देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका !

उत्सव हे मनोरंजन आणि कला यांच्या प्रदर्शनासाठी नसून देवाची उपासना करून चैतन्य मिळवण्यासाठी असतात. हिंदूंच्या सणांच्या दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर कार्यरत होते. श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत श्री गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ करून घेण्यासाठी श्री गणेशाची आराधना करतात. श्री गणेशाची मूर्ती जर मूर्तीशास्त्रानुसार योग्य आकारातील म्हणजेच प्रत्यक्ष श्री गणेश या देवतेच्या प्रत्यक्ष रूपाप्रमाणे असेल, तर त्याचा भाविकांना लाभ होतो. अध्यात्मशास्त्रानुसार देवतेची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्र असते. त्यामुळे देवतेचे रूप धर्मशास्त्रानुसारच असायला हवे. त्यातून देवतेचे तत्त्व कार्यरत होते. विविध आकाराच्या, तसेच विविध वस्तूंपासून देवतेची मूर्ती सिद्ध केल्यास त्यातून त्या देवतेचे तत्त्व प्रक्षेपित होत नाही आणि त्याचा लाभही भाविकाला मिळत नाही.

 

वेगवेगळ्या उपकरणापासून श्री गणेशमूर्ती !

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकाग्रहास्तव गांधीजी किंवा नेहरूंचे रूप कल्पून मूर्ती केली जायची. त्याप्रमाणे सध्याही काही ठिकाणी शिवाजी महाराजांसारखी दिसणारी, एखाद्या संतांसारखी दिसणारी मूर्ती केली जाते. फुटबॉल किंवा क्रिकेट खेळणारा गणपति, बुलेटवरील गणपति यांसारख्या गणेशमूर्तीही बनवल्या जातात. मुंबईजवळील कल्याण येथील एका गणेशोत्सव मंडळाने तर वैद्यकीय उपकरणांपासून गणेशमूर्ती बनवली होती. त्यात सोंड म्हणून इंजेक्शनची सिरींज, कान म्हणून किडनी ट्रे, मुकुट म्हणून बाटली, हात म्हणून ग्लोव्हज्, डोळे म्हणून कॅप्सूल, अशा विविध वैद्यकीय उपकरणांचा वापर केला होता. केवळ कल्पनाविलास आणि आधुनिक जीवनप्रवाह यांचा अनाठायी आणि निष्फळ मेळ घालण्याचा प्रयत्न अशा मूर्ती बनवतांना दिसून येतो. हे सर्वस्वी चुकीचे आहे; कारण गणपतीची तुलना नेता, सैनिक, खेळाडू इत्यादींशी करता येत नाही. सवंग लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी गणेशमूर्तीचे मानवीकरण केले जाते. संत आणि देव यांत फरक आहे; म्हणून संतांच्या रूपातही गणेशाची मूर्ती स्थापू नये.

 

देवतेला चित्रविचित्र रूपांत दर्शवल्याने तो देवतेचा अवमान !

१९५० साली महाराष्ट्र शासनाने गणेशमूर्तीचे वेशांतर आणि मानवीकरण यांवर बंदी घातली होती; मात्र कालांतराने या नियमांमध्ये शिथिलता आली. वेगवेगळ्या रूपांतील आणि वेशभूषांतील मूर्तींमुळे लोकांच्या मनातील त्या देवतेविषयीच्या श्रद्धेवर आणि भावावर परिणाम होतो, तसेच देवतेला चित्रविचित्र रूपांत दर्शवल्याने तो देवतेचा अवमानच ठरतो.

 

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ करून देणारी मूर्ती बनवा !

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या सिद्धांतानुसार मूर्तीविज्ञानाप्रमाणे योग्य मूर्ती बनवल्यासच त्या त्या मूर्तीमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. या सिद्धांताचे पालन न करता मूर्ती बनवल्यास ते तत्त्व त्या मूर्तीमध्ये येऊ शकत नाही. परिणामी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्या मूर्तीचा भाविकाला लाभ होत नाही.

सार्वजनिक गणेशोत्सवात काही वेळा अयोग्य रूपातील गणेशमूर्ती आणल्या जातात. यामागील कारण म्हणजे त्यातून ‘आपण यंदा काहीतरी नवीन करून दाखवले’, असे संबंधित कार्यकर्त्यांना वाटते. बर्‍याचदा सामान्य हिंदूही त्या उत्साहाने पहायला जातात आणि त्यांची स्तुती करतात. हे सर्व धर्माविषयीच्या अज्ञानातून घडते. खरेतर अशा मूर्ती म्हणजे देवतेचे विडंबन असते. आपण याच विषयाबद्दल विस्ताराने आता पहाणार आहोत.

 

श्री गणेशाच्या विडंबनात्मक मूर्ती म्हणजे काय ?

श्री गणेशाच्या रूपाचे वर्णन शतकानुतके ऋषि-मुनी, संत-महात्मे यांनी त्यांच्या साहित्यातून करून ठेवलेले आहे. ‘हे वर्णन त्यांना त्यांच्या साधनेमुळे प्राप्त झालेल्या अनुभूतींच्या आधारे झाले आहे. कल्पनेतून नव्हे’, हे सूत्र आपण समजून घ्यायला हवे. त्या रूपातून संतांना प्रत्यक्ष ॐ काराचीही अनुभूती आलेली आहे. धर्मशास्त्रात याच रूपाविषयी सांगितले आहे. ‘श्री गणेशाचे योग्य रूप उपासनेसाठी समोर ठेवले, तर सामान्यांना अधिकाधिक लाभ मिळेल’, हे स्पष्ट असल्याने धर्मशास्त्रात ‘श्री गणेशाची मूर्ती कशी असावी’, याचे निर्देश दिले आहेत. असे असतांना या शतकानुशतके धर्मशास्त्रात सांगितलेल्या आणि तेही संतांच्या अनुभूतीतून निश्‍चित झालेल्या रूपापेक्षा कोणत्याही भिन्न रूपातील श्री गणेशाची अशास्त्रीय मूर्ती उत्सवासाठी आणणे म्हणजे त्याचे विडंबन नव्हे का ?

प्लास्टिकच्या वस्तूंंपासून, लोखंडी सांगाड्यात दगड घालून, भाज्यांपासून, शीतपेयांच्या बाटल्यांपासून बनवलेले गणपति, लांब सोंड असलेला अयोग्य रूपातील गणपति, राजकारण्यांसमवेत चहा पित असलेले गणपति अशा विविध प्रकारे गणपति बनवण्यात येतात.

अशा मूर्तींमुळे श्री गणेशाचे विडंबन होते. श्री गणेशाची अयोग्य रूपातील मूर्ती आणल्याने आध्यात्मिक स्तरावर काही लाभ तर होतच नाही, उलट हानीच होते. संतांना, साधना करणार्‍यांना, देवतेप्रती भाव असणार्‍यांना याची जाणीव आतूनच होते.

श्री गणेशाची विडंबनात्मक प्रतिमा वापरल्यास वातावरणावर आध्यात्मिक स्तरावर होणारा नकारात्मक परिणाम वाढतो आणि सकारात्मक परिणाम न्यून होतो. सर्वसाधारण प्रतिमा वापरली, तर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम न्यून होतो, तर सकारात्मक परिणाम काही प्रमाणात वाढतो. धर्मशास्त्रानुसार, साधना  म्हणून, संतांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली प्रतिमा वापरल्यास नकारात्मक परिणाम पुष्कळ न्यून होतो आणि सकारात्मक परिणाम पुष्कळ वाढतो.

यावरून ‘श्री गणेशाची विडंबनात्मक प्रतिमा वापरणे किती चुकीचे आहे आणि श्री गणेशाची धर्मशास्त्रानुसार बनवलेली प्रतिमा वापरणे किती योग्य आहे’, हे स्पष्ट होते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’

 

आस्थापने कधी अन्य धर्मियांच्या
श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याचे धाडस करतात का ?

एका आस्थापनाने एका विज्ञापनाद्वारे श्री गणेशाचे विडंबन केले असून केसांना श्री गणेशाचा आकार केला आहे. ११ सप्टेंबर २०१८ च्या दैनिक लोकमतच्या पृष्ठ क्रमांक १ वर हे विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे.

देवतेचे अशा प्रकारे मानवीकरण करून उत्पादनाच्या विक्रीसाठी वापर करणे निषेधार्हच !

‘फॉरच्यून बेसन’ या आस्थापनाने श्री गणेश आवडीने बेसनाचे लाडू खात आहे, असे दाखवले आहे आणि एक प्रकारे श्री गणेशाचे विडंबन करून त्याचा विज्ञापनासाठी वापर केला. हे विज्ञापन दैनिक सकाळच्या पृष्ठ ३ वर प्रसिद्ध झाले आहे. (सप्टेंबर २०१८)

खाद्यपदार्थांपासून मूर्ती साकार करणे म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच आहे !

एरंडवणे परिसरात ‘गणेश भेळ’च्या वतीने पाणीपुरींच्या १० सहस्र पुर्‍यांपासून साकारण्यात आलेली गणेशमूर्ती

अशा प्रकारे उंच आणि खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचे पूजन आणि विसर्जन तरी कसे करणार ?

कच्च्या केळ्यांच्या घडापासून साकार केलेली अवाढव्य आकाराची श्री गणेशाची मूर्ती

देवतेचे विडंबनात्मक चित्र काढून मनोरंजनासाठी वापर करणे, म्हणजे देवतेचा अवमानच होय !

दैनिक सकाळमध्ये आलेले श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र

अशा मानवीरूपात साकारलेल्या अशास्त्रीय मूर्ती या धर्मशिक्षणाच्या अभावाचाच परिणाम !

एका पोलीस निरीक्षकाने त्याच्या घरी बसवलेली मूर्ती

या पानावर श्री गणेशाची चित्रे प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणे, हा हेतू नसून वस्तुस्थिती समजावी यासाठी प्रसिद्ध केली आहेत. – संपादक

नागपूर येथील आदिवासी वसतिगृहात रद्दी पेपरच्या माध्यमातून गणेशाची प्रतिमा !

रद्दी कागदापासून निर्माण केलेला गणपति हा पर्यावरपूरक नसून पर्यावरणाची हानी करणारा आहे. त्यामुळे पाण्यातील प्राणवायू (ऑक्सिजनचे) प्रमाण न्यून होते आणि पर्यावरणाची हानी होते, तसेच माशांनी हे कागद खाल्ल्यामुळे त्यांच्या श्‍वासनलिकेत अडकून त्यांचा मृत्यू होतो. उलट प्लास्टर ऑफ पॅरिसने जलप्रदूषण होत नाही, असा अहवाल ‘सृष्टी इको रिसर्च’ या संस्थेने दिला आहे ! पर्यावरणपुरकच्या नावाखाली पुरो(अधो)गामी राबवत असलेल्या कल्पना या प्रत्यक्षात पर्यावरणाची हानी करणार्‍या आहेत हे लक्षात घ्या !

भाजी विकणारी श्री गणेशाची मूर्ती
बिस्किटांपासून साकार केलेली श्री गणेशाची मूर्ती

धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन !

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव गणेशभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी. सनातन संस्था यासंदर्भात वैध मार्गाने कार्य करत आहे.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment