हिंदु धर्मामध्येच स्त्री-पुरुषांना समान मान !

जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. याउलट अन्य धर्मांत स्त्रियांचा विचारही करण्यात आला नाही. मानवासह सर्व सृष्टीच्या निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष यांच्या बीजाचा संयोग होणे अपरिहार्य असल्याचे वैज्ञानिक सत्य हिंदु धर्मानेच मान्य करून दोघांना समान दर्जा दिला आहे.

ऋषि आणि त्यांची पत्नी

 

१. हिंदु धर्माने स्त्रीला दिलेले मानाचे स्थान !

भारतीय तत्त्वज्ञानानुसार जीवनाला समृद्धी आणि संपन्नता देणारी श्री लक्ष्मी, ज्ञान प्रदान करणारी श्री सरस्वती आणि शक्ती प्रदान करणारी श्री महादुर्गा अन् श्री महाकाली या मूलभूत तिपाईवर मानवी जीवनाची सफलता आधारित आहे.

१ अ. हिंदु धर्माने स्त्रीला अनेकदा पुरुषापेक्षाही काकणभर सरसच समजले आहे. ख्रिस्त्यांच्या विवाह विधीत पत्नी पतीला त्याची आज्ञा पाळण्याचे आश्वासन देते; पण भारतीय विवाह संस्कारात वर वधूस ते एकमेकांचे मित्र झाल्याचे सांगतो. आमच्या देशात विवाह हा एक संस्कार आहे, तो केव्हाही सोडता येत नाही. पाश्चात्त्यांत विवाह हा एक स्त्री-पुरुषांमधील करार आहे, तो केव्हाही मोडता येतो. शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे की, पुरुष पत्नीमुळेच पूर्ण होतो.

 

२. सर्व वंदनीय गोष्टींना मातृ रूपात पहाणारे भारतीय  !

आईच्या ॠणाप्रमाणेच गाय, नदी, भूमी, भाषा, गुरु, ग्रंथ यांचेही ॠण फेडणे अशक्यप्राय आहे. गोमाता, लोकमाता, मातृभूमी, मातृभाषा, गुरुमाऊली, गीतामाऊली असे त्या घटकांचे नामाभिधान करून त्यांना मातृस्थानी मंडित केले. इतकेच काय; पण ज्या देवता आणि संत यांनी आमच्यावर मातृवत प्रेम केले त्यांनाही विठाई, तुकाई, ज्ञानेश्वर माऊली असे संबोधू लागलो. मनु म्हणतात की, उपाध्यापेक्षा आचार्य दहा पटींनी श्रेष्ठ, तर आचार्यापेक्षा बाप शंभर पटींनी श्रेष्ठ, तर बापाहून आई सहस्र पटींनी श्रेष्ठ आहे. सप्तशतीत मार्कंडेयांनी जगन्मातेची पूजा करतांना म्हटले आहे की, सर्व स्त्रिया ही तुझीच रूपे आहेत. त्यामुळेच आपल्या देशात आचार्य आपल्या शिष्यांना उपदेश करतांना प्रथम म्हणतात, ‘मातृदेवो भव’, मग ‘पितृदेवो भव’, नंतर ‘आचार्य देवो भव’, ‘अतिथी देवोभव’ इत्यादी… तशा सगळ्याच माता श्रेष्ठ; पण यशोदामाता, जिजामाता, हिरा गवळण यांनी प्रस्थापित केलेले मातृत्वाचे आदर्श अजरामर म्हणावे लागतील.

 

३. प्राचीन काळातील दैवी स्त्रिया !

रामायणात कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, मंथरा, सीता, उर्मिला, मंदोदरी, शूर्पणखा, शबरी या स्त्रिया किंवा महाभारतात भीष्ममाता गंगा, मत्स्यगंधा, कुंती, माद्री, द्रौपदी, सुभद्रा, गांधारी, हिडिंबा या स्त्रियांचे महत्त्व विषद होते. रामायण, महाभारतातील स्त्रिया जशा पतिव्रता, तशाच राजकारणातही निपुण होत्या. रणांगणात पती दशरथाच्या रथाचे चाक निखळून पडत असतांना त्याला स्वतःच्या हाताचा आधार देणारी कैकेयी एक रणधुरंधर स्त्रीच होती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांचे प्रातःसमयी नित्य स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हणण्यामागे या स्त्रियांचे चरित्र आणि चारित्र्य कारणीभूत आहे.

 

४. धर्मप्रसार आणि धर्माभ्यास करणार्‍या प्राचीन हिंदु स्त्रिया !

हिंदु धर्माने स्त्रीला कधी अबला न मानता नेहमी शक्तीच्या रूपात पूज्य मानले आहे.  पत्नीविना पुरुषांना कोणताही धार्मिक विधी करण्याची अनुमती शास्त्रानेच नाकारली होती. वेदकाळात स्त्रियांना गायत्री मंत्र आणि वेदपठणाचा, तर अधिकार होताच; पण मौजींचाही (व्रतबंधनाचा) अधिकार होता. कात्यायनी, मैत्रेयी, गार्गी, अपाला यांशिवाय अनेक स्त्रिया वेदविद्येत पारंगत होत्या. ॠग्वेदातील ॠचा रचणार्‍या ॠषींची एकूण संख्या ३०० होती. त्यात जुहू, शची, घोषा, लोमाशा, लोपामुद्रा या विदुषी स्त्रियांचाही समावेश होता. प्राचीन काळातील संस्कृत कवियत्रींच्या नावांची सूची पुष्कळ मोठी होईल.

भारताच्या इतिहासात फार प्राचीन काळापासून वेळोवेळी अनेक स्त्रीरत्नांनी जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत उत्तुंग आदर्श प्रस्थापित केले. त्रिपिटीकाच्या भेरीगाथा या ग्रंथात शुभा, क्षेमा, अनुपमा, विशाखा, गौतमी अशा ७३ बुद्धकालीन स्त्रीरत्नांचे वर्णन दिले आहे. या स्त्रिया अनुपम सौंदर्यवती आणि बुद्धीमान होत्या; पण सारे लौकिक मोह टाळून या स्त्रिया भिक्षुणी झाल्या आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचे कार्य अंगीकारले. आद्य शंकराचार्य आणि बौद्ध महापंडित मंडणमिश्र यांच्या विद्वत्तापूर्ण वादचर्चेत न्यायाधिशाची भूमिका बजावणारी एक स्त्री होती. तिचे नाव होते उभयभारती (श्री सरस्वतीदेवी). ती मंडनमिश्रांची पत्नी होती. प्रत्यक्ष सरस्वतीदेवीच्या पतीशी शास्त्रार्थाचा वाद होतांना तिला आद्य शंकराचार्यांनी न्यायाधिशांची भूमिका स्वीकारण्यास स्वीकृती द्यावी, यावरून त्या स्त्रीच्या निःपक्षपातीपणाची आणि पांडित्याची कल्पना येते. वादात पती हरल्यानंतर तिने आद्य शंकराचार्यांसारख्या प्रकांड पंडितालाही शास्त्रार्थ करण्याचे आवाहन केले होते.

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ
(साभार : ‘एकता’, मे २०१३)

Leave a Comment