषदांचा अर्थनिर्णय केलेला आहे.

इ.   पुराणे

व्यास पुराणांचे आद्यकर्ते आहेत. यातील भागवतपुराण सर्वांत महत्त्वाचे आहे.

ई.   महाभारत

व्यासांच्या सर्व ग्रंथसंपदेत आणि वाड्मयकार्यात महाभारताचा महिमा अलौकिक आहे. त्या ग्रंथात अर्थशास्र, धर्मशास्र आणि मोक्षशास्र ही तिन्ही जीवनदर्शने व्यासांनी सुंदर कथांनी सजवून-शोभवून मांडली आहेत. आर्यांचे विस्तृत ज्ञान आणि विशाल लोकजीवन यांचा सुस्पष्ट साक्षात्कार त्यावरून घडतो.

 

४. व्यासांचे कार्य

महर्षि व्यासांनी १२ वर्षे तपश्‍चर्या केलेले व्यासकुंडाचे हिमालयातील हेच ते पवित्र स्थान !

४ अ. व्यास आणि राष्ट्रीय अभ्युत्थान

ज्ञात अतीतापासून वर्तमानापर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एक प्रचंड देशकाल व्यासांच्या विशाल दृष्टीपुढे उभा होता. या राष्ट्राचे अभ्युत्थान घडावे एतदर्थ ते बद्धपरिकर (सिद्ध) झाले होते. राष्ट्र सुखी, संपन्न आणि सर्वांगी परिवर्धित व्हायचे, तर आधी राज्यातली राजनीती सुरक्षित राहिली पाहिजे. राजा नीतीमान, चारित्र्यवान, समर्थ आणि सर्वार्थी सावधान असला पाहिजे. जर राजा समर्थ नसेल, तर दुष्ट-दुर्जन सज्जनांना खाऊन टाकतील आणि धर्माची नौका बुडून जाईल. राष्ट्राचा म्हणून एक सामान्य धर्म असतो आणि तो शासनाच्या दक्षतेवर आणि सुव्यवस्थेवर आधारलेला असतो; म्हणून व्यासांनी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन केले आहे.

४ आ. व्यास आणि धर्म

देशकालपरिस्थितीत व्यक्ती, राष्ट्र, समग्र जीवन, लोक आणि परलोक या सर्वांचे धारणपोषण करतो, तो धर्म होय, अशी व्यासांची धर्मव्याख्या आहे. लोकस्थितीचे सनातन बीज म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे केवळ स्वर्ग-मोक्षाचा विचार नव्हे, तर या व्यावहारिक जगात लोकधारणा करतो, लोकांना सुखी, समृद्ध, परस्परपूरक, नीतीप्रवण आणि पुरुषार्थी बनवतो, तो धर्म होय. जर धर्म ही जीवनाचे धारण करणारी उत्तम वस्तू असेल, तर जीवनही तितकेच मूल्यवान असायला हवे. व्यासांच्या मते जीवन रडण्या-कुढण्याचे नसून ते आनंदमय आहे. माया समजून त्याचा त्याग करता कामा नये. व्यास इहलोकी कर्मवाद मानतात, त्यासमवेतच दैववादही मानतात आणि अध्यात्म किंवा आत्मतत्त्व यांच्यावरही विश्‍वास ठेवतात. मानवी ऐहिक जीवनाचे आधारस्तंभ दोन आहेत – एक वार्ता किंवा अर्थशास्त्र आणि दुसरा राज्यशास्त्र किंवा दंडनीती. अर्थावाचून जगात पान हालत नाही आणि हा मानवी अर्थ राजधर्माश्रित आहे; म्हणून राजाने योग्य प्रकारे नीतीला अनुसरून शासन चालवावे आणि माणसाने उद्यमशील रहावे. जो अर्थलाभ करून घ्यायचा तो स्वाभिमान जागृत ठेवून साधावा. अप्रतिष्ठेच्या मार्गाने माणसाने कोणत्याही वस्तूची आकांक्षा धरू नये. भीक मागणार्‍याचा मार्ग किंवा लुटारूपणाचा मार्ग अप्रशस्त होय. मग त्यात केवढाही अर्थलाभ व्हायचा असो. श्रमार्जित लाभ, हेच तत्त्व माणसाने सदैव डोळ्यांपुढे ठेवावे.

४ इ. संप्रदायांचे एकीकरण

हिंदुस्थानच्या वाङ्मयातच काय, तर जगाच्या वाङ्मयात अत्यंत थोर अशी व्यक्ती म्हटली म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास हीच होय. यापेक्षा थोर व्यक्ती सापडणे शक्य नाही. महर्षि वाल्मीकि कदाचित तुल्य होऊ शकतील; पण त्यांच्यामध्ये आणि व्यासांमध्ये महदंतर आहे. वाल्मीकींनी एक सुंदर काव्य करून राजघराण्यातील एका पुरुषास देवतुल्य केले. ती कामगिरी लहान नाही. तथापी वाल्मीकींचे हे कार्य कृष्णद्वैपायनांच्या कार्यापेक्षा लहान आहे. वाङ्मयाद्वारे जगाचे एकीकरण घडवावे, ही कल्पना मनात आणून, तिचा उठाव करणारा पुरुष जगात व्यासांव्यतिरिक्त दुसरा झालाच नाही.

