सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)

अनुक्रमणिका

१. महर्षि व्यास यांची विविध नावे

२. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड असणार्‍या व्याससाहित्याचे अलौकिक ग्रंथकार महर्षि व्यास !

३. व्यासचर्या


 

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. असे परमवंदनीय महर्षि व्यास यांची विविध नावे, अलौकिक ग्रंथकार म्हणून त्यांचे कार्य, त्यांचे श्रीकृष्णाने केलेले कौतुक यांविषयीचे विवेचन करणार्‍या या लेखाचा पहिला भाग आता आपण पाहूया.

 

१. महर्षि व्यास यांची विविध नावे

व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – ‘विशदं करोति इति व्यासः ।’ म्हणजे विषय विशद करतो तो ‘व्यास’. वर्णाने काळे म्हणून त्यांना ‘कृष्ण’ म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून ‘द्वैपायन’ म्हणत. ‘कृष्णद्वैपायन’ असेही जोडनाव रूढ आहे. त्यांनी ‘वेदान् विव्यास’ म्हणजे वेदांचे विभाग केले, म्हणून त्यांना ‘व्यास’ असे संबोधीत. पराशरपुत्र म्हणून त्यांना ‘पाराशर्य’ही म्हणत. व्यासांचा उल्लेख करतांना ‘भगवान व्यास’ असे म्हणण्याचा विद्वज्जनांत परिपाठ आहे. श्री शंकराचार्य त्यांना तशाच उपाधीने उल्लेखीत. त्यांना ‘महर्षि’ असेही म्हटले जाते.

 

२. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड असणार्‍या व्याससाहित्याचे अलौकिक ग्रंथकार महर्षि व्यास !

‘व्यासोचि्छष्टं जगत्सर्वम् ।’ म्हणजे जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे करून सोडले आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. जसे वर्तुळाच्या व्यासाने परिघाचे सर्व बिंदू स्पर्शिले जातात, तसाच व्यासांनी सर्व विषयांना स्पर्श केला आहे. केवळ स्पर्शच केला नाही, तर त्यांचे सखोल विवरण केले आहे.’

‘वर्तुळाच्या मध्यबिंदूतून दोन्ही अंगांच्या (बाजूच्या) परिघाला जोडणारी रेषा म्हणजे व्यास. त्याप्रमाणे या सृष्टी (वर्तुळ) चक्राचा विभाजन करणारे ते व्यास. हे दोन्ही अंगांना स्पर्श करतात. ही दोन अंगे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. असे असूनही ते त्या दोन्हींपासून अलिप्त असतात; म्हणून त्यांना ‘व्यास’, असे म्हणतात.’

– जगद्गुरु श्री शंकराचार्य, करवीरपीठ, कोल्हापूर.

`युगायुगातून एखादीच अशी विभूती जन्माला येते. व्यासांचा जन्म भारतात झाला, ही गोष्ट भारतीय जनतेला अनंत कालपर्यंत अभिमानास्पद राहील. ‘आजवर जगात असा दिव्योदात्त, विद्वान आणि साहित्यकार झाला नाही आणि होणार नाही’, असे म्हटले जाते. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. भारतीय संस्कृतीचे सर्वांगांनी यथावत ज्ञान करून घ्यायचे, तर व्यासरचित ग्रंथांचे अध्ययन करणे अपरिहार्य आहे. व्याससाहित्य हा भारतीय संस्कृतीचा मेरुदंड आहे.

 

३. व्यासचर्या

व्यासरचित आणि व्याससंपादित वेदविभाजन, ब्रह्मसूत्रे, पुराणे आणि महाभारत या ग्रंथांनी मिळून होणारी ती ‘व्यासचर्या’.

अ. वेदविभाजन

वेदांचे विषयानुसार विभाजन व्यासांनी केले.

‘चार पाद असलेला असा एकच वेद होता’, असे पुराणांत म्हटले आहे. हे चार पाय म्हणजे चार वेद होत. (अग्निपुराण, अध्याय १५०, श्लोक २४; श्रीविष्णुपुराण, अंश ३, अध्याय ४, श्लोक १; वायुपुराण, अध्याय १, श्लोक १७९; पद्मपुराण, पातालखण्ड, अध्याय २, श्लोक ४३) वेद एकराशी असल्यामुळे तो अध्ययनाला अवघड होऊ लागला, हे व्यासांना कळून आले. त्यांनी एका वेदराशीचे अध्ययनाच्या सोयीसाठी चार विभाग केले.

१. वेदराशीतील सर्व ऋचा वेगळ्या काढून त्यांच्या संग्रहाला ‘ऋग्वेद’ असे नाव दिले.

२. त्यातीलच गानयोग्य अशा ऋचा वेगळ्या काढून त्यांच्या समूहाला ‘सामवेद’ अशी संज्ञा दिली.

३. यज्ञाविषयी तपशीलवार ज्ञान देणार्‍या गद्यभागाला ‘यजुर्वेद’ म्हणून वेगळे केले.

४. यातुविद्येचे (जादूटोण्याचे) तसेच लौकिक व्यवहारात उपयोजिले जाणारे मंत्र वेगळे करून त्यांचे ‘अथर्ववेद’ हे नामकरण केले. व्यासांचे हे वेदविभाजनाचे कार्य तत्कालीन सर्व आचार्यांनी मान्य केले. यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व कळून येते.’

आ. ब्रह्मसूत्रे

महर्षि व्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्रांमध्ये उपनिषदांचा अर्थनिर्णय केला असल्याने वेदान्तात त्यांचाही अंतर्भाव होतो. उपनिषदांमध्ये वेदांचा गूढ अर्थ उलगडून दाखवलेला असल्याने त्यांना वेदान्त अशी संज्ञा प्राप्त झाली.

इ. पुराणे

व्यास पुराणांचे आद्यकर्ते आहेत. यातील भागवतपुराण सर्वांत महत्त्वाचे आहे. ‘पुरा नवं भवति ।’ म्हणजे प्राचीन असूनही जे नवे असते, ते पुराण होय. पुराणांमधील विषयांचे पुढील ५ भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे –

१. सर्ग,
२. प्रतिसर्ग,
३. मन्वंतर,
४. वंश आणि
५. वंशानुचरित.

ई. महाभारत

भारतीय युद्ध संपून धर्मराजाला राज्याभिषेक झाल्यावर कौरव-पांडवांचा इतिहास ग्रंथनिविष्ट (ग्रंथित) करावा, असे व्यासांनी ठरविले. त्यासाठी तीन वर्षे लेखनोद्योग करून त्यांनी ‘जय’ नावाचा ग्रंथ लिहिला. कौरव-पांडवांच्या जन्मापासून भारतीय युद्धाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास या ‘जय’ नामक ग्रंथात आहेत.

पुढे वैशंपायनऋषी यांनी आणि नंतर लौमहर्षणी नामक सूतपुत्राने केलेल्या संस्करणाने या ग्रंथाचे अनुक्रमे आधी ‘भारत’ आणि पुढे एक लक्ष श्लोकसंख्या होऊन ‘महाभारत’ असे नामकरण करण्यात आले.

 

हिंदूंनो, आतातरी महर्षी व्यासांचे ऐका !

ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्‍चित् श्रुणोति मे ।
धर्मादर्थश्‍च कामश्‍च स किमर्थं न सेव्यते ॥ – महाभारत, स्वर्गारोहणपर्व, अध्याय ५, श्‍लोक ६२

अर्थ : महर्षी व्यास म्हणतात, मी बाहू उभारून (दोन्ही हात वर करून) मोठ्याने ओरडून सांगत आहे; पण कोणीच माझे ऐकत नाही. अहो, धर्मापासूनच अर्थ अन् काम प्राप्त होतात. त्या धर्माचे तुम्ही आचरण का करत नाही ?

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्मग्रंथ’

या लेखाच्या दुसर्‍या भागात पुढील माहिती दिली आहे –

१. व्यासांचे अमूल्य कार्य
२. महर्षि व्यासांचे महत्त्व
३. श्रीकृष्णाने व्यासांचे केलेले कौतुक

‘सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २)’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment