अनुक्रमणिका
- १. आम्लपित्ताचा त्रास असणारे रुग्ण मनानेच औषधे घेत असल्याने त्यांना विविध शारीरिक त्रास होणे
- २. आम्लपित्त दूर करण्यासाठी करावयाचे उपाय !
- ३. छातीत जळजळ होऊ लागल्यास लवंग, आले, दालचिनी, ताक, जिरे, बडीशेप, थंड दूध आणि नारळपाणी यांचे सेवन करावे !
- ४. तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?
- ५. फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?
- ६. तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?
- ७. नेहमी चहा पिणे आरोग्याला हानीकारक असल्याने तो सोडा !
१. आम्लपित्ताचा त्रास असणारे रुग्ण मनानेच औषधे घेत असल्याने त्यांना विविध शारीरिक त्रास होणे
आपल्या आजूबाजूला आम्लपित्ताचा (ॲसिडिटीचा) त्रास असलेले ४-५ तरी लोक असतात. आम्लपित्ताचे रुग्ण पित्ताची औषधे स्वतःच्या मनाने वर्षानुवर्षे घेत आहेत, असे अनेकदा लक्षात येते. त्यात ‘प्रोटॉन पम्प इन्हिबिटर्स’ या वर्गात मोडणारी औषधे सर्वाधिक प्रमाणात घेतली जातात. ही औषधे वैद्यकीय सल्ल्याविना अधिक काळ घेतल्याने किडनीचे विविध आजार, प्रसंगी किडनी निकामी होणे, विविध हृदयविकार, तसेच हाडे कमकुवत होऊन अस्थिभंग होणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या गोळ्यांसमवेत रुग्ण ‘डोमपेरिडोन’ हे औषधही स्वत:च्या मनाने वारंवार घेतांना दिसतात. स्त्रियांमध्ये ‘डोमपेरिडोन’मुळे ‘प्रोलॅक्टिन’ या हॉर्मोनचे प्रमाण वाढून मासिक पाळी अनियमित होऊ शकते. त्यामुळे ही औषधे आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना घेणे टाळले पाहिजे.
२. आम्लपित्त दूर करण्यासाठी करावयाचे उपाय !

आम्लपित्ताच्या त्रासामागील कारणांचा तज्ञांच्या साहाय्याने शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपचार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये पालट करण्याची सिद्धता हवी. अधिक वेळा थोडे थोडे खाणे, खाल्ल्यानंतर लगेच न बसणे, तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अल्प प्रमाणात सेवन करणे, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन टाळणे, नियमित व्यायाम करून वजन अल्प ठेवणे, मानसिक ताण न्यून करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा सगळ्या गोष्टींचा पुष्कळ लाभ होऊ शकतो. उपाशीपोटी पाणी पिणे (गरम नव्हे) याचाही लाभ होऊ शकतो.
३. छातीत जळजळ होऊ लागल्यास लवंग, आले, दालचिनी, ताक, जिरे, बडीशेप, थंड दूध आणि नारळपाणी यांचे सेवन करावे !
अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक झडप असते. जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की, ती झडप बंद होते आणि आम्लाला वर अन्ननलिकेत येऊ देत नाही. आम्लपित्त होण्याचे एक कारण, म्हणजे जठरामध्ये अल्प आम्ल असणे, हेही असू शकते. त्यामुळे अन्ननलिका आणि जठर यांच्यातील झडप पूर्णपणे बंद होत नाही आणि आम्ल अन्ननलिकेतून वर येऊन छातीत जळजळ होऊ लागते. अशा वेळी आम्लपित्तासाठी लवंग, आले, दालचिनी, ताक, जिरे, बडीशेप, थंड दूध, नारळपाणी अशा पदार्थांचे सेवन लाभदायक ठरू शकते. सतत गोळ्या घेण्यापेक्षा हे उत्तम आणि सुरक्षित आहे.
आम्लपित्ताचा अधिक त्रास असलेल्यांनी जठर आणि आतडे विकारांचे तज्ञ यांचा सल्ला वेळेत घेणे उत्तम !
– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे
४. तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

‘आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु असे काही न खातासुद्धा काही जणांना घशात आणि छातीत जळजळण्याचा त्रास, म्हणजेच पित्ताचा त्रास होतो. बहुतेक वेळा यामागे बद्धकोष्ठता हे कारण असते. बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपचार केल्यास हा त्रास लगेच न्यून होतो. पुढील प्राथमिक उपचार करून पहावेत.
‘गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. बद्धकोष्ठतेसह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या १५ मिनिटे आधी चघळून खाव्यात. याने पाचक स्राव चांगल्या प्रकारे निर्माण होतात. बद्धकोष्ठतेवरील हे उपचार १५ दिवस करावेत.’
५. फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?
‘फोडणीचे पोहे हा अल्पाहारामध्ये जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काही जणांना फोडणीचे पोहे खाल्ल्यावर घशात किंवा छातीत जळजळणे आणि मळमळणे असे त्रास होतात. त्यामुळे ‘फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते’, असा त्यांचा समज होतो. आयुर्वेदानुसार नुसते पोहे पित्तकारक नाहीत. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त होते. बर्याच वेळा फोडणीचे पोहे करतांना पुष्कळ तेल वापरले जाते. हे तेल एवढे असते की, पोहे खाल्ल्यावर ताटलीलाही भरपूर तेल लागलेले दिसते. या तेलकटपणामुळे पित्त होते. फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात.’
६. तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?
‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे. तूरडाळीची आमटी करतांना त्यामध्ये जास्त प्रमाणात आंबट किंवा तिखट घातले असेल, तर त्याने मात्र पित्त होते. यामध्ये दोष तूरडाळीचा नसून आंबट आणि तिखट यांचा असतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७. नेहमी चहा पिणे आरोग्याला हानीकारक असल्याने तो सोडा !
‘दूध घातलेला चहा प्यायल्याने पित्त वाढते. अल्पाहारासह आपण चहा पितो. अल्पाहारातील पदार्थांत मीठ असते. मीठ आणि दूध हा संयोग रोगकारक. या संयोगाला आयुर्वेदात ‘विरुद्ध आहार’ म्हणतात. कधीतरी चहा घेणे ठीक आहे; परंतु आरोग्यप्राप्तीची तळमळ असलेल्याने प्रतिदिन चहा घेण्याची सवय मोडावी. बर्याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’
अ. सतत उत्साही रहाण्यासाठी चहा-कशाय सोडा !
‘बरेच जण म्हणतात की, ‘चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे’, हे आम्हाला पटते; पण सकाळी आणि सायंकाळी काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा प्यायल्यावर तरतरी येते आणि उत्साह वाटतो. त्यामुळे चहा सोडवत नाही.’ ‘चहाऐवजी कोरा चहा किंवा कशाय चालेल का ?’, असेही अनेक जण विचारतात. थोडक्यात उत्साह किंवा तरतरी यासाठी त्यांना कोणत्या तरी बाह्य गोष्टीची आवश्यकता असते. बाह्य साधनांनी येणारा उत्साह तात्कालिक असतो; परंतु शरिरातील अग्नी (पचनशक्ती) उत्तम बनल्याने जो उत्साह निर्माण होतो, तो दीर्घकाळ टिकणारा असतो. अग्नी उत्तम राहून सतत उत्साही रहाण्यासाठी चहा-कशाय सोडून केवळ २ वेळा आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवा !
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !
आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे
मूत्राशयाशी संबंधित विकारांवरील उपाय !
मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !