आरंभीपासूनच अवतारत्वाच्या विविध कला दर्शवणारे; परंतु अवतारत्व सुस्पष्ट होऊ न देणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

१. योग्य वेळी योग्य वाक्य उच्चारून जीवनाला एक स्वार्थविहीन
आणि समष्टीपोषक दिशा देणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

१ अ. मेव्हण्याचे निवृत्तीवेतन मिळण्याकरता प्रयत्न करतांना मुंबई येथील
कार्यालयात जावे लागणे आणि त्या वेळी तेथील सेवाकेंद्रात जाण्याचा योग येणे

वर्ष १९९२ मध्ये माझ्या सासूबाईंचे (माझी पत्नी सौ. मधुवंती पिंगळे यांच्या आईचे) देहावसान झाले. त्यांच्या पश्चात् माझा मेहुणा (पत्नीचा लहान भाऊ) शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याने त्याला आईचे कुटुंब निवृत्तीवेतन मिळू शकत होते. निवृत्तीवेतनाची कागदपत्रे पुढे पाठवण्यासाठी संबंधित कर्मचार्यांना पैसे न दिल्याने वर्ष १९९७ पर्यंत त्याचे निवृत्तीवेतन संमत झाले नव्हते. मी त्याला निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो. यासंदर्भात मला मुंबई येथील संबंधित कार्यालयात जावे लागले. त्या वेळी मला प्रथम मुंबईतील सेवाकेंद्रात जाण्याचा योग आला.

१ आ. वैयक्तिक कामासाठी आल्याने सेवाकेंद्रात न रहाता नातेवाइकांकडे
रहात असल्याचे सांगितल्यावर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी
आता तुमचे काही वैयक्तिक राहिले आहे का ?, असे विचारणे आणि त्यांच्या या वाक्याचा
अंतर्मनावर खोल परिणाम होऊन सर्वकाही आता श्रीगुरूंच्या इच्छेप्रमाणे होत असल्याची जाणीव होणे

मी सेवाकेंद्रात गेलो असतांना तेथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची भेट झाली. त्या वेळी त्यांनी विचारले, तुम्ही सरळ सेवाकेंद्रातच आला आहात ना ? मी सांगितले, नाही. वैयक्तिक कामासाठी आलो असल्याने सेवाकेंद्रात निवासाला आलो नाही. पनवेल येथे बहिणीकडे उतरलो आहे. त्या वेळी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले म्हणाले, आता तुमचे काही वैयक्तिक राहिले आहे का ? या वाक्याचा माझ्या अंर्तमनावर खोल परिणाम झाला. आपल्या जीवनात आता वैयक्तिक काहीच नसून सर्वकाही आता श्रीगुरूंच्या इच्छेप्रमाणे होत आहे, याची मला जाणीव झाली.

१ इ. निवृत्तीवेतन प्रकरणातील कार्यालयीन कामकाजाच्या अनुभवाचा धर्माधिष्ठित
राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी कराव्या लागणार्या सुधारणांचा अभ्यास होण्यासाठी उपयोग होणे

मेव्हण्याच्या निवृत्तीवेतन प्रकरणातून पैसे देऊन कामे करण्यासारख्या भारतातील प्रस्थापित भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची क्षमता आणि वैध मार्गाने लढण्यासाठीचा मार्ग परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनीच मला दाखवला आहे, याची माझ्या मनाला जाणीव झाली. नंतर मिरज येथे असतांना दैनिक सनातन प्रभात, मिरज आश्रम आणि सनातन संस्था यांच्या संदर्भात विविध कार्यालयीन प्रक्रिया करतांना या कार्यालयीन कामातील अनुभवाचा उपयोग झाला. इतकेच नव्हे, तर आदर्श समाजव्यवस्था किंवा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी कुठेकुठे सुधारणा करणे अपेक्षित आहे, याचा अभ्यासही झाला. पुढे समाजात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध ठिकाणी चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी लेखन करून घेऊन परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन धर्मराज्य स्थापनेचे संस्कार माझ्यात आणि समष्टीत रुजवण्याची कृपा केली.

१ ई. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी वरील वाक्यातून
पूर्णवेळ साधना आणि गुरुकार्य करून घेण्याचे बीज पेरले असल्याचे जाणवणे

माझ्या जीवनाला एक स्वार्थविहीन आणि समष्टीपोषक दिशा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या एका वाक्याने दिली. त्यातूनच पुढे त्यांनी माझ्याकडून पूर्णवेळ साधना आणि गुरुकार्य करून घेण्याचे बीज पेरले होते, याची जाणीव आज होते. यातूनच श्रीगुरु योग्य वेळी एखादे वाक्य उच्चारून साधक किंवा शिष्य यांच्या जीवनाला कशी दिशा देतात, त्याचे हे मूर्तीमंत उदाहरण होय.

२. श्रीगुरूंची प्रत्येक कृतीच समष्टीला दिशादर्शक असते, याची काही उदाहरणे

२ अ. दुष्काळी भाग असलेल्या जत येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या
आगमनानंतर धो-धो पाऊस येणे आणि त्यामुळे जतवासियांची परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी
आठवले यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होणे आणि ही परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या
समष्टी कार्यातील एक (अवतारत्वाची समाजाला जाणीव करून देण्याची) कृपा असल्याचे जाणवणे

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका असून वारकरी संप्रदायाचे तिथे पुष्कळ अनुयायी आहेत. वर्ष १९९७ मध्ये या ठिकाणी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची जाहीर सभा होणार होती. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची ही सभा म्हणजे आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीची सभा असल्याने जतवासियांना त्याची काय साक्ष (प्रचीती) मिळेल ?, अशी लोकांमध्ये चर्चा चालू होती. काही साक्ष मिळाली, तर जतवासीय ईश्वराचा संकेत मानतात आणि त्यांची त्या व्यक्तीप्रती श्रद्धा निर्माण होते. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची सभा नोव्हेंबर मासात होणार होती. नोव्हेंबर मासात पाऊस अपेक्षितच नसतो; पण जत येथील परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या सभेच्या एक घंट्यापूर्वी वार्या-वादळासह एक ते दीड घंटा (तास) धो-धो पाऊस पडला. त्यामुळे मैदानाऐवजी शाळेच्या छोट्या सभागृहात ही सभा घ्यावी लागली. या घटनेतून जत येथील साधक आणि जतवासीय यांना परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आध्यात्मिक अधिकारी असल्याची साक्ष मिळाली आणि त्यांची परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याप्रती श्रद्धा निर्माण झाली.

आवश्यकतेनुसार परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी स्थानिक लोकांच्या मनातील विचारांना जाणून आपल्या अधिकाराची (अवतारी कार्याची) प्रचीती दिली असावी, असे वाटले. तसेच ही त्यांच्या समष्टी कार्यातील एक (अवतारत्वाची समाजाला जाणीव करून देण्याची) कृपा होती, असेही जाणवले. जतवासियांची श्रद्धा बसली, तरी साधनेसाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनाच गुरुकृपेचा लाभ झाला.

२ आ. एका छोट्याशा कृतीतून परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी
आठवले यांनी इतरांचा विचार कसा करावा ? आणि इतरांसाठी त्याग कसा करावा ?,
हे शिकवणे आणि श्रीगुरूंची प्रत्येक कृती समष्टीला दिशादर्शक असते, हे लक्षात येणे

जत येथील सभेच्या एक घंटा आधी वारा-वादळ आणि पाऊस चालू झाल्यामुळे मैदानाऐवजी शाळेच्या सभागृहात सभा घेण्याचे ठरले. त्यामुळे व्यासपीठ, कापडी फलक आणि कनात इत्यादी काढतांना आम्ही आठ-दहा साधक पावसात नखशिखांत भिजलो होतो. शाळेच्या सभागृहात सभा चालू होण्यापूर्वी कपडे पालटण्यासाठी आम्ही श्री. होमकरकाका यांच्या घरी गेलो होतो. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांनी दिलेला पायजमा मला पुष्कळ आखूड झाला होता. तेथे उपस्थित अन्य साधकांच्या हा भाग लक्षात आला नाही. त्यामुळे तो आखूड पायजमा घालून तसाच मी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या खोलीत गेलो. मला पहाताच परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले पटकन् उठले आणि माझ्या बाजूला उभे राहून हाताने त्यांची आणि माझी उंची मोजू लागले. ते काय करत आहेत, हे मला कळत नव्हते. नंतर ते म्हणाले, हा पायजमा तुम्हाला पुष्कळ आखूड होतो. माझ्या पॅन्टची उंची तुम्हाला जुळेल, मी तुम्हाला घालायला माझी पॅन्ट देतो. असा आखूड पायजमा घालून सभेच्या ठिकाणी जाऊ नका. त्या वेळी तेथे त्यांचे वाहन चालवण्याची सेवा करणारे साधक श्री. प्रमोद बेंद्रे होते. ते पटकन् म्हणाले, नको, गुरुदेव ! मी माझी पॅन्ट देतो, त्यांना होईल. त्याप्रमाणे मी श्री. बेन्द्रे यांची पॅन्ट घातली. या छोट्याशा प्रसंगातून परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले इतरांचा कसा विचार करतात, हे प्रत्यक्ष पहायला मिळाले. इतरांसाठी कसा त्याग करता आला पाहिजे, याची अप्रत्यक्ष शिकवणच जणू त्यांनी आम्हाला दिली. श्रीगुरूंची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांच्या मनातील प्रत्येक विचार साधकांना कसे निरंतर शिकवत असतो, याची पदोपदी अनुभूती येते. शब्दातील आणि शब्दातीत, स्थुलातील आणि सूक्ष्मातील श्रीगुरूंची प्रत्येक कृती समष्टीला दिशादर्शक असते, हे लक्षात घेऊन सतत शिकत रहाणे आवश्यक असते, हेच यातून शिकायला मिळते.

२ इ. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी मनातील
विचार ओळखून आठवण काढणे, त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा दृढ होणे आणि कुणी
समोर असो अथवा नसो, कितीही गर्दी वा गडबड असो, ते कुणाला विसरत नसल्याचे लक्षात येणे

नोव्हेंबर १९९७ चा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा दौरा संपल्यानंतर सांगली जिल्ह्यातून परत निघण्यापूर्वी श्री. डोडिया यांच्या घरी सर्व साधक एकत्र जमले होते. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले जाण्यासाठी बाहेर आले होते आणि त्यांच्याभोवती सर्व साधक गोळा झालेले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, निघतांना परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे दर्शन होणार नाही, एवढ्या साधकांत मी त्यांना दिसणार नाही आणि त्यांना माझी आठवण येणार नाही. मनातील हा विचार संपतो न संपतो तोच परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी उपस्थित साधकांना विचारले, डॉ. पिंगळे कुठे आहेत ? ते आले नाहीत का ? हे ऐकताच मनात एकदम कृतज्ञतेचा भाव भरून आला.

किती गर्दी असली आणि कितीही गडबड असली, तरी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले कोणत्याही साधकाला विसरू शकणार नाहीत. कोणत्याही साधकाचे विचार त्यांच्यापासून लपून रहाणार नाहीत. अशा वारंवार घडणार्याे प्रसंगांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी माझी श्रद्धा त्यांच्या चरणी दृढ करत नेली आणि मला ते जवळ करत गेले. त्यांची कृपा आणि त्यांचे प्रेम यांमुळेच आज मी त्यांच्या सेवेत आहे, असे मला वाटते.

२ ई. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची रफू केलेली पॅन्ट पाहून एका
नवीन साधकाच्या मनातील त्यांच्याबद्दलच्या अवास्तव कल्पना नष्ट होऊन परात्पर गुरु
श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याप्रती मनात श्रद्धा निर्माण होणे आणि अवतारी श्रीगुरूंची प्रत्येक कृती ही केवळ
साधकांना आदर्शच नव्हे, तर साधकांच्या अवास्तव कल्पना आणि संस्कारांना छेद देणारीही असते, हे शिकायला मिळणे

नोव्हेंबर १९९७ मधील दौर्याच्या वेळी सांगली येथे असतांना परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले श्री. एच्.एन्. पाटील यांच्याकडे निवासाला होते. श्री. पाटील यापूर्वी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना कधी भेटलेले नव्हते. त्यामुळे आरंभी श्री. पाटील यांच्या मनात परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले म्हणजे एक मोठे प्रस्थ असणार. त्यांनी बोटांत अंगठ्या घातलेल्या असणार. ते मोठ्या आसंदीवर (खुर्चीवर) बसत असणार. त्यांच्या बाजूला सुकामेवा ठेवलेला असणार. ते भक्तांना आशीर्वाद देणार, अशा कल्पना होत्या. प्रत्यक्षात परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या सगळ्या कल्पनांचा भ्रमनिरास झाला; कारण परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे रहाणे, वागणे आणि बोलणे एकदमच साधे होते. ते नमस्कार करण्यासाठी कुणाला त्यांच्या पायांवर डोकेसुद्धा ठेवू देत नसत. रात्री परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची घरात वापरायची पॅन्ट इस्त्री करण्यासाठी श्री. पाटील यांच्याकडे दिली. त्या पॅन्टला एका ठिकाणी रफू केले होते. ते पाहून श्री. पाटील यांचा भाव जागृत झाला आणि रफू केलेली ती पॅन्ट छातीशी धरून ते रडू लागले. त्यांच्या मनात आले, मी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याविषयी काय काय कल्पना केली होती आणि प्रत्यक्षात ते किती साधे आणि थोर आहेत !

यात आम्हा सर्वांना शिकण्यासारखे हेच होते की, अवतारी श्रीगुरूंची प्रत्येक कृती ही केवळ साधकांना आदर्शच नव्हे, तर साधकांच्या अवास्तव कल्पना आणि संस्कारांना छेद देणारीही असते.

३. पंचमहाभूतांवर नियंत्रण असलेल्या परात्पर गुरु श्री
श्री जयंत बाळाजी आठवले यांनी आपल्या अवतारत्वाची दिलेली प्रचीती

३ अ. ढगांचा गडगडाट ऐकून ढग मला विचारत आहेत की, सभेच्या जागी
पाऊस पाडावा कि नाही ? असे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले
यांनी सांगणे आणि पुढे पाहूया ! साधकांची भक्ती जिंकते कि ते (ढग) !, असे म्हणणे

नोव्हेंबर १९९७ मध्ये मिरज येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची सभा होती. त्यासाठी ते मिरजेत आले असतांना आमच्या घरी निवासाला होते. सायंकाळी सभेला निघण्यापूर्वी हस्तप्रक्षालन पात्रात (बेसीनवर) तोंड धूत असतांना ढगांचा जोराचा गडगडाट झाला. मी आणि श्री. अशोक लिमकरकाका त्यांच्या शेजारी उभे होतो. गडगडाट ऐकून परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले मला म्हणाले, ढग विचारत आहेत की, आज आमचे नियोजन तिकडे आहे. आम्ही यायचे का ? काय सांगू ? मला परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे बोलणे कळले नाही; म्हणून मी लिमकरकाकांकडे बघितले. लिमकरकाकांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना सांगितले, तुम्ही काय म्हणालात, ते कळले नाही. त्यावर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले पुन्हा म्हणाले, ढग मला विचारत आहेत की, आज ज्या भागात तुमची सभा आहे, त्या भागात पाऊस पाडण्याचे आमचे नियोजन आहे. आम्ही यावे कि नाही ? नंतर म्हणाले, पाहूया ! साधकांची भक्ती जिंकते कि ते (ढग) !

३ आ. प्रत्यक्षात सभेच्या वेळी सभास्थान आणि त्याच्या
आजूबाजूच्या ५०० मीटर अंतराचा परिसर सोडून सर्वत्र पाऊस पडणे

नंतर प्रत्यक्षात असे घडले की, सभेच्या वेळी पुष्कळ काळोख दाटून आला. विजेचा कडकडाट झाला. वारे सुटले. वीज गेली. जनरेटर जळला. बॅटरीवर आणि आपत्कालीन दिव्यावर सभा संपन्न झाली. सभा संपल्यानंतर कळले की, सभेच्या कालावधीत सभेचे स्थान आणि त्याच्या आजूबाजूचा ५०० मीटर अंतराचा परिसर सोडून संपूर्ण मिरज शहरात पाऊस पडला होता.

३ इ. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे पंचमहाभूतांवर
नियंत्रण असून त्यांच्या इच्छेविना पाऊसही विघ्न निर्माण करू शकत
नसल्याची प्रचीती येेणे; परंतु तरीही त्यांचे अवतारत्व साधकांना सुस्पष्ट न होणे

सभा झाल्यावर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले म्हणाले, साधकांची भक्ती जिंकली, ते (ढग) हरले. या प्रसंगातून जाणीव झाली की, परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या इच्छेविना पाऊसही विघ्न निर्माण करू शकत नाही. पंचमहाभूतांवर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे नियंत्रण (ताबा) असल्याची प्रचीतीच त्यांनी आम्हाला दिली.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले पुष्कळ वेगळे आहेत, याची जाणीव त्या वेळी मला झाली. या प्रसंगानंतर माझा पूर्णवेळ साधक होण्याचा निश्चाय अंतरात झाला. असे असले, तरी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे अवतारी आहेत, साक्षात् ईश्वर आहेत, अशी सुस्पष्टता त्या वेळी आम्हाला येऊ शकली नाही, ही आमची मर्यादा आणि हे आमचे दुर्भाग्य !

४. केवळ शब्दांत आणि शब्दातीतच नव्हे, तर प्रकाश
भाषेतही शिकवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

४ अ. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पत्र लिहिण्याचा
विचार येत असल्याने ते लिहायला घेणे आणि त्यांच्या चरणांवर विलीन
होण्याचा आणि त्यांना सर्वच ठाऊक असल्याचा विचार आल्याने कोरेच पत्र पाठवणे

वर्ष १९९८ मध्ये माझ्या मनात परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना एखादे पत्र लिहावे, असा विचार पुष्कळदा येत होता; परंतु काय लिहावे ?, हा प्रश्न माझ्या मनात असे. एक दिवस परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पत्र लिहिण्यासाठी कागद घेतला. वरच्या बाजूला त्यांचे नाव लिहून साष्टांग नमस्कार असे लिहिले. त्यानंतर मी त्यांना काय लिहून कळवणार ? त्यांना तर सर्वच ठाऊक आहे. असा माझ्या मनात विचार आला. त्यामुळे काही न लिहिता त्याच कागदाच्या खाली (पत्राचा शेवट करण्याकरता) तुमच्या चरणांशी विलिन होण्याची इच्छा ठेवणारा, असे लिहून पत्र पूर्ण करून लगेच पोस्टाच्या पेटीत टाकले. पत्र पाठवल्यानंतर मी मधुवंतीला (पत्नीला) म्हणालो, मी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना कोरे पत्र पाठवले आहे; पण आता हे इतरांना सांगू कि नको ?, असा प्रश्न माझ्या मनात येत आहे. मला त्यांच्या चरणी विलीन व्हायचे आहे; म्हणून मी पत्र कोरे ठेवले आहे. त्यांना जे काही लिहायचे आहे, ते त्यांनी त्यावर लिहू दे. त्यांनी मला त्यांच्या चरणी विलीन करून घ्यावे, हीच माझी प्रार्थना आहे.

४ आ. प.पू. रामानंद महाराज यांना नमस्कार करतांना काढलेल्या छायाचित्रात
स्वतःचे छायाचित्र न उमटलेले पाहून आनंद होणे आणि पत्रात लिहिल्याप्रमाणे परात्पर
गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांच्या चरणांत विलीन करून घेतल्याचे जाणवणे

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पाठवलेल्या कोर्या पत्राविषयी मी अन्य कुणाही साधकाला काही सांगितले नाही. त्यानंतर अनुमाने एक मासाने (महिन्याने) प.पू. ज्ञानगिरी महाराजांच्या मठात प.पू. रामानंद महाराज आले होते. त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सर्व साधक प.पू. ज्ञानगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो. त्या वेळी तेथे आम्हा सर्वांचे छायाचित्र काढण्यात आले. त्या छायाचित्रात माझे छायाचित्र उमटले नव्हते. केवळ कपड्यांवरून तो मी असल्याचे ओळखता येत होते. सात-आठ दिवसांनी कु. शशिकला आचार्य यांनी मला एक छायाचित्र दाखवले आणि प.पू. रामानंद महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करत असलेले तुम्हीच आहात, असे सांगितले. ते छायाचित्र पाहिल्यावर पुष्कळ आनंद झाला. मी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पाठवलेल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे त्यांनी मला त्यांच्या चरणांशी घेतले आहे. माझे अस्तित्व त्यांच्या चरणांमध्ये विलीन करून घेतल्यामुळे या छायाचित्रात मी ओळखूसुद्धा येत नाही, असा माझ्या मनात विचार आला. यातून त्यांनी माझे अस्तित्व नष्ट करून माझ्यावर कृपा केल्याचे मला जाणवले.

४ इ. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना भेटण्यासाठी
कोल्हापूरला जाण्याचा निरोप येणे आणि मुंबई येथील सेवाकेंद्रातून कोरे पत्र पाठवल्याविषयी
विचारणा झाल्याने परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना भेटण्याचा ताण येणे

त्यानंतर काही दिवसांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले कोल्हापूरला येत आहेत आणि तुम्हाला त्यांनी भेटायला बोलावले आहे, असा निरोप मला आला. त्याच वेळेस सेवाकेंद्रातून सौ. नंदिनी सामंत यांच्याकडे डॉ. पिंगळे कोण आहेत ? त्यांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना कोरे पत्र कसे पाठवले ? त्यांना कळत नाही का ?, अशी विचारणा झाली. सौ. नंदिनीताई यांनी मला याविषयी विचारले. त्या गमतीने मला म्हणाल्या, अहो, चांगदेवानंतर कोरे पत्र पाठवणारे दुसरे तुम्हीच ! त्या वेळी मला कोल्हापूरला जाऊन परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना भेटण्याचा थोडा ताण आला. ते पाहून डॉ. दुर्गेश सामंत आणि सौ. नंदिनी सामंत म्हणाल्या, काळजी नका करू, आम्हीही तुमच्या सोेबत येऊ.

४ ई. प्रत्यक्ष भेट झाल्यावर कोर्या पत्राविषयी बोलतांना परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी छायाचित्राच्या माध्यमातून प्रकाश भाषेत उत्तर दिल्याचे सांगणे

प्रत्यक्षात कोल्हापूरला जाऊन परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना भेटलो असता त्यांनी कान, नाक, घसा तपासणीची उपकरणे मागवून त्यांचा घसा इत्यादी तपासून घेतले आणि अन्य विषयांवर चर्चा केली. त्या वेळी त्यांनी माझ्याकडून सूक्ष्मातले काही प्रयोगही करवून घेतले. माझ्या मनात मात्र ते कोर्या पत्राविषयी काही तरी बोलतील, असा विचार येत होता; पण त्याविषयी त्यांनी काही विचारलेच नाही. शेवटी निघण्यापूर्वी सौ. नंदिनीताईंनी कोर्या पत्राविषयी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना विचारले. तेव्हा तुम्हाला काय वाटते ?, असे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी मला विचारले. तेव्हा मी पत्र लिहितांना माझा काय भाव होता, ते सांगितले आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले रामानंद महाराजांच्या दर्शनाला गेल्याचा प्रसंग सांगून त्या वेळी काढलेल्या छायाचित्रातून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, असे सांगितले. तेव्हा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले म्हणाले, हां ! तेच तर प्रकाश भाषेतील उत्तर होते ! हे सर्व झाल्यानंतर मला परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. आपल्या मनातील भावाप्रमाणे त्यांनी प्रकाश भाषेत उत्तर दिले, हे माझ्यासाठी पुष्कळ वेगळेच होते. या प्रसंगातून केवळ एवढेच शिकायला मिळाले की, कोरे पत्र पाठवले, तरी आपला भाव आणि विचार त्यांच्यापर्यंत पोेहोचतो आणि त्यांना आवश्यक वाटले, तर त्याचे उत्तरही ते विविध भाषेत देतात. एकूणच अवतारी गुरूंचा शब्दांत आणि शब्दातीत शिकवण्याचा महिमा ठाऊक होता; परंतु प्रकाश भाषेत शिकवण्याचा पैलू या प्रसंगातून शिकायला मिळाला.

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे (कान-नाक-घसातज्ञ), उत्तर भारत प्रसारसेवक

कितीही लपवले, तरी अवतारत्व लपेल का ?

वास्तविक आरंभापासूनच परात्पर गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, विचारातून आणि ध्येयाच्या वाटचालीतून अवतारत्वाचे दर्शन घडत होते; परंतु त्यांनी आपले अवतारत्व साधकांना कधीच सुस्पष्ट होऊ दिले नाही. साधकांना येणार्या विविध अनुभूतींमधून साधकांना ते जाणवतही होते. पू. पिंगळेकाकांच्या अनुभूतींतून तर ते अगदी पारदर्शकतेने स्पष्ट होत आहे; परंतु मी कृष्ण नाही, असे सातत्याने म्हणत; परंतु कृष्णापर्यंत पोहोचण्याचा सतत मार्ग दाखवत त्यांनी स्वतःचे अवतारत्व एक सर्वसामान्य व्यक्ती वा आध्यात्मिक मार्गदर्शक असल्याचे म्हणवून घेत अवगुंठित केले होते. महर्षींनी जेव्हा ते अवगुंठण दूर करून अखंड चैतन्यस्रोत असलेल्या या अवतारी ब्रह्मांडनायकाचे तेजोमय रूप विश्वाला दाखवले, तेव्हा भारावलेल्या साधकांकडे उरली केवळ भावाश्रूंची कृतज्ञतांजली ! गुरुदेव, हे अहोभाग्य आम्हाला दिलेत, आपली चरणरज होण्याची आणि अमृत महोत्सवाच्या सुवर्णक्षणांचे याचि देही याचि डोळा साक्षीदार होण्याची संधी दिलीत, यासाठी हा जीव तुमच्या चरणी पूर्णतः समर्पितभावाने कृतज्ञ आहे. – रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment