दानशूर आणि क्षात्रतेजसंपन्न हिंदु प्रशासक : पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर

पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

महेश्‍वर (जिल्हा खरगोन) येथील अहल्याबाई होळकर यांचे स्मारक

मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांची सून अहल्याबाई होळकर यांच्या हाती इंदूरच्या राज्यकारभाराची सूत्रे आली. अहल्याबाईंनी सुमारे २८ वर्षे राज्याचा कारभार समर्थपणे करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली. त्या प्रजाहितदक्ष आणि न्यायी होत्या. त्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. त्यांनी अनेक जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केला. प्रजेच्या सुखसुविधांसाठी त्यांनी नदीकिनारी अनेक घाट बांधले, तसेच अनेक धर्मशाळाही बांधल्या. त्या शिवाच्या भक्त होत्या आणि नियमितपणे शिवाची उपासना करीत.

एकदा राघोबा पेशवे यांनी इंदूरवर स्वारी करून होळकरांचे राज्य बळकावण्याचा मनसुबा आखला. ती बातमी अहल्याबाईंना कळताच त्यांनी राघोबादादांना पत्र लिहून सणसणीत उत्तर दिले, माझ्याशी लढतांना तुम्ही जिंकलात, तर स्त्रीशी लढून कोणता पुरुषार्थ दाखवणार आहात ? जर तुम्ही या युद्धात हरलात, तर स्त्रीकडून पराजित झाल्यामुळे तुम्हाला जगाला तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे युद्ध करण्यापूर्वी विचार करा. हे पत्र वाचून राघोबांनी युद्ध करण्याचे टाळले. कणखर मनाच्या आणि लढवय्या वृत्तीच्या अहल्याबाई सर्वांसाठीच आदर्श ठरल्या. अतिशय दानशूर म्हणून नावलौकिक असलेल्या अहल्याबाईंचे वर्ष १७९५ मध्ये निधन झाले.

मध्यप्रदेश राज्यातील महेश्‍वर (जिल्हा खरगोन) हे गाव होळकर साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. येथेच पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांचा वाडा होता. या ठिकाणाहूनच त्यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या ठिकाणची काही छायाचित्रे…

राजवाड्याचे प्रवेशद्वार
अहल्याबाई होळकर यांनी येथे राहून २८ वर्षे समर्थपणे राज्यकारभार सांभाळला तो राजवाडा !
अहल्याबाई होळकर यांनी त्यांच्या नित्य पूजेसाठी बांधलेले शिवाचे मंदिर ! यालाच अहिल्येश्‍वर महादेवाचे मंदिर असे म्हणतात, तसेच या छायाचित्रात नर्मदा नदीकिनारी अहल्याबाई होळकर यांनी भाविकांच्या सोयीसाठी बांधलेले घाटही दिसत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment