आध्यात्मिक त्रासांचे प्रकार

वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत.’

संदर्भ : मराठी विश्‍वकोश खंड १, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, सचिवालय, मुंबई – ४०००३२, आवृत्ती १ (१९७६), पृष्ठ १९४

 

१. कलियुगाचे वैशिष्ट्य आणि त्याचा मानवी जीवनावरील परिणाम

अ. ‘कलियुग हे तमोगुणी संस्कारांनी व्यापलेले आहे.

आ. साधना न करता रहाणे, तसेच आध्यात्मिक उपायांविना जीवन व्यतीत करणे, म्हणजे या जन्मात स्वतःचीच अत्यंत हानी करून घेणे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकणे

इ. मनुष्यात षड्रिपूंचे प्रमाण अधिक-उणे (कमी-जास्त) असते. कलियुगात मनुष्याचे षड्रिपूंच्या प्रमाणात कार्य करण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याला दुसर्‍यांविषयी ईर्षा असते, तसेच अनेक गोष्टींविषयी अपेक्षा आणि आसक्ती असते. हे सर्व विचार वासनात्मक संबंधित असतात.

ई. कलियुगातील मनुष्याचे मन ७० टक्के विकल्पाने भरलेले असते. त्याच्या मनात येणारा अन् व्यक्त होणारा विचार तमोगुणी असतो.

उ. तामसिक विचारांचे तमोगुणी वादळ जिवावर आपला रज-तमात्मक प्रभाव दर्शवत असते. क्रोध, द्वेष, मत्सर यांसारख्या दोषांचा परिणाम दुसर्‍यावर होऊन ज्याच्याविषयी आपल्याला वासनाजन्यरूपी आसक्तीदर्शक रज-तमात्मक विचार येतात, त्या विचारांच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्या जिवाला दृष्ट लागण्याचे प्रमाण जास्त असते.

 

२. आध्यात्मिक त्रासांचे प्रकार

२ अ. दृष्ट लागणे

बाळाला काजळाची तीट लावण्याचा संस्कार आजही जपला जातो. काही जुन्याजाणत्या स्त्रिया आलेल्या पाहुण्यावरून लिंबलोण आजही उतरवतात. परंपरा जेव्हा शतकानुशतके जपल्या जातात, तेव्हा त्यांमागे निश्‍चित काहीतरी शास्त्र असते, हे आपण समजून घ्यायला हवे. सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, भिन्नलिंगी व्यक्तींकडे पहाण्याची वाईट दृष्टी यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसर्‍या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात. तसेच कुटुंबात भांडणे, व्याधी, आर्थिक चणचण, वाईट स्वप्ने पडणे, नैराश्य, सिगारेट किंवा मद्य यांचे व्यसन यांसारख्या समस्या आता नित्याच्या झाल्या आहेत. जीवनातील ८० टक्के समस्यांमागील कारणे सकृद्दर्शनी स्थुलातील दिसत असली, तरी खरे मूळ कारण हे सूक्ष्मातील, म्हणजेच वाईट शक्तींचा त्रास, हे असते. वाईट शक्तींचा त्रास हाही दृष्ट लागण्याचाच प्रकार होय.

थोडक्यात, जीवन समस्यांरहित आणि आनंदी बनवायचे असेल, तर ‘दृष्ट काढणे’ हा सोपा घरगुती आध्यात्मिक उपाय अवलंबणे केव्हाही उपयुक्त ठरते. सध्याच्या विज्ञानयुगात वावरतांना ‘दृष्ट लागणे आणि दृष्ट काढणे’, हे शब्द उच्चारले, तरी बुद्धीजीवी लोक त्याला ‘पुरातन पद्धत’, असे हिणवून नाक मुरडतील. विज्ञानयुगात गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडल्यास तिच्यावर लगेच विश्‍वास बसतो.

दृष्ट काढण्याचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकाधिक जणांनी दृष्ट काढून स्वतःभोवती निर्माण झालेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करावे आणि साधनेने ब्रह्मांडातील ईश्‍वरी लहरींचा लाभ करून घ्यावा.