ऋग्वेद हा पंजाबातील सोमयाजींचा (सोमयाग करणार्‍यांचा) संप्रदाय होता. यजुर्वेद हा दक्षिणेकडील पशुयाग करणार्‍यांचा संप्रदाय होता. सामवेद हा अत्यंत प्राचीन सत्रसंस्था (१३ पासून १०० दिवसांपर्यंत यज्ञयाग जिथे होतात अशा संस्था) चालविणार्‍यांचा संप्रदाय होता, तर अथर्ववेद हा मगधातील प्राचीन मगांच्या परंपरेचा विकास होय, असे शोधाअंती दिसून येईल. या भिन्न लोकांचे यजनसंप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणे, ही क्रिया वेदव्यासांनी केली आणि त्या क्रियेचे फल म्हणजे आजची वेदचतुष्टयीची रचना हे होय. या रचनेमुळे प्रत्येक वेद भिन्न धर्म न रहाता एकाच मोठ्या समवाय (समन्वय करणार्‍या) धर्माचे अंग बनला. हे कार्य करण्याकरिता व्यासांनी जी मोठी संस्था स्थापन केली, तीमुळेच त्यांना कुलपति ही पदवी प्राप्त झाली. सर्व ठिकाणच्या लोकांचे संग्रहण, हे त्यांच्या विद्येचे संग्रहण केल्याने होते आणि संप्रदायभिन्नतेमुळे होणारा विरोधसुद्धा या संग्राहक कृतीने काढून टाकता येतो, हे समाजशास्त्रीय तत्त्व व्यासांनी जाणले आणि आपल्या थोर कार्याची उभारणी केली.

एकीकृत विद्येचा प्रसार पुन्हा निराळ्या प्रकारे वेदव्यासांनी केला. वेदव्यासांना असेही दिसून आले की, सामान्य लोकांत यज्ञधर्माचा प्रसार नाही, सामान्य लोकांचा धर्म निराळाच आहे. सामान्य जनतेस मान्य अशी विविध स्थानिक दैवते आहेत; तीर्थस्थाने आहेत; पवित्र झालेले प्रदेश आहेत; वीरकथा अन् राक्षसमर्दनाच्या कथा स्थानोस्थानी आहेत; शिव, श्रीविष्णु, देवी या तीन देवतांच्या उपासना चोहोकडे आहेत आणि या सर्व गोष्टींस साहाय्यक होईल, असे प्राचीन वाङ्मय सूतवर्गाने बरेचसे संरक्षून ठेवले आहे. या परिस्थितीत केवळ हवि अर्पण करणार्‍या लोकांच्या धर्मकर्माच्या एकीकरणाने जनतेचे ऐक्य घडविण्याचा कार्यभाग होणार नाही, तर सामान्य लोकांचे उपासनासंप्रदायसुद्धा एकत्रित केले पाहिजेत अन् त्यांचे वाङ्मयही एकत्रित झाले पाहिजे. या दृष्टीमुळेे वेदव्यासांनी चोहोकडच्या साहित्याचे एकीकरण करण्यास प्रारंभ केला. त्यांनी जे कार्य आरंभिले, ते कार्य अनेक अनुयायांकडून पुढे वृद्धींगत झाले अन् त्यामुळे सर्व पुराणांचे आद्यकर्ते अशी त्यांची प्रसिद्धी झाली.

 

५. व्यासांचे महत्त्व

महर्षि व्यास यांच्या तपोबलाने उत्पन्न झालेला पवित्र झरा – व्यास कुंड. येथूनच व्यास नदीचा उगम होतो.

५ अ. श्री व्यासपूजन

व्यासांच्या महान ग्रंथरचनेमुळे त्यांना आदीगुरु म्हणतात. (शैव संप्रदायानुसार शिवाला, तर दत्त संप्रदायानुसार दत्ताला आदीगुरु म्हणतात.) आषाढ पौर्णिमेला गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिष्यमंडळी गुरुपौर्णिमा साजरी करतात. या प्रसंगी व्यासांचे पुण्यस्मरण म्हणून गुरुपूजनापूर्वी व्यासपूजन करतात.

५ आ. व्यासपीठ

सभेत बोलणारा वक्ता ज्यावर उभा असतो, त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यासपिठावर बसणार्‍या माणसाने काही पथ्ये पाळायची असतात. सर्वांत प्रथम गोष्ट ही की, व्यासपिठावरून व्यासांना अमान्य असा एकही विचार बोलता कामा नये; म्हणून व्यासपिठावर बसणार्‍याने साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. व्यासपिठावरून कोणाची अकारण निंदा किंवा स्तुती करता कामा नये. व्यासपिठावर बसणारा माणूस श्री सरस्वतीचा खरा उपासक असला पाहिजे. त्याची वाणी वाङ्मयीन विलास म्हणून नव्हे, तर ईश्‍वरभक्तीच्या रूपात वाहिली पाहिजे. त्याची वाणी व्यासांप्रमाणे सरळ, स्पष्ट, सखोल आणि समाजोन्नतीसाधक असली पाहिजे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ धर्मग्रंथ

श्रीकृष्णाने केलेले कौतुक

मुनीनामप्यहं व्यासः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्‍लोक ३७,

अर्थ : मुनींमध्ये मी व्यास आहे, असे म्हणून श्रीकृष्णाने व्यासांचे महत्त्वच दर्शवले आहे.

व्यासांच्या वाणीत शब्द सागरासारखे अत्यंत खोल, गहन आणि गंभीर झाले. यच्चयावत सर्व भाषांतील त्या शब्दांनी त्याचे जे आवृत्त सौंदर्य, माधुर्य, सौगंध्य होते, ते पूर्णतः प्रगट केले. ते ‘शब्द व्यासांच्या जवळ असलेले सर्वोच्च सौंदर्य पूर्णतः अभिव्यक्त करतात. व्यासांच्या वाणीतील ते शब्द स्वर्गीय भूमीत वास करतात.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २२.५.२००८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment