योगियांचे योगी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज

Bhalchandra_maharaj
परब्रह्म एेशी कीर्ती आहे थोर । म्हणूनी तुज नमिती सान थोर ।। योगियांचे योगी तुम्ही भाग्यवंत । भालचंद्र महाराज बाबा तुम्ही हो महंत ।।

कणकवलीचे (कनकनगरी) परमहंस भालचंद्र महाराज यांचे स्वरूप नित्यशुद्ध, निराभास, निराकार, निरंजन असेच होते. ते ब्रह्मपदी लीन राहिल्याने अखिल चराचराशी तादात्म्य पावलेले होते. परोकोटीची विदेही स्थिती होती. तसेच ते अनंतकोटी ब्रह्मांडनायक होते. नेहमी विदेही अवस्थेत असलेले, भक्तांना दर्शन होताच त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या परमहंस भालचंद्रबाबांच्या चरणी वाहिलेली शब्द सुमनांजली…

संकलक : श्री. रमेश ब. सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परिक्षेत आलेले अपयश, यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले. त्या स्थितीत भालचंद्रबाबा एक दिवस गारगोटी, कोल्हापूर येथे गेले. तेथे गारगोटीचे एक साक्षात्कारी योगीपुरुष मुळे महाराजांच्या सान्निध्यात आले. मुळे महाराजांनी बाबांना सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे जाऊन तेथील संत प.पू. साटम महाराज यांची सेवा करण्यास सांगितले. त्यानुसार बाबा दाणोलीत आले. तेथे प.पू. साटम महाराजांची सेवा केली. काही कालावधीनंतर बाबा १९२६ या वर्षी कणकवलीत आले.

प्रारंभी जुन्या मोटारस्टँडवर किंवा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले दिसत. कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत. कोणाशी बोलत नसत, हसत बसत, काही दिले, तर घेत नसत. त्यांना काही खायला दिले तर दोन दोन दिवस, तसेच पडून रहात असे.

पुढे ते सहसा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरानजिकच्या प.पू. कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत बसत असत. देहभान नसल्याने मलमूत्रविसर्जनही तेथेच करत असत. हाकलले तरी जात नसत. अखेर त्यांना समाधीमंदिराशेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसवले. तेथेही तोच प्रकार चालू झाला. जाणारे, येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत; पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले. महाराजांचा कशालाच विरोध नसे, असे विलक्षण वैराग्य. ते सत्पुरुष आहेत याची जरासुद्धा कल्पना त्याकाळी लोकांना नव्हती. महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसाळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरीत टाकले. तेथेही ते दोन दिवस तसेच होते. बाबांची कोणी चेष्टामस्करी करत, कोणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काहीही नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवीत असत.

बाबांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दाणोली येथील प.पू. साटम महाराजांच्या कानी पडले. तेव्हा ते स्वत: दोन वेळा कणकवली येथे आले आणि प.पू. भालचंद्र महाराजांना भेटले. प.पू. साटम महाराजांनी प.पू. भालचंद्र महाराजांची महती, आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचीती समाजास दाखवून दिली. दोन महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले. हळूहळू प.पू. भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले; पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी. ते चहाचे व्यापारी होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे असायचे. कणकवली येथे आल्यावर प.पू. भालचंद्र महाराजांना त्यानी ओळखले. त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली. त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला.

प.पू. भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील म्हापण हे होय. तेथे ते शाळेत गेल्याचीही नोंद आहे. धर्मराज महाराज, फलाहारी महाराज, प.पू. राज अहमद हुसेनशहा पटेलबाबा हे प.पू. भालचंद्र महाराजांचे शिष्य होते. प.पू. भालचंद्र महाराजांच्या ३८व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्णरित्या न्याहाळत असतांना जाणवते की, कणकवलीमध्ये या सत्पुरूषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पालटले.

बाबांना काहीजण वेडे समजत होते. एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा. कोणी नमस्कार केला, तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला. अशा प्रकारे बाबांची किर्ती सर्वदूर पसरू लागली. जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले. आज भक्तांना विचारले, तर विशेषत: कणकवलीवासियांना विचारले, तर ते सांगतील, आमच्या समस्या, दु:ख, त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो. त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुखशांती लाभल्याची उदाहरणे आहेत.

मुंबई-लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता. रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच ते अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला (१८ डिसेंबर १९७७) सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्‍यात वेदमंत्रघोषात समाधी देण्यात आली.

कणकवली येथील आश्रमात प.पू. भालचंद्र महाराज आश्रम समिती कार्यरत असून ती नोंदणीकृत आहे. या आश्रम समितीने जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे । या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतले आहे.

१.  धार्मिक उत्सव

procession_600
कणकवली शहरातून निघालेली प.पू. भालचंद्र महाराजांची पालखी

१.अ. आश्रमात प.पू. बाबांची पुण्यतिथी, जयंती, गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या स्वरूपात साजरे केले जातात.

१.आ. पुण्यतिथी आणि जयंतीउत्सव या दोन्ही दिवशी सर्वभक्तकल्याणार्थ धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. प्रतीदिन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सामूहिक नामजप केला जातो.

१.ई. पुण्यतिथी आणि जयंतीउत्सव या दोन्ही दिवशी प.पू. बाबांची भव्य पालखी मिरणूक कणकवली शहरातून काढली जाते.

१.उ. पुण्यतिथी आणि जयंती उत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देशाच्या विविध भागांतून भाविक उपस्थित असतात.

१.ऊ. आश्रम समिती आणि कणकवली येथील स्थानिक मंडळी आणि भक्तगण मिळून आश्रमातील सर्व कार्यक्रम नियोजनबद्धरित्या यशस्वीपणे साजरे करतात.

२. महाप्रसाद

२.अ. वर्ष २००४ पासून आश्रमात प्रत्येक गुरुवारी विनामूल्य महाप्रसादाची सोय केली आहे. याचा सुमारे १ सहस्र ५०० हून अधिक भक्त लाभ घेतात.

२.आ. बाहेरून येणार्‍या भक्तांसाठी आश्रमात प्रतिदिन नाममात्र १० रुपये घेऊन महाप्रसादाची सोय केली जाते.

२.इ. प्रत्येक गुरुवारी होणार्‍या महाप्रसादाचा खर्च एकावेळी एकच भक्त करतो. या संदर्भातील आगावू आरक्षण तीन मास अगोदर केले जाते.

२.ई. पुण्यतिथी आणि जयंती उत्सव हे सोहळे पाच दिवसांचे असल्याने या वेळी प्रत्येक दिवशी सुमारे १० सहस्रांहून अधिक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असतात.

३. भक्तनिवास सोय

३.अ. सध्या आश्रमसमितीकडे १६ खोल्यांचे सुसज्ज भक्त निवास आहे.

३.आ. वर्ष २०१० ते २०१४ या कालावधीत समितीने आश्रमाच्या लगतची एक एकर जमीन आश्रम विस्तारासाठी विकत घेतली.

४. वैद्यकीय सेवा

४.अ. आश्रमामध्ये वर्ष २००६ पासून विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध केली असून त्यासाठी एक डॉक्टर आणि एक साहाय्यक नियुक्त केले आहेत.

४.आ. प्रतिदिन सकाळी ९ ते १२ या वेळेत वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्ण घेतात.

४.इ. या सेवेमध्ये तपासणी, औषधे, गोळ्या, इंजेक्शन विनामूल्य आहेत.

४.ई. या सेवेचा असंख्य रुग्ण लाभ घेत आहेत.

४.उ. प्रतिवर्षी जयंती उत्सवाच्या वेळी रक्तदान शिबीर आयोजित करून गरजूंना त्याचा लाभ दिला जातो.

५. शैक्षणिक सेवा

५.अ. प्रतिवर्ष पूर्व माध्यमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्यात तज्ञांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.

५.आ. प्रतिवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक/ माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. त्यासाठी मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शक बोलावले जातात.

५.इ. पूर्व माध्यमिक / माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी जिल्हास्तरीय सराव परीक्षा घेतली जाते. या सराव परिक्षेत जे विद्यार्थी पहिल्या १० मध्ये येतात, तेच विद्यार्थी शासनाच्या अधिकृत शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात गुणवत्ता सूचीत असतात.

६. परमहंस भालचंद्र महाराजांचे विड्या आणि सिगारेट फुंकण्याचे वैशिष्ट्य !

‘परमहंस भालचंद्र महाराज यांना त्यांचे भक्त ‘बाबा’ म्हणतात. बाबांची कुणी चेष्टामस्करी करत, कुणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काही वाटत नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवत असत. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त तेथे ‘सिगारेट’ पेटवतात.

पूर्वी जेव्हा परमहंस भालचंद्र महाराज यांची (बाबांची ) समाजाला ओळख नव्हती, तेव्हा ते लोकांना उकीरड्यावर लोकांचे उष्टे अन्न खातांना किंवा लोकांनी अर्धवट टाकलेल्या विड्या किंवा सिगारेट ओढतांना दिसत. जेव्हा त्यांच्या संतत्वाची प्रचीती लोकांना आली, तेव्हा लोक त्यांना विड्या किंवा सिगारेट अर्पण करू लागले. लोकांना वाटे, ‘बाबांना विड्या आणि सिगारेट यांचे व्यसन आहे’; पण संतांना तसे काही नसते. बाबा लोकांनी दिलेल्या विड्या किंवा सिगारेट ओढत. ‘या माध्यमातून आपल्या दुःखाचे किंवा कष्टाचे निवारण होत आहे’, अशी अनुभूती लोकांना येत असे. काही वेळा बाबा काही भक्तांना सिगारेटचे चटकेही देत; पण भक्तांना फारशा वेदना होत नसत. उलट ‘या माध्यमातूनही आपले तीव्र प्रारब्ध बाबांनी दूर केले’, अशी अनुभूती भक्तांना येत असे. या अनुभूतींतूनच बाबांना विड्या किंवा सिगारेट अर्पण करण्याची प्रथा पडली. ती आताही चालू आहे. बाबांच्या समाधीसमोर भक्त विड्या किंवा सिगारेट पेटवतात आणि आपल्या व्यथा दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करतात. अजूनही भक्तांना बाबांच्या कृपेची अनुभूती येते.