गंगा नदी :भूलोकावरील अवतरण आणि तिची विविध नांवे

पुण्यसलिला गंगा नदीची महती अदि्वतीय आहे ! भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे ! इतिहासाच्या दृष्टीतून प्राचीनतम कालापासून आधुनिक कालापर्यंत आणि गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत गंगेची कथा, म्हणजे हिंदु सभ्यता आणि संस्कृती यांची अमृतगाथा आहे. प्रस्तुत लेखात अशा या ‘गंगे’विषयीची माहिती देण्यात आली आहे. ‘गंगा’ शब्दाची व्युत्पत्ती, अर्थ, ब्रह्मांडातील तिची उत्पत्ती अन् भूलोकातील अवतरण तसेच तिची इतर काही नांवे आणि त्या नावांमागील पार्श्वभूमी या लेखात सुस्पष्ट करण्यात आली आहेत.

 

१. ‘गंगा’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. गमयति भगवत्पदम् इति गङ्गा ।

अर्थ : (स्नान करणार्‍या जिवाला) भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचवते, ती गंगा.

आ. गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिः इति गङ्गा ।

अर्थ : मोक्षार्थी म्हणजे मुमूक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय.

 

२. गंगा नदीची ब्रह्मांडातील उत्पत्ती अन् तिचे भूलोकातील अवतरण

२ अ. ब्रह्मांडातील उत्पत्ती

वामन अवतारात विष्णूने दानशूर बलीराजाकडे भिक्षा म्हणून तीन पावले भूमीदान मागितले. वामन म्हणजे विष्णू असल्याचे ठाऊक नसल्याने बलीराजाने त्या क्षणी वामनाला तीन पावले भूमी दान दिली. वामनाने विराट रूप धारण करून एका पावलात संपूर्ण पृथ्वी आणि दुसर्‍या पावलाने अंतरिक्ष व्यापले. त्यांपैकी दुसरे पाऊल उचलतांना वामनाच्या (विष्णूच्या) डाव्या पायाच्या अंगठ्याचा धक्का लागून ब्रह्मांडाचे सूक्ष्म-जलीय कवच (टीप १) फुटले. त्यातून गर्भोदकाप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरचे सूक्ष्म-जल ब्रह्मांडात शिरले. हे सूक्ष्म-जल म्हणजे गंगा !

हा गंगेचा प्रवाह प्रथम सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवाने तिला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. नंतर सत्यलोकात त्याने स्वतःच्या कमंडलूतील पाण्याने श्रीविष्णूचे चरण धुतले. त्या जलातून गंगा उत्पन्न झाली. नंतर ती सत्यलोकातून अनुक्रमे तपोलोक, जनलोक, महर्लोक अशा मार्गाने स्वर्गलोकात आली.

२ आ. भूलोकातील अवतरण – भगीरथाच्या कठोर
तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरणे आणि तिने सगरपुत्रांचा उद्धार करणे

‘सूर्यवंशातील सगर राजाने अश्वमेध यज्ञ आरंभला. प्रथम त्याने दिग्विजयासाठी यज्ञीय अश्व पाठवला आणि त्याच्या रक्षणार्थ स्वतःच्या ६० सहस्त्र पुत्रांना पाठवले. या यज्ञाची धास्ती घेतलेल्या इंद्राने यज्ञीय अश्व पळवून कपिलमुनींच्या आश्रमाजवळ बांधला. नंतर सगरपुत्रांना तो अश्व कपिलमुनींच्या आश्रमाजवळ सापडला. तेव्हा ‘कपिलमुनींनीच अश्व चोरला’, असे समजून सगरपुत्रांनी ध्यानस्थ कपिलमुनींवर आक्रमण करण्याचा विचार केला. ही गोष्ट कपिलमुनींनी अंतर्ज्ञानाने जाणून डोळे उघडले अन् त्या क्षणी त्यांच्या नेत्रातील तेजाने सर्व सगरपुत्र भस्मसात् झाले. काही काळानंतर सगराचा नातू राजा अंशुमन याने सगरपुत्रांच्या मृत्यूचा शोध घेतला. त्या वेळी कपिलमुनींनी अंशुमनला सांगितले, ‘`स्वर्गातील गंगा भूतलावर आण. सगरपुत्रांच्या अस्थी आणि रक्षा यांवरून गंगेचा प्रवाह वहात गेला, तर त्यांचा उद्धार होईल !’’ त्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर येण्यासाठी अंशुमनने तप आरंभले.’

‘त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सुपुत्र राजा दिलीपनेही गंगावतरणासाठी तप केले. अंशुमन आणि दिलीप यांनी सहस्रो वर्षे तप करून गंगावतरण झाले नाही; पण तपश्चर्येमुळे त्या दोघांना स्वर्गलोक प्राप्त झाला.’ (वाल्मीकिरामायण, काण्ड १, अध्याय ४१, २०-२१)

‘राजा दिलीपच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र राजा भगीरथने कठोर तपश्चर्या केली. त्या वेळी प्रसन्न झालेली गंगामाता भगीरथाला म्हणाली, ‘‘माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यामुळे तू भगवान शंकराला प्रसन्न करून घे.’’ पुढे भगीरथाच्या घोर तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. नंतर शंकराने गंगेचा प्रवाह जटेत अडवला आणि तो पृथ्वीतलावर सोडला. अशा प्रकारे हिमालयात अवतीर्ण झालेली गंगा नदी भगीरथाच्या मागोमाग हरिद्वार, प्रयाग आदी स्थानांना पवित्र करत सागराला (बंगालच्या उपसागराला) मिळाली.’

२ आ १. गंगा भूलोकी अवतरित झाल्याचा दिवस !

दशमी शुक्लपक्षे तु ज्येष्ठे मासि कुजेऽहनि ।
अवतीर्णा यतः स्वर्गात् हस्तर्क्षे च सरिद्वरा ।। – वराहपुराण

अर्थ : ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, भौमवार (मंगळवार) आणि हस्त नक्षत्र या योगावर गंगा स्वर्गातून धरणीवर अवतरली.

गंगावतरणाची तिथी काही पुराणांत वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, तर काही पुराणांत कार्तिक पौर्णिमा सांगितली असली, तरी बहुसंख्य पुराणांत ‘ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी’ हीच गंगावतरणाची तिथी सांगितली आहे आणि तीच सर्वमान्य आहे.

 

३. गंगेची इतर काही नावे

३ अ. ब्रह्मद्रवा

ब्रह्मदेवाने गंगेला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. त्यामुळे तिला ‘ब्रह्मद्रवा’ असे म्हणतात.

३ आ. विष्णुपदी किंवा विष्णुप्रिया

गंगा विष्णुपदाला स्पर्शून भूलोकी आल्याने तिला ‘विष्णुपदी’ किंवा ‘विष्णुप्रिया’ हे नाव मिळाले.

३ इ. भागीरथी

राजा भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली; म्हणून तिला ‘भागीरथी (भगीरथाची कन्या)’ असे म्हणतात.

३ ई. जान्हवी

‘हिमालयातून खाली उतरतांना गंगेने राजर्षी आणि तपोनिष्ठ अशा जन्हुऋषींची यज्ञभूमी वाहून नेली. या गोष्टीचा राग आल्याने जन्हुऋषींनी तिचा सगळा प्रवाहच पिऊन टाकला. मग भगीरथाने जन्हुऋषींना प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गंगेचा प्रवाह स्वतःच्या एका कानातून बाहेर सोडला. त्यावरून तिला ‘जान्हवी (जन्हुऋषींची कन्या)’ हे नाव मिळाले.’ (वायुपुराण, अध्याय ९१, श्लोक ५४ ते ५८)

३ उ. त्रिपथगा

‘भूतलावर अवतरित झाल्यानंतर गंगेची धारा शिवाने जटेत अडवली. त्या वेळी तिचे तीन प्रवाह झाले. या प्रवाहांपैकी पहिला स्वर्गात केला, दुसरा भूतलावर राहिला आणि तिसरा पाताळात वहात गेला; म्हणून तिला ‘त्रिपथगा’ किंवा ‘त्रिपथगामिनी’ असे म्हणतात.’

३ ऊ. त्रिलोकांतील नावे

गंगेला स्वर्गात ‘मंदाकिनी’, पृथ्वीवर ‘भागीरथी’ आणि पाताळात ‘भोगावती’ म्हणतात.

३ ए. ‘गँजेस्’ – पाश्चात्त्यांनी दिलेले विकृत नाव

ग्रीक, इंग्रजी आदी युरोपीय भाषांमध्ये गंगेचा उच्चार ‘गँजेस्’ असा विकृतपणे केला जातो. इंग्रजाळलेले भारतीयही तिला याच नावाने उच्चारतात.

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत आहे. ‘गंगा’ हा शब्द अयोग्य पद्धतीने उच्चारणार्‍यांना गंगेच्या स्मरणाचा आध्यात्मिक लाभ कसा होणार ? म्हणूनच परकीय भाषेत बोलतांना आणि लिहितांना तिला ‘गंगा’ या नावानेच संबोधित करा !

टीप १ – हिंदु धर्मशास्त्रानुसार ब्रह्मांड हे भूलोकादी सप्तलोक आणि सप्तपाताळ अशा १४ भुवनांचे बनते. ब्रह्मांड लंबवर्तुळाकार असून त्याच्या बाहेर चारही दिशांनी अनुक्रमे सूक्ष्म-पृथ्वीय, सूक्ष्म-जलीय, सूक्ष्म-तेज, सूक्ष्म-वायू, सूक्ष्म-आकाश, अहंतत्त्व, महत्ततत्त्व आणि प्रकृती अशी ८ कवचे असतात. या कवचांतील ‘सूक्ष्म-जलीय कवच’ म्हणजे गंगा. म्हणूनच आयुर्वेदात गंगाजलाला ‘अंतरिक्षजल’ म्हटले आहे. (मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)’

Leave a Comment