प्रामाणिकपणे समाजसाहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

अनुक्रमणिका

सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास येथे दिला आहे.

पू. सत्यनारायण तिवारी यांचे बालपण अतिशय खडतर गेले; पण त्यांनी कधीही प्रामाणिकपणा सोडला नाही. त्यांच्या मनात समाजासाठी काही करायची तळमळ असल्यामुळे ते सतत इतरांना साहाय्य करण्यासाठी धडपडत असत. त्यांनी राजकारणात सक्रीय राहूनही प्रामाणिकपणे कार्य केले; पण ‘राजकारणात प्रामाणिकपणाचा काही लाभ नाही’, असे लक्षात आल्यावर त्यांनी खर्‍या अर्थाने साधनेला आरंभ केला. तसे ते आधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे साधना करत होते; मात्र त्यांना सनातनच्या आश्रमात आल्यावर पुष्कळ शांती अनुभवता आली आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील देवत्वाची अनुभूती आली. तेव्हापासून त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा बसली आणि ते सतत त्यांच्या अनुसंधानात राहू लागले. त्यांच्यातील भाव आणि भक्ती यांमुळे ते लवकरच संतपदी विराजमान झाले.

१. जन्म

‘८.१२.१९४९ या दिवशी खामगाव (जि. बुलढाणा), महाराष्ट्र येथे पू. सत्यनारायण तिवारी यांचा (माझ्या वडिलांचा) जन्म झाला. त्यांना एक सख्खी बहीण (श्रीमती जमुनाबाई शुक्ला, वय ७७ वर्षे) असून ती विवाहित आहे. सध्या ती शेंदुर्णी (जि. जळगाव) येथे असते.

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

२. बालपणी केलेले कष्ट

लहानपणी पू. बाबांची कौटुंबिक परिस्थिती पुष्कळ हलाखीची होती. त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या समवेत भाजी विकणे, रिक्शा चालवणे, अशी विविध कष्टाची कामे केली. त्यांना समाजाकडून पुष्कळ कटू अनुभव आले. अनेक वेळा भूक लागली असतांना त्यांना जेवायला मिळत नव्हते. तेव्हा ते पाव पाण्यात बुडवून खायचे; पण काही वेळा पाव विकत घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नसायचे.

३. शिक्षण

कष्ट करून पैसे मिळवत त्यांनी कला शाखेत पदवीचे शिक्षण (B.A.) पूर्ण केले.

४. नोकरी आणि सक्रीय राजकारण करणे

शिक्षण झाल्यावर त्यांनी संभाजीनगर येथील सूतगिरणीत कामगार म्हणून नोकरी केली. ती बंद पडल्यावर त्यांनी संभाजीनगर येथील ‘देवगिरी टेक्सटाईल मिल’मध्ये लेखा विभागात कारकून म्हणून नोकरी केली. त्यांना सामाजिक कार्य आणि इतरांना साहाय्य करणे आवडत असल्यामुळे नोकरी करत असतांना ते राजकारणात सक्रीय झाले. राजकारण करतांना त्यांचे घराकडे लक्ष नसायचे. ते एक कुशल वक्ता होते. ते भाषणाची सिद्धता न करताही उत्स्फूर्तपणे उत्तम भाषण करायचे. त्यांनी २० – २२ वर्षे निरपेक्षभावाने राजकारणात प्रामाणिकपणे कार्य केले. त्यामुळे अनेक मंत्री त्यांना नावानिशी ओळखत असत; परंतु ‘राजकारणात प्रामाणिकपणाचे काही मूल्य नाही’, हे जाणल्यावर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि वर्ष २००७ पासून ते पूर्णपणे अध्यात्माकडे वळले.

५. समाजातील कुणाही व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या अंत्यविधीसाठी साहाय्य करणे

समाजातील कुणाच्याही निधनाचे वृत्त कळताच बाबा लगेच तिथे जाऊन त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना साहाय्य करत असत. ‘लहान-मोठा’ किंवा ‘गरीब-श्रीमंत’, असे न पहाता बाबा प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी निरपेक्षपणे साहाय्य करत. तेथून घरी आल्यावर ते आम्हाला आवर्जून सांगत, ‘‘जगात मृत्यूच सत्य आहे. कुणाचे काही खरे नाही. सर्वकाही देवाच्याच हातात आहे.’’

६. वडिलांचे (पू. सत्यनारायण तिवारी यांचे) झालेले सन्मान !

६ अ. वडील कामगारांचा नेता बनणे आणि ते कामही चांगले केल्यामुळे त्यांना ‘गुणवंत कामगार’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणे

पू. बाबांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यामुळे नोकरी करतांना एखाद्या कामगारावर अन्याय झाल्यास ते पुढाकार घेऊन त्याला साहाय्य करत. त्यांच्यातील उत्तम नेतृत्व गुणामुळे कामगारांनी त्यांना त्यांचा नेता म्हणून निवडले. ते कामगारांच्या संघटनेचे (‘युनियन’चे) नेते झाले. हे कामही त्यांनी चोखपणे केल्याने त्यांना ‘गुणवंत कामगार’ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

६ आ. वडिलांमधील प्रामाणिकपणामुळे त्यांना ‘ऑनररी मॅजिस्ट्रेट’ म्हणून अधिकार मिळणे

पू. बाबांचा समाजातील लोकांना साहाय्य करण्याचा स्वभाव असल्याने ते नेहमी समाजसाहाय्य करण्यात व्यस्त असायचे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना शासनाकडून ‘ऑनररी मॅजिस्ट्रेट’ हा अधिकार देण्यात आला. त्यामुळे कुणाला छायांकित प्रतींवर सही-शिक्का हवा असल्यास पू. बाबांची स्वाक्षरी उपयोगी पडायची. जिल्ह्यात अन्य दोघांनाही हा अधिकार होता; पण ते एकेका स्वाक्षरीचे पैसे घ्यायचे; परंतु बाबांना पैशांचा लोभ नव्हता. त्यामुळे ते निरपेक्षपणे स्वाक्षरी-शिक्का देत असत. त्याचप्रमाणे व्यक्ती कुठल्याही वेळी स्वाक्षरी मागायला आली, तरी ते लगेच स्वाक्षरी करून देत असत.

७. वडिलांना आलेल्या अनुभूती

७ अ. ‘वडिलांनी मुलाला बरे वाटू दे’, यासाठी मारुतिरायाला नवस बोलल्यानंतर मुलगा बरा होणे

माझा भाऊ लहानपणी पुष्कळ रुग्णाईत होता. ताप डोक्यात जाऊन त्याला चक्कर (फीट) आली आणि त्याने डोळे पांढरे केले. बाबांना हे कळल्यावर त्यांनी लगेच जवळच्या मारुतिरायांच्या देवळात जाऊन प्रार्थना केली आणि ते नवस बोलले, ‘माझ्या मुलाला बरे कर. मी तुला चांदीचे डोळे वाहीन.’ त्यानंतर २ दिवसांत भाऊ बरा झाला.

७ आ. पत्नी ‘कोमा’त गेल्यावर श्री गणेशाची मूर्ती पाण्यात ठेवून साकडे घातल्यावर पत्नी शुद्धीवर येणे

वर्ष १९९५ मध्ये माझी आई ‘कोमा’त (बेशुद्धीची अवस्था) गेली होती. तेव्हा आधुनिक वैद्यांना ‘ती जिवंत रहाणार नाही आणि राहिली, तरी तिची स्मृती राहील कि नाही ?’, अशी शंका होती. तेव्हा अन्य कुणा नातेवाइकांना सांगण्याऐवजी बाबांनी श्री गणेशाची मूर्ती पाण्यात ठेवली आणि त्याला साकडे घातले, ‘तूच माझ्या पत्नीला या संकटातून बाहेर काढ.’ त्यानंतर २४ घंट्यांनंतर आई शुद्धीवर आली आणि तिची स्मृतीही चांगली राहिली.

८. कुलाचार न केल्यामुळे घरी होत असलेले त्रास

८ अ. घरी कधी श्राद्धविधी न केल्यामुळे कुटुंबियांना पूर्वजांचे अनेक तीव्र त्रास सहन करावे लागणे

पू. बाबांना समजू लागले, तेव्हापासून आमच्याकडे कधीच श्राद्धविधी केले नव्हते. त्यामुळे आम्हाला पूर्वजांचे पुष्कळ त्रास होते.

१. माझे आजोबा रुग्णाईत असतांना त्यांना ४ पावलेही चालणे कठीण होते. अशा स्थितीत ते आम्ही ज्या इमारतीत रहात होतो, तेथील २ जिने चढून वरच्या आगाशीत (गच्चीत) गेले आणि तेथील कठड्यावर बसले असतांना तेथून खाली पडून त्यांचे अपघाती निधन झाले.

२. माझ्या वडिलांची आई भ्रमिष्ट होऊन घरातून निघून गेली आणि हरवली. ‘तिचे पुढे काय झाले ?’, ते कळले नाही.

३. आमच्या घरात सतत वाद आणि भांडणे चालू असायची. कुणाचेही कुणाशी पटत नव्हते.

वर्ष १९९९ मध्ये मी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधना करू लागल्यावर ५ – ६ वर्षांनी श्राद्धविधींचे महत्त्व कळल्यावर पू. बाबांनी श्राद्ध करायला आरंभ केला. नंतर आम्ही आजीसाठी करायला सांगितलेले विधीही केले.

९. वडिलांवर आलेली जीवघेणी संकटे आणि देवाचे लाभलेले साहाय्य !

९ अ. संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीच्या वेळी धर्मांधाने वडिलांना चाकू मारणे; पण भगवंताच्या कृपेने चाकू खिशाला लागून वडिलांना दुखापत न होणे

एकदा संभाजीनगर जिल्ह्यात दंगल झाली होती. तेव्हा बाबांच्या आस्थापनाने त्यांना गाडीने मुख्य मार्गावर सोडले. तेथून घरापर्यंत येतांना मध्येच धर्मांधांची वस्ती होती. बाबांना येतांना पाहून तेथील दोघांनी एकमेकांना खुणावले. त्यांच्यातील एक जण हातात चाकू घेऊन बाबांच्या दिशेने धावत आला आणि त्याने बाबांवर वार केला. नंतर ते दोघे पळून गेले; पण चाकू बाबांच्या खिशाला लागून खिसा फाटला आणि बाबांना काही न होता ते वाचले. नंतर बाबा झपझप चालत घरी आले. घरी आल्यानंतर बाबांना २ दिवस तो क्षण सतत डोळ्यांसमोर दिसत होता. त्यांना २ दिवस झोप लागली नाही. त्यांनी मृत्यू पुष्कळ जवळून पाहिला होता. या प्रसंगात ‘देवानेच मला वाचवले’, असे जाणवून त्यांना भगवंताविषयी कृतज्ञता वाटली.

९ आ. पित्ताशयात खडे झाल्याने असह्य वेदना होऊन शस्त्रकर्म करून खडे काढावे लागणे

एकदा बाबांना पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. वेदना असह्य होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यांच्या पित्ताशयात पित्ताचे असंख्य खडे झाल्याचे निदान झाले. ते शस्त्रकर्म करून काढावे लागले. तेव्हा त्यांना ‘आपला काळच समोर उभा आहे’, असे वाटत होते; पण देवाने त्यांना जीवदान दिले. त्यानंतर ते माझ्या समवेत काही दिवस गोवा येथे रहायला आले.

१०. मनोभावे देवपूजा करणे

वर्ष २०१० पासून बाबा मनोभावे पूजा करू लागले. पूजा करतांना त्यांना भगवंताच्या सहवासाचा पुष्कळ लळा लागला. त्यामुळे पूजेतच त्यांचे ५ – ६ घंटे निघून जायचे. ते पूजा करतांना देवघराची मांडणी, देवाला फुले वहाणे इत्यादी सर्वच कृती पुष्कळ भावपूर्ण करत असत. त्यामुळे अनेकदा त्यांना ‘देवघरात देव आले आहेत’, अशी अनुभूती येत असे. ते मला म्हणायचे, ‘‘आरती, आज पूजेत वेगळेच वाटत आहे. बघ जरा.’’ नंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे ‘पूजा करणे’ बंद झाले.

११. आरंभी वडील ध्यानमार्गाने साधना करत असणे आणि विवाहानंतर काही वर्षांनी त्यांची प.पू. गजानन महाराज यांच्यावर श्रद्धा असणे

बाबा त्यांच्या विवाहापूर्वी ध्यानमार्गाने साधना करत असत. विवाहानंतर त्यांची शेगावच्या प.पू. गजानन महाराज यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. त्यांना कितीही उशीर झाला, तरी ते प्रत्येक गुरुवारी संभाजीनगर येथील प.पू. गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊनच घरी यायचे. पुढे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य नसल्यामुळे त्यांचे मंदिरात दर्शनाला जाणे थांबले. त्यानंतर त्यांना मानसभावाचे महत्त्व कळले आणि ते मानसभावाने प.पू. गजानन महाराज यांच्या दर्शनाला जाऊ लागले.

