हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

Article also available in :

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच भारताच्या सर्व समस्यांवरील उपाय असणे
आणि तो मतपेटीतून अन् राजकारण्यांच्या साहाय्याने नाही, तर संतांच्या आशीर्वादानेच साध्य होईल !

‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची लक्तरे भारतात सर्वत्र दिसून येत आहेत. याला बहुतांश राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत. त्यामुळे भारतभर वेळोवेळी होणार्‍या निवडणुकांत कोणीही निवडून आले, तरी ‘भारताच्या स्थितीत काही पालट होईल’, अशी अपेक्षा करणे अत्यंत चुकीचे आणि घातक आहे. यावर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे संतांच्या पुढाकाराखाली सात्त्विक लोकांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !

अ. बहुतेक राजकारण्यांचा संपर्क नकोसा वाटणे आणि संतांचा सहवास हवाहवासा वाटणे

सनातनच्या आश्रमांत अनेकदा संत येतात.  संत आश्रमात आल्यावर किंवा त्यांची बाहेर कुठे भेट झाल्यावर साधकांना भाव जागृत होणे; चैतन्य, आनंद किंवा शांती अनुभवणे, अशा अनुभूती येतात. त्यामुळे ‘संतसहवास पुन:पुन्हा मिळावा, संतसेवा करायला मिळावी’, अशी त्यांच्यात ओढ निर्माण होते.

याउलट अनेक राजकारणी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात असलेल्या अहंमुळे त्यांचा सहवास नकोसा वाटतो. साधकांना त्यांच्यातील अहं सहन होत नाही, तर ईश्‍वराला सहन होईल का ? त्यामुळेच ईश्‍वर राजकारणी आणि लोकप्रतिनिधी यांना दूर ठेवतो. ईश्‍वराने दूर ठेवलेल्यांकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला कधी साहाय्य मिळेल का ?

आ. राजकारणी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मनात हिंदु राष्ट्राची
स्थापना व्हावी, असे विचारही न येणे अन् संतच त्याबद्दल कृतीशील असणे

रज-तम प्रधान राजकारणी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मनात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, असे विचारही येत नाहीत; कारण त्यांना ‘स्वतःच राज्य करावे’, असे वाटते. सत्त्वप्रधान संतांच्याच मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, असे विचार येतात. संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्‍वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते. संतांच्या स्तराप्रमाणे ते स्थुलातील साहाय्य, धार्मिक विधी, संकल्प, आशीर्वाद आणि अस्तित्व, अशा विविध माध्यमांतून साहाय्य करतात. आता आपत्काळ जसा चालू होत आहे, तसे सनातन संस्थेला होणार्‍या त्यांच्या साहाय्याचे प्रमाणही वाढत आहे.

इ. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे

स्थुलातील कोणतीही गोष्ट घडण्याआधी ती सूक्ष्मातून घडलेली असते. या नियमानुसार स्थुलातील हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याआधी ती सूक्ष्मातून व्हावी लागते. अनिष्ट शक्तीविरुद्धचा हा सूक्ष्मातील लढा संतच लढू शकतात, राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे ! म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. अध्यात्मात कर्मफलसिद्धान्त महत्त्वाचा मानला आहे. कर्माचे फळ अटळ आहे. केलेल्या कर्माचे फळ पाप-पुण्याच्या रूपात भोगावे लागते. भावनिक कृतींमुळे केलेल्या हिंसेचे फळही भोगावे लागते. यासाठी सनातनमध्ये कुठेही भावनिक कृतींना स्थान नाही.

२. हिंदु राष्ट्राची स्थापना ही होणारच आहे; पण ती क्षात्रधर्माच्या नावे केलेल्या भावनिक प्रयत्नांमुळे नाही, तर कालमाहात्म्यानुसार होणार आहे. प्रभु श्रीरामाला १४ वर्षांच्या वनवासानंतर, तर पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर राज्य प्राप्त झाले. त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार हिंदूंनाही वाईट काळ सरल्यानंतर हिंदु राष्ट्र निश्‍चित मिळणार आहे !

३. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांच्या दृष्टीने धर्म आणि अधर्म यांच्यातील लढा स्थुलातून नव्हे, तर सूक्ष्मातून जिंकणे महत्त्वाचे असते. सूक्ष्मातील विजय मिळवण्यासाठी प्रथम स्वतःला जिंकणे, म्हणजे काम, क्रोधादी षड्विकारांवर विजय मिळवणे आणि मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे !

वरील सर्व सूत्रे लक्षात घेऊन भावनिक कृतींपासून दूर रहाण्यासाठी साधकांनी स्वतःच्या साधनेकडे लक्ष केंद्रीत करणे आणि स्वभावदोष निर्मूलन करणे यांना प्राधान्य दिले पाहिजे. ‘भावनिक कृतींद्वारे स्वतःचे कर्मफल वाढणार नाही’, याकडे लक्ष देणे आणि ‘कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्र येणारच आहे’, यावर श्रद्धा ठेवून समष्टी कार्य करणे अपेक्षित आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, सनातन संस्था.

 

राजकारणी आणि संत

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment