दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

श्रीराम Shriram

श्रीराम

 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.

१. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण ‘दसरा’

‘दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. ‘गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू’, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटावयाचे असते.

२. त्रेतायुगापासून साजरा केला जाणारा सण ‘विजयादशमी’

‘आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेर सुवर्णांचा वर्षाव करतो. कौत्स केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजन नेतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २००७)

३. सरस्वतीतत्त्व अप्रकटावस्थेत जाणे

‘या दिवशी सरस्वतीतत्त्व सगुणाच्या अधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरूपी अप्रकटावस्था धारण करते; म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते.

श्री सरस्वतीदेवी Shri Saraswati

श्री सरस्वतीदेवी

 

अ. परिणाम आणि लाभ

या दिवशी सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने आणि विसर्जनाने व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन जिवाचे स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.९.२००६, सायं. ७.३९ आणि ९.९.२००६, रात्री ८.०९)

४. तमोगुण आणि वाईट शक्ती यांचा
नाश होणे आणि परस्परांवरील प्रीती जागृत होऊन सृजनतेचे कार्य होणे

‘देवीतत्त्व कार्यरत असल्यास सगुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते अन् केवळ विष्णुतत्त्व कार्यरत असल्यास निर्गुण स्तरावर तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य होत असते, असे शास्त्र आहे. दसर्‍याच्या दिवशी तारक देवीतत्त्व विष्णुतत्त्वाच्या समवेत एकत्रितपणे कार्यरत होते. या दोन भिन्न तत्त्वांनी संयुक्तपणे कार्य केल्यामुळे तमोगुण आणि वाईट शक्ती यांच्या नाशाचे कार्य संपन्न होण्याबरोबरच या दोन तत्त्वांमधील परस्परांविषयीची प्रीती जागृत होऊन त्यांच्यातील तत्त्वाकडून विनाशाचे कार्य करण्याबरोबरच सृजनतेचे, म्हणजे स्थितीसंबंधीचे कार्यही आपोआप होऊ लागते. देवी आणि विष्णु यांच्या संयुक्त कार्यरत तत्त्वांकडून प्रक्षेपित होणार्‍या प्रीतीयुक्त कल्याणकारी स्थितीजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरतात. यामुळे सृजनतेच्या कार्याला गती प्राप्त होते. त्यामुळे पीक चांगले येणे, भरभराट होणे यांसारखे परिणाम दिसून येतात. स्थितीजन्य कार्य करण्यासाठी श्रीविष्णूची सहयोगिनी म्हणून श्रीलक्ष्मी त्याच्याबरोबर कार्य करते. त्यामुळे श्रीविष्णु त्याच्या प्रत्येक अवतारामध्ये श्रीलक्ष्मीचाही सहभाग करून घेतो आणि दोघेही मानवदेह धारण करून पृथ्वीतलावर एकाच वेळी अवतार घेतात.

५. श्रीराम आणि हनुमान तत्त्वे अन् क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसर्‍याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास साहाय्य होते.

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्तीरूपी) आणि तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन जिवाच्या मारक भावाबरोबरच नेतृत्वगुणामध्येही वाढ होते.’

– सूक्ष्म जगतातील एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.५.२००५, दुपारी २.४०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

1 thought on “दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व”

Leave a Comment