परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०१७ पासून चालू झालेला आणखी एक महामृत्यूयोग आणि त्यामागील शास्त्र

वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. यांपैकी एप्रिल २००९ मधील महामृत्यूयोग खडतर होता. एप्रिल २००९ या काळात मडगाव, गोवा येथील ‘अपोलो रुग्णालया’त ते भरती होते. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आशा सोडूनही संतांच्या आध्यात्मिक उपायांमुळे प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळला !

 

रुग्णावस्थेत आणि अत्यल्प प्राणशक्ती असतांनाही संगणकावर ग्रंथांचे संकलन करतांना प.पू. डॉक्टर (वर्ष २००९)
६.४.२००९ या दिवशी रुग्णालयातून ‘व्हीलचेअर’वरून बाहेर पडतांना प.पू. डॉक्टर

१. एक ज्योतिष फलित विशारद, एक हस्तसामुद्रिक आणि दोन
नाडीभविष्य सांगणारे यांनी एकाच काळात दिलेली धोक्याची चेतावणी

१ अ. ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी, सनातन आश्रम. रामनाथी, गोवा

‘२५.१०.२०१७ या दिवशी त्यांनी सांगितले, ‘‘२६.१०.२०१७ या दिवशी दुपारी ३.३० वाजता तुमची साडेसाती चालू होणार आहे. पहिले दीड वर्ष तुम्हाला अत्यंत प्रतिकूल काळ असल्यामुळे दुपारी ३.१५ ते ३.४५ या वेळेत ‘श्री शनिदेवाय नमः ।’, हा जप करा.’’ (‘त्याप्रमाणे जप केला.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

१ आ. हस्तसामुद्रिक श्री. के.टी. बालमणी, जिल्हा त्रिची (तिरुचिरापल्ली), तमिळनाडू

१.११.२०१७ या दिवशी सप्तर्षि जीवनाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा दूरभाष आला. तेव्हाच के.टी. बालमणी यांनीही दूरभाष करून विचारले, ‘‘गुरुजींची ((परात्पर गुरु) डॉ. आठवले यांची) प्रकृती कशी आहे ?’’ आणि त्यांनीही प्रकृती अत्यवस्थ होणार असल्याने काळजी घेण्यास सांगितले.

१ इ. १.११.२०१७ या एकाच दिवशी एकाच वेळी दोन नाडीवाचकांकडून आलेले निरोप

आमचा तमिळनाडूमधील सप्तर्षि जीवनाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्याशी गेले ४ मास आणि पंजाबमधील भृगु संहिता-वाचक पंडित लालदेवशास्त्री यांच्याशी गेली २ वर्षे संपर्क नाही. ते एकमेकांना ओळखत नाहीत. त्या दोघांनी एकाच वेळी स्वतःहून दूरभाष करून विचारले, ‘गुरुजींची प्रकृती कशी आहे ?’ आणि ते म्हणाले, ‘‘गुरुजींची स्थिती गंभीर होणार असल्याने त्यांची काळजी घ्या.’’

१ इ १. सप्तर्षि जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्

यांनी दूरभाष करून सांगितले, ‘शनीची साडेसाती चालू झाली आहे. ‘प्राण जातो कि काय’, अशी गुरुजींची प्रकृती होईल; पण काळजी करू नका.’

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मृत्यूयोगाबद्दल एका मोठ्या
संतांना कळवणे आणि त्यांनी त्यासाठी आधीच उपाय चालू केल्याचे सांगणे !

२६.१०.२०१७ पासून माझे अतिशय थकवा इत्यादी अनेक शारीरिक त्रास बरेच वाढले. संतांना ज्योतिषी आणि नाडीपट्टीवाचक यांनी सांगितलेले भविष्य सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ज्योतिषांनी आणि नाडीपट्टीत सांगितलेले बरोबर आहे. धोका आहेच. अतिशय यातनायुक्त गंभीर परिस्थिती आपल्या कुडीमधे झालेली आहे. याची पूर्ण कल्पना वेळोवेळी येते. त्यामुळे त्याची वाढ इत्यादी न होण्यासाठी शक्यतो आपणांस न सांगता प्रयत्न करीत असतो. (माझे कर्तव्यकर्म म्हणून) मी प्रतिदिन देवाकडे प्रार्थना करीत असतो की, प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली राहू दे; परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे सर्व होत नाही; कारण हे शेवटचे; पण लवकर न संपणारे पर्व आहे. त्यामुळे सहनशक्तीची वाढ करता ते योग्यच आहे. त्यासाठी कळवलेली साधना केली, तर लाभ होईल.’’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१७)

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मृत्यूचे वेध लागणे

या विविध त्रासांमुळे नाही, तर ‘कार्य पूर्णत्वाला जाणार’, याची खात्री झाल्यामुळे मलाही आता जायचे वेध लागायला आरंभ झाला आहे.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अन्य विषयांप्रमाणे
स्वतःच्या मृत्यूविषयी जिज्ञासा नसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

४ अ. एक संत

४ अ १. प.पू. डॉक्टरांची जिज्ञासा कमी कमीच होत जाणार; कारण आता त्यांचा तो टप्पा पूर्ण झाला आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले : यापूर्वी मला जिज्ञासा खूप असायची. ज्ञान मिळवणारे साधक आणि संत यांना सारखे प्रश्‍न विचारायचो अन् ते विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायचे; पण आता मृत्यू जसा जसा जवळ येत आहे, तशी जिज्ञासा कमी कमी होत चालली आहे. यामागचे कारण काय ?

योगतज्ञ दादाजी वैशंपायन : बरोबर आहे. शेवटी जिज्ञासा कमी कमीच होत जाणार. आता तुमचा कार्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.

४ आ. श्री. राम होनप

(परात्पर गुरु) डॉ. आठवले : माझा मृत्यूयोग जवळ आलेला असूनही इतर विषयांच्या संदर्भात असते, तशी स्वतःबद्दल ‘मृत्यूनंतर माझे काय होणार ?’, याची मला जिज्ञासा नाही. याचे कारण काय ? कोणाला वाटेल, ‘जिज्ञासा नाही’, असे का म्हणतात ? ‘जिज्ञासा का नाही’, याची जिज्ञासा तर आहे ना ?’ याचे उत्तर असे, ‘मला स्वतःसाठी जिज्ञासा नाही; पण पुढे अभ्यासकांना उत्तर कळावे, यासाठी आहे.

४ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अन्य विषयांच्या संदर्भातील जिज्ञासा कार्यानुरूप असणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही विषय जाणून घेण्याची आवश्यकता नाही. परात्पर गुरु डॉक्टरांना अन्य विषयांच्या संदर्भातील जिज्ञासा कार्यानुरूप असते. अशी जिज्ञासा ठेवल्याने समष्टीला उपयोगी पडणारे ज्ञान पृथ्वीवर येत असते. अशी जिज्ञासा ही निमित्तमात्र असते. काळानुरूप ईश्‍वरी संकेतानुसार जेव्हा विशिष्ट ज्ञान पृथ्वीवर येण्याची वेळ आलेली असते, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये जिज्ञासा निर्माण होऊन त्यातून त्यांना काही प्रश्‍न पडतात. त्याद्वारे समष्टीला आवश्यक ते ज्ञान उत्तरांच्या रूपात अन्य कुणाच्यातरी माध्यमातून प्रगट होत असते. (‘पार्वती शिवाला जसे मानवाला ज्ञान मिळावे; म्हणून प्रश्‍न विचारते, तसे परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रश्‍न विचारणे आहे.’ – संकलक)

४ आ २. आध्यात्मिक वाटचाल करतांना जिवाला टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार्‍या अवस्था

४ आ २ अ. जितेंद्रिय

आध्यात्मिक प्रगती झाली की, सर्व इंद्रिये जिवाच्या नियंत्रणात येतात. (त्यापूर्वी मनाचे सर्व इंद्रियांवर नियंत्रण नसते.) अशा जिवाला साधना करतांना मायेतील कुठल्याही विषयांची बाधा होत नाही. या अवस्थेला ‘जितेंद्रिय’, असे म्हणतात.

४ आ २ आ. स्वेच्छा मरण

आध्यात्मिक प्रगती आणखीन झाल्यावर जिवाचे मायेतील कार्य संपलेले असते. त्याचे बहुतांशी प्रारब्ध भोगून संपलेले असते. हा जीव निमित्तमात्रे पृथ्वीवर राहिलेला असतो. अशा जिवाच्या हातात देहत्याग करणे असते. या अवस्थेला ‘स्वेच्छा मरण’, असे म्हणतात.

४ आ २ इ. मृत्यूंजयी

उच्च आध्यात्मिक पातळीला जिवाने मृत्यूवर विजय मिळवलेला असतो. अशा जिवाला स्वतःचे आणि अन्य कुणाचेही आयुष्य वाढवता येते. अशा स्थितीला जिवाची ‘मृत्यूंजय अवस्था’, असे म्हणतात.

४ आ ३. परात्पर गुरु डॉक्टरांची मृत्यूसंबंधीची स्थिती

४ आ ३ अ. ईश्‍वरेच्छेने वागणे

परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या मृत्यूकडे ईश्‍वरेच्छेने पहातात. त्यामुळे त्यांना ‘मृत्यू कधी येणार ? त्यानंतर काय होणार ?’, यासंबंधीचे विचार मनात येत नाहीत; कारण त्यांनी सर्वकाही ईश्‍वरावर सोपवलेले आहे.

४ आ ३ आ. अमरत्व

जन्म आणि मृत्यू ही पृथ्वीशी संबंधित अवस्था असते. केवळ भगवंताला जन्म आणि मृत्यू नाही; कारण तो ‘अमर’ किंवा ‘अनंत’ आहे. जेव्हा साधना करून जीव परमेश्‍वराची एकरूप होतो, तेव्हा त्याच्यात परमेश्‍वरातील सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमानता हे गुण येतात, तेव्हा त्यात अमरत्वही येते. त्या वेळी जीवात्म्याची स्थिती ‘मला ना आदि ना अंत’, अशी होते. त्यामुळे अशा जिवाला मृत्यूसंबंधी काही विचार येत नाहीत. ही स्थिती अध्यात्मातील परात्पर अवस्थेला प्राप्त होते.

४ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांना स्वतःचा मृत्यूयोग जवळ आल्यासारखे वाटण्याचे कारण

परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष मृत्यूयोग काही काळाने आहे. आता मृत्यूयोग जवळ आला नसून ही मृत्यूची छाया आहे.

४ आ ४ अ. मृत्यूची छाया आणि प्रत्यक्ष मृत्यूयोग यांतील भेद

सध्या काळ प्रतिकूल आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांवर मृत्यू ओढवण्याइतपत संकट तीव्र आहे. ही मृत्यूची छाया मृत्यूइतकीच दाट आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष मृत्यूयोग दूर असला, तरी त्यांना तो जवळ आल्यासारखा जाणवतो.

४ आ ४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी देहत्याग करण्याच्या संदर्भातील सूत्र

जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांकडून समष्टी कार्याची पूर्ती होईल आणि त्यांना देहत्याग करण्याच्या संदर्भातील ईश्‍वरी प्रेरणा प्राप्त होईल, तेव्हा ते देहत्याग करतील.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०१७)

४ इ. श्री. निषाद देशमुख

४ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अन्य विषयांत अधिक जिज्ञासा, तर स्वतःच्या मृत्यूयोगाविषयी अल्प जिज्ञासा असण्याचे कारण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनाच्या विज्ञानी अवस्थेमुळे त्यांना असे जाणवते.

४ इ २. उन्मनी अवस्थेचे अधिक प्रमाण असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात इतर विषयांच्या संदर्भात अधिक जिज्ञासा निर्माण होणे

विज्ञानी अवस्थेत साक्षीत्व आणि उन्मनी यांचे समतोलत्व गाठले जाते. अन्य विषयांच्या संदर्भातील प्रश्‍न विचारतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनातील साक्षीत्व अवस्था न्यून होऊन उन्मनी अवस्थेत वाढ होते. यामुळे त्यांच्या मनात समष्टीसाठी पूरक अशा प्रश्‍नांचे उत्तर जाणून घेऊन समष्टीला लाभ करून देण्याची जिज्ञासा निर्माण होेते. मनाच्या उन्मनी अवस्थेत निर्माण झालेल्या जिज्ञासायुक्त प्रश्‍नांमुळे भूतलावर ईश्‍वरी ज्ञानाचे प्रकटीकरण सहजतेने होते.

४ इ ३. साक्षीत्व अवस्थेच्या प्रमाणात वाढ झाल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःच्या मृत्यूयोगाविषयी अधिक जिज्ञासा निर्माण न होणे

स्वतःच्या मृत्यूयोगाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनातील साक्षीभावात वाढ होऊन उन्मनी अवस्थेचे प्रमाण न्यून झाले आहे. ईश्‍वरेच्छेने स्वतःच्या मृत्यूयोगाविषयी साक्षीभावाची स्थिती अधिक कार्यरत असल्यामुळे इतर प्रश्‍नांविषयी जाणवते, तशी जिज्ञासा यासंदर्भात जाणवत नाही.

४ इ ४. विज्ञानी अवस्थेतील संतांच्या मनाच्या स्थितीत ईश्‍वरेच्छेने पालट होत असल्याने ईश्‍वराने परात्पर गुरु डॉक्टरांच्या मृत्यूयोगाविषयी त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण न करण्याची कारणे आणि त्यांचे प्रमाण

टीप : श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर गोपींनाही काही काळ दुःख झाले होेते. त्यानुसार साधकही सगुण क्रियेत अडकून आपल्या साधनेतील वेळ वाया घालवू नयेत; म्हणून ईश्‍वर सध्याच्या काळात त्या संदर्भातील विचार निर्माण करत नाही.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०१७, दुपारी १२.३३)

४ इ ५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर निर्गुण तत्त्वाचे झालेले परिणाम

४ इ ५ अ. व्यष्टी आणि समष्टी घटकांवर निर्गुण तत्त्वाचे होणारे परिणाम

४ इ ५ अ १. निर्गुण तत्त्वामुळे ‘(स)गुण’ अस्तित्व न्यून होणे

‘एखादा घटक किंवा जीव यांच्याशी झालेल्या निर्गुण तत्त्वाच्या दीर्घ संपर्कामुळे त्यात असलेल्या गुणांचे अस्तित्व न्यून होते, उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले वापरत असलेल्या ‘मग’ (स्नानासाठी वापरतात ते प्लास्टिकचे भांडे) मधील तेजतत्त्व न्यून झाल्याने तो पांढरा होणे.

४ इ ५ अ २. निर्गुण तत्त्वामुळे ‘(स)गुण’ अस्तित्वात वाढ होणे

व्यापक समष्टीशी, उदा. साधना करणार्‍या जिवांच्या निवासाचा परिसर किंवा कार्य यांच्याशी निर्गुण तत्त्वाच्या झालेल्या दीर्घ संपर्कामुळे त्यांच्यातील गुणांत अधिक प्रमाणात वृद्धी होते, उदा. रामनाथी आश्रमातील लाद्यांना उच्च क्षमतेचे पॉलीश न करताही त्यांच्याकडून प्रकाशाचे परावर्तन केले जाणे.

४ इ ५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यष्टी आणि समष्टी अस्तित्वावर निर्गुण तत्त्वाचे झालेले परिणाम

४ इ ५ आ १. निर्गुण तत्त्वात झालेल्या वृद्धीचा परिणाम परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यष्टी आणि समष्टी अस्तित्वावर होणे

वर्तमानकाळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात असलेल्या निर्गुण तत्त्वाच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी अस्तित्वावर त्याचे सम प्रमाणात परिणाम झाले आहेत. सर्वसाधारणतः निर्गुण तत्त्वाचा एकाच प्रकारचा परिणाम होत असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य ईश्‍वरेच्छेने होत असल्याने त्यांच्यावर निर्गुण तत्त्वामुळे होणारे दोन्ही प्रकारचे परिणाम होऊन त्यांचे समतोलत्व निर्माण झाले आहे.

४ इ ५ आ २. निर्गुण तत्त्वामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यष्टी अस्तित्व न्यून झाल्याने त्यांना स्वतःच्या मृत्यूयोगाविषयी जिज्ञासा निर्माण न होणे

निर्गुण तत्त्वाच्या व्यष्टीवर होणार्‍या परिणामांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यष्टी अस्तित्व न्यून होत आहे. परिणामस्वरूप त्यांना ‘स्व’ संदर्भात जाणवणार्‍या संवेदना न्यून झाल्या आहेत, उदा. इतर विषयांच्या संदर्भात जाणवणारी जिज्ञासा स्वतःच्या मृत्यूयोगाच्या संदर्भात न जाणवणे.

४ इ ५ आ ३. निर्गुण तत्त्वामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी अस्तित्व अधिक कार्यरत झाल्याने त्यांच्याकडून ‘अभ्यासकांना उपयोगी पडावे’, असे प्रश्‍न विचारले जाणे

निर्गुण तत्त्वाच्या समष्टीवर होणार्‍या परिणामांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून होणार्‍या समष्टी कार्यात वृद्धी झाली आहे, उदा. त्यांनी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना जिज्ञासेमुळे प्रश्‍न न विचारता ‘अभ्यासकांना उपयोगी पडावे’, या उद्देशाने प्रश्‍न विचारणे.’

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०१७, दुपारी ३.३६)

४ ई. कु. मधुरा भोसले

४ ई १. व्यक्तीच्या मनात येणार्‍या मृत्यूसंबंधीच्या विचारांमागील शास्त्र

४ ई १ अ. व्यक्तीतील त्रिगुण आणि मृत्यूसंबंधीचे विचार

‘व्यक्तीत त्रिगुणांपैकी कोणता गुण प्रबळ आहे, त्यानुसार त्याच्या मनात मृत्यूसंबंधीचे विचार येत असतात.

४ ई १ अ १. तमोगुण प्रबळ असणार्‍या व्यक्तीला मृत्यूविषयी भय असणे

व्यक्तीतील तमोगुणामुळे तिला तिच्या देहाची आसक्ती अधिक प्रमाणात वाटत असते. व्यक्तीला देहाची आसक्ती जेवढी अधिक असते, तेवढे तिचे मन तिच्या देहाला सोडून जाण्यास तत्पर नसते. त्यामुळे तमोगुणी मनुष्याला मृत्यूविषयी भय अधिक वाटत असते.

४ ई १ अ २. रजोेगुण प्रबळ असणार्‍या व्यक्तीत मृत्यूविषयी जिज्ञासा असणे

व्यक्तीतील रजोगुणामुळे त्याच्या मनात मृत्यूविषयीची जिज्ञासा जागृत होऊन त्याच्यामध्ये ‘मृत्यूनंतरचे जीवन’ अनुभवण्याची इच्छा निर्माण होते.

४ ई १ अ ३. सत्त्वगुण प्रबळ असणार्‍या व्यक्तीत मृत्यूविषयी निश्‍चिंतता असणे

व्यक्तीतील सत्त्वगुणामुळे ‘मी देह नसून आत्मा आहे’, याची तिला अनुभूती आलेली असते. त्यामुळे तिला तिच्या देहाविषयी विशेष आसक्ती वाटत नाही. आत्मा चिरंतन असल्यामुळे देहाचा मृत्यू झाला, तरी ‘आत्मा शाश्‍वत आहे’, याची अनुभूती आल्यामुळे तिला मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी स्वारस्य वाटत नाही.

४ ई १ अ ४. त्रिगुणातीत अवस्था

त्रिगुणातीत अवस्थेला गेलेल्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यू यांविषयी काहीच वाटत नसते. त्रिगुणातीत अवस्थेत तो स्वत:च्या, तसेच इतरांच्या संदर्भात घडणार्‍या घटनांकडे साक्षीभावाने पहात असतो. साक्षीभाव हाच त्याचा स्थायीभाव झालेला असतो. त्याच्यामध्ये निर्गुण तत्त्व कार्यरत झालेले असते. त्यामुळे सगुण देहाच्या धारणेशी संबंधित असणार्‍या जन्म आणि मृत्यू या घटनांचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. तो संपूर्ण जीवन ईश्‍वरेच्छेने व्यतीत करत असतो.

४ ई १ आ. व्यक्तीची दशा आणि मृत्यूसंबंधीचे विचार

४ ई १ आ १. जीवदशा

जीवदशेत जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था कार्यरत असल्यामुळे व्यक्तीला तिच्या स्थूल देहाविषयी मोह अधिक प्रमाणात वाटत असतो. त्यामुळे तिच्या मनाची मृत्यूला सामोरे जाण्याची सिद्धता नसते. जीवदशेतील व्यक्तीचा लिंगदेह पुष्कळ जड असतो.

४ ई १ आ २. जीवात्मा दशा

जीवात्मा दशेत व्यक्तीची जागृती आणि स्वप्न यांसह सुषुप्ती अवस्था कार्यरत असल्यामुळे व्यक्तीला तिच्या सूक्ष्म देहांविषयी जाणीव अधिक असते. तिच्या मनात मृत्यूविषयी कुतूहल असते. जीवात्मा दशेतील व्यक्तीचा लिंगदेह थोडा विरळ आणि हलका असतो.

४ ई १ आ ३. शिवदशा

शिवदशेत व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च असणारी तुर्या अवस्था अनुभवत असते. तिला आत्म्याचा साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे तिच्या मनात मृत्यूविषयी भय किंवा जिज्ञासा जागृत नसते. ती ईश्‍वरेच्छेने प्राप्त होणारा जन्म किंवा मृत्यू आनंदाने स्वीकारत असते. शिवदशेतील व्यक्तीचा लिंगदेह पुष्कळ हलका आणि तेजस्वी असतो.

४ ई १ आ ४. शिवात्मा दशा

शिवात्मा दशा अनुभवणार्‍या उन्नतांना ते परमेश्‍वरस्वरूप असल्याची अनुभूती सातत्याने येत असते. ते आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ असणार्‍या तुर्यातीत अवस्थेत वावरत असतात. ते स्वत:च्या देहाकडे परमेश्‍वराची लीला म्हणून त्रयस्थपणे आणि साक्षीभावाने पहात असतात. त्यामुळे त्यांना जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना सारख्याच वाटतात अन् त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारच्या भावभावना मनात शेष नसतात. अशा व्यक्ती जीवनमुक्त असून त्यांच्यामध्ये आणि भगवंतात अद्वैत निर्माण झाल्यामुळे त्यांची इच्छा अन् भगवंताची इच्छा एकच असते. त्यामुळे त्यांचा जन्म किंवा मृत्यू त्यांच्या इच्छेने होत असतो. त्यांचा लिंगदेह विरळ आणि वायूस्वरूप असतो.

४ ई १ इ. पातळी आणि मृत्यूसंबंधीचे विचार

४ ई १ इ १. पातळी ५० टक्क्यांपेक्षा न्यून असणे

या पातळीपेक्षा न्यून पातळी असणार्‍या व्यक्तींच्या बुद्धीवर मायेचा पगडा अधिक असतो. त्यामुळे त्या अज्ञानात भटकत असतात. अज्ञानाच्या प्रभावामुळे त्यांच्या मनात चिरकाल जिवंत रहाण्याची इच्छा प्रबळ असते आणि ते स्वत:चा मृत्यू टाळण्यासाठी तत्पर असतात.

४ ई १ इ २. पातळी ५० ते ७० टक्क्यांच्या दरम्यान असणे

या पातळीला मनुष्यामध्ये विवेक जागृत होऊ लागतो. ‘त्याचे अस्तित्व त्याच्या देहाहून भिन्न आहे’, याची त्याला जाणीव होते. त्यामुळे त्याच्यात मृत्यूला सामोरे जाण्याची सिद्धता निर्माण होऊ लागते. तो साधनेच्या प्रयत्नांद्वारे मृत्यू स्वीकारून त्याला सुखाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो.

४ ई १ इ ३. पातळी ७० टक्क्यांपेक्षा अधिक असणे

७० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्‍या व्यक्तींवर मायेचा विशेष प्रभाव पडत नाही आणि त्यांच्या अंत:करणात ज्ञानदीप अखंड तेवत असतो. ते देहातीत म्हणजे विदेही अवस्थेला पोहोचल्यामुळे त्यांच्या मनात मृत्यूविषयी भय नसते; परंतु थोडीफार जिज्ञासा असते.

४ ई १ इ ४. पातळी ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणे

८० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्‍या व्यक्तींवर मायेचा कोणताच प्रभाव पडत नाही. अशा व्यक्ती जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेल्या असतात. त्या सच्चिदानंद अवस्था अनुभवत असल्यामुळे त्यांच्या मनात मृत्यूविषयी भय तर नसतेच; परंतु जिज्ञासाही नसते. ते साक्षीभावाने स्वत:चा जन्म आणि मृत्यू या घटना पाहू शकतात.

४ ई १ इ ५. पातळी ९५ टक्क्यांहून अधिक – शिवात्मा दशा

परात्पर गुरु डॉ. आठवले हे त्रिगुणातीत अवस्थेला पोचलेले आहेत. ते अखंड शिवात्मा दशेत असतात. त्यांची पातळी ९५ टक्क्यांहून अधिक आहे. ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन उच्च मोक्षपदाला पोहोचलेे आहेत. ते मोक्षाची अवस्था अखंड अनुभवत असल्यामुळे त्यांना त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात जिज्ञासा जाणवत नाही.’

– कु. मधुरा भोसले, (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१७, रात्री १०.४०)

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात
‘काहीच, अगदी शरीरही माझे नाही’, असा विचार येणे !

‘मी खोलीत वावरतांनाही ‘दुसर्‍यांच्या घरात किंवा हॉटेलमधील खोलीत रहात आहे’, असे वाटते. ‘ती माझी खोली आहे’, असे वाटत नाही. असाच विचार कपडे, चप्पल इत्यादी सर्वांच्याच संदर्भात येतो. एवढेच नव्हे, तर शरीरही माझे नाही’, असा विचार येतो. या विचारांमुळे ‘इदं न मम ।’, म्हणजे ‘हे माझे नाही’, हे संस्कृत वचन जे पूर्वी बुद्धीने समजून घ्यायचा प्रयत्न करायचो, त्याची सार्थता आता अनुभवतो आहे. यामुळे ‘मायेतून टप्प्याटप्प्याने कसे मुक्त होता येते’, हेही अनुभवता येत आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०१७)

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘मायेतून
टप्प्याटप्प्याने कसे मुक्त होता येते’, यासंबंधी आलेल्या अनुभूतींचे विश्‍लेषण !

५ अ १. युगांनुरूप अहंचे स्वरूप

५ अ १ अ. सत्ययुगातील जिवांच्या शुद्ध अहंचे स्वरूप !

‘भगवंताने मनुष्याला पृथ्वीवर पाठवले, तेव्हा त्याच्यात शुद्ध अहं होता. शुद्ध अहं, म्हणजे ‘मी पृथ्वीवर निमित्तमात्र असून सर्वकाही करणारा भगवंत आहे’, याची सातत्याने जाणीव असणे होय. ही अवस्था सत्ययुगातील बहुतेक जिवांमध्ये होती.

५ अ १ आ. मायेमुळे त्रेता, द्वापर आणि कलि या युगांत शुद्ध अहंचा विसर पडणे

त्यानंतर त्रेता, द्वापर आणि कलि या युगांमध्ये काळानुरूप मायेचे कार्य वाढले. त्यामुळे मनुष्याचे चांगले कर्म न्यून होऊन त्याच्या वाईट कर्मांमध्ये वाढ झाली. त्यामुळे मनुष्य शुद्ध अहंकडून सात्त्विक अहंकडे, सात्त्विक अहंकडून राजसिक अहंकडे आणि राजसिक अहंकडून तामसिक अहंकडे वाटचाल करू लागला. या अहंमुळे तो भगवंतापासून अधिकाधिक दूर होऊ लागला.

५ अ २. अहंचे प्रकार

५ अ २ अ. सात्त्विक अहं : सात्त्विक अहं साधनेच्या संदर्भातील असतो, उदा. स्वतःकडून झालेला तन, मन आणि धन यांचा त्याग.

५ अ २ आ. राजसिक अहं : स्वतःतील क्षमतेचा अथवा शक्तीचा अहं.

५ अ २ इ. तामसिक अहं : वाईट कामे कौशल्याने करत असल्याचा अहं.

५ अ २ ई. त्रिगुणातीत अहं : याचा अर्थ आहे, ‘शुद्ध अहं नष्ट होणेे !’

५ अ ३. अहं-निर्मूलन होण्यासंबंधी साधनेचे महत्त्व

साधना करतांना साधकातील रज-तम न्यून होऊन तो हळूहळू सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणामुळे त्याला ‘सतत साधना करावी आणि देवाच्या स्मरणात रहावे’, असे वाटते. अध्यात्मात प्रगती होऊ लागली की, साधकाचा साधनेच्या संदर्भातील सात्त्विक अहं न्यून होऊ लागतो.

५ अ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधनेचा प्रवास

५ अ ४ अ. साधनेच्या प्रारंभी सात्त्विक अहं असणे

परात्पर गुरु डॉक्टरांची आध्यात्मिक पातळी साधनेच्या प्रारंभी मुळातच चांगली होती आणि स्वभावदोषांचे प्रमाणही अत्यल्प होते; परंतु त्यांच्यात सात्त्विक अहं होता.

५ अ ४ आ. गुरुसेवेने सात्त्विक अहं दूर होणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुसेवेद्वारे साधना केली. गुरुकृपेने त्यांच्यातील सात्त्विक अहं अल्प कालावधीतच नष्ट झाला.

५ अ ४ इ. शुद्ध अहं नष्ट होणेे

त्रिगुणात्मक, म्हणजे सत्त्व, रज आणि तम यांच्याशी संबंधित अहं नष्ट होऊ लागतो, तेव्हा जिवाला आनंद अन् शांती प्राप्त होऊ लागते. ही अवस्था अनुभवत असतांना जिवात अल्प प्रमाणात अहं शेष असतो. या अहंला ‘त्रिगुणातीत अहं’, असे म्हणतात. गेल्या १० वर्षांच्या साधनेने परात्पर गुरु डॉक्टरांचा हाही अहं नष्ट झालेला आहे. त्रिगुणातीत अहं हा अतिशय सूक्ष्म असतो. तो नष्ट होण्यासाठी खडतर साधनेची आवश्यकता असते. उच्च आध्यात्मिक पातळीला ही खडतर साधना आपोआप, आंतरिक आणि अहोरात्र चालू असते.

या स्थितीला जिवाला भगवंतापासून वेगळे असल्याची जाणीव नसते. कर्तेपणाचा अंशही गळून गेलेला असतो. तेव्हा जिवाला मी पृथ्वीवर निमित्तमात्र असल्याची जाणीव होऊन ‘कुठलीही गोष्ट माझी नाही आणि देहही माझा नाही’, असे जाणवू लागते. ही अवस्था साधनेची परात्पर स्थिती दर्शवते, तसेच पृथ्वीशी बांधिलकी संपली असल्याचे हे लक्षण आहे.

५ अ ५. परात्पर गुरु डॉक्टरांची वरील अनुभूती ही त्यांची समष्टी आध्यात्मिक पातळी ९८ टक्के असल्याचे दर्शवते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०१७)

Leave a Comment