सनातनच्या साधकांसारखी प्रसन्नता तात्काळ आत्मसात् करायला हवी ! – सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर

सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

पनवेल – देवाच्या घरी आल्यावर देव जसा सन्मान करेल, तसा इथे झाला. सगळीकडे साधक असतात; परंतु सनातनच्या आश्रमात देवासारखी माणसे गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) निर्माण केली आहेत. व्यष्टी साधनाही नीट न करणार्‍यांसाठी समष्टी साधना करणार्‍यांनी अतिथी म्हणून सर्व काही करावे, ही पुष्कळ विशेष गोष्ट आहे. जशी लवंगी मिरची तिचा गुणधर्म तात्काळ दर्शवते, तसेच सनातनच्या साधकांची प्रसन्नता आपण तात्काळ आत्मसात् करायला हवी, असे मार्गदर्शन पुणे येथील सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांनी त्यांच्या साधकांना केले. सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला २७ नोव्हेंबर या दिवशी भेट दिली, त्या वेळी त्यांच्या सन्मानानंतर केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या.

सरस्वतीदेवी पुढे म्हणाल्या, ‘‘पूर्णवेळ साधकांनी आपले सर्व आदरातिथ्य केले, हे विलक्षण आहे. खर्‍या घरात खरा सन्मान झाला आहे. सनातनच्या साधकांनी आपल्याला ‘साधक’ म्हटले, तसे आपण झाले पाहिजे. सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आपल्याला स्वभावदोष-निर्मूलनाविषयी मार्गदर्शन केले आहे, त्याप्रमाणे आपल्यात पालट करण्याचा आतापासूनच प्रयत्न करायला हवा. हे मार्गदर्शन आपल्याला मिळाले, ही पुष्कळ मोठी गुरुकृपा आहे.’’

सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांना सनातनचे साधक श्री. अतुल गोडसे यांनी आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी अवगत केले. त्यांनी अतिशय आत्मियतेने आश्रमातील सर्व सेवाकार्य समजून घेतले. सनातनच्या साधिका सौ. रूपाली वर्तक यांनी त्यांचा पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांच्यासमवेत त्यांच्या संप्रदायानुसार साधना करणारे साधकगणही या वेळी उपस्थित होते.

Leave a Comment