पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

१. पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी २. कु. श्रिया राजंदेकर ३. श्री. योगेश जलतारे ४. सौ. मुक्ता लोटलीकर ५. सौ. माया श्रीकांत पिसोळकर ६. सौ. मानसी राजंदेकर ७. चि. वामन राजंदेकर ८. श्री. अनिरुद्ध राजंदेकर

 

सनातनच्या एकमेवाद्वितीय संत पू. कुसुम जलतारेआजी !

इतर साधकांच्या संदर्भात ‘त्यांनी साधनेला कधी आरंभ केला ?’, हे ते सांगतात. ‘श्रीमती जलतारेआजींची साधना, सेवा वयाच्या १० व्या वर्षापासूनच चालू होती’, हे त्यांची येथे दिलेली माहिती वाचल्यावर लक्षात येईल. बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत. त्यांच्यात कसलीच आसक्ती नसणे; साधकांशीच काय, तर त्या कोकिळेशीही संवाद करणे; समष्टीसाठी नामजप करणे, कुटुंबियांना पूर्णवेळ साधक होऊ देणे इत्यादी अनेक गुण आहेत.

त्यांच्यासारखी साधिका आणि आता संतपदी आरूढ झालेल्या पू. जलतारेआजी आपल्याला पहायला मिळत आहेत, हे आपले भाग्य आहे. ‘साधकांनी पू. जलतारेआजींसंदर्भातील लेखांचा अभ्यास करून आणि तो कृतीत आणून जलतारेआजींसारखी जलद गतीने प्रगती करावी’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

१. श्री. राजेश जलतारे, पुणे (पू. आजींचा मोठा मुलगा)

१ अ. नामजपात एकाग्र होऊन घरात घडणार्‍या घटनांकडे तटस्थपणे पहाणे

घरात घडणार्‍या प्रसंगांमध्ये आई स्थितप्रज्ञ असते. घरातील घटनांचा तिच्यावर परिणाम होत नाही. ती कुणात फारशी अडकत नाही. आवश्यक तेवढा वेळ प्रसंगात सहभागी होऊन परत नामजपात एकाग्र होते. ती त्या घटनांकडे तटस्थपणे पहाते.

१ आ. जेवण जात नसतांना देवाला प्रार्थना करणे

मे २०१८ पासून तिचे जेवण अत्यल्प होत गेले. पितृपक्षाच्या काळात तिला अजिबात जेवण जात नव्हते, तरी तिची चिडचिड होत नव्हती. ती त्या वेळी देवाला प्रार्थना करायची.

१ इ. व्यष्टी साधनेतील सातत्य

तिच्यामध्ये पूर्वीपासूनच सातत्य राखणे हा गुण आहे. कितीही उशीर झाला, तरी ती साधनेचे प्रयत्न करण्यात सवलत घेत नाही. दिवसभरातील व्यष्टी साधनेचे प्रयत्न, पूजा, मानसपूजा, आत्मनिवेदन, समष्टीसाठी प्रार्थना आणि नामजप यांत ती खंड पडू देत नाही.

१ ई. गुरूंवर श्रद्धा निर्माण झाल्यामुळे मुलांची काळजी
करण्याचे प्रमाण न्यून होणे आणि केवळ साधनेसंदर्भातच बोलणे

पूर्वी तिला माझ्या भावाची आणि माझ्या दुसर्‍या बहिणीची काळजी वाटायची. भाऊ आश्रमात रहातो, तर पुढे त्याचे व्यावहारिक दृष्टीने कसे होईल ? बहीण लांब रहात असल्याने तिच्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही’, असे विचार तिच्या मनात असायचे आणि ती ते बोलूनही दाखवायची; परंतु आता ‘भाऊ आश्रमात रहात असला, तरी गुरुचरणी आहे. त्यामुळे तेच त्याचा सांभाळ करणार’, अशी तिच्यात गुरूंप्रती श्रद्धा निर्माण झाल्यामुळे तिला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. ‘देव आपले चांगलेच करील’, हा विचार वाढल्याने ती आता आमचीही फारशी काळजी करत नाही आणि आमच्याशी व्यवहारातील काही न बोलता केवळ साधनेसंदर्भातच बोलते.

१ उ. स्मरणशक्ती वाढणे

आईची स्मरणशक्ती पुष्कळ वाढली आहे. ती काहीच विसरत नाही. आम्हालाच ती सगळ्या गोष्टींची वेळच्या वेळी आठवण करून देते.

१ ऊ. वस्तूंविषयी आसक्ती न्यून होणे

आता आईला कपडे इत्यादी वस्तूंविषयी आसक्ती राहिलेली नाही.

१ ए. देहात झालेले दैवी पालट

१. वजन कमी (हलके) झाले आहे.

२. पूर्ण त्वचा लहान मुलांप्रमाणे पुष्कळ मऊ आणि रेशमी झाली आहे.

३. डोळे अनेकदा भावनारहित (निर्गुण) स्थितीत दिसतात.

४. आईचा तोंडवळा तेजस्वी दिसतो.

५. झोपेतून उठल्यावर आपला तोंडवळा झोप आल्यासारखा असतो; परंतु आईचे तसे नसते. ती रात्री झोपतांना जितकी प्रसन्न दिसते, तितकीच ती उठल्यावरही प्रसन्न दिसते. ती ‘रात्रभर नामजप करते’, असे वाटते.’

 

२. अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन
आश्रम, रामनाथी, गोवा. (पू. आजींचा धाकटा मुलगा)

२ अ. पतीच्या देहत्यागानंतर केवळ ४ – ५ दिवस झालेले असतांनाही
परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित साधना होत नसल्याचे मनात विचार आणि खंत असणे

‘आई सतत साधनेचाच विचार करत असते. वडील गेल्यावर चार-पाच दिवसांनी ती एकदा एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यांत पाणी पाहून मला वाटले, ‘आईला वडिलांची आठवण झाली असेल.’ त्यासंदर्भात मी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही, याचे वाईट वाटते. त्यांची किती कृपा आहे आपल्यावर !’’ हे ऐकून मी अचंबित झालो. वडील गेल्यावर अगदी ४ – ५ दिवसांनी आई केवळ साधनेचाच विचार करत होती.’

२ आ. कोकिळेशी संवाद साधणे

‘घरी मी आणि आई दोघेच असतो. मी एकदा स्नान करून बाहेर आलो. तेव्हा मला आईच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. ‘ती कोणाशीतरी भ्रमणभाषवर बोलत असेल’, असे मला वाटले; परंतु मी बाहेरच्या खोलीत आल्यावर मला आई एकटीच बोलत असल्याचे दिसले. मी तिला विचारले, ‘‘कोणाशी बोलत आहेस ?’’ त्यावर ती म्हणाली,‘‘कोकिळा मला विचारत होती, ‘मी आश्रमात येऊ का ?’ तेव्हा मी तिला ‘चल. मी तुला घेऊन जाते’, असे सांगत होते.’’

२ इ. जेवणातील पदार्थ इतरांना देऊन मगच स्वतः खाणे

आईला जेवणातील पदार्थ इतरांना देऊन मगच खाण्याची सवय आहे. ती तिच्या जेवणातील एक घास तरी इतरांना देतेच. कोणी ‘तिला जेवण न्यून पडू नये’, या विचाराने ‘नको’ सांगितल्यास ती म्हणते, ‘‘मला जास्त झाले आहे; म्हणून तुम्ही घ्या.’’ खरे पहाता तिला आवश्यक तेवढेच जेवण तिला दिलेले असते.

२ ई. आध्यात्मिक स्तरावर विचार करत असल्याने मुलाकडून झालेल्या चुकांसाठी
‘त्याने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, असे सांगणे

माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे लहानपणापासून माझ्यामुळे आईला झालेल्या त्रासांसाठी मी एकदा तिच्याकडे क्षमायाचना केली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘तुझ्याकडून मला झालेला त्रास अनिष्ट शक्तींमुळे झाला असेल.’’ दोन वर्षांपूर्वी माझ्याकडून झालेल्या चुकांची जाणीव मला करून देण्यात आली. त्या वेळी माझी ताईही उपस्थित होती. त्या वेळी काही प्रसंगांत माझ्याकडून झालेल्या चुका सांगितल्यावर त्या स्वीकारणे मला जड गेले. ताईही थोडी भावनाशील झाली; परंतु नंतर सत्संग घेणार्‍या संतांकडून आईला माझ्या चुकांसंदर्भात विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘त्याने स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’ त्या वेळी तिने ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे या चुका झाल्या असतील’, असा विचार केला नाही. यावरून ती प्रत्येक वेळी आध्यात्मिक स्तरावर विचार करत असल्याचे लक्षात आले.

२ उ. वक्तशीरपणा

आई कुठल्याही सेवेसाठी उशिरा गेली, असे होत नाही. आता वयाच्या ८० व्या वर्षीदेखील ती प्रत्येक ठिकाणी वेळेतच पोचते. मी तिला ‘आज मला सेवेला लवकर जायचे आहे’, असे सांगितले, तर ती मला उशीर होऊ नये; म्हणून माझ्या आधीच तयार होते.

२ ऊ. वयोमानामुळे गुडघेदुखीचा त्रास असूनही चारचाकीवर
अवलंबून न रहाता जिन्यावरूनच चढ-उतार करून मंत्रपठणासाठी जाणे

तिला वयोमानामुळे जिने चढ-उतार करायला त्रास होतो. तिचा गुडघा दुखत असतो, तरीदेखील ती कधी तळमजल्यावर, तर कधी दुसर्‍या, तर कधी तिसर्‍या मजल्यावर मंत्रजपाच्या पठणासाठी जाते. तळमजल्यावरून तिसर्‍या मजल्यापर्यंत जाण्यासाठी चारचाकीची सोय आहे, तरी गाडीतून जाण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे ती जिने चढ-उतार करूनच जाते. ती स्वतःची सर्व कामे कुणावरही विसंबून न रहाता स्वतःच करते.

२ ए. इंग्रजी येत नसतांनाही विदेशातील साधकांची चौकशी करणे

आईला इंग्रजी बोलता येत नाही; परंतु ती विदेशातील साधकांचीही मराठीतच चौकशी करते. तिच्यातील प्रेमभावामुळे साधकांनाही तिचा भाव कळतो आणि ते खुणेनेच आईला ‘आम्ही चांगले आहोत’, असे सांगतात. आईला आलिंगन देतात.

२ ऐ. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याचा सतत विचार करणे

‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, याचा आई सतत विचार करत असते. याच कारणासाठी ती कमी जेवते. तिला दात नसल्याने पोळी वरणात घालून मऊ करून द्यावी लागते. त्यामुळे तिला प्रतिदिन तेच खावे लागते, तरी ती मला तिच्यासाठी वेगळा पदार्थ करावा लागू नये; म्हणून आहे तेच आनंदाने जेवते. साधकांना झोपायला जागा मिळावी; म्हणून अंथरुणावर स्वतः उठून बसते आणि इतरांना झोपायला जागा देते. अशाच प्रकारे ती सर्वत्र इतरांना प्राधान्य देते. येता-जाता इतरांना काय साहाय्य करू ? कुणाचे सामान उचलू का ? इत्यादी विचार तिच्या मनात चालू असतात.

२ ओ. तोंडवळा पाहून साधकांची मनःस्थिती अचूक ओळखणे

एक साधिका पाहुण्यांना जेवण वाढत होती. ती पुष्कळ तळमळीने सेवा करत होती. तिच्याकडे पाहून आई मला म्हणाली, ‘‘ती सेवा पुष्कळ करते; पण तिच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत नाही.’’ मी प्रतिदिन आश्रम स्तरावरील आढावा सत्संगाला जातो. एकदा सत्संग झाल्यानंतर तिने मला विचारले, ‘‘कसा झाला सत्संग ?’’ एका चुकीसंदर्भात माझा संघर्ष होत असूनही तिला काळजी वाटू नये; म्हणून मी म्हटले, ‘‘छान झाला.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘शरणागतीनेच नकारात्मकतेचे रूपांतर सकारात्मकतेत होते, हे लक्षात ठेव.’’

२ औ. आईच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. आईची पिशवी आणि कपडे यांना सुगंध येतो.

२. मी आणि आई एकच उदबत्ती वापरत असूनही आईने उदबत्ती लावल्यावर तिचा सुगंध अधिक दरवळतो.

३. मला चारचाकी गाडी चालवण्याचा तितका सराव नाही. आई नसतांना गाडी चालवतांना मला अडचण येते; परंतु आई गाडीत बसलेली असतांना मी सराईत चालकाप्रमाणे गाडी चालवत असतो. तेव्हा लक्षात येते की, देवालाच तिची काळजी असल्याने तो माझ्याकडून चांगली गाडी चालवून घेतो.

 

३. सौ. माया पिसोळकर, अमरावती (पू. आजींची मोठी मुलगी)

३ अ. आजीची आई लहानपणीच वारल्यामुळे घरातील सर्व जबाबदार्‍या एकटीनेच पार पाडणे

‘आई दहा वर्षांची असतांना तिची आई थंडी-ताप येऊन वारली. तिच्या वडिलांचे कडक सोवळे असल्याने सोवळ्यात स्वयंपाक करणे, सोवळ्याने पाणी भरणे इत्यादी कामे करणे, तसेच तिच्यापेक्षा लहान असलेल्या तीन भावंडांना सांभाळणे, असे विविध दायित्व तिच्याकडे आले. घरातील कामे शिकवायला कोणी नव्हते आणि वडिलांचा स्वभावही कडक होता. अशी परिस्थिती असतांना तिने सर्व कामे कशी करायची, हे शिकून घेतले. त्यासाठी तिला शाळा सोडावी लागली. तिने तिन्ही भावंडांना आईसारखेच प्रेम देऊन सांभाळले.

३ आ. लग्नानंतर सासुरवास सहन करावा लागूनही कधीही उलट न बोलणे

लग्नानंतर आईला सासरी सासुरवास सहन करावा लागला. तिला सासरी कायम दुय्यम वागणूक मिळाली. तिच्या सासूबाई माझे वडील आणि त्यांचे भाऊ यांच्यात भेदभाव करायच्या अन् बाबांना टोचून बोलायच्या. त्याचे आईला पुष्कळ वाईट वाटायचे; पण ती त्यांना त्याविषयी कधी उलट बोलली नाही.

३ इ. हलाखीची परिस्थिती असतांना कोणाकडे आर्थिक साहाय्य न मागणे आणि
देवावरील श्रद्धेमुळे आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत देवाच्या कृपेने जेवणाची सोय आपोआप होणे

वर्ष १९७४ ते १९८५ पर्यंत आईने पुष्कळ गरीबीत दिवस काढले. घरात आर्थिक चणचण असायची. आईने वर्ष १९९५ पर्यंत कोणतीही तक्रार न करता चुलीवर स्वयंपाक केला. कधीकधी जेवायला घरात शिधा नसायचा. भाज्या सुकवून त्या पुरवून त्याची आवश्यक तेव्हा भाजी करायला लागायची. इतकी हलाखीची परिस्थिती असतांनासुद्धा आईने कधी कोणाकडे काही मागितले नाही किंवा कोणाचे आर्थिक साहाय्यही घेतले नाही. तिने परिस्थितीला कधीही दोष दिला नाही. आहे त्या परिस्थितीत वडिलांसह दिवस काढले आणि आमच्यावरही काटकसरीने वागण्याचे संस्कार केले. आईची देवावर अतिशय श्रद्धा आहे. तिला नेहमी देवच काळजी घेत असल्याचे वाटायचे. त्यामुळे देवाच्या कृपेने जेवणाची सोय आपोआप व्हायची.

३ ई. रात्री पुष्कळ विलंब होऊनही मुलांना देवाची विभूती लावून मगच स्वतः झोपणे

आई घरातील कामांमध्ये पुष्कळ व्यस्त असायची. तिला रात्री भांडी घासायला कितीही विलंब झाला, तरी ती आम्हाला देवाची विभूती लावायची आणि त्यानंतरच ती झोपायची.

३ उ. माधुकरी मागणार्‍यांमध्ये परमेश्‍वराचे रूप पहात असल्याने
भावंडाच्या आजारपणात परमेश्‍वराने त्यांच्या रूपात येऊन काळजी घेणे

आमच्या आकोट, जिल्हा अकोला येथील घरी दाराशी मागायला आलेल्या कुणालाही तिने विन्मुख परत पाठवले नाही. त्यांना यथाशक्ती जे देता येईल, ते ती द्यायची. प्रतिदिन माधुकरी मागायला एक गृहस्थ यायचे. ‘ते साक्षात परमेश्‍वराचे रूप आहेत’, असा आईचा भाव असल्याने ती त्यांना माधुकरी द्यायची. एकदा आम्हा भावंडांपैकी एकाला बरे वाटत नव्हते. तेव्हा आईने माधुकरी मागणार्‍या गृहस्थांना यासंदर्भात सांगितले. त्यांनी मंत्र म्हणून तीर्थ दिले. ते साखरेसारखे गोड लागले. तेव्हा लक्षात आले की, आईचा भाव असल्याने परमेश्‍वराने त्यांच्या रूपात येऊन आमची काळजी घेतली.

३ ऊ. भावपूर्ण भजने म्हणणे

आई आमच्या आकोट येथील घराशेजारी असलेल्या श्री नृसिंह मंदिरात प्रती शनिवारी भजनाला नियमित जायची. तिचा आवाजही छान आहे. ‘कल्याणकरी रामराया..’ हे भजन आणि ‘श्री अनंता मधुसूदना’, हा संत तुकाराम महाराज रचित धावा आई आजही खूप भावपूर्ण म्हणते.’

३ ए. ६० वर्षे वय असतांनाही जवळच्या खेड्यांमध्ये प्रसाराला
जाणे आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर आकोटला प्रसारातील साधक घरी आल्यानंतर त्यांची जेवणाची, निवासाची व्यवस्था आई उत्तम रितीने करायची. आईने साधनेला आरंभ केला, तेव्हा तिचे वय ६० वर्षे होते. त्या वयातही ती जवळच्या खेड्यांमध्ये प्रसाराला जायची, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करायची. ती स्वतः नियमित ‘सनातन प्रभात’ वाचत असल्याने त्यातील लिखाण ती समाजातील लोकांना सांगत असे. आकोट येथील जुने साधक अजूनही तिची आठवण काढतात.

३ ऐ. व्रताचा सोवळ्यातील स्वयंपाक आनंदाने करणे

अंजनगाव सूर्जी, जिल्हा अमरावती येथील संत श्री मनोहरनाथ महाराज यांचा गुरुमंत्र वडिलांनी घेतला होता. त्यांची उपासना प्रत्येक गुरुवारी आमच्या घरी असायची. तेव्हा येणार्‍या प्रत्येकाचे चहा-पाणी, बैठक व्यवस्था, प्रसाद तयार करणे इत्यादी सेवा ती आनंदाने करायची. तसेच आमच्याकडे ‘श्री नारायण दशमी’चे व्रत असायचे. तेव्हा मोठी पूजा असायची आणि महाप्रसादासाठी ५० जण तरी असायचे. तो सोवळ्यातील स्वयंपाकही ती कोणालातरी साहाय्याला घेऊन आनंदाने करायची.’

 

४. सौ. माया पिसोळकर, अमरावती (आजींचीमोठी मुलगी)
आणि सौ. छाया देशपांडे, मध्यप्रदेश (आजींची धाकटी मुलगी)

४ अ. एकत्र कुटुंबातील सर्व कामे एकटीने करणे आणि तिने केलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवूनही स्थिर रहाणे

तिला एकत्र कुटुंबातील २५ जणांचा स्वयंपाक करायला लागायचा; पण कौतुकाचे शब्द तिच्या वाट्याला कधीच आले नाहीत. माझे काका आईने बनवलेल्या स्वयंपाकाला कायम नावे ठेवायचे. तिला क्षणभर वाईट वाटायचे; पण त्यात न अडकता ती पुन्हा जोमाने कामाला लागायची. घरातील सगळी कामे आई एकटी करायची. मातीचे घर असल्याने घराच्या भिंती सारवणे, चूल सारवणे इत्यादी कामे ती स्वतः करत असे. आमच्या घरासमोर काही मुले शिकायला रहायची. माझे वडील त्या मुलांना कधी घरातील भाजी नेऊन देत, तर कधी लोणचे नेऊन देत. त्यामुळे आईला कधीकधी जेवायला भाजी उरत नसे; पण तरीही तिने कधी चिडचिड किंवा गार्‍हाणे केले नाही.’

 

५. श्री. श्याम राजंदेकर, अकोला (आजींचे लहान भाऊ)

५ अ. वडील बराच काळ बाहेरगावी जात असल्याने
सर्व भार केवळ देवावर टाकून भावंडांचे दायित्व स्वीकारून ते आनंदाने पार पाडणे

‘आम्ही तीन भावंडे अनुक्रमे सात, पाच आणि एक वर्षाचे असतांना आमच्या आईला देवाज्ञा झाली. त्या वेळी आमची कुसुमताई केवळ दहा वर्षे वयाची होती. वडिलांनी दुसरे लग्न न करण्याचे ठरवल्यामुळे साहजिकच आमचा सर्वांचा भार ताईवर येऊन पडला. शेतीचा व्यवसाय आणि भिक्षुकीची कामे यांमुळे वडील बराच काळ बाहेरगावी जात. तेव्हा सर्व भार केवळ देवावर टाकून ताईने आमचे दायित्व स्वीकारले आणि आनंदाने पार पाडले.

५ आ. घरातील कामे सुरळीत आणि वेळच्या वेळीच व्हावीत, यासाठी
कामांची विभागणी करणे आणि भावंडांना स्वयंशिस्त अन् चांगले वळण लावणे

ताईने घरातील कामे सुरळीत आणि वेळच्या वेळीच व्हावीत, यासाठी केर काढणे, कपबश्या वेळीच स्वच्छ करून जागेवर लावून ठेवणे, भांडी जागेवर लावून ठेवणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, विहिरीवरून पाणी भरून आणायला साहाय्य करणे इत्यादी कामांची विभागणी केली. ही सर्व कामे आम्हाला हळूहळू शिकवून तिने आम्हाला स्वयंशिस्त आणि चांगले वळण लावले. कुसुमताईच्या रूपाने आम्हाला केवळ एक बहीणच नाही, तर खर्‍या अर्थाने आध्यात्मिक आईच लाभली. याविषयी कृतज्ञता !

५ इ. भावंडांवर केलेल्या आध्यात्मिक संस्कारामुळे
त्यांना लहानपणापासूनच नामस्मरणाची आवड निर्माण होणे

राजंदा, जिल्हा अकोला येथे आमचे घर होते. त्या घराशेजारीच श्रीरामाचे देऊळ आहे. ताई आम्हाला प्रतिदिन श्रीरामाच्या आरतीच्या वेळी मंदिरात न्यायची. तेथे गेल्यावर रामरक्षास्तोत्र, भीमरूपी इत्यादी स्तोत्रे आमच्याकडून म्हणून घ्यायची. गावातच आमच्या चुलत काकूकडे संध्याकाळी रामरक्षा आणि नंतर रामनामाचा जप होत असे. तेथे ताई आम्हाला प्रतिदिन नेत असे. त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच नामजप करण्याची गोडी लागली. त्यामुळे आम्ही कधी घरी एकटे असलो, तरी भीती वाटायची नाही. ताईला लहापणापासूनच दत्ताची पदे, रामाचा पाळणा आणि भजने म्हणणे यांची आवड होती. अकोला येथे रहाण्यास आल्यावर आमच्या वडिलांनी एकवीस वर्षे श्रीमद्भागवताचे पठण येथील मुकुंद मंदिरात केले. त्याला ताईची सलग उपस्थिती असायची.

५ ई. विवाहाच्या वेळी नोकरी किंवा मालमत्ता यांचा विचार न करता
केवळ सासू-सासर्‍यांच्या आध्यात्मिक नावांवरून विवाहाला संमती देणे

ताईचे शिक्षण अल्प असल्यामुळे वडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती; परंतु ताईने स्वतः त्याविषयी कधीच आस्था दाखवली नाही. श्री. जलतारे यांचे स्थळ चालून आले, तेव्हा त्यांची नोकरी किंवा मालमत्ता यांचा विचार न करता तिच्या सासर्‍यांचे नाव रामचंद्र आणि सासूबाईंचे नाव सीताबाई असल्यामुळे ताईने लग्नाला संमती दिली.’

 

६. श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ अ. ईश्‍वरेच्छेने वागणे

जलतारेआजींना कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा नाही. त्यांच्याशी बोलतांना त्यांनी एकदा मला सांगितले, ‘‘आपण काही सांगितले, तरी ‘संबंधितांना ते शक्य असेल’, असे सांगता येत नाही. यापेक्षा त्यांच्या प्रारब्धात जे असेल आणि देवाला जे अपेक्षित असेल, ते होईल !’’

 

७. श्रीमती जलतारेआजी यांचा दिनक्रम

श्रीमती जलतारेआजींचे वय ८० वर्षे आहे. त्या पहाटे ५ ते ७ या वेळेत समष्टीसाठी नामजप करतात. त्यानंतर त्या वैयक्तिक आवरून रामनाथी आश्रमात येतात. नंतर प्रसाद ग्रहण करून समष्टीसाठी मंत्रपठण करण्याच्या सेवेला जातात. मग पुन्हा समष्टीसाठी नामजप करतात आणि दुपारी थोडा वेळ विश्रांती घेतात. नंतर प्रसाद घेऊन पुन्हा समष्टीसाठी मंत्रपठण आणि नामजप करतात. रात्री त्या महाप्रसाद घेऊन घरी जातात आणि रात्री ११.३० वाजेपर्यंत समष्टीसाठी नामजप करतात. त्यांच्याशी बोलल्यावर मला कळले की, त्या अनुमाने ८ ते १० घंटे नामजपाच्या माध्यमातून सेवारत रहातात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment