भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

Article also available in :


 

१. पंढरपूरची वारी म्हणजे हिंदू कुटुंब आणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत !

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,
‘संतकृपा झाली इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया ।
उभारीले देवालया ।।
नामा तयाचा हा किंकर ।
तेणे केला हा विस्तार ।
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।।’
येथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ।’

याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे. पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांत एकोपा वाढण्यास हातभार लावला आहे. व्रतांचे हे सामाजिक महत्त्व झाले. प्राध्यापक न. र. फाटक म्हणतात, ‘महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी संघटना ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात होती, तिचे शैथिल्य, कर्त्या पुरुषांच्या अभावी संघटनेला आलेले दैन्य एकनाथांच्या शिकवणीने नाहीसे झाले. लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उल्हास संचारला अन् यालाच पुढे पन्नास वर्षांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांचे फळ येऊन त्याचा परिपाक महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला.’

 

२. वारकर्‍यांनी साधलेला मुक्त संवाद !

पालख्या पुणे मुक्कामी असतांना काही वारकर्‍यांशी संवाद साधला. पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवत होता. ‘वारी हे अमृत आहे. हिंदु धर्मात आणि संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात जन्म मिळणे, हे मोठे भाग्य आहे’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. रिमझिम पावसातही डोक्यावरील तुळशी वृंदावन सांभाळत ‘माऊली-माऊली’ असा जयघोष करत चालणार्‍या महिला वारकरी पाहिल्या की, आपल्यातील देह अहंकाराची जाणीव होते. ‘सहज संवाद साधणे आणि भरभरून बोलणे’, हे वारकर्‍यांचे अजून एक वैशिष्ट्य ! बहुतांश भक्तीमार्गी वारकरी हे इतरांशी सहज संवाद साधत त्यांच्याकडचे अनुभव ‘हातचे न राखता’ सांगतात. कशाचेही अवडंबर न माजवता विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने चालणारे वारकरी हे भागवत धर्माचेच भोई आहेत. धर्मग्रंथांची केवळ पारायणे करण्यापेक्षा ‘एक तरी ओवी अनुभवावी’, असे संतांनी सांगितले आहे. हा पालखी सोहळा म्हणजे संतांच्या ओव्यांची आणि त्यांच्या कृपेची अनुभूती देणारा चालता-फिरता हरिपाठच म्हणावे लागेल.

 

४. असे असते दिंडी व्यवस्थापन !

पूर्वी दिंड्यांमध्ये वारकरी अल्प संख्येने असायचे; पण आता दिंड्यांमध्ये वारकर्‍यांची संख्या काही शेकडोंच्या घरात आहे. पूर्वी गावांमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी तितक्या सोयीसुविधा नव्हत्या; पण आता त्या उपलब्ध होत आहेत. दिंडीसमवेत साधारण २ ट्रक, १ पाण्याचा टँकर, २ टेम्पो आणि २ कार अशी वाहने असतात. ट्रकमध्ये जेवणाची सर्व सामग्री आणि रहाण्यासाठी लागणारे कापडी तंबू, तसेच ताडपत्र्या अशी सर्व व्यवस्था असते. साधारणपणे २ लाख रुपयांचा किराणा आणि साहित्य लागते; पण विविध देणगीदार आणि भाविक यांच्या देणग्यांच्या माध्यमातून सोय होते. याचे नियोजन एक मास आधीपासूनच चालू होते. दिंडीतील महिला स्वयंपाक बनवतात. तोच प्रसाद आम्ही सर्वजण ग्रहण करतो. सकाळी पालख्या निघण्यापूर्वी दिंडीतील काही जण वाहनांसह पुढच्या विसाव्याला निघतात. सलग २२ दिवस हाच दिनक्रम असतो. हरिनामाच्या गजरात सगळे श्रम आणि कष्ट दूर होतात. माऊली काहीही न्यून पडू देत नाहीत, याचा अनुभव येतो. (वरील सूत्रे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीतील १८ क्रमांकाच्या दिंडीप्रमुखांनी सांगितली. अल्पअधिक प्रमाणात सर्व दिंड्यांचे असेच नियोजन असते.)

 

५. वारकर्‍यांच्या निरिच्छ वृत्तीचे दर्शन झाले !

‘या वर्षी पुणे महापालिकेने प्रत्येक दिंडीला एक पखवाज भेट दिला; पण राज्यसरकारचे रेनकोट मिळणार असल्याच्या बातम्या होत्या. ते मिळाले नाहीत; पण आम्हाला कोणती अपेक्षा नाही. आम्ही वैष्णव कोणाकडूनही काही घेत नाही’, या प्रतिक्रियेतून वारकर्‍यांची निरिच्छ वृत्ती दिसून येते.

– डॉ. ज्योती काळे, सौ. सायली ढमढेरे आणि कु. शलाका सहस्रबुद्धे, पुणे

 

६. पालखी सोहळ्याची आध्यात्मिकता न्यून करणार्‍या गोष्टी टाळा !

वारकर्‍यांनो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील धार्मिक विधी, नियमितची पूजा, मंत्रपठण, मंदिरातील परंपरा यांवर घाला घालणार्‍या मंदिर समितीवरच आता वार करण्याची आणि विठ्ठल मंदिराचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा या आषाढी एकादशीला करून विठ्ठलाची कृपा संपादन करा ! – श्री. श्रीकांत भट, अकोला.

वारीचा गाभा भक्तीमार्गाचा असला, तरी या पालखी सोहळ्यात आता हौशे-नवशे-गवशे यांचाही सुकाळ झाला आहे. मुक्कामाच्या ठिकाणी येणारे जत्रेचे स्वरूप सोहळ्याची आध्यात्मिकता अल्प करणारे आहे. पुण्यात पालख्या मुक्कामाला असतांना ज्या ठिकाणी जत्रा भरली होती, तेथील एका ठिकाणी तर चक्क मोठ्या आवाजात हिंदी चित्रपटांतील गाणी लावण्यात आली होती. या काही त्रुटी झाल्या, तर वारीच्या माध्यमातून ‘आनंदवनभुवनी’ असा अनुभव प्रत्येकालाच आल्यावाचून रहाणार नाही.

 

 

Leave a Comment