१२. ‘प.पू. गजानन महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले एकच आहेत’, असे जाणवल्यामुळे ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात रहाणे

नंतर त्यांनी अनुमाने वर्ष २०१५ पासून मनापासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केली. ते घरी आलेले साधक आणि संत यांच्या सेवेसाठी आम्हाला विरोध न करता सहकार्य करू लागले. त्यांना शक्य होईल, तेव्हा ते प्रासंगिक कार्यक्रमाला उपस्थितही रहायचे. काही दिवसांनी त्यांना ‘प.पू. गजानन महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर एकच आहेत’, असे जाणवून त्यांच्या मनातील त्या दोघांविषयीचे द्वैत संपले अन् ते अधिकाधिक वेळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मरणात राहू लागले.’

१३. रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर वडिलांना पुष्कळ शांती जाणवणे

‘काही वेळा बाबा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यायचे. तेव्हा येथील शांत वातावरण पाहून ते म्हणायचे, ‘‘येथे किती शांती आहे ? मी या वातावरणात रहाण्याच्या पात्रतेचा नाही. माझ्या मनात किती काय काय चालू असते ?’’ यासाठी त्यांना नेहमी अपराधी वाटायचे. ‘त्यांच्याकडून घडलेल्या चुकांसाठी आणि भगवंताचे विचार अधिक येत नाहीत अन् आले, तरी अधिक काळ टिकत नाहीत’, यासाठी त्यांना खंत वाटायची.

१४. आश्रमातील वातावरण आणि साधकांचे नम्र अन् प्रेमळ बोलणे-वागणे अनुभवल्यावर वडिलांचे सनातन संस्थेविषयीचे मत पालटणे

बाबांना त्यांच्या जीवनात आलेल्या काही कटू अनुभवांमुळे वाटायचे, ‘सनातन संस्थेतही ब्राह्मणवाद असेल. ते आपल्या मुलीचा वापर करतील आणि तिच्या आयुष्याची हानी होईल.’ त्यांची अशी प्रबळ इच्छा होती की, ‘शिक्षणाच्या माध्यमातून मुलगी (मी) पोलीस खात्यात किंवा एखाद्या शासकीय अधिकारी पदावर निवडली जावी. त्यामुळे तिच्या हातून पुष्कळ समाजकार्य घडेल.’ एकदा तर ते मला निवडणुकीसाठी उभे करणार होते; पण मी नकार दिल्यावर ते शांत राहिले. त्यानंतर एकदा बाबा स्वतः सनातन संस्थेच्या देवद आणि रामनाथी येथील आश्रमात येऊन राहिले. त्यांनी आश्रमातील वातावरण अन् साधकांचे बोलणे-वागणे अनुभवले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आरती, तू पुष्कळ चांगल्या ठिकाणी आली आहेस. तुझ्या जीवनाचे कल्याण झाले आहे. मीही तुला एवढे चांगले आणि सुरक्षित जीवन देऊ शकलो नसतो.’’

१५. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

‘वर्ष २०१९ मध्ये वडिलांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यासाठी त्यांना सद्गुरु जाधवकाकांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

१६. सनातनचे साधक घरी आल्यावर आनंद होणे

आम्ही गोवा येथे रहायला आल्यावर बाबा रुग्णाईत असतांना २ – ३ वेळा साधक त्यांना भेटायला आले. तेव्हा साधकांना पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला. अर्धांगवायू झाल्यामुळे बाबांना दोन्ही हात जोडण्यास अडचण येते; पण साधक आल्यानंतर ते आनंदाने टाळी वाजवत किंवा त्यांना नमस्कार करत असत.

१७. भाव !

१७ अ. सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

१७ अ १. पू. होनपकाका यांच्या चरणांवर फुले वाहून आशीर्वाद मागणे : एकदा एका सेवेसाठी पू. होनपकाका संभाजीनगर येथे आले असतांना आमच्या घरी आले होते. तेव्हा मी बाबांना सांगितले, ‘‘पू. होनपकाका संत आहेत.’’

