शांती करणे

 

उतारवयात इंद्रिये अकार्यक्षम होऊ लागतात. कानाने अल्प ऐकू येणे, डोळ्यांनी अल्प दिसणे, विविध रोग निर्माण होणे, असे त्रास चालू होतात. देवतांच्या कृपेने या व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावे, यांसाठी ५० व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत प्रत्येक ५ वर्षांनी व्यक्तीसाठी शांतीविधी करावा, असे शास्त्र आहे. या शांतीविधींच्या विषयी माहिती मिळवूया.

 

शांती करण्याचा दिवस कोणता असावा ?

प्रत्येक शांती ते वर्ष लागलेल्या दिवशी करावी. तो दिवस शुभ नसल्यास जन्मनक्षत्रादिवशी किंवा त्यानंतर येणार्‍या कोणत्याही शुभ दिवशी करावी.

 

शांतीचा प्रकार

कितव्या वर्षी करतात ?

प्रमुख देवता

हवनीय द्रव्य

१. वैष्णवी शांती ५० श्रीविष्णु समिधा, आज्य, चरु आणि पायस (टीप १)
२. वारुणी शांती ५५ वरुण समिधा, आज्य, चरु आणि पायस
३. उग्ररथ शांती ६० मार्कंडेय समिधा, आज्य, चरु, दूर्वा आणि पायस
४. मृत्युंजय महारथी शांती ६५ मृत्युंजयमहारथ समिधा, आज्य, चरु आणि पायस
५. भैमरथी शांती ७० भीमरथमृत्युंजयरुद्र घृताक्त तीळ (टीप २)
६. ऐंद्री शांती ७५ इंद्रकौशिक समिधा, आज्य, चरु आणि पायस
७. सहस्त्रचंद्रदर्शन शांती ८० चंद्र आज्य
८. रौद्री शांती ८५ रुद्र समिधा, आज्य, चरु आणि पायस
९. सौरी शांती ९० कालस्वरूपसूर्य समिधा, आज्य, चरु आणि पायस
१०. त्रैयंबक मृत्युंजय शांती ९५ मृत्युंजयरुद्र समिधा, आज्य, चरु आणि पायस
११. महामृत्युंजय शांती १०० महामृत्युंजय समिधा, आज्य, चरु आणि पायस

 

टीप १ : आज्य म्हणजे तूप, चरु म्हणजे शिजवलेला भात आणि पायस म्हणजे पाणी न वापरता केवळ दुधात शिजवलेला भात (मूळस्थानी)

 

टीप २ : तुपात भिजवलेले तीळ (मूळस्थानी)

 

 

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीचे महत्त्व

पूजेच्या ठिकाणी सात सुपार्‍यांवर सप्तर्षींचे आवाहन करण्यात आले. त्यांतील एक सुपारी जागृत होऊन तिच्यातून मोठ्या प्रमाणात पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत होता. त्या ठिकाणी मला सूक्ष्मातून महर्षी व्यासांचे दर्शन झाले. मी त्यांना ‘ईश्वराकडून ज्ञान मिळवण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत आणि देवाकडून ज्ञान घेतांना भाव कसा हवा, ते तुम्ही मला शिकवा’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर ते हसले आणि त्यांनी डोळे मिटून मला सहस्रचंद्रदर्शन विधीचे ज्ञान (माहिती) दिले.’ – कु. मधुरा भोसले, सनातन संस्था

 

शिवाच्या तारक रूपाकडून चंद्राप्रमाणे चैतन्य अन् आनंद प्राप्त करून
आयुष्यात शिवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सहस्र चंद्रांची शीतलता अन् चैतन्य
देण्याची क्षमता असलेल्या सूक्ष्मातील चंद्रदेवतेचे दर्शन घेण्यासाठी सहस्रचंद्रदर्शन विधी करण्यात येणे

शिव समाधिस्त राहून बहुतेक वेळ अप्रकट असतो. शिवाचे तारक रूप क्वचित प्रकट असते. शिवाच्या तारक रूपाकडून चंद्राप्रमाणे चैतन्य अन् आनंद प्राप्त करून आयुष्यात शिवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सहस्रचंद्रदर्शन विधी करण्यात येतो. शिवाचा आशीर्वाद मिळाल्यामुळे व्यक्तीला होणार्‍या ऐहिक अन् पारमार्थिक पीडा आणि क्लेश दूर होऊन तिचे आयुष्य वाढते. या विधीत केवळ एका चंद्राचे (सोमाचे) दर्शन घ्यावयाचे नसून सहस्र चंद्रांची शीतलता आणि चैतन्य देण्याची क्षमता असलेल्या सूक्ष्मातील चंद्रदेवतेचे दर्शन घेण्यासाठीही हा विधी केला जातो. या विधीतून मिळणार्‍या चैतन्यामुळे व्यक्तीच्या लिंगदेहाला केवळ या जन्मीच नव्हे, तर पुढच्या जन्मीही त्या चैतन्याचा लाभ होतो.

 

शिव आणि शशी (चंद्र) यांच्याकडून प्राप्त झालेल्या चैतन्यामुळे व्यक्तीला होणारे आध्यात्मिक त्रास न्यून होऊ लागतात.

 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या लिंगदेहाभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होणे

चैतन्याचे स्वरूप चंदेरी पाण्याप्रमाणे आहे. त्याला जडत्व नसल्यामुळे ते हलके आहे. त्यामुळे लिंगदेह ते ग्रहण करू शकतो. मृत्यूनंतर हे चैतन्य लिंगदेहासह जाते आणि या चैतन्याच्या शीतलतेचा सूक्ष्म-वायूशी संबंध आल्यावर त्या चैतन्यातील पाण्याचे घनीकरण होऊन त्याचे रूपांतर चैतन्यमय संरक्षक-कवचात होते. यालाच ‘चैतन्याचे रूपांतर तारक रूपातून मारक रूपात होणे’, असे म्हणतात.

 

विधीतील मंत्रांमुळे होणारे लाभ

अ. विधीतील मंत्रांमध्ये साधना आणि जीवनाचा उद्देश सांगितला आहे. त्यामुळे लिंगदेहावर चैतन्याच्या जोडीला साधना करण्याचाही संस्कार होतो.

 

आ. या ज्ञानाचे स्मरण मृत्यूपर्यंत आणि मृत्यूसमयी झाल्यामुळे जिवाचा अहं न्यून होण्यास साहाय्य होते.

 

इ. जिवाच्या मनात सत्‌चे विचार आणि जिवाची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते.

 

ई. त्यामुळे पुढचा जन्म घेतांना जिवामध्ये वाईट शक्तींचा प्रतिकार करण्याची उपजतच क्षमता निर्माण होते.

 

उ. अशा जिवाला गर्भात धारण करणार्‍या मातेलाही प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीच्या वेळी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक स्तरांवर त्रास होण्याचे प्रमाण अल्प असते. गर्भातील जिवाच्या सूक्ष्म-देहांवर चैतन्य आणि साधना यांचे संस्कार झाल्यामुळे मातेला गर्भातील जिवाचा सत्संग लाभतो अन् आनंद आणि चैतन्य यांची अनुभूतीयेते.

 

‘वर्तमान जन्मी उतारवयात केलेल्या शांतीचा लाभ जिवाला पुढील जन्मी स्वतःला मायेच्या पाशातून बाहेर काढून लवकरात लवकर साधनेकडे वळवण्यास होतो.’ – महर्षी व्यास (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दु. १२)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’

Leave a Comment