२ अ १. ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?

१. ‘एखाद्या जिवाच्या रज-तमात्मक इच्छेचा दुसर्‍या जिवावर होणारा दुष्परिणाम म्हणजेच दृष्ट लागणे.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १०.८.२००४, सायं. ७.२४
याचे एक उदाहरण म्हणजे, बाळाला दृष्ट लागणे. हसर्‍या किंवा गोंडस बाळाला पहाणार्‍या काही जणांच्या मनात नकळत एक आसक्तीयुक्त विचार येतात. आसक्तीयुक्त विचार हे रज-तमात्मक असतात. बाळाचा सूक्ष्म-देह हा अती संवेदनशील असल्यामुळे त्याच्यावर या रज-तमात्मक स्पंदनांचा अनिष्ट परिणाम होतो, म्हणजेच बाळाला दृष्ट लागते.

२. काही वेळा एखादी व्यक्ती, किंवा वस्तू यांविषयी एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या वाईट शक्तीच्या मनात वाईट विचार येतात किंवा त्यांचे चांगले झाल्याचे तिला बघवत नाही. यांमुळे निर्माण होणार्‍या वाईट स्पंदनांचा ती व्यक्ती, किंवा वस्तू यांच्यावर परिणाम होणे, याला ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात.

‘एखाद्या जिवाच्या मनात दुसर्‍या जिवाविषयी तीव्र मत्सर किंवा द्वेषयुक्त विचारांचे ३० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर त्या जिवाची दुसर्‍या जिवाला तीव्र दृष्ट लागू शकते. या दृष्टीच्या प्रमाणानुसार त्या दुसर्‍या जिवाला शारीरिक स्तरापेक्षा मानसिक स्तरावर त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. याला ‘सूक्ष्म स्तरावर तीव्र दृष्ट लागणे’, असे म्हणतात.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.५.२००९

२ आ. अतृप्त पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण आणि त्रासाचे स्वरूप

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वर मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते.

माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यू नंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या …

अतृप्त पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण आणि त्रासाचे स्वरूप

 

३. शारीरिक व्याधी मनुष्याच्या मृत्यूसहित संपणे; परंतु आध्यात्मिक व्याधी मात्र जन्मोजन्मी तशाच चालू रहात असल्याने त्या आध्यात्मिक उपायांतूनच वेळीच दूर कराव्या लागणे

शारीरिक व्याधी मनुष्याच्या मृत्यूसहित संपतात; परंतु आध्यात्मिक व्याधी मात्र जन्मोजन्म तशाच चालू रहातात. या व्याधींना तीव्र साधनेने, तसेच वेळोवेळी दृष्ट काढणे आणि अन्य आध्यात्मिक उपाय करणे, या माध्यमांतून दूर करावे लागते. तरच कलियुगातील मनुष्य जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळवू शकतो.

 

४. कलियुगात जिवांनी साधना करण्याचे महत्त्व

कलियुगातील वायूमंडलच तमोगुणी विचारांनी ग्रासलेले असल्याने जिवाला कोणाची तरी दृष्ट लागतच असते. त्यासाठी जिवाने साधना करून स्वतःभोवतीचे वायूमंडल सतत शुद्ध ठेवणे अन् त्यातूनच श्‍वास घेऊन ईश्‍वराच्या चैतन्यलहरींचा अपेक्षित लाभ करून घेणे इष्ट ठरते.

 

५. कलियुगात वाईट शक्तींपासून असलेला धोका ओळखूनच आपले जीवन व्यतीत करणे आवश्यक असणे

बुद्धीजीवी जिवांना हे सर्व पटणारे नसले, तरी ते एक शाश्‍वत सत्य आहे. त्याला आपल्याला स्वीकारावेच लागेल. कलियुगात मोठ्या संख्येने वावरणार्‍या वाईट शक्तींपासून पावलापावलावर धोका आहे, हे ओळखूनच आपले जीवन व्यतीत करायला हवे.

 

Leave a Comment