नवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके !

Article also available in :

हिंदूंच्या उत्सवांत सध्या अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. उत्सवांचे बाजारीकरण झाल्याने मूळ शास्त्राचा हिंदूंना विसर पडला आहे. हिंदूंची भावी पिढी तर उत्सवांत शिरलेल्या या अपप्रवृत्ती म्हणजेच उत्सव असे समजू लागली आहे. ही स्थिती भयावह आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी यांना या संदर्भात काही जिज्ञासू महिलांनी प्रश्‍न आणि शंका विचारल्या. त्याचे निरसन करणारा लेख त्यांनी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमावर प्रसारित केला. मूळ लेखात फेरफार न करता काही संपादकीय संस्करणासह हा लेख येथे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

सर्व वेदवेत्त्या गुरुजनांना वंदन करून आज एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे, त्या अनुषंगाने अन् पौरोहित्य करतांना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो. १९ सप्टेंबरला प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक, भागवत आणि रामायण यांचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे अन् गणकप्रवर सिद्धांतिज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करूनच आज हा विषय मांडत आहे.

 

१. नवरात्रोत्सवाचे बाजारीकरण झाल्याचे दर्शवणारे महिलांचे प्रश्‍न !

अ. चार-पाच महिलांनी दूरभाषद्वारे माझ्याशी संपर्क केला आणि एक विचारणा केली. गुरुजी नवरात्रात प्रत्येक दिवशी विविधरंगी साड्या नेसाव्यात आणि देवीची अन् नवग्रहांची कृपा प्राप्त करून घ्यावी, असे मेसेज सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत आहेत. हे सत्य आहे का ?

आ. काही महिलांनी तर ९ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गळ्यातले अलंकार हवेत ? कोणते दागिने घालावेत ? आणि त्यामुळे देवीची कशी कृपा होते, याचेही मेसेज आल्याचे सांगितले. धर्मशास्त्रात असे काही दिले आहे का ?, असे विचारले.

इ. गरबा आणि दांडिया खेळ हाच देवीला आवडतो आणि तो खेळलात की, लक्ष्मी प्राप्त होईल, अशाही चर्चा होत आहेत. यात सत्यता आहे का ? गुरुजी धर्मशास्त्रात हे दिले आहे का ?, असा प्रश्‍न आज मातृवर्ग विचारतो आहे.

ई. मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगितले की, ऑफीसमध्ये (कार्यालयात) नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या आणि त्याला अनुसरून मॅचिंग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असे ठरते आहे. मी गरीब आहे, शिपाई पदावर काम करते, नवरा सतत आजारी असतो, मी एवढा खर्च करू शकत नाही तेव्हा मी काय करू ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर ? हा सौ. सावंत यांनी विचारलेला प्रश्‍न ऐकून मात्र मी हादरलोच आणि ठरवले की, यावर एक लेख द्यावा.

(या महिलांनी नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी त्यांच्या शंकांचे गुरूजींना जिज्ञासूपणे प्रश्‍न विचारून निरसन करून घेतल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! – संपादक)

 

२. गुरूजींनी केलेले शंकानिरसन आणि लक्षात आणून दिलेले संभाव्य धोके !

२ अ. नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात
कुठेही नसणे आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा असणे

४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा, असे दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा (स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. तुमच्यापाशी जे अलंकार असतील ते घाला. मॅचिंग हवेच असे नाही. मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरून हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बीभत्सपणा आला आहे.

आता याची पुढची आवृत्ती म्हणजे ‘नवरात्रीत ९ रंगांचे मास्क घाला’, अशी विज्ञापने झळकू लागली आहेत.

कोविडसारख्या महामारीत मास्क लावणे, हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नवरात्र आणि कोरोना यांचा लाभ उठवत मास्कविक्रेते अन् व्यावसायिक यांनी गल्ला भरण्यासाठी ९ रंगांच्या मास्कची संकल्पना विज्ञापनांमधून मांडली आहे. ९ रंगांचे मास्क घालणे उपासनेच्या दृष्टीने निरर्थक आहे.

२ आ. इव्हेंट मँनेजमेंट कंपन्यांची लुडबूड ! 

प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. महाराष्ट्रात घटस्थापना ही प्रधान असते. त्याचसमवेत अखंड नंदादीप, काही जणांकडे त्रिकाळपूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी कुमारिका पूजन आणि भोजन, तसेच माळा बांधणे, अशा पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन-पूजन, असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात या प्रांतात देवीच्या प्रतिमेचे पूजन करून रात्री जागरण, गरबा, तसेच होमहवन वगैरे पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात आणि नवीनच पद्धती निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो आणि त्यात देवीची उपासना हा सर्वांत मुख्य भागच नसतो.

२ इ. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे न कळल्यास पुढील पिढीचे धर्मांतर होईल ! 

प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य असते, परंपरा असतात. त्या जपल्याच पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले, नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा, दांडिया खेळणे एवढाच घेतील. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे त्यांना कळणारच नाही. मी हिंदु आहे, माझे आचार-विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा त्यांना एकदा विसर पडला की, गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा, काहीच फरक पडणार नाही. नेमकी हीच नस या इव्हेंट आणि मार्केटिंग आस्थापनांनी जाणली आहे. यात काही झाले, तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

एखादी गरीब भगिनी हे सध्याचे हाय फाय नवरात्र जमणार नाही म्हणून ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू ती नास्तिक होईल. श्रीमंती आणि धर्मशिक्षणाचा अभाव अन् मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या डिजे आणि गरबा-दांडियाला  नवरात्र समजतील, कारण त्यांना नवरात्र म्हणजे देवीची उपासना हे ठाऊकच नसणार. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदु समाजच कारणीभूत आहे.

२ ई. डे संस्कृती लादणार्‍या कंपन्या (आस्थापने) आणि त्यांच्या आहारी गेलेली तरुण पिढी !  

काही वर्षांपूर्वी डे संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या आणि ग्रिटिंग कार्ड (शुभेच्छापत्रे) करणार्‍या कंपन्या आपल्या देशात आल्या, तेव्हापासून हे डेचे खूळ डोक्यात शिरले. या दिवसांत कोट्यवधींची उलाढाल या कंपन्या करत आहेत. आज अशी अवस्था आहे की, मुलांना श्रीगणेशचतुर्थी, गोकुळाष्टमी कधी आहे, हे सांगावे लागते, तर डे मात्र ते लक्षात ठेवतात. गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच डिजेमय आणि मद्यमय झाली. किमान आईचा उत्सव (नवरात्रोत्सव) असा होता कामा नये, असे वाटते.

२ उ. नवरात्र काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची उपासना करावी ! 

चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली तो काळ म्हणजे हा नवरात्र आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले, असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युद्ध करतच नाही केवळ नाचतो.) या काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीदेवीची उपासना ही विद्या आणि बुद्धी यांकरिता करून घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरिता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रूसंहार सामर्थ्यप्राप्तीकरिता महाकालीची उपासना करावी.

२ ऊ. नट्यांसारखे नाचण्यापेक्षा तरुण मुलींनी पराक्रमी होण्यासाठी प्रयत्न करावेत ! 

मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे आणि छेडछाड करणार्‍या गुंडांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे, याकरिता देवीचे माहात्म्य अन् पराक्रम वाचावेत ही आज काळाची आवश्यकता आहे. नट्यांसारखे नाचण्यापेक्षा महाकालीसारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरची चेन्नमा, जिजाबाईं यांच्यासारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे आणि आवश्यकताही त्याचीच आहे. नाचणारे खूप झाले आहेत; पण पराक्रमी मात्र अल्प होत आहेत.

२ ए. मुलामुलींना धोक्यांची जाणीव करून देणे हे कर्तव्य ! 

या दांडिया आणि गरब्याच्या काळात संततीनियमन साधनांची विक्री दुप्पट होते आणि नंतर शालेय अन् महाविद्यालयीन तरूणींच्या गर्भपाताचे प्रमाणही वाढत आहे. लव्ह जिहाद याच काळात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुलामुलींना या धोक्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा या मार्केटिंग आणि इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्त्विकरित्या, आनंदाने, आपल्या परिस्थितीनुरूप जगदंबेची सेवा करा आणि देवीची कृपा संपादन करा, ही विनंती !

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग

 

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा !

गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा, ‘गरबा खेळणे’.

पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून गरबा खेळला जातो. गरब्याच्या निमित्ताने व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण इत्यादी प्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे. सनातन काही वर्षांपासून या अपप्रकारांविरुद्ध जनजागृती चळवळ राबवते. यात तुम्हीही सहभागी व्हा !

‘हिंदू राष्ट्रा’त देवळे सुरक्षित असतील !

हे नसावे !

हे असावे !

वर्गणीसाठी बळाचा वापर वर्गणी ऐच्छिक
प्लास्टर ऑफ पॅरीसची अशास्त्रीय अवाढव्य मूर्ती शाडूची / नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
कृत्रिम सजावट, भव्य मंडप, विद्युत लखलखाट नैसर्गिक तसेच दिव्यांची सजावट, लहान मंडप
चित्रपटगीते / फटाके यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण आरती, नामजप आदींमुळे वातावरणात सात्त्विकता
मिरवणुकीत हिडीस नाच, मद्यपी, गुलालाचा अतिरेक देवीचा नामजप करत अनुशासनबद्ध मिरवणुक

 

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा होणासाठी हे करा !

१. भव्य मंडप, ‘डॉल्बी’ ध्वनीवर्धक, कृत्रिम अन् विद्युत सजावट यांवर अनाठायी खर्च टाळा !

२. आरत्या कर्णकर्कश आवाजात नव्हे, तर एक सुरात व सुस्पष्ट म्हणा ! वाद्ये हळू वाजवा !!

३. विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा अतिरेक, ध्वनीवर्धकांद्वारे ध्वनीप्रदूषण, हिडीस नाच, फटाके, महिलांशी असभ्य वर्तन आणि मद्यपान आदी अधर्माचरण करू नका !

 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !

राष्ट्रावर कर्ज, दारिद्र्य, आणि वीजटंचाई यांचे भीषण संकट असतांना नवरात्रोत्सवात खर्चिक आरास, झगमगाट आणि फटाके वाजवणे, ही राष्ट्रहानीच आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रवचन, कीर्तन, संतकथा, क्रांतीकारकांच्या शौर्यगाथा यांसारखे राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करा !

Leave a Comment