लोकहो, दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यासच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल !

जनतेची होणारी पिळवणूक रोखूया । स्वराज्याचे सुराज्य करूया ॥

‘भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही अपयशी म्हणण्याची वेळ आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण आता केवळ मतांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले, तरी ते राबवणार्‍या व्यक्तीच जर असक्षम असतील, तर लोकशाही अपयशी ठरते.’ त्यामुळे केवळ राज्यघटना आणि लोकशाही चांगली असून उपयोग नाही, तर ती ज्यांच्या हातात आहे, ते राजकारणी निःस्वार्थी, प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यपरायण असायला हवेत.

आज राज्यव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था, पोलीस, प्रशासन, कृषी, संरक्षण आणि अर्थ अशा सर्वच व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता अन् अधिकारशाही यांचे प्रस्थ वाढलेले दिसून येत आहे. आपल्या प्रत्येकालाच याचा अनुभव प्रतिदिन येत असतो. सर्वांच्या मनात याविषयी चीड असते; मात्र ‘आपल्याकडे अन्य पर्याय नाही’, ‘आपले काम त्वरित व्हायला हवे’ किंवा ‘मी एकटा या व्यवस्थेशी कसा लढणार’, अशा विचारांनी आपणही याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनतो. असे सतत होत राहिल्यास मग ‘रामराज्य’ आणि ‘शिवशाही’ केवळ कथांमधून सांगण्यासाठी राहील. या दृष्टीनेच केवळ राजकीय व्यवस्थेवर टीका करून न थांबता, ‘हे राष्ट्र माझे आहे, ही माझी मातृभूमी आहे आणि या समाजाचा मी एक घटक आहे’, या दृष्टीने सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्याला या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. क्रांतीविरांनी आपल्या हाती हे स्वराज्य सोपवलेले असले, तरी त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे दायित्व आपल्यावर आहे, हे आपण विसरता कामा नये; म्हणून अन्याय सहन न करता आता त्याच्या विरोधात लढून तो रोखण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे. यासाठीच आजच्या विशेषांकात वर्तमानकाळात सामाजिक आणि शासकीय यंत्रणांकडून जनतेची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी करावयाच्या कायदेशीर कृती यांविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

आपण प्रत्येकाने ध्येयनिष्ठ बनून आणि संघटित होऊन अन्याय करणार्‍या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यास निश्‍चितच पुढच्या पिढीसाठी एका आदर्श राज्यव्यवस्थेचा, म्हणजेच रामराज्याची अनुभूती देणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment