परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७२ वर्षे) ! (भाग १)

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा साधनाप्रवास येथे पाहूया.

अनुक्रमणिका

सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा साधनाप्रवास वाचतांना त्यांची मागील अनेक जन्मांची साधना असल्यामुळे ‘त्यांना लहान वयापासूनच साधनेची ओढ आणि तळमळ होती’, हे लक्षात येते. त्यांना भेटलेल्या सर्व संतांविषयी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेला अपार भाव लक्षात येतो. त्यांच्यातील ‘कर्तेपणा नसणे आणि परिस्थिती स्वीकारून आज्ञापालन करणे’ हे महत्त्वाचे गुण लक्षात येतात.

 

१. लहानपणापासून साधनेविषयी असलेले कुतूहल आणि साधनेची ओढ !

मला लहानपणापासून संन्यासी आणि संत यांच्याविषयी पुष्कळ जिज्ञासा असायची. मी त्यांना भेटून त्यांच्या साधनेच्या संदर्भातील प्रश्न विचारत असे. मी त्यांना ‘त्यांचा साधनामार्ग आणि त्यांच्या मार्गाने साधना करता येण्यासाठी ‘मी काय करायला हवे ?’, असा प्रश्न विचारत असे.

 

२. संतांचा वेळोवेळी लाभलेला सहवास आणि आशीर्वाद !

२ अ. श्री राघवेंद्रगुरुजींचा आशीर्वाद प्राप्त होणे आणि त्यांच्या माध्यमातून गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन लाभल्याचे जाणवणे

वर्ष १९८४ मध्ये मी ‘एम्.ए.’ करत असतांना श्री राघवेंद्र स्वामी (तमिळनाडू येथील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्त्वज्ञानी) यांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले होन्नाळी तालुक्यातील बसवापट्टण येथील श्री राघवेंद्रगुरुजी यांना मी वरचेवर भेटत होतो. त्यांनी स्थापन केलेल्या चतुर्मुख राघवेंद्र स्वामींच्या वृंदावनाच्या जीर्णाेद्धार कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. त्यामुळे मला त्यांचा पूर्ण आशीर्वाद लाभला. त्यामुळेच आज मला अध्यात्मात पुढच्या टप्प्याला घेऊन जाणाऱ्या प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मार्गदर्शनाचे भाग्य लाभले. यातून ‘गुरुतत्त्व कोणत्या ना कोणत्या रितीने साधकाला योग्य साधनेत घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करते आणि योग्य गुरूंकडे घेऊन जाते’, हे मला शिकायला मिळाले.

२ आ. संत सहवास

मला अवधूत आचारबाबा आणि अवधूत योगिनीअम्मा, पू. सिद्दण्णा अन् प.पू. देवबाबा या संतांचाही अनेक वेळा सहवास घडून त्यांचे आशीर्वाद लाभले.

२ इ. प.पू. परुळेकर महाराज यांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे

वर्ष २००१ मध्ये मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प.पू. परुळेकर महाराज यांच्या भेटीची आणि ३ दिवस त्यांच्या आश्रमात राहून सेवा करण्याची संधी लाभली. ‘मी सनातन संस्थेचा साधक आहे’, हे जाणून ते अत्यंत आनंदी झाले. ‘सनातनचे साधक आणि ते करत असलेली सेवा’ याचे त्यांनी पुष्कळ कौतुक केले. त्यांनी आमच्या श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) स्तुती केली.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सत्संग आणि अभ्यासवर्ग घेणे अन् त्यातून स्वतःचीही साधना होणे

वर्ष १९९८ नंतर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला टप्प्याटप्प्याने साधना करण्यासाठी प्रेरित केले. गुरुदेवांनी संसारातील कटकटी आणि मायेतील आवरण यात आकंठ बुडालेल्या मला योग्य साधनामार्गात आणून माझा भाग्योदय करून दिला. गुरुदेवांनी माझ्याकडून कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर, न्यामती, शिवमोग्गा, शिकारीपूर, भद्रावती, सुरहोन्ने आणि ताळगुप्पा इत्यादी ठिकाणी असणाऱ्या सनातनच्या साधकांना भेटून त्यांचा सत्संग अन् अभ्यासवर्ग घेणे इत्यादी सेवा करवून घेतल्या. गुरुकृपेने साधकांची सत्संगातील संख्या वाढत गेली आणि त्यासह माझाही आध्यात्मिक विकास होत गेला. गुरुदेवांच्या कृपेने मला १६ वर्षे कर्नाटकात राहून सेवा करण्याचे भाग्य मिळाले. गुरुदेवांनी मला सेवा आणि साधना या माध्यमातून अनेक विषय शिकवले.

 

४. पत्नीचे आजारपण, तिची सेवा आणि निधन

४ अ. पत्नीचे आरोग्य बिघडल्यावर सेवाकेंद्रातील विविध सेवा करायला शिकणे

मी अधिकोषाच्या चाकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर दीड वर्ष दक्षिण भारतात सेवा केली. गुरुदेवांनी मला संपूर्ण दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांना भेटी देऊन सेवा करण्याची संधी दिली. माझ्या पत्नीचे आरोग्य बिघडल्यानंतर त्यांनी मला मंगळुरू सेवाकेंद्रात विविध सेवा करायला शिकवल्या. सेवेत माझ्याकडून झालेल्या अनेक चुका पू. राजेंद्रदादांच्या (आताचे सद्गुरु राजेंद्रदादा शिंदे यांच्या) माध्यमातून दाखवून देऊन त्यांनी स्वभावदोषांमुळे माझी साधनेत होणारी अधोगती थांबवली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ४ वर्षे पत्नीची सेवा केल्यानंतर संतपद प्राप्त होणे आणि पत्नीही जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होणे

‘माझा आणि पत्नीचा देवाण-घेवाण हिशोब अधिक आहे’, असे सांगून गुरुदेवांनी माझ्याकडून ४ वर्षे पत्नीची सेवा करवून घेतली आणि आमच्या दोघांमधील देवाण-घेवाण हिशोब न्यून केला. त्यांनी मला संतपदाला नेले आणि पत्नीला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त केले. पत्नीच्या आजारपणात तिची सेवा करण्याची संधी देणाऱ्या श्री गुरूंच्या चरणी कोटीशः नमन !

४ इ. पत्नीचे निधन झाल्यावर स्थिर रहाता येणे

मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना माझ्या पत्नीची प्रकृती पुष्कळ बिघडली आणि त्यातच तिचे निधन झाले. तेव्हा गुरुकृपेने मी स्थिर होतो.

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हात धरून साधनेत प्रगती करवून घेणे

पत्नीच्या मृत्यूनंतर माझ्या पुढील साधनेसाठी त्यांनी मला देवद आश्रमात जाण्यास सांगितले. माझ्या साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुदेव माझा हात धरून मला सामान्य साधक ते संतपदापर्यंत पुढे घेऊन गेले. याविषयी कृतज्ञता शब्दांत सांगणे शक्य नाही. ‘माझी साधना कशी होणे अपेक्षित आहे ?’ ते गुरुदेवांना ठाऊक आहे. मी कर्नाटकात असतांना गुरुदेवांनी टप्प्याटप्प्याने माझा हात धरून माझ्या मनात आणि बुद्धीत बसून माझ्याकडून सर्व सेवा करवून घेतल्या. गुरुदेवांनी माझी साधनेत पुढील प्रगती होण्यासाठी वरचेवर मार्गदर्शन करून माझा हात धरून मला पुढे नेले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता अर्पण करतो.

 

६. देवद आश्रमात लाभलेला संतांचा सहवास आणि सत्संग !

६ अ. देवद आश्रमात आल्यावर अनेक संतांचा सत्संग लाभून त्यांचे गुण जाणून ते आत्मसात करता येणे

देवद आश्रमात आल्यावर मला मिळालेली मोठी संधी म्हणजे इथे असलेल्या संतांचा सत्संग ! मला वेगवेगळ्या संतांसह त्यांच्या निवासस्थानी रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला इथले अनेक संत करत असलेली साधना आणि त्यांचे गुण जाणून घेऊन आत्मसात करण्यास साहाय्य झाले. गुरुदेवांनी मला एवढ्या संतांच्या सहवासात ठेवून ते करत असलेली साधना आणि त्यांनी केलेल्या सेवा यांविषयी सविस्तर समजून घेण्याची संधी दिली.

६ आ. सर्व संतांचे विचार समजल्यामुळे पुष्कळ लाभ होणे

आठवड्यातून एकदा होत असलेला संतांचा सत्संग, म्हणजे संतांसाठी श्री गुरूंनी दिलेले एक व्यासपीठच होते. या सत्संगात संतांना साधनेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी सविस्तरपणे सांगण्यात येते. त्यामुळे आम्हाला साधनेची दिशा मिळते. प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि प्रकृती भिन्न असल्याने आम्हाला साधनेसाठी पुष्कळ विषय शिकायला मिळायचे. या सत्संगात सर्व संत मनमोकळेपणाने विचार मांडत असल्याने त्याचा मला पुष्कळ लाभ होत आहे.

६ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सत्संग लाभणे

देवद आश्रमात असतांना मला झालेला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सत्संगाचा लाभ, म्हणजे माझे अहोभाग्यच म्हणावे लागेल. मी वरचेवर त्यांच्या कक्षात जाऊन त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेत असे. त्यांच्या आशीर्वचनाचा लाभ आश्रमातील आम्हा सर्वांना नेहमीच मिळत होता. ‘अशा महान संतांचे मार्गदर्शन मिळणे’, हे आम्हा सर्वांचे पूर्वजन्माचे सुकृतच म्हणावे लागेल.

६ ई. दोन ज्येष्ठ संतांच्या हस्ते वाढदिवस साजरा होणे

माझ्या ७० व्या वाढदिवसाच्या वेळी प.पू. दास महाराज देवद आश्रमात आले होते. तेव्हा प.पू. दास महाराज यांनी प.पू. पांडे महाराज यांच्या हस्ते मला शाल देऊन माझा सन्मान केला. हा माझ्या जीवनातील एक सुवर्ण क्षणच होता. ‘ध्यानीमनी नसतांना माझ्या वाढदिवसाला दोन ज्येष्ठ संतांकडून माझा सत्कार होणे’, हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल. प.पू. दास महाराज आणि माझे संबंध हे पूर्वजन्मीचे सुकृतच आहे.

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची पूजा करण्याची संधी मिळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका देवद आश्रमात आल्यावर त्यांची पूजा करण्याची आणि आश्रमाच्या ध्यानमंदिरात त्यांची स्थापना करण्याच्या सेवेची संधी मला देण्यात आली. हे गुरुकृपेने मला लाभलेले मोठे भाग्यच होते.

 

८. पाठदुखीचा त्रास असल्याचे कुणापाशीही न बोलता सर्वांतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सेवा आणि नामजप करतांना आरामात बसता येईल’, अशी आसंदी पाठवल्याने गुरुदेवांचे महानत्व कळून कृतज्ञता वाटणे

मला अनेक वर्षांपासून पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे मला पुष्कळ वेळ बसल्यास पाठीत वेदना होतात. याविषयी मी कधी कोणाला सांगितले नव्हते. देवद आश्रमात सेवा करतांना मला दिलेली आसंदी मला आराम देणारी नव्हती; परंतु मी त्यात विनातक्रार बसत होतो, तसेच मला प्रतिदिन २ – ३ घंटे नामजपासाठीही बसावे लागत असे. त्यामुळे माझी पाठदुखी पुष्कळ वाढली. याविषयी मी कोणापाशीही बोललो नव्हतो; पण सर्वांतर्यामी (सर्वांच्या अंतरात असलेल्या) श्री गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सर्व समजले. वर्ष २०१९ मध्ये माझ्यासाठी आरामखुर्ची पाठवण्यात आली. त्यामुळे मला नामजपासाठी काही घंटे आरामात बसता येऊ लागले. सेवेच्या ठिकाणीही मला अनुकूल अशा आसंदीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सेवा आणि नामजप करतांना होणारी माझी पाठदुखी पुष्कळ न्यून झाली.

त्यातून ‘साधकाने त्रास सांगितले नाहीत, तरी गुरुदेव जाणून ते दूर करतात’, हे मला शिकायला मिळाले. त्यामुळे मला गुरुदेवांच्या अलौकिक महिमेची जाणीव झाली. असे महान गुरु आम्हाला देणाऱ्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

 

९. देवद आश्रमात समष्टी सेवेची मिळालेली सुसंधी !

९ अ. अनेक वेळा समष्टीसाठी नामजप करण्याची संधी मिळणे

देवद आश्रमात अनेक संत असल्यामुळे संत आणि साधक यांच्यासाठी मंत्रजप करण्याची संधी मिळते. अनेक वेळा मलाही ते मंत्रजप करण्याची संधी मिळाली. ‘साधक आणि संत यांना वरचेवर होणारे आजार अथवा वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे होणारे त्रास’ यांसाठी मला पुष्कळ वेळा मंत्रजप करण्याची संधी मिळत होती. त्यामुळे माझी समष्टी सेवाही होत होती.

९ आ. सात्त्विक उत्पादनांच्या सेवेची संधी मिळणे

देवद आश्रमात सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा शिकून घेण्याची मला संधी मिळाली.

 

१०. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे साधनेसाठी मिळणारे अमूल्य मार्गदर्शन !

१० अ. सेवाकेंद्रात रहात असतांना अन् आता देवद आश्रमात आल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ होणे

माझे महत् भाग्य, म्हणजे सद्गुरु राजेंद्रदादांची (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची) माझ्यावरील प्रीती आणि मला साधनेच्या पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्याची त्यांची तळमळ ! मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना सद्गुरु राजेंद्रदादांनी मला केलेले मार्गदर्शन माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी अमूल्य आहे. सेवाकेंद्रात असतांना माझ्याकडून झालेल्या चुका सांगून, मला मार्गदर्शन करून आणि माझे शुद्धीकरण करून मला या स्थितीला आणण्यात सद्गुरु राजेंद्रदादांचा अमूल्य सहभाग आहे. गुरुकृपेने देवद आश्रमात आल्यावर मला पुन्हा त्यांचे मार्गदर्शन आणि सत्संग यांचा लाभ मिळू लागला. प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या संतांच्या सत्संगात मला त्यांचे अत्यंत अमूल्य दृष्टीकोन मिळत होते.

१० आ. सांसारिक जीवन आणि साधना यांतील अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य दृष्टीकोन देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्रदादांची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असते. त्यांनी माझ्या वैयक्तिक अडचणींविषयीही जाणून घेऊन, त्यावर योग्य दृष्टीकोन देऊन मला साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेले. हे माझे कोणत्या तरी जन्माचे पुण्य आहे. ते माझी पुष्कळ काळजी घेतात. हा मला मिळालेला गुरुकृपेचा आशीर्वादच आहे. माझ्या तोंडवळ्यावर होणारा किंचितसा पालटही हेरून ते मला त्यांच्या कक्षात बोलावून त्याविषयी सर्व सविस्तर जाणून घेऊन योग्य दृष्टीकोन देतात.

१० इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी वैयक्तिक जीवन आणि साधना यांतील अडचणींवर मार्गदर्शन करून योग्य दृष्टीकोन दिल्यामुळे साधनेतील अडथळे दूर होणे अन् ही मोठी गुरुकृपाच असणे

माझ्या संसारातील काही अडचणींवर मला सद्गुरु राजेंद्रदादांचे मार्गदर्शन आणि दृष्टीकोन मिळाले नसते, तर माझ्या आध्यात्मिक जीवनात त्याचा मोठा अडथळा निर्माण झाला असता. असे सद्गुरु या आश्रमाला देऊन गुरुदेवांनी मोठी कृपाच केली आहे. सद्गुरु राजेंद्रदादांकडून मिळणारे मार्गदर्शन ही आम्हा सर्वांवर असलेली गुरुकृपाच आहे. गुरुदेवांनी मला ‘मंगळुरू येथून देवद आश्रमात का पाठवले ?’, हे मला टप्प्याटप्प्याने समजू लागले आहे. ‘मी मंगळुरू सेवाकेंद्रात सेवा करत असतांना सद्गुरु राजेंद्रदादांचे तिकडे झालेले आगमन अन् आता या आश्रमात पुन्हा माझ्या पुढच्या आध्यात्मिक साधनेसाठी त्यांच्याशी आलेला संबंध हे केवळ माझ्या साधनेसाठीच आले आहेत’, असा माझा दृढ विश्वास आहे.

– पू. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment