अनुक्रमणिका
- १. घसा दुखणे किंवा खवखवणे, तसेच कोणत्याही प्रकारचा खोकला
- २. कोरडा खोकला (वातज कास)
- ३. कणकण वाटणे किंवा ताप येणे
- ४. डोकेदुखी
- ५. बद्धकोष्ठता
- ६. व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
- ७. चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !
- ८. वात आणि पित्त यांचे विकार
- ९. भाजण्यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
- १०. जेवण जास्त झाल्याने होणार्या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

१. घसा दुखणे किंवा खवखवणे, तसेच कोणत्याही प्रकारचा खोकला
‘दिवसातून २ – ३ वेळा ‘चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.’– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)
वैद्य मेघराज पराडकर
१ अ. अनुभव
‘बर्याचदा कोणत्याही कारणामुळे माझा घसा दुखायला लागून कणकण वाटणे चालू झाल्यावर मी लगेच ‘चंद्रामृत रस’ची १ गोळी चघळतो. बहुतेक वेळा केवळ एका गोळीमुळेही माझा घसा दुखणे बंद होऊन कणकणही जाते, तसेच पुढे जाऊन खोकला येण्याचेही टळते.’ – (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)
२. कोरडा खोकला (वातज कास)
‘काही वेळा केवळ खोकल्याची ढास लागते; परंतु कफ पडत नाही किंवा पडलाच, तर थोडासा पडतो. या प्रकारच्या खोकल्यामध्ये ‘श्वासनलिका आतून सोलपटून गेली आहे कि काय ?’, असे वाटू लागते. खोकून खोकून बरगड्या आणि पोट दुखू लागते. काही वेळा खोकल्यावरील औषधे घेऊन कफ सुकून गेल्यानेही असा खोकला येतो. काही वेळा झोपेत थंड वारा नाकातोंडात गेल्याने असा खोकला येतो. ही वातामुळे येणार्या खोकल्याची लक्षणे आहेत. आयुर्वेदात याला ‘वातज कास’ म्हणतात. ‘कास’ म्हणजे ‘खोकला’. अशा वेळी पुढील उपचार करावा.
अर्धी वाटी गरम पाणी घ्यावे. त्यामध्ये २ चमचे (१० मि.ली) साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालावे आणि ढवळून ढवळून प्यावे. (तुपाऐवजी तळणीचे तेलही वापरता येते. ‘तळणीचे तेल’ म्हणजे ‘ज्यामध्ये वडे, पापड, भजी असे खाद्यपदार्थ तळलेले आहेत, असे तेल’.) पिऊन झाल्यावर भांड्याला आतून लागलेले तूप भांड्यात थोडे गरम पाणी फिरवून काढून प्यावे. १ – २ वेळा असे केल्यावर खोकला थांबतो, असा अनुभव आहे. खोकल्यासह ताप किंवा कणकण असल्यास तुपासह चमचाभर तुळशीचा रसही घ्यावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर (२५.७.२०२२)
२ अ. अनुभव
‘माझी मुलगी चि. मुक्ता साडेचार वर्षांची आहे. जुलै २०२२ च्या तिसर्या आठवड्यात तिला सर्दी होऊन कोरडा खोकला चालू झाला. खोकून खोकून ती हैराण झाली होती. त्यात थोडा तापही आला. अशा वेळी एक चमचा तुळशीच्या रसामध्ये १ चमचा (५ मिली) तूप आणि थोडे मीठ घालून ढवळून तिला पाजले. त्या वेळी तिची खोकल्याची ढास पुष्कळ अल्प झाली. त्यानंतर साधारण ४ घंट्यांनी थोडा खोकला आल्यावर तिला याप्रमाणेच तूप पाजले. नंतर तिला खोकला आला नाही आणि तापही उतरला.’ – सौ. राघवी मयुरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२५.७.२०२२)
३. कणकण वाटणे किंवा ताप येणे
‘२ दिवस तुळशीची २ – २ पाने सकाळ-सायंकाळ चावून खावीत. एका जेवणाच्या वेळेस काहीही न खाता उपवास करून त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा थोडे गरम वरण १ चमचा तूप घालून प्यावे. २ दिवस अन्य काही न खाता केवळ गरम गरम वरणभात जेवावा. वरणभातावर थोडे तूप घ्यावे. चवीसाठी लोणचे घेतले, तरी चालते. पूर्ण बरे वाटेपर्यंत हाच आहार घ्यावा. अल्पाहार करू नये. त्याऐवजी चमचाभर मनुके चावून चावून खावेत किंवा वाटीभर गरम पाण्यात थोडा गूळ घालून ढवळून प्यावे. तहान लागेल, तेव्हा गरम पाणीच प्यावे. विश्रांती घ्यावी. असे केल्यास तापाचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते. ताप आलाच, तर त्याचा फार त्रास होत नाही आणि तो लवकर बरा होऊ लागतो.’
४. डोकेदुखी
‘सूतशेखर रस’ या औषधाच्या एका गोळीचे बारीक चूर्ण करावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) हे चूर्ण तपकीर ओढतात त्याप्रमाणे नाकात ओढावे. असे करणे जमत नसल्यास चमचाभर पातळ तुपामध्ये हे गोळीचे चूर्ण मिसळावे. उताणे झोपून या तुपात मिसळलेल्या औषधाचे २ – २ थेंब दोन्ही नाकपुड्यांत घालून २ मिनिटे पडून रहावे. त्यानंतर उठून तुपात मिसळलेले बाकीचे औषध चाटून खावे.’
५. बद्धकोष्ठता
‘बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. यासह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे, ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या १५ मिनिटे आधी चघळून खाव्यात. याने पाचक स्राव चांगल्या प्रकारे निर्माण होतात. बद्धकोष्ठतेवरील हे उपचार १५ दिवस करावेत.’
६. व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो. तुळशीचा रस काढण्यापूर्वी दोन्ही हात साबण लावून स्वच्छ धुवावेत. तुळशीची ७ – ८ ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यांतील पाणी झटकून टाकावे. ही पाने एकत्र करून दोन्ही तळहातांच्या मध्ये दाबत फिरवावीत. थोडा वेळ अशी फिरवल्यावर तळहाताला तुळशीचा रस लागू लागतो. तेव्हा पाने बोटांनी पिळून येणारा रस व्रणावर लावावा.’
७. चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !
‘वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागतात. यांतील बर्याच जणांना भेडसावणारी समस्या म्हणजे ‘गुडघेदुखी’. गुडघेदुखी होऊ नये म्हणून किंवा ती असल्यास सुसह्य व्हावी, यासाठी चाळिशीनंतर प्रत्येकानेच प्रतिदिन दिवसातून न्यूनतम एकदा गुडघ्यांना तेल लावायला हवे. यासाठी कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते.’
गुडघ्यांना मागच्या बाजूनेही तेल लावा !
‘सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात. गुडघ्यांना तेल लावतांना ते गुडघ्यांच्या सर्व बाजूंना लावावे.’
उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?
‘काहीजण म्हणतात की, उभ्याने पाणी प्यायल्याने गुडघ्यांचा संधीवात होतो. खरेतर ‘उभ्याने पाणी प्यायल्याने संधीवात होतो’, याला काही शास्त्रीय आधार नाही. बसून पाणी पिणे, हे आदर्श असले, तरी ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’
८. वात आणि पित्त यांचे विकार
तूप हे अमृतासमान असल्याने ते घरी ठेवाच !
‘सर्पिः वातपित्तप्रशमनानाम् (श्रेष्ठम्) ।’ असे चरकसंहितेत (अध्याय २५, श्लोक ४० मधील निवडक अंश) सांगितले आहे. ‘तूप हे वात आणि पित्त यांचे विकार दूर करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे’, असा याचा अर्थ आहे. दैनंदिन आहारामध्ये, तसेच विविध रोगांच्या आत्ययिक अवस्थांमध्ये (इमर्जन्सीमध्ये) तुपाचा पुष्कळ चांगला उपयोग होतो. असे तूप प्रत्येकाकडे असायलाच हवे. अनेकांना वाटते की, तूप महाग असते. आपल्याला परवडणार नाही; परंतु ‘तूप महाग असले, तरी शरिरासाठी अत्यावश्यक आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, शेव, चिवडा, फरसाण, अन्य फराळ, तसेच भजी, वडापाव, पिझ्झा इत्यादी आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक पदार्थांवर होणारा (अप)व्यय वाचवून तो व्यय (खर्च) तुपावर करा. घरी तूप बनवण्यासाठी दुधाच्या सायीचे दही लावा. ते घुसळून लोणी काढा. हे लोणी पाण्याने स्वच्छ धुऊन कढवा, म्हणजे तूप बनेल. हे घरचे साजुक तूप मिळाल्यास फारच चांगले; परंतु ते नसेल, तर पेठेत विकत मिळणारे तूप घ्या. देशी गायीचे तूप खाणे आदर्श आहे; पण ते शक्य नसेल, तर पेठेत मिळणारे सामान्य गायीचे तूप विकत घ्या. प्रत्येकाच्या घरी न्यूनतम अर्धा किलो तूप नेहमी असावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
९. भाजण्यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
‘कोणत्याही कारणाने भाजल्यास भाजलेल्या भागावर लगेच तूप लावावे. दाह तत्क्षणी थांबतो. वैद्य लोक पायांत होणार्या भोवर्या (कुरूप) जाळून काढण्यासाठी ‘अग्नीकर्म’ करतात. यामध्ये लोखंडी सळई तांबडी होईपर्यंत गरम करून तिच्या द्वारे भोवरी जाळली जाते. तापलेल्या लोखंडी सळईचे तापमान ७०० अंश सेल्सिअस असते. एक भोवरी काढण्यासाठी हा उपचार एकदाच करावा लागतो. या सळईचा जेव्हा चटका बसतो, तेव्हा वैद्य लोक त्या ठिकाणी लगेच तूप लावतात. एवढ्या गरम सळईने भाजलेले असले, तरी तूप लावल्यावर दुसर्या सेकंदाला दाह शांत झालेला असतो, एवढा तुपाचा प्रभाव आहे.’
१०. जेवण जास्त झाल्याने होणार्या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
‘काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात. याने अपचन दूर होण्यास साहाय्य होते.’
| येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे. |
‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !
पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे
आम्लपित्त : अलीकडच्या काळातील मोठी समस्या आणि त्यावरील उपाय !
मूत्राशयाशी संबंधित विकारांवरील उपाय !
मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !