गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश (2024)

Article also available in :

१. हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ! – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य ! अध्यात्मातील अनेक अधिकारी संत हे कार्य करत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.

त्याग ही हिंदु धर्माची शिकवण आहे. तन-मन-धन यांचा आणि पुढे सर्वस्वाचा त्याग केल्याविना आध्यात्मिक उन्नती होत नाही. तनाचा त्याग करणे म्हणजे शरिराने राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणे, मनाचा त्याग म्हणजे नामस्मरण करणे किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचे चिंतन करणे आणि धनाच्या त्याग म्हणजे या कार्यार्थ स्वतःकडील धन अर्पण करणे. हा त्याग टप्प्याटप्प्याने केल्यानंतर एक दिवस सर्वस्वाचा त्याग करण्याची मनाची सिद्धता होते. आजच्या काळात सर्वस्वाचा त्याग म्हणजे स्वतःचे संपूर्ण जीवन हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी समर्पित करणे होय. धर्मनिष्ठ हिंदू, साधक आणि शिष्य यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी स्वक्षमतेनुसार त्याग करण्याची बुद्धी व्हावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्‍थापक, सनातन संस्‍था

२. श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ

‘श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना साधक आणि शिष्य यांचे ध्येय आध्यात्मिक उन्नती हे असते. गुरूंवरील निष्ठा म्हणजे शिष्याची विकल्परहित अवस्था, गुरूंवरील श्रद्धा म्हणजे ‘गुरूंमुळे माझे परमकल्याण होणारच आहे’, असे दृढतेने वाटणे आणि गुरूंवरील भक्ती म्हणजे गुरूंना जे आवडते, ते भक्तीभावाने करणे. गुरूंना व्यापक धर्मकार्य आवडते. ते तळमळीने करणे, ही खरी ‘गुरुभक्ती’ होय. हे कार्य करतांना कुठलाही विकल्प न बाळगणे, ही खरी ‘गुरुनिष्ठा’ होय आणि ‘हे व्यापक धर्मकार्य परिपूर्ण आणि पुढाकार घेऊन केल्याने माझी आध्यात्मिक उन्नती होणारच आहे’, असा भाव असणे, हीच खरी ‘गुरूंवरील श्रद्धा’ होय; म्हणूनच आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी या गुरुपौर्णिमेपासून श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्‍था

३. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

अखिल मानवजातीचे कल्याण करणारा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा काळ समीप आहे; मात्र ‘आपणांस तो सहजपणे अनुभवायला मिळेल’, असे नाही. त्यासाठी ईश्वरावरील दृढ भक्ती, सत्साठी त्यागाची सिद्धता, मनाची सर्वांगीण सिद्धता अशा सद्गुणांची शिदोरी आपल्यासोबत असली पाहिजे. ती साठवण्यासाठी गुरुपौर्णिमेसारखी अद्वितीय संधी नाही !

गुरुपौर्णिमेनिमित्त एक सहस्र पटींनी कार्यरत गुरुतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी तन, मन आणि धन यांपैकी ज्या जमेल, त्या मार्गाने या उत्सवात, तसेच त्यातील सेवेत सहभागी व्हा ! गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’ अशी प्रार्थना तळमळीने करा ! हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या !

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्‍मिक उत्तराधिकारी, सनातन संस्‍था

Leave a Comment