पू. होनपकाका घरी येण्याआधीच बाबांनी आमच्या इमारतीतील फूलझाडांची थोडी फुले काढून ठेवली. आम्ही रहातो, त्या इमारतीत पू. होनपकाकांनी प्रवेश केल्यावर बाबांनी ती फुले अतिशय भावपूर्णपणे त्यांच्या चरणांवर वाहिली आणि म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, म्हणजे माझा उद्धार होईल. मी पुष्कळ पापी आणि अपराधी आहे. माझा उद्धार करा.’’

१७ अ २. वडिलांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘देवीस्वरूप’ दिसल्यामुळे वडिलांनी त्यांना साष्टांग नमस्कार करणे : एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ संभाजीनगर येथे आल्या होत्या. त्या येथून जवळच असलेल्या एका तालुक्यात नवनाथांच्या मंदिरात होणार्‍या ‘होमा’चा अभ्यास करण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा बाबांनी त्यांना प्रथमच पाहिले होते. मी बाबांना त्यांच्याविषयी काहीच सांगितले नव्हते; मात्र ‘त्यांच्या चेहर्‍यावर किती तेज आहे ? त्या देवीस्वरूपच आहेत’, या भावाने बाबांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला.

१७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव !

१७ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर वडिलांना त्यांच्यात ‘श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ यांचे रूप दिसून भावजागृती होणे : बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची २ वेळा भेट घेतली. एका भेटीत त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रभु श्रीरामच आहेत’, असे दिसल्यामुळे बाबांनी त्याच भावाने त्यांच्याशी संवाद साधला. दुसर्‍या भेटीत बाबांना परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘श्रीकृष्ण’ रूपात दर्शन झाल्यामुळे ते भावविभोर झाले.

१७ आ २. साधना चालू केल्यावर वडिलांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवंत असून ‘माझा मृत्यू अन् मृत्यूनंतरचे सर्वकाही त्यांनीच पहावे’, असे वाटणे : गोवा येथे रहात असतांना बाबांनी सनातनच्या आश्रमातील वातावरण अनुभवले. तेव्हा त्यांना वाटले, ‘माझा मृत्यू गोव्यात व्हावा. माझे काही करावे लागले, तर साधकांनी करावे. प्रत्यक्षात सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू करण्यापूर्वी त्यांना वाटायचे, ‘माझ्या अंत्यसंस्कारासाठी पुष्कळ लोकांनी यावे आणि माझी अंत्ययात्रा वाजत-गाजत निघावी’; पण सनातनमधे आल्यावर त्यांना ‘आश्रमातील शांती किती अनुभवू आणि किती नको’, असे झाले. अनुमाने वर्ष २०१६ मध्ये त्यांनी ‘अंत्यसमयी माझे जे काही व्हायचे, ते येथेच व्हावे’, हे त्यांचे विचार आमच्यासमोर (मी आणि आईसमोर) व्यक्त केले होते. वर्ष २०२२ मध्ये ते माझ्याकडे गोवा येथे आले असतांना रुग्णाईत होते. तेव्हा त्यांनी पुन्हा तेच विचार व्यक्त केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाल्यावर ‘तेच भगवंत आहेत’, या भावाने त्यांनी गुरुदेवांकडे ‘माझा मृत्यू आणि मृत्यूनंतरचे सर्व तुम्हीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) पहावे’, अशी इच्छा व्यक्त केली.

१८. वडिलांचे जाणवलेले गुण

१८ अ. नीटनेटकेपणा

बाबांची प्रत्येकच कृती ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे’, या उक्तीप्रमाणे असते. स्वतःचे कपडे धुणे, इस्त्री करणे, भाजी विकत आणल्यावर ती शीतकपाटात ठेवणे, वहीत लिखाण करणे, गावाला जातांना बॅग भरणे, वैयक्तिक साहित्य कपाटात ठेवणे, अशा सर्वच कृती त्यांच्या नीटनेटक्या अन् परिपूर्ण असतात.

१८ आ. काटकसरी

बाबांकडे कपड्यांचे केवळ २ – ३ जोडच असतात; पण बाबा ते कपडे स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून व्यवस्थित वापरतात.

१८ इ. अनावश्यक न बोलणे

बाबा कधीच अनावश्यक बोलले नाहीत आणि इतर कुणी अनावश्यक बोललेले त्यांना आवडायचे नाही. ते म्हणायचे, ‘‘कुणी विचारले, तरच बोलायचे आणि जेवढे विचारले आहे, तेवढेच उत्तर द्यायचे.’’

१८ ई. पैशांची आसक्ती नसणे

१. त्यांना पैशाची आसक्ती नव्हती. त्यांनी पैशांपेक्षा वडीलधार्‍यांचा मान राखला.

२. समाजकार्य करण्यासाठी बाबा स्वतःचे वेतन आणि वेळप्रसंगी आईचेही वेतन व्यय करत असत.

३. पैशांची अडचण असली, तरी ते कधीच काळजी करत नाहीत आणि अधिक पैसे आले, तरी ते कधी हुरळून जात नाहीत. ते बर्‍याचदा समभावात, म्हणजे स्थिर असतात.

१८ उ. साक्षीभाव

आमच्या घरी आध्यात्मिक त्रासामुळे पुष्कळ वाद होतात; पण बाबा कधीच त्याविषयी ‘ताण घ्यायचे नाहीत, काळजी करायचे नाहीत किंवा त्यासाठी आम्हाला काही बोलायचे नाहीत. ते म्हणायचे, ‘‘मी सांगून कुणी ऐकत नाही. जे व्हायचे, ते होईल. देव पाहील, तोच काळजी घेईल.’’

१८ ऊ. अवलिया संतांप्रमाणे वागणे

त्यांचा स्वभाव काहीसा विक्षिप्त वाटेल, असा होता. त्याचा उलगडा ते संत घोषित झाल्यावर झाला. त्यांच्या संतसन्मान सोहळ्याला आलेले आधुनिक पशूवैद्य अजय जोशी म्हणाले, ‘‘पू. तिवारीकाका अवलिया संत आहेत’, असे वाटते.’’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळही म्हणाल्या, ‘‘हो. मलाही असेच जाणवते.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून पू. बाबांच्या विक्षिप्त वागण्या-बोलण्यातील काही प्रसंग चलचित्रपटाप्रमाणे एकदम आमच्या डोळ्यांसमोर येऊन गेले.

१. पैसे हातात असूनही काही वेळा बाबा आईला घरकाम करणार्‍या महिलांचे वेतन लगेच देऊ देत नव्हते.

२. घर झाडून एके ठिकाणी केर गोळा करत असतांना बाबा ‘‘येथे केर का ठेवला ?’’, म्हणून ओरडायचे. दुसर्‍या वेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्यत्र केर गोळा केल्यावरही ते पुन्हा ओरडायचे.

३. त्यांना राग आल्यावर ते आईला आणि आम्हा भावंडांना हात धरून घराबाहेर उभे करत.

४. बाबा त्यांचा पगार झाल्यावरही किराणा आणि भाजीपाला आणायला लगेच पैसे न देता काही दिवसांनी द्यायचे.

५. आई सरकारी खात्यात नोकरी करायची. वेतन मिळाल्यावर ती बाबांना तिचे पूर्ण वेतन देत असे. एखादे वेळी आईकडून वेतन देतांना १० रुपयेही अल्प दिले गेले, तर बाबा संपूर्ण वेतनाचे पैसे फेकून देत असत.

६. त्यांच्या मनाप्रमाणे झाले नाही किंवा त्यांचे न ऐकल्यास ते घरातून निघून जात असत.

७. दिवाळीला मुलांना नवीन कपडे घ्यायचे म्हटल्यावर ते म्हणायचे, ‘‘जुने सर्व कपडे जाळून टाकतो; अन्यथा नवीन आणण्याचा आग्रह सोडा आणि जुने कपडेच धुऊन इस्त्री करून घाला.’’

८. बाबांचा स्वभाव पुष्कळ रागीट होता. त्यांच्यामुळे आईला बराच त्रास सहन करावा लागला. ते आईला रागवायचे, शिवीगाळ करायचे; परंतु जेव्हा माझी आजी आणि आत्या आईला त्रास द्यायचे. तेव्हा ते आईची बाजू घेऊन आईचा बचाव करायचे.

आमच्या घरात भगवंताचे विशेष अधिष्ठान नसतांना, घरी एवढा त्रास असतांनाही केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आम्हाला साधना समजली. आता आम्ही आपापल्या परीने साधना करत आहोत. एवढ्या त्रासातही आम्ही सर्व जण केवळ गुरुकृपेनेच जिवंत आहोत. अशी स्थिती असतांनाही ‘बाबांनी संतपदही गाठले’, ही केवळ आणि केवळ गुरुकृपाच !’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१.५.२०२३)

Leave a Comment