श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?

अनुक्रमणिका

श्री गणपति Ganpati

 

श्री गणपति

१. श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये

अ. विघ्नहर्ता

विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.

आ. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा

श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. ‘मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले, याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

इ. संगीत आणि नृत्य यांत प्रवीण असलेला

स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार. श्री गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. श्री गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्‍लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्‍वरमाउली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंगरचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला आठ हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे, तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्‍वरांनी ये गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती ॥, अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे. गजाननाचे नृत्य पाहून गंधर्व-अप्सराही लज्जित होतात, असे सांगतांना कवी मोरोपंतांनी श्री गणेशाचे मनोहर रूप शब्दसंपदेने आणि कल्पनासौंदर्याने उत्तमरित्या चितारले आहे.

ई. वाक्देवता

गणेश प्रसन्न झाला की, वाक्सिद्धी प्राप्त होते.

उ. श्री गणपति साधनेला प्रारंभीची दिशा देण्याचे कार्य करतो.

 

२. ‘गणपति बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या !’ असे म्हणण्याचा भावार्थ

‘प्रश्न : प्रत्येक वर्षी श्री गणेश चतुर्थीला, म्हणजे एक वर्षानेच गणपति येत असतो, तर तो पुढच्या वर्षी लवकर कसा
येईल ?

उत्तर : आरंभी आपले दिवस भराभर कालक्रमण करत असतात, त्यामुळे सुखाचा एक मास कसा गेला, हे कळतही नाही. या उलट जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा दिवस संपता संपत नाहीत; म्हणून ‘पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणतो. याचा भावार्थ किंवा गर्भितार्थ, म्हणजे ‘वर्षभर आम्हाला सुखात ठेव !’ असा आहे.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले, मुंबई. (जून २०११)

 

३. गणपतीला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत ?

गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.

 

४. गणपतीचे वाहन उंदीर हे कशाचे प्रतीक आहे ?

उंदीर : हा ज्याप्रमाणे पदार्थ कुरतडत असतो, त्याप्रमाणे कालही सृष्ट पदार्थ नाश करत असतो; म्हणून उंदीर हा काळाचे प्रतीक आहे.

गणपति : काळाला जिंकून त्यावर वाहन म्हणून जो स्वार झाला, तो खरा गणपति होय.

 

५. श्री गणेशाच्या ऋद्धी-सिद्धी !

शक्तीचा प्रसव, प्रतीप्रसव क्रम आणि श्री गणेशाच्या ऋद्धी-सिद्धी

‘जगताकडे प्रवाहित होणार्‍या शक्तीला ‘प्रसव क्रम’ आणि आत्म्याकडे प्रवाहित जागृत शक्तीला ‘प्रतीप्रसव क्रम’ म्हणतात. याच आधारावर ‘श्री गणेश ऋद्धी-सिद्धी यांचा दाता आहे’, या विधानाचे स्पष्टीकरण करता येईल.

१. ऋद्धी

शक्ती किंवा श्री गणेश बहिर्जगताभिमुख जागृत होतात, तेव्हा जीव जगताभिमुख कार्य करतो आणि ऋद्धी प्राप्त करतो.

२. सिद्धी

जेव्हा शक्ती किंवा श्री गणेश अंतर्मुख, जागृत आणि प्रवाहित होतात, तेव्हा जिवाचा मार्ग परमसिद्धीरूपी आत्मस्थितीला प्राप्त करण्याच्या हेतूने प्रशस्त होतो.’

 

६. प्रथम प्रदक्षिणा कोणी घातली ?

पुराणात पहिली प्रदक्षिणा बुद्धीदात्या श्री गणेशाने शिव-पार्वती यांना घातली आहे.

 

७. कलियुगात लवकर प्राप्त होणार्‍या
आणि फलदायी असणार्‍या देवता कोणत्या ?

कलियुगात लवकर प्राप्त होणार्‍या आणि फलदायी असणार्‍या देवता दोनच आहेत – ‘कलौ चंडिविनायकौ’, म्हणजे ‘कलियुगात चंडी म्हणजे देवी आणि विनायक म्हणजे गणपति, ही दोन दैवते लवकर फलदायी होतात.

गणेश देवतेविषयी माहिती गणेशपुराण, मुद्गलपुराण, गणेश महात्म्य यांमध्ये आहे. तसेच पद्मपुराण, भविष्योत्तरपुराण, लिंगपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, शिवपुराण या पुराणांमध्येही आहे. तसेच काही उल्लेख महाभारतातही आहेत; पण ही वैदिक देवता आहे. वेदांत तिचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.

१. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे ।
कविं कवीनामुपश्रवस्तमम… ।’ – ऋग्वेद

२. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’
प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे… ।’ – अथर्ववेदातील अथर्वशीर्ष

 

८. अशी केली श्री गणेशाने महर्षि व्यासांच्या ‘महाभारत’ लिखाणाची सेवा !

‘श्री गणेशाच्या हस्ते यावल भूमीवरच महर्षि व्यासांनी श्री गणेशाला सांगितले, ‘मी सांगतो, तू लिखाण कर. मध्ये थांबू नको.’ महर्षि व्यासांची वाणी चालू झाली. श्री गणेश लिखाण करत होता. त्याची लेखणी खराब झाली; परंतु थांबायचे नाही; म्हणून त्याने चटकन आपला एक दात तोडला आणि लिखाण चालू केले. तेव्हापासून श्री गजाननाला एकदंत म्हणून प्रसिद्धी मिळाली.’ – श्री. तुकाराम जोशी, शिवाजीनगर, वाडा (ठाणे) (‘अक्कलकोट स्वामी दर्शन’, वर्ष ३३, अंक ४)

 

९. प्राणप्रतिष्ठा केलेली सनातनची सात्त्विक गणेशमूर्ती
उत्तरपूजा झाल्यानंतर घरी ठेवायची कि विसर्जन करायची ?

प्राणप्रतिष्ठा केलेली गणेशमूर्ती उत्तरपूजा झाल्यानंतर घरी ठेवण्यापेक्षा ती विसर्जन करणेच योग्य असणे

‘काही साधक गणेशोत्सव काळात पूजा करण्यासाठी सनातनची सात्त्विक गणेशमूर्ती घेत आहेत. ‘तिची उत्तरपूजा झाल्यानंतर ती मूर्ती लाभ व्हावा म्हणून आम्ही घरी ठेवू शकतो का’, असेही ते विचारत आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे उत्तरपूजा झालेली मूर्ती विसर्जन करणेच अधिक योग्य आहे, त्याप्रमाणेच करावे.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (श्रावण अमावास्या / भाद्रपद शु. १, कलियुग वर्ष ५११३ (२९.८.२०११))

 

१०. शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि
नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?

उत्तर : असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरेतर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा अपप्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.

 

११. दीड दिवसच गणपति बसवा, असा सल्ला दिला जात आहे. असे करावे का ?

उत्तर : सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपति बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे.

 

१२. ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?

उत्तर : कर्मकांडानुसार शास्त्रशुद्ध पूजा करणे योग्य आहे; परंतु आपत्काळात एकमेकांकडे जाणे शक्य नसल्यास ‘ऑनलाईन’ पूजा चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते.

– श्री. दामोदर वझे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संचालक, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, गोवा.

Leave a Comment