अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

अनुक्रमणिका

कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्तीे घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पूर्वी शिष्य गुरूंकडे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात (गुरुकुलात) जात असत. तेव्हा ते आपल्या गुरूंना ‘गुरुजी’ असे संबोधत असत. त्याप्रमाणे शिल्पकार श्री. नंदा आचारी यांच्याकडे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार हे शिल्पकला शिकायला गेले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या पुढील लेखात शिल्पकार श्री. नंदा आचारी यांना साधकांनी ‘गुरुजी’ असे संबोधले आहे.

श्री. नंदा आचारी (गुरुजी)

वयाच्या २५ व्या वर्षी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती घडवतांना श्री. नंदा आचारी (गुरुजी)

 

१. आनंदी आणि उत्साही

‘गुरुजी अतिशय उत्साही आणि आनंदी असतात. वय अधिक असूनही त्यांची सेवा करण्याची गतीही जलद आहे.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

 

२. ‘त्यांचे राहाणीमान अतिशय साधे आहे.’ – श्री. रामानंद परब

 

३. तत्परता

‘वय अधिक असूनही ते अतिशय तत्परतेने प्रत्येक कृती करतात. त्यांचे घर मूर्ती बनवण्याच्या ठिकाणापासून साधारण १०० ते १५० फूट अंतरावर आहे. त्यांना वयोमानाप्रमाणे चालण्यास त्रास होतो आणि त्यांचे गुडघेही दुखतात, तरी आम्ही सेवा करतांना त्यांना आम्हाला काही दाखवायचे आठवले, तर ते घरी जाऊन ती वस्तू आणून आम्हाला दाखवतात. त्यांची ही कृती पाहून आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण आली. त्यांनाही आम्हाला काही दाखवायचे असल्यास विसरायला नको; म्हणून ते लगेच खोलीत जाऊन आणून दाखवायचे.

 

 ४. स्वावलंबी

४ अ. उतार वयातही कष्ट करून उदरनिर्वाह करणे

त्यांना कुठलेही व्यसन नाही. त्यांच्या औषधांसाठी जो व्यय होतो, तो त्यांनी कधीच त्यांच्या मुलांकडे मागितला नाही किंवा ते इतर कुणाकडेही मागत नाहीत. ते म्हणतात, ‘‘मी नेहमी स्वतःच कमावतो आणि ते पैसे वापरतो. देव माझी सोय करतो. जेव्हा पैसे नसतात, तेव्हा दुसर्‍या दिवशी कुणाच्या तरी माध्यमातून देव पैशांची सोय करतो. जोपर्यंत हात-पाय चांगले आहेत, तोपर्यंत स्वतःच कष्ट करायचे आणि कष्टाचे पैसे वापरायचे.’’

४ आ. स्वतःची सर्व कामे स्वतःच करणे

वय ८० वर्षे असूनही (आताचे वय ८२ वर्षे) ते स्वतःची कामे स्वतःच करतात. मूर्तीसाठी दगड पहायला किंवा कोणतेही साहित्य आणायला ते स्वतः दुचाकीवरून २०० ते ३०० कि.मी. पर्यंतचा प्रवास करतात. त्यांच्या मनात ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा केवळ एकच विचार असतो.’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

 

५. दशकलांचे अधिकारी असणे

‘त्यांना दशकला येतात. आतापर्यंत आपण पंचकला येणार्‍या व्यक्ती ऐकल्या आहेत; पण ‘भगवंताने मला दशकला दिल्या आहेत’, असे गुरुजी म्हणाले. त्यांना दगड, माती, सिमेंट, फायबर, लाकूड, चांदी, पितळ, तांबे, ॲल्युमिनिअम इत्यादी वस्तूंपासून मूर्ती बनवणे; जुन्या ‘टाईप रायटर’ची दुरुस्ती करणे; पेट्रोल आणि डिझेल इंजिन, चारचाकी, दुचाकी यांची दुरुस्ती करणे; शिलाईयंत्र बनवणे आणि त्याची दुरुस्ती करणे; ॲल्युमिनिअमचा वापर करून विळी बनवणे इत्यादी कला अवगत आहेत. इतकेच नाही, तर मूर्ती सिद्ध करण्यासाठी लागणारी यंत्रे किंवा अवजारे ते स्वतःच बनवतात.’ – श्री. रामानंद परब

 

६. प्रेमभाव

श्री. रामानंद परब

अ. ‘आम्ही मूर्ती बनवतांना ते मधे मधे आम्हाला चहा-बिस्कीटे द्यायचे.

आ. आम्ही आमच्या जेवणाचा डबा घेऊन जायचो. तेव्हा ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचे, बसायला चटई घालून द्यायचे आणि प्यायला पाणी आणून द्यायचे. ते अतिशय प्रेमळ असल्याने ‘त्यांच्या सहवासात सतत रहावे’, असे आम्हाला वाटायचे. त्यांच्या सहवासात आल्यावर ‘सहवास वेड लावी जिवा’, अशी आमची स्थिती झाली. ‘आम्ही संतांच्या समवेतच आहोत’, असे वाटायचे.

इ. ते प्रतिदिन सकाळी चालायला जातात. एकदा येतांना त्यांना रस्त्यात ताजी पालेभाजी विकणारे भेटले. तेव्हा ते आमच्यासाठी भाजी घेऊन आले.

 

७. इतरांना साहाय्य करणे

त्यांच्या घरापासून आमचे रहाण्याचे ठिकाण साधारण १४ कि.मी. दूर होते. आम्हाला जाण्या-येण्यासाठी वाहनाची अडचण येत होती. त्या वेळी गुरुजी स्वतःहून आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही माझी दुचाकी वापरू शकता.’’ तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांची दुचाकी वापरायलाही दिली.’   – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

श्री. राजू सुतार

 

८. देहभान हरपून सेवा करणे

‘गुरुजींची देहबुद्धी अत्यल्प आहे. याचा आम्हाला अनुभव आला. एकदा ते एका सेवेसाठी बाहेर जाऊन आले. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, ‘‘आपण जेवून घेऊया.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो, आपण जेवून मूर्ती बनवणे चालू करूया.’’ आम्ही जेवायला बसलो आणि ते सेवेचे कपडे घालून तसेच मूर्ती बनवण्याच्या सेवेच्या ठिकाणी जाऊन बसले. सायंकाळी ५ वाजता त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली आणि ते मला म्हणाले, ‘‘मी जेवलोच नाही.’’ ‘मी जेवून येतो’, असे म्हणून त्यांनी गोल फिरून आम्ही करत असलेली मूर्ती पाहिली आणि पुन्हा मूर्तीसेवा चालू केली. ५ मिनिटांनी मी त्यांना विचारले, ‘‘गुरुजी, तुम्ही जेवायला जाणार होता ना ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो. पुन्हा विसरलो.’’ यावरून ‘ते सेवेशी किती एकरूप होतात ?’, हे शिकायला मिळाले. त्यांना देहाची जाणीव नसते. ते देहभान आणि तहान-भूक विसरून सेवेशी एकरूप होतात.

 

९. अहं अल्प असणे

आतापर्यंत त्यांनी सहस्रो मूर्ती बनवल्या आहेत; पण त्याचा त्यांना अहंकार नाही.’– श्री. रामानंद परब

 

१०. गुरूंचे आज्ञापालन करणे

१० अ. श्री गुरूंनी सांगितलेल्या मुलीशी विवाह करणे

‘गुरुजी म्हणाले, ‘‘माझा विवाह श्री गुरूंनीच (श्री बाबा महाराज यांनी) करून दिला आहे. मला अनेक श्रीमंत कुटुंबातल्या, गाडी-बंगला असलेल्या मुलींनी लग्नाची मागणी घातली होती; पण माझ्या गुरूंनी सांगितले, ‘‘तुझा विवाह मी करणार.’’ त्यामुळे मी त्या सर्व मुलींना नाकारले. गुरूंनी ज्या मुलीशी माझा विवाह करून दिला, त्या मुलीची परिस्थिती एवढी गरिबीची होती की, तिला नेसायला चांगली साडीही नव्हती. मी तिला साडी देऊन तिच्या गळ्यात अर्ध्या ग्रॅमचे मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करून घरात आणले. ती स्वभावाने फार छान आणि शांत आहे. तिने कधीच माझ्याकडे काही मागितले नाही. तिच्यामुळेच आज मी एवढ्या मूर्ती करू शकलो आणि इथपर्यंत पोचू शकलो.’’ हा प्रसंग ते मला सांगत असतांना त्यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वहात होते.

नंतर ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या स्त्रिया नऊवारी साडी नेसायच्या. पूर्ण अंगभर कपडे घालायच्या; पण आज त्याच्या विरुद्ध आहे. आजच्या स्त्रिया राक्षसांप्रमाणे कपडे घालतात.’’

१० आ. गुरुजींना श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) सांगितल्याप्रमाणे सिद्धींचा वापर न करणे

गुरुजींना सिद्धी प्राप्त आहे. त्यांनी कुणाला काही सांगितले, तर ते खरे होते. एकदा एका व्यक्तीचा विवाह जमत नव्हता. गुरुजींनी त्याला एका देवतेची उपासना करण्यास सांगून ‘तुझा विवाह होईल’, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा विवाह झाला. हे गुरुजींच्या श्री गुरूंना (श्री बाबा महाराज यांना) कळले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुझा जन्म केवळ मूर्ती बनण्यासाठी झाला आहे. तू सिद्धीचा वापर करू नकोस.’’ तेव्हापासून गुरुजींनी त्याविषयी सांगणे बंद केले.

 

११. गुरुजींच्या आजोबांनाही सिद्धी प्राप्त असणे आणि त्यांना स्वतःच्या मृत्यूची वेळ अचूकपणे ठाऊक असणे

गुरुजींचे आजोबा १०५ वर्षे जगले. त्यांना ‘स्वतःचा मृत्यू कधी होणार ?’, हे आधीच ठाऊक होते. त्यांनी घरच्यांना आधीच सांगून ठेवले होते, ‘‘अमुक दिवशी मी जाणार.’’ तो दिवस आल्यावर ते म्हणाले, ‘‘आज तुळशीची पूजा आहे. पूजा करून नैवेद्य आणि जेवण करून घ्या.’’ त्यानंतर पूजा करून जेवण झाल्यानंतर दुपारनंतर ते म्हणाले, ‘‘आता मला स्नान घाला. मला जायला लागेल. माझी वाट पहात आहेत.’’ त्यांना स्नान घालून अंथरुणावर आणून झोपवल्यावर त्यांनी सर्वांना सांगून सांगितलेल्या वेळी प्राण सोडला. गुरुजी म्हणाले, ‘‘त्यांनाही सिद्धी प्राप्त होती.’’

 

१२. केवळ एका रात्रीत मूर्ती घडवण्याचे कौशल्य

१२ अ. काणकोण (गोवा) येथील श्रीकृष्ण मंदिरात स्थापन करण्यासाठी राजस्थानमधून श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती बनवून आणणे, ती ‘जलाधिवास’ या विधीच्या वेळी दुभंगणे आणि ग्रामदेवतेने ‘कारवार येथील श्री. नंदा आचारी एका दिवसात मूर्ती बनवून देऊ शकतात’, असा कौल देणे

काणकोण (गोवा) येथे श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यासाठी राजस्थानहून संगमरवरी दगडाची श्रीकृष्णाची एक मूर्ती बनवून आणली होती. तिच्या प्रतिष्ठापनेचा विधी ३ दिवस होता. पहिल्या दिवशी ‘जलाधिवास’ हा विधी असतो. या विधीच्या वेळी मूर्ती पाण्यात ठेवल्यावर ती दुभंगली. तेव्हा गावकर्‍यांना ‘परवा प्रतिष्ठापना आहे आणि आज विधी चालू असतांना मूर्ती दुभंगली. आता काय करायचे ?’, असा प्रश्न पडला. गावकर्‍यांनी काणकोणचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याला कौल लावला. देवाने कौल दिला, ‘कारवार येथे श्री. नंदा आचारी नावाचे एक मूर्तीकार आहेत. तेच तुम्हाला एका दिवसात मूर्ती बनवून देऊ शकतात.’

१२ आ. तेथील ब्राह्मणांनी ‘मूर्ती वेळेत घडवल्यास गुरुजींचा हार घालून सत्कार करू’, असे सांगणे आणि गुरुजींनी एका रात्रीत अन् वेळेपूर्वीच तशी मूर्ती घडवून दिल्यावर ब्राह्मणांनी त्यांचा हार घालून सत्कार करणे

ग्रामदेवतेने दिलेला कौल ऐकून गावकरी दुपारी ४ वाजता गुरुजींकडे पोचले. त्यांनी गुरुजींना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. गावकरी म्हणाले, ‘‘उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत आम्हाला स्थापनेसाठी मूर्ती हवी आहे. ती मिळेल ना ?’’ गुरुजी त्यांना म्हणाले, ‘‘मिळू शकते.’’ सव्वादोन फूट उंचीची श्रीकृष्णमूर्ती बनवायची होती. गुरुजींनी वज्रशिळेमध्ये ती मूर्ती सायंकाळी ५ वाजता बनवायला चालू केली आणि सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण केली. काणकोणच्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितले होते, ‘‘त्यांनी जर ही मूर्ती आम्हाला वेळेत दिली, तर आम्ही जाऊन त्यांना हार घालू.’’ प्रत्यक्षात ब्राह्मणांनी दिलेल्या वेळेच्या पूर्वी १ घंटा ती मूर्ती गुरुजींनी पूर्ण करून दिली. तेव्हा काणकोणच्या ब्राह्मणांनी कारवार येथे गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा हार घालून सत्कार केला.

 

१३. अनासक्त

१३ अ. घडवलेल्या मूर्तींतून गुरुजींनी कोट्यवधी रुपये मिळवले असले, तरीही ‘पैशांविषयी आठवण यायला नको’, यासाठी गुरुजींचे अधिकोषात खाते नसणे आणि मूर्ती घडवून मिळालेले धन न साठवता समाजोपयोगी कार्य करण्यासाठी वापरणे

त्यांनी घडवलेल्या मूर्तींचे त्यांना जे काही पैसे मिळाले, इतक्या वर्षांत ते त्यांनी कधीच स्वतःजवळ ठेवले नाहीत. त्यांनी त्यांचा वापर इतरांना साहाय्य करण्यासाठी केला. त्यांनी ३० जणांचे विवाह करून दिले, तसेच अनेक गरिबांना आर्थिक साहाय्य केले. त्यांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या मूर्तींतून त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवले आहेत, तरीही त्यांचे अधिकोषात खाते नाही. अधिकोषात खाते असल्यावर आपल्याला पैशांची आठवण होत रहाते. मला पैशांविषयी कसलीच आठवण नको; म्हणून माझे अधिकोषात खाते नाही.

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

१३ आ. सोनार असलेल्या एका व्यक्तीने एका मंदिराचे चांदीचे दार आणि चौकट गुरुजींकडून बनवून घेणे, गुरुजींना चांदीचे मूल्य अल्प सांगून फसवणे, त्यांची चेष्टा करणे, मात्र गुरुजींनी ‘तुम्हाला पैसे द्यायचे नसल्यास देऊ नका; पण चेष्टा करू नका, मी ‘ते पैसे देवाला अर्पण केले आहेत’, असे समजेन’, असे सांगणे

‘गुरुजींनी एका मंदिराचे चांदीचे दार आणि चौकट बनवली. त्याला अडीच किलो चांदी लागली. चौकटीचे काम देणारी व्यक्ती सोनारच होती. गुरुजींनी काम चालू केले, तेव्हा चांदी ४८ सहस्र रुपये प्रतिकिलो होती. त्या व्यक्तीने गुरुजींना ‘४० सहस्र रुपये प्रतिकिलोने चांदी घेतली ना ?’, असे चेष्टेने विचारले. प्रत्यक्षात ती व्यक्ती स्वतः सोनार असूनही गुरुजींना फसवत होती. त्या व्यक्तीने गुरुजींना ४० सहस्र रुपयांना फसवले. एवढेच नाही, तर ती व्यक्ती भ्रमणभाषवर गुरुजींची चेष्टा करत होती. गुरुजींनी तिला स्पष्टपणे सांगितले, ‘‘तुम्हाला पैसे द्यायचे नसल्यास देऊ नका; पण अशी चेष्टा करू नका. मी ‘ते पैसे देवाला अर्पण केले आहेत’, असे समजेन.’’ – श्री. रामानंद परब

 

१४. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता – ‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला पाहिजे ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी कळणे

‘मूर्ती घडवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मूर्तीला विशिष्ट प्रकारचा दगड लागतो, उदा. कृष्णशिळा, वज्रशिळा, शाळिग्राम, संगमरवर इत्यादी. ‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला पाहिजे ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी कळते. त्या दगडाला स्पर्श केल्यावर त्या दगडातून जाणवणारी स्पंदने जी मूर्ती घडवायची आहे, त्या देवतेच्या स्पदनांशी जुळली पाहिजेत. त्या स्पंदनांद्वारे त्यांना ‘त्या मूर्तीसाठी तो दगड चालेल का ?’, याची आतून जाणीव होते. तो दगड त्या देवतेच्या मूर्तीसाठी योग्य नसेल, तर दगडातून जाणवणारी स्पंदने त्यांच्या मनातील मूर्तीच्या स्पंदनांशी जुळत नाहीत.’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

 

१५. भाव

१५ अ. ‘देवाच्या नामजपाची गोळी’ हेच औषध आहे’, असा भाव असल्याने अनेक दुखणी असूनही आणि वय अधिक असूनही सतत उत्साही अन् आनंदी असणे

‘गुरुजींना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. मूर्ती बनवतांना दगडाची जी पूड उडते, त्यापासून त्यांच्या यकृतामध्ये (लीव्हरमध्ये) एक खडा निर्माण झाला आहे. या सर्व दुखण्यांवर ते औषध घेतात. यकृतामध्ये झालेल्या खड्यासाठी वैद्यांनी त्यांना शस्त्रकर्म करण्यास सांगितले आहे आणि त्याचा व्यय ८० सहस्र रुपये एवढा आहे. ‘त्यांचे वय अधिक (वय ८० वर्षे) असल्यामुळे शस्त्रकर्माने अधिक लाभ होईल’, असेही नाही. यासाठी आधुनिक वैद्यांनी त्यांना औषधे चालू केली आहेत; मात्र ते कोणतेही पथ्य पाळत नाहीत. ते म्हणतात, ‘‘भगवंताच्या नामाची गोळी घेत असतांना पथ्य पाळण्याची आवश्यकताच काय ?’’ त्यांच्याकडे पाहून ‘त्यांना दुखणी आहेत किंवा दुखण्यामुळे ते थकले आहेत’, असे जाणवत नाही, तसेच ‘त्यांचे वय ८० वर्षे आहे’, असेही त्यांच्याकडे पाहून वाटत नाही.

१५ आ. गुरुजींमधील भावामुळे देवीने स्वतः त्यांना मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन करणे

१५ आ १. भटकळ येथील मंदिरात स्थापना करण्यासाठी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती घडवतांना देवीने स्वतःच गुरुजींना मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन करणे, त्याप्रमाणे सर्व आचार पाळून देवीची मूर्ती घडवण्यास १५ वर्षे लागणे आणि ती मूर्ती पुष्कळ जागृत असणे

भटकळ येथे श्री पद्मावतीदेवीचे मंदिर आहे. त्या मंदिरात मूर्ती स्थापन करण्यासाठी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती घडवण्यास गुरुजींनी वयाच्या २५ व्या वर्षीच आरंभ केला. त्यांनी वज्रशिळेमध्ये श्री पद्मावतीदेवीची ७ फूट उंचीची मूर्ती घडवायला आरंभ केला. प्रारंभी त्यांना त्या वज्रशिळेतून मूर्ती घडवत असतांना आवाज ऐकू येऊ लागला. ‘ती मूर्ती आपल्याशी बोलत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. ती मूर्तीच त्यांना मूर्ती बनवण्याविषयी मार्गदर्शन करू लागली आणि देवीनेच त्यांच्याकडून ती मूर्ती बनवून घेतली. त्या देवीने त्यांना सांगितले होते, ‘दिवसाला केवळ एक घंटाच मूर्ती बनवायची.’ अशा प्रकारे सर्व नियमांचे पालन करून ती मूर्ती घडवायला त्यांना १५ वर्षे लागली. गुरुजी म्हणाले, ‘‘ती मूर्ती पुष्कळ जागृत आहे. तिच्या डोक्यावर नागाचा फणा आहे. त्यावर तेथील पुजारी सुपारी ठेवतात. एखादा भक्त मनात एखादी इच्छा घेऊन तिच्यासमोर आला आणि ती इच्छा पूर्ण होणार असेल, तर ती सुपारी त्या भक्ताच्या हातात पडते.’

१५ आ २. श्री पद्मावतीदेवीची मूर्ती भटकळ येथे प्रतिष्ठापनेसाठी नेण्यासाठी ४० माणसांनी उचलल्यावरही ती जागेवरून न हलणे आणि साधू-संतांनी मूर्तीच्या ठिकाणी येऊन मंत्रसामर्थ्याने अग्नि प्रज्वलित करून यज्ञ-याग केल्यावर १५ माणसांनी ती मूर्ती उचलून भटकळ येथे नेणे

‘गुरुजींनी कारवार येथे त्यांच्या घरी श्री पद्मावतीदेवीची मूर्ती बनवली. त्यानंतर ती मूर्ती भटकळ येथे प्रतिष्ठापनेसाठी नेण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केल्यावर ती जागेवरून हलत नव्हती. भटकळ येथून ४० माणसे मूर्ती उचलण्यासाठी आली, तरीही ती मूर्ती जागेवरून हलेना. शेवटी साधू-संतांनी मूर्तीच्या ठिकाणी येऊन मंत्रसामर्थ्याने अग्नि प्रज्वलित केला आणि यज्ञ-याग केले. त्यानंतर १५ माणसांनी ती मूर्ती उचलून भटकळ येथे नेली.  (क्रमश:)

१५ आ ३. श्री पद्मावतीदेवीची मूर्ती भटकळ येथे नेल्यावर गावकर्‍यांना ती न आवडल्याने ते मूर्ती फोडण्याच्या सिद्धतेत असणे आणि एका स्वामींनी ‘या मूर्तीत सूर्यासमान तेज आहे. तिची स्थापना करा’, असे सांगितल्यावर गावकर्‍यांनी मूर्तीची मंदिरात स्थापना करणे

भटकळ येथे श्री पद्मावतीदेवीची मूर्ती नेल्यावर तेथील गावकर्‍यांनी ‘ती मूर्ती आवडली नाही’, असे म्हणून ती मूर्ती तेथे जवळच नदीकिनार्‍यावर नेऊन ठेवली. ते ती मूर्ती फोडण्याच्या सिद्धतेत होते. तेव्हा एक स्वामी तेथे आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘या मूर्तीत सूर्यासमान तेज आहे. तिची स्थापना करा.’’ हे ऐकून गावकर्‍यांनी तेथून मूर्ती उचलून मंदिरात स्थापन केली.

१५ आ ४. जलाधिवास विधीसाठी रात्री देवीची मूर्ती कुंडात ठेवून बाजूला फुलांच्या बिया घातल्यावर सकाळपर्यंत त्या बियांपासून रोपे तयार होऊन त्यांना फुले लागणे

तेथे विटा आणि माती यांचे पाण्याचे कुंड बनवून जलाधिवास विधीसाठी रात्री ती मूर्ती त्या कुंडात ठेवली अन् बाजूला फुलांच्या बिया घातल्या. सकाळपर्यंत म्हणजे ८ घंट्यांत त्या बियांपासून रोपे तयार होऊन त्यांना फुले लागली होती.’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२०)

१५ इ. गुरुजींची अनुभवलेली स्थिरता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

१५ इ १. गोव्यातील एका व्यक्तीने गुरुजींना एका मंदिरासाठी पितळी चौकट करायला देणे, गुरुजींनी ते काम वेळेत पूर्ण केलेले असूनही ‘विलंब झाला’, असे सांगून त्या व्यक्तीने काही स्त्रियांच्या समवेत येऊन गुरुजींना अर्वाच्य भाषेत धमकावणे

‘गोव्यातील एका व्यक्तीने गुरुजींना एका मंदिरासाठी पितळी चौकट बनवण्याचे काम दिले होते. गुरुजींनी ते काम वेळेतच पूर्ण करून ठेवले होते; पण संबंधित व्यक्ती ती चौकट घेण्यासाठी वेळेत आली नाही. ती व्यक्ती आली आणि ती अतिशय रागाने अन् अरेरावीने गुरुजींशी बोलू लागली. त्या व्यक्तीने गुरुजींना मूर्ती बनवत असतांना अयोग्य पद्धतीने हाताला धरून उठवले आणि ती म्हणाली, ‘‘तुम्ही चौकट देण्यास विलंब केला आणि त्यातील काही भाग व्यवस्थित केला नाही.’’ ती व्यक्ती गुरुजींना वाटेल तसे बोलू लागली. त्या व्यक्तीच्या समवेत आलेल्या स्त्रियांनी गुरूजींना शिव्या दिल्या आणि त्या म्हणाल्या, ‘‘तू आमच्या अंगाला हात लावला’, असे आम्ही तुझ्याविरुद्ध पोलीसात गार्‍हाणे देऊन तुला कारागृहात डांबून ठेवायला लावतो, म्हणजे तुला कळेल, तरीही गुरुजी शांत आणि स्थिर होते. गुरुजी मला म्हणाले, ‘‘मी या स्त्रियांच्या वडिलांच्या वयाचा आहे, तरीही त्या कसे बोलतात ?’, ते पाहा.’’

श्री. रामानंद परब

१५ इ २. त्या व्यक्तीने गुरुजींना कामगारांकडे घेऊन जाणे, गुरुजींनी साधकाला समवेत नेणे, त्या व्यक्तीने दारू पिऊन गुरुजींना शिवीगाळ करून धमकावणे, तरीही गुरुजी स्थिर असणे आणि त्यानंतर ‘तुझ्या माध्यमातून स्वामीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे आले असल्याने ते मला मारू शकले नाहीत’, असे साधकाला सांगतांना गुरुजींचा भाव जागृत होणे

ती व्यक्ती त्यांना गुरुजी आपल्या कामगाराकडून काम करवून घेतात, तेथे घेऊन जाणार होती. त्या वेळी गुरुजी मला म्हणाले, ‘‘तू माझ्या समवेत चल, म्हणजे ते मला मारणार किंवा कोणतीही इजा करणार नाहीत.’’ त्यांनी सांगितल्यानुसार मी त्यांच्या समवेत गेलो. ती व्यक्ती आम्हाला त्या गुरुजींच्या कामगाराच्या घरी घेऊन गेली. तेथे ती व्यक्ती दारू पिऊन आली होती आणि तिच्या समवेतची इतर मंडळी गुरुजींना वाटेल तसे बोलत होती. त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोपही केले. ‘तुला कारागृहात घालू’, असे ते बोलत होते, तरीही गुरुजी स्थिरच होते. हा प्रसंग झाल्यावर गुरुजी मला म्हणाले, ‘‘तू माझ्या समवेत होतास आणि तुझ्या माध्यमातून स्वामीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे आले होते. त्यामुळे ते मला मारू शकले नाहीत.’’ हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला होता.

१५ इ ३. ‘या प्रसंगाच्या माध्यमातून साडेसाती माझे वाईट प्रारब्ध घेऊन गेली, आता माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट होणार’, असे गुरुजींनी सांगणे

हा प्रसंग घडल्यावर गुरुजी मला म्हणाले, ‘‘२५.१.२०२० ला माझी साडेसाती संपली. ‘साडेसाती जातांना काहीतरी घेऊन जाते’, असे म्हणतात. २६.१.२०२० या दिवशी घडलेल्या या प्रसंगाच्या माध्यमातून साडेसाती माझे वाईट प्रारब्ध घेऊन गेली. आता माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट होणार आहे. माझ्या राशीत मंगळ आणि गुरु उच्च स्थानी आहेत.’’

– श्री. रामानंद परब

 

१६. गुरुजींची सनातनच्या साधकांवरील प्रीती

१६ अ. गुरुजींच्या श्री गुरूंनी त्यांना दिलेला आशीर्वाद त्यांनी साधकांना देणे

गुरुजींना त्यांच्या श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) आशीर्वाद दिला होता, ‘‘तू ज्या दगडाला हात लावशील, त्या दगडातून तुला जी मूर्ती करायची आहे, ती आपोआप पूर्ण होईल.’’ तोच आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या दगडाला हात लावाल, त्या दगडातून तुम्हाला जी मूर्ती साकारायची आहे, ती आपोआप पूर्ण होईल. स्वामीजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) तुम्हा दोघांना केवळ पाठवले असे नाही, तर तुम्ही २ कोटी लोकांच्या समान आहात.’’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार (१.२.२०२०)

 

१७. श्री. नंदा आचारी यांना आलेल्या अनुभूती

१७ अ. बद्रिनाथहून आलेल्या एका साधूने गुरुजींकडे ५० सहस्र रुपये मागणे, त्यांना ते पैसे दिल्यावर दुसर्‍याच दिवशी गुरुजींना १ लाख रुपये मिळणे आणि ‘आपण देवाला सर्व दिले की, देव आपल्याला दुप्पट देतो’, असे गुरुजींनी सांगणे

‘एकदा बद्रिनाथहून एक साधू गुरुजींकडे आले होते. त्यांनी गुरुजींना सांगितले, ‘‘मला ५० सहस्र रुपये दे.’’ त्या वेळी गुरुजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे ५० सहस्र रुपये नाहीत.’’ तेव्हा ते साधू म्हणाले, ‘‘नाही कसे म्हणतोस ? तुझ्या कपाटातील खणात ५० सहस्र रुपये आहेत. ते मला हवे आहेत, ते मला आणून दे.’’ गुरुजींना एका मूर्तीचे ५० सहस्र रुपये आदल्या दिवशीच मिळाले होते. गुरुजींनी ते पैसे साधूला आणून दिले. ते पैसे घेऊन ते साधू निघून गेले. दुसर्‍याच दिवशी गुरुजींना एक लाख रुपये मिळाले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण देवाला सर्व दिले की, देव आपल्याला दुप्पट देतो.’’

– श्री. रामानंद परब

१७ आ. घराजवळची शापित जागा मूर्ती घडवण्यासाठी घेणे आणि तेथे मूर्ती घडवायला आरंभ केल्यावर ती जागा शापमुक्त होऊन तेथे कोणत्याही प्रकारचा त्रास न होणे

‘एकदा त्यांना आम्ही विचारले, ‘‘तुम्ही पूर्वीपासून याच जागी मूर्ती बनवता का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘याच्या बाजूला माझे घर आहे. आरंभी मी तेथे मूर्ती बनवायचो. आता आपण मूर्ती घडवतो, ती जागा शापित होती. ‘इथे जो कुणी रहायला यायचा, त्याच्या कुळाचा नाश व्हायचा’, असे अनेकांनी अनुभवले होते. त्या जागेच्या मालकांनी मला विचारले, ‘‘ही जागा तू घेशील का ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘हो’ म्हणालो आणि मी ही जागा घेतली. तेव्हापासून मी येथे मूर्ती बनवत आहे. येथे मूर्ती घडवायला लागल्यापासून ही जागा शापमुक्त झाली आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आतापर्यंत मी या स्थानावर अनेक प्रकारच्या मूर्ती बनवल्या आहेत.

१७ इ. या जागेत एका वृक्षावर देवीचे स्थान असणे, त्या देवीचे गुरुजींना अनेक वेळा दर्शन होणे आणि तेथे मूर्तीसेवा करतांना ऋषिमुनींच्या आश्रमात असल्याचे साधकांनी अनुभवणे

या जागेमध्ये एका वृक्षावर देवीचे स्थान आहे. तिथे मला देवीचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. तो वृक्ष ओवळीच्या फुलांचा आहे. त्या फुलांना पुष्कळ सुगंध असतो.’’

त्या ठिकाणी पुष्कळ शांतता आहे. ‘तेथे सेवा करतांना आम्ही ऋषिमुनींच्या आश्रमात आहोत’, असे आम्हाला जाणवते.

१७ ई. सनातन संस्थेसाठी श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती

श्री. राजू सुतार

१७ ई १. गुरुजींना श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवण्यासाठी दोघांच्या साहाय्याची आवश्यकता भासणे आणि त्याच वेळी रामनाथी आश्रमातून दोन साधक साहाय्यासाठी त्यांच्याकडे येणार असल्याचे कळल्यावर गुरुजींचा भाव जागृत होणे

‘आम्ही सनातन संस्थेसाठी श्री सिद्धीविनायकाची मूर्ती बनवून घेणार होतो. कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांना दगडापासून श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवण्यासाठी दोन जणांची आवश्यकता होती. ते त्यांच्या समवेत असलेले सनातनचे साधक श्री. सागर कुरडेकर म्हणाले, ‘‘दोन जण साहाय्यासाठी मिळाले असते, तर बरे झाले असते.’’

त्याच वेळी आम्ही त्यांच्या साहाय्यासाठी आणि ‘मूर्ती कशी घडवायची ?’ ते शिकण्यासाठी लगेच रामनाथी आश्रमातून निघालो. ‘आम्ही दोघे त्यांच्याकडे येण्यासाठी निघालो आहे’, हे कळल्यावर गुरुजींचा भाव जागृत झाला आणि ते म्हणाले, ‘‘माझ्या मनातील सर्व विचार श्री गुरूंना कळतात. त्यांनी माझी हाक लगेच ऐकली.’’ खरेतर त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना कधीच पाहिले नाही, तरीही त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा आहे.

१७ ई २. एका मूर्तीकाराकडे गुरुजींना सिद्धिविनायकाच्या मूर्तीसाठी एक दगड योग्य वाटणे, तो दगड घट्ट असल्याने मूर्तीकार तो फोडून टाकणार असणे; परंतु ‘मला हाच दगड हवा आहे’, असे सांगून गुरुजींनी तो दगड आणणे

आपण गुरुजींना दगडापासून श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवायला सांगितली होती. गुरुजी त्या मूर्तीसाठी कारवार येथील सदाशिवगड येथे एका मूर्तीकाराकडे दगड आणायला गेले होते. तेथे अनेक प्रकारचे दगड होते. त्यांनी तेथील एका दगडाला हात लावल्यावर त्या दगडाची स्पंदने त्यांना श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीसाठी योग्य वाटली. तो दगड घट्ट असल्याने त्यातून मूर्ती बनवू शकणार नाही; म्हणून त्या मूर्तीकाराने तो बाजूला ठेवला होता. तो दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य नसल्याने मूर्तीकार तो फोडून टाकणार होता. ‘तेथे असलेले अन्य दगड मूर्तीसाठी योग्य आहेत. त्यांच्यापैकी एक दगड घेऊन जाऊ शकता’, असे त्या मूर्तीकाराने गुरुजींना सांगितले; परंतु गुरुजी त्यांना म्हणाले, ‘‘मला हाच दगड हवा आहे’’ आणि त्यांच्याकडून तो दगड घेऊन आले.

१७ ई ३. दगडाचे वजन अधिक असल्याने एकही ‘टेम्पो’वाला तो दगड नेण्यास सिद्ध नसतांना एकाने ‘देवाची सेवा’ या भावाने तो दगड त्याच्या ‘टेम्पो’तून मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी पोचवणे

गुरुजींना हवा असणारा दगड मिळाला; पण तेथून तो दगड मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी एकही ‘टेम्पो’वाला सिद्ध होत नव्हता; कारण त्या दगडाचे वजन ७०० किलो होते. ‘आमची गाडी खराब होईल’, असे म्हणून अनेक ‘टेम्पो’वाल्यांनी तो दगड वाहून नेण्यास नकार दिला. त्यानंतर गुरुजींच्या परिचयाचा एक ‘टेम्पो’वाला तो दगड घेऊन जाण्यास सिद्ध झाला आणि त्याने कोणताही विचार न करता ‘देवाची सेवा आहे’, या विचाराने तो दगड आपल्या गाडीत घालून मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी आणून दिला.’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार
१७ ई ४. गुरुजींच्या श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) त्यांना स्वप्नात येऊन मूर्तीत सुधारणा करण्यास सांगणे, तेव्हाच एका संतांनीही मूर्तीत आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा करण्यास सांगणे आणि यावरून गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती येणे

‘श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवण्याची सेवा चालू असतांना एका रात्री गुरुजींच्या गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) रात्री १२.३० वाजता त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितले, ‘तू जी मूर्ती बनवत आहेस, त्या मूर्तीचे कान लहान-मोठे आहेत.’ त्यांनी इतरही काही सुधारणा करायला सांगितल्या. गुरुजींनी लगेच उठून दिवा चालू करून उशाशी ठेवलेले श्री सिद्धिविनायकाचे संदर्भ चित्र हातात घेऊन पाहिले. तेव्हा ‘श्री गुरूंनी त्यांना सांगितलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये कराव्या लागणार होत्या’, असे त्यांच्या लक्षात आले.

श्री. रामानंद परब यांना ते चित्र पाहून ‘मूर्ती घडवतांना त्यात काही सुधारणा करायला हव्यात’, असे वाटत होते. ‘त्या सुधारणा आपण मूर्ती बनवतांना करायच्या का ?’, हे मी एका संतांना विचारायला सांगितले. दुसर्‍या दिवशी आम्ही गुरुजींकडे सेवेसाठी गेल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या गुरूंनी स्वप्नात येऊन मूर्तीत काही सुधारणा करण्यास सांगितल्याचे सांगितले आणि त्याच वेळी संतांचाही निरोप आला, ‘‘मूर्तीत ज्या सुधारणा करणे आवश्यक आहेत, त्या सर्व सुधारणा करायच्या आहेत. आपण त्या सुधारणा केल्या, तर त्या गणेशमूर्तीतील तत्त्व अजून वाढू शकते.’’ तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘माझ्या श्री गुरूंनी जे सांगितले, तेच त्या संतांनीही सांगितले. गुरुतत्त्व कसे एक असते ना ?’’

 

१८. गुरुजींविषयी आलेली अनुभूती

१८ अ. गुरुजींच्या जागी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन होणे आणि तेव्हा त्यांनी त्यांचे नाव ‘विवेकानंद’ असल्याचे सांगणे

पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्या समवेत सेवेसाठी बसलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या जागी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन झाले. याविषयी मी सहसाधक श्री. राजू सुतार यांना सांगितले. त्यानंतर १ – २ मिनिटांतच ते आम्हाला म्हणाले, ‘‘माझे खरे नाव ‘विवेकानंद’ आहे. सर्व जण मला ‘नंदा’ असे म्हणतात.’’

एकदा गुरुजी सहज म्हणाले, ‘‘माझे शरीर श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे आहे. त्यांचा एक खांदा लहान आणि एक खांदा मोठा होता. माझेही तसेच आहे आणि त्यांचा जो खांदा मोठा होता, तोच माझाही खांदा मोठा आहे. ’’ हे ऐकल्यावर मला माझ्या वरील सूत्रातील अनुभूतीचा उलगडा झाला.’

– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२०)

श्री गुरूंच्या आशीर्वादाने जन्म होणे

‘श्री. नंदा आचारी गुरुजींनी सांगितले, ‘‘माझी आई गरोदर असतांना एकदा तिला संत गाडगेबाबा भेटले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, ‘‘तुला एक मुलगा होईल. त्याचे चांगले संगोपन कर. त्याचे नाव ‘विवेकानंद’ ठेव. तो इतिहासात नाव कमवेल.’’ त्यानंतर त्यांनी तिला खाण्यासाठी एक फळ दिले. माझा जन्म गुरूंच्या आशीर्वादाने झाला आहे. त्यांनी मला जन्माला घातले आहे, तर ते सांगतील तसे करूया. दत्त संप्रदायाचे पद्मनाभस्वामी हे माझ्या आईचे गुरु होते.’’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार (११.२.२०२०)

गुरुजींनी सांगितलेली काही अमूल्य सूत्रे

१. ‘इतरांना साहाय्य करणे’ हे आपले कर्तव्य आहे.

२. ज्यांना कुणाचा आधार नसतो, त्यांना भगवंताचा आधार असतो.

३. आपण जी कृती करतो, त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळायला हवे.

४. मनात शंका यायला नको. मनात शंका असल्यास कोणतेच कार्य नीट होत नाही. मनात शंका आल्यास तिचे निरसन करून नंतरच ती कृती करायला हवी, म्हणजे ती कृती भगवंताला अपेक्षित अशी होते.

५. देह आणि आत्मा देवाने बनवला आहे. देवाकडेही एक नोंदवही, म्हणजे संगणक आहे. आपला आत्मा आणि तो संगणक हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आपण जी काही कृती करतो, त्याची नोंद देवाकडील संगणकात संरक्षित होते.’

– श्री. नंदा आचारी (१.२.२०२०)

 

१९. शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांची झालेली गुरुभेट आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१९ अ. गुरुभेटीपूर्वीची पार्श्वभूमी

एकदा मी सहज गुरुजींना विचारले, ‘‘तुमच्या जीवनात गुरु कसे आले ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटगाव येथे श्री दत्तावतारी सद्गुरु समर्थ श्री बाळकृष्ण महाराज उपाख्य दादा महाराज यांच्या समाधीवर ठेवण्यासाठी मूर्ती बनवायची होती. त्यांच्या भक्तांनी मुंबईमधील एका उत्तम कलाकाराला ती मूर्ती घडवण्याचे काम देण्याचे ठरवले आणि तसे त्यांनी श्री दादा महाराज यांचे उत्तराधिकारी श्री बाबा महाराज यांना सांगितले; पण श्री बाबा महाराज यांनी सुचवले, ‘‘कारवारमध्ये एक विश्वकर्मा आहे. त्याच्याकडून आपण श्री दादा महाराज यांची मूर्ती सिद्ध करवून घेऊ.’’ प्रत्यक्षात त्या वेळी मला श्री बाबा महाराज यांच्याविषयी काहीही ठाऊक नव्हते. त्यापूर्वी मी कधीही श्री बाबा महाराज यांना भेटलो नव्हतो. श्री बाबा महाराज यांनी भक्तमंडळींना सांगितले, ‘‘आपण नमुना म्हणून त्यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती सिद्ध करवून घेऊ.’’ त्याप्रमाणे कारवारचे श्री. रामकृष्ण रायकर यांनी पुढाकार घेऊन माझ्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती सिद्ध करवून घेतली. ती विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती श्री बाबा महाराज यांना फार आवडली. ती मूर्ती श्री बाबा महाराज यांच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या कट्ट्यावर बसवण्यात आली.

त्यानंतर श्री बाबा महाराज यांनी मला श्री दादा महाराज यांची मूर्ती घडवण्याची संमती दिली. तेव्हा मी दादा महाराज यांची मूर्ती मोठ्या श्रद्धेने बनवली आणि ती घेऊन तिकडे गेलो. त्यानंतर त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवण्यात आला. त्यांच्या बर्‍याच भक्तांच्या मनात ‘आपल्याला मूर्ती बसवण्याची संधी मिळावी’, अशी इच्छा होती; पण श्री बाबा महाराज यांनी ‘मूर्ती मी आणि नंदा (शिल्पकार) बसवणार’, असे सांगितले. मला पुष्कळ आनंद झाला आणि त्यासमवेत ‘आपल्याकडून कुठे चूक तर होणार नाही ना ?’, अशी थोडी भीतीही वाटली.

१९ आ. मूर्ती सिद्ध करतांना ती वजनदार वाटणे; मात्र प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री बाबा महाराज यांनी मूर्ती उचलण्यास सांगितल्यावर तिचे वजन अल्प जाणवणे

श्री बाबा महाराज यांच्या सांगण्यावरून मूर्ती बसवण्यासाठी मी मोठ्या धैर्याने मूर्ती उचलण्यासाठी पुढे झालो. मूर्ती सिद्ध करतांना मला मूर्ती थोडी वजनदार वाटत होती; परंतु जेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला श्री दादा महाराज यांची मूर्ती उचलण्यास सांगितले, तेव्हा मला त्या मूर्तीचे वजन एकदम अल्प जाणवले. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. त्यामुळे ती मूर्ती सहजपणे उचलून समाधीवर ठेवून स्थापन करता आली. यानंतर श्री बाबा महाराज यांनी माझ्याकडून आपल्या आईची मूर्ती करवून घेतली.

१९ इ. आलेल्या अनुभूती

१९ इ १. श्री बाबा महाराज यांच्या घरामागे असलेल्या दत्तस्थानी श्री बाबा महाराज यांनी अनवाणी जाणे, दत्तस्थानी गेल्यावर श्री बाबा महाराज यांनी त्यांच्या पायांकडे पाहायला सांगितल्यावर त्यांच्या पायांत लाकडी पादुका दिसणे, ‘दत्तपादुका अशा असतात’, असे त्यांनी सांगणे आणि घरी परत आल्यावर त्यांच्या पायांत काही नसणे

मी पाटगाव येथे अधूनमधून जायचो आणि श्री बाबा महाराज यांच्या सान्निध्यात एक मास राहायचो. एकदा असेच मी श्री बाबा महाराज यांच्याकडे राहायला गेलो होतो. संध्याकाळ झाली होती. सूर्य संपूर्ण मावळलेला नव्हता. तेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला आपल्याजवळ बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘‘आपण जरा खाली जाऊन येऊ.’’ आम्ही दोघे श्री बाबा महाराज यांच्या घरामागे श्री दत्तपादुका आहेत, तेथे गेलो. श्री बाबा महाराज यांनी मला दत्तपादुका दाखवल्या आणि म्हणाले, ‘‘नंदा, माझ्या पायांकडे बघ.’’ मी श्री बाबा महाराज यांच्या पायांकडे बघून पुष्कळ आश्चर्यचकित झालो. आम्ही दोघे घरांतून बाहेर निघालो, तेव्हा आम्हा दोघांच्याही पायांत चपला नव्हत्या; पण जेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला त्यांच्या पायाकडे बघायला सांगितले, तेव्हा मला त्यांच्या पायात लाकडी पादुका दिसल्या ! नंतर श्री बाबा महाराज यांनी मला सांगितले, ‘‘दत्तपादुका अशा असतात.’’ तेव्हा मला तो मोठा चमत्कार वाटला. मी काही न बोलता गप्प राहिलो. नंतर आम्ही घरी पोचलो. तेव्हा मी पुन्हा श्री बाबा महाराज यांच्या पायांकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या पायांत काही नव्हते !

१९ इ २. श्री बाबा महाराज यांनी समाधी घेतल्याचे त्यांचे उत्तराधिकारी श्री भाई यांच्याकडून समजणे, ‘श्री बाबा महाराज यांनी स्वप्नात येऊन ‘माझ्या पादुका श्री. नंदा आचारी गुरुजींना दाखवल्या आहेत, तशा पादुका बनवून घ्या’, असे सांगितले आहे’, असे श्री भाई यांनी सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांना श्री बाबा महाराज यांच्या पादुका बनवून देणे

पुढे काही दिवसांनी श्री बाबा महाराज यांनी समाधी घेतली. ही गोष्ट मला कळली नव्हती; परंतु काही दिवसांनी मला पाटगावहून श्री भाई यांचा भ्रमणभाष आला. श्री भाई हे श्री बाबा महाराज यांचा मुलगा आहे आणि ते आता तेथील उत्तराधिकारी आहेत. श्री भाई यांनी मला सांगितले, ‘‘श्री बाबा महाराज आता नाहीत; परंतु त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितले, ‘माझ्या पादुका तुम्ही श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांच्याकडून करवून घ्या; कारण मी त्यांना माझ्या पादुका दाखवल्या आहेत.’’ हे ऐकून मी फार चकित झालो. त्यानंतर मी स्वतः बघितल्याप्रमाणे श्री बाबा महाराज यांच्या पादुका त्यांना बनवून दिल्या.

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्री दादा महाराज हे श्री साईबाबांचे परम मित्र होते. श्री बाबा महाराज हे पाटगावहून साईबाबांसाठी कफनी पाठवून देत असत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुपरंपराही श्री साईबाबांचीच आहे.’

– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment