आद्य शंकराचार्य : हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक !

प्रस्तुत लेखात आपण आद्य शंकराचार्य यांचा जन्म, त्यांनी केलेली साधना आणि केलेले अलौकिक कार्य याविषयीची माहिती जाणून घेऊया.

 

१. आद्य शंकराचार्य यांच्या जन्मापूर्वी

ख्रिस्ताब्द ७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात बौद्धांनी वैदिक धर्माला पायदळी तुडवण्याचा आवेशपूर्वक प्रयत्न चालू केला. जैन-बौद्धांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होते. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. त्यामुळे सामान्य मनुष्य गोंधळात पडला होता. खरा धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते.

 

२. आद्य शंकराचार्य – जन्म, साधना आणि परिचय

अशा वेळी आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ प्रांतातील कालाडी या गावी वर्ष ६३२ मध्ये झाला. त्यांचे नाव शंकर होते. संन्यास घेऊन आपले जीवन धर्मकार्यासाठी अर्पण करण्याकरिता त्यांनी लहान वयातच घराचा त्याग केला. गोविंदयतींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना विधिवत संन्यासदीक्षा दिली आणि ‘शंकराचार्य’ असे नामकरण केले.

जैन-बौद्धांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक यांमुळे हिंदु धर्मच संकटात आला होता. प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी जैन आणि बौद्ध या दोन्ही मतांचा पाडाव करून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. शंकराचार्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, काळाच्या प्रभावाने धर्मावर वाढलेली जळमटे दूर केली आणि आचारप्रधान अन् अद्वैतप्रधान अशा वैदिक धर्माचा प्रकाश भारतभूमीवर सर्वत्र भरून टाकला; धर्माला तेज प्राप्त झाले.

आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्मसाम्राज्याचे संस्थापक होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले.

 

३. आद्य शंकराचार्य – अलौकिक कार्य

अ. वैदिक धर्माचा प्रसार करणे

मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना पिठाधिपती म्हणून नेमले.

 

कांचीकामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पिठे स्थापन केली.

आ. ग्रंथांची निर्मिती करणे

शंकराचार्यांनी १२ उपनिषदांवर भाष्ये लिहिली आणि गीताभाष्यही लिहिले. त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी दोनशेहून अधिक ग्रंथ रचले. ‘निर्गुणाच्या उपलब्धीसाठी सगुणाची उपासना हे प्रबल साधन आहे आणि जोवर एखादा साधक सगुण ईश्वराची उपासना करत नाही, तोवर त्याला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही’, असे ते मानीत. यासाठी त्यांनी शिव, गणपति, देवी इत्यादी देवतांची सुंदर आणि भावपूर्ण स्तोत्रे रचली आहेत.

शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेल्या अद्वैत सिद्धांताचा मंत्र

शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेल्या अद्वैत सिद्धांताचा मंत्र आहे, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ।’ म्हणजे ‘ब्रह्म हेच सत्य आहे, जगत् मिथ्या आहे. जीव हा ब्रह्मच आहे, तो ब्रह्माहून निराळा नाही.’

श्रीशैल पर्वतावर कापालिक शैवांनी आपला आखाडा सिद्ध केला होता. ते शिवाला मद्यमांसाचे उपहार समर्पित करत आणि स्वतःही सेवन करत. ते देवाला पशूबळी आणि प्रसंगी नरबळीही देत होते. शंकराचार्यांनी तेथील लोकांना सात्त्विक उपासना करण्याची शिकवण देण्यास प्रारंभ केला. याविषयी राग येऊन उग्रभैरव नावाचा एक कापालिक शंकराचार्यांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन त्यांच्याकडे धावत गेला; पण ऐन वेळी पद्मपाद हा शंकराचार्यांचा शिष्य तेथे आला आणि त्याने उग्रभैरवाच्याच त्रिशुळाने त्याला कंठस्नान घातले. त्यानंतर कापालिकांनी आपला पराभव मान्य केला.’ (भारतीय संस्कृतीकोश, खंड ९)

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था (चैत्र कृ. ५ (२५.४.२००८))

इ. आदि शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु परंपरेचे रक्षण
करणारी मंतरलेल्या कवचासारखी दुर्भेद्य अशी परंपरा निर्माण करणे

‘त्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या जीवनात सनातन वैदिक हिंदु परंपरेचे रक्षण करणारी मंतरलेल्या कवचासारखी दुर्भेद्य अशी परंपरा निर्माण केली.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १०.६.२०१०))

हिंदूंनो, आपले धार्मिक नेते असलेल्या पीठस्थ श्री शंकराचार्यांचा अवमान होऊ देऊ नका !

Leave a Comment