सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – १)

सर्वसामान्य आणि साधना न करणार्‍या व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणार्‍या व्यक्‍तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्‍ती संतपदाला पोहोचते. हे संत समष्टीच्या कल्याणासाठी नामजप करू शकतात. मृत्यूनंतर त्यांना पुनर्जन्म नसतो. ते पुढील साधनेसाठी वा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.

 

सनातनशी एकरूप झालेले संत !

१. परात्पर गुरु पांडे महाराज

 प.पू. पांडे महाराज
परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पूर्ण नाव श्री. परशराम माधवराव पांडे. ते नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील आहेत. नागपूरचे प.पू. बापूराव महाराज खातखेडकर त्यांना गुरु म्हणून लाभले. अकोला येथील वास्तव्यात अभियंता पदावर कार्यरत असतांनाच त्यांच्या नामसाधनेला आरंभ झाला. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या वाचनाच्या व्यासंगामुळे त्यांनी वेद, उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे. स्वतःच्या मुलाला गणित शिकवत असतांना त्यांना १ या अंकातून श्री गणेशाची शक्ती जाणवली. त्यानंतर त्यांनी ‘श्रीगणेश अध्यात्म दर्शन’ हा ग्रंथ लिहिला. डिसेंबर २००४ मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या संपर्कात आले. सनातनशी संपर्कात आल्यावर त्यांनी आपल्या आयुष्यात गुरु असूनही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सनातनचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) विदर्भ दौर्‍यावर असतांना त्यांची परात्पर गुरु पांडे महाराजांशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी आश्रमात रहाण्याचा निर्णय घेतला आणि ते देवद आश्रमात राहू लागले. त्यांच्यातील समष्टी तळमळ आणि साधकांवरील प्रीती यांमुळे ते देवद आश्रमाचे आधारस्तंभ बनले. आज त्यांची ओळख म्हणजे सनातनच्या साधकांचा त्रास न्यून होण्यासाठी अविरत झटणारी करुणामय संतमूर्ती अशी आहे.

* जन्मदिवस २४.११.१९२७

* गुरुमंत्र ख्रिस्ताब्द १९६० ला मिळाला तेव्हापासून साधना चालू झाली.

* १ या अंकाची अनुभूती ख्रिस्ताब्द १९७६ या वर्षी आली.

* सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दौर्‍यावर असतांना त्यांची परात्पर गुरु महाराजांशी १८.०२.२००५ या दिवशी अकोला येथे भेट झाली.

* सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने श्रीगणेश अध्यात्म दर्शन, या ग्रंथाला १६.१०.२००५ या दिवशी इंदूर येथे भारतीय स्तरावर असलेला ख्रिस्ताब्द २००५ चा ब्रह्मलिन स्वामी विष्णुतीर्थ पुरस्कार मिळाला.

* ३.१.२००७ पासून ते सनातन आश्रम, देवद येथे रहायला आले.

सनातनच्या मार्गदर्शनानुसार केलेली साधना अन् गुरुकृपा यांचे फलित म्हणजे, केवळ १४ वर्षांतच (मार्च २०१५ पर्यंत) या संस्थेचे ४८ साधक संतपदाला पोहोचले. सांप्रतकाळी समाज धर्माचरणापासून दूर गेल्यामुळे समाजात रज-तम गुणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनता, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अनाचार, नीतीहीनता आदी आसुरी गुणांचे प्राबल्यही वाढले आहे. वायूप्रदूषण, जलप्रदूषण आदींपेक्षाही हे रज-तम गुणांचे प्रदूषण विघातक असते. सत्वगुणांचे प्राबल्य वाढवणे, हाच रज-तम गुणांचे प्रदूषण रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. हेच कार्य संतांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे सूक्ष्मातून होत असते. ‘सनातन संस्था’ सांगत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रज-तम गुणांचे प्राबल्यात घट होऊन सत्त्वगुण वाढणे आवश्यक आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहून शारीरिक आणि आध्यात्मिक या दोन्ही स्तरांवर सनातनचे संत हे कार्य करत आहेत.

२. प.पू. दास महाराज (रघुवीर महाराज)

प.पू. दास महाराज
प.पू. दास महाराज

 

सनातनचे कार्य संतांच्या आशीर्वादाच्या बळावर सुरू आहे. अनेक संत विविध माध्यमांतून सनातनला मदत करत आहेत. त्यातील एक संत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ-बांदा येथील प.पू. रघुवीर महाराज.

प.पू. रघुवीर महाराज यांचे पूर्ण नाव श्री. रघुवीर भगवानदास नाईक आहे. त्यांचा जन्म माघ कृ. सप्तमी, म्हणजे ८ फेब्रुवारी १९४२ या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील मूळ गावी भीमापूरवाडी (गळतगेवाडी) येथे झाला. प.पू. रघुवीर महाराज हे रामदासी संप्रदायाचे आहेत. त्यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज आणि आई दोघेही अध्यात्मप्रवण होते. वयाच्या १६ व्या वर्षी सज्जनगडावर श्रीधरस्वामी यांनी प.पू. रघुवीर महाराजांना अनुग्रह दिला. १९६१ मध्ये बांदा येथे त्यांनी राम, लक्ष्मण, मारुति आदींच्या मूर्ती आणल्या. १९६२ मध्ये महाराजांनी बद्रिनाथ येथे ६ महिने वास्तव्य करून गायत्री मंत्राचा जप केला. बनारस येथे त्यांनी ‘हनुमान कवच यज्ञा’साठी ३ महिने जप केला. तिथे त्यांना श्री हनुमंताने दर्शन दिले. प.पू. रघुवीर महाराज व्यष्टी साधना करून व्यष्टीतील संत झाले होते. सनातनच्या संपर्कात आल्यावर त्यांनी हळूहळू समष्टी साधनेला सुरुवात केली. पुढे त्यांनी जीव झोकून समष्टी साधनेला वाहून घेतले. २००७ च्या गुरुपौर्णिमेला, म्हणजे २९.८.२००७ या दिवशी ते समष्टीतील संत झाले.

सनातनला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण व्हावे, यासाठी प.पू. रघुवीर महाराज आणि निपाणी-भिमापूरवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील प.पू. पागनीस महाराज यांनी गोव्यातील फोंडा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येक शनिवारी एक, असे लागोपाठ ११ शनिवारी पंचमुखी श्री वीर हनुमत्कवच यज्ञ केले. या यज्ञांमुळे निर्माण झालेल्या सात्त्विकतेमुळे आणि यज्ञातून सिद्ध (तयार) झालेल्या विभूतीच्या वापरामुळे साधकांच्या त्रासांत काही प्रमाणात घट झाली. त्यानंतर प.पू. रघुवीर महाराजांनी संस्थेकरिता आतापर्यंत विविध ठिकाणी ३६ श्री वीर हनुमत्कवच यज्ञ केले आहेत. प.पू. रघुवीर महाराज यांची श्रद्धा आणि त्यांचे मार्गदर्शन सनातनच्या साधकांना सातत्याने चैतन्याच्या स्तरावर प्रेरणा आणि स्फूर्ती देत असते.

सनातनच्या संतांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. संतांचा मनोलय झालेला असतो, म्हणजे त्यांच्या मनात केवळ गुरूंनी दिलेले नामच अखंड चालू असते किंवा त्यांची निर्विचार अवस्था असते.

२. संतांमध्ये प्रेमभाव आणि साक्षीभाव निर्माण झालेला असतो. त्याचेही प्रत्यंतर साधकांना येते.

३. त्यांच्या सहवासात उपाय होणे, नामजप आपोआप चालू होणे, मन निर्विचार होणे, अधिक आनंद आणि शांती जाणवणे इत्यादी अनुभूती येतात.

४. त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे चैतन्य वायूमंडल नेहमीच शुद्ध ठेवते.

५. संतांचा अहं अत्यल्प असल्याने ‘देव किंवा गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्या माध्यमातून सर्वकाही करतात’, याची त्यांना क्षणोक्षणी जाणीव असते. त्यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्वही अत्यल्प जाणवत असते.

६. संत सातत्याने शरणागत भावात असल्यामुळे ते दीर्घ काळ आणि अधिक परिणामकारक समष्टी सेवा करू शकतात.

अशा प्रकारे संत सततच इतरांच्या कल्याणासाठी झटत असतात.

सनातनची संतरत्ने

पहिल्या संत पू. विमल फडके (देहत्याग)

३ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असतांनाही गुरुसेवेच्या प्रचंड तळमळीमुळे त्यांची सत्सेवा चालू होती. त्यांच्या संतपदाचा साधकांना चांगला लाभ झाला.

संतपद : मार्गशीर्ष शु. नवमी, कलियुग वर्ष ५१०४ म्हणजे १३ डिसेंबर २००२

देहत्याग : फाल्गुन शु. तृतीय, कलियुग ५१०८ म्हणजे १९ फेब्रुवारी २००७
त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विकतेमुळे त्यांच्या वास्तूतील जमीन गुळगुळीत झाली आहे.

सद्गुरुपद : ०१.०७.२०१२

दुसरे संत परात्परगुरु प.पू. कालिदास देशपांडे (देहत्याग)

संतपद : श्रावण शु. १४, कलियुग वर्ष ५१०८ म्हणजे ८ ऑगस्ट २००६ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी भारतभर फिरून साधकांना मार्गदर्शन केले.

देहत्याग : भाद्रपद कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११२ म्हणजे २४ सप्टेंबर २०१०. देहत्यागाच्या वेळी त्यांची पातळी ९१ टक्के होती. त्यांनी सत्यलोकापर्यंत आणि परात्परगुरुपदापर्यंतची सर्वोच्च उन्नती केली. परात्परगुरु : २४.०९.२०१०

तिसर्‍या संत पू. शकुंतला पेठे (देहत्याग)

वयाच्या ६७ व्या वर्षी यांनी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधनेला सुरुवात केली. अवघी बारा वर्षे साधना करून त्या संतपदाला पोहोचल्या. प्रीती (निरपेक्ष प्रेम) हा त्यांच्या साधनेचा विशेष पैलू होता.

संतपद : वैशाख शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५१०९ म्हणजे २४ एप्रिल २००७

देहत्याग : वैशाख शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११० म्हणजे ८ मे २००८

सद्गुरुपद : ०१.०७.२०१२

चौथे संत पू. निकमतात्या (देहत्याग)

निरागस भावाच्या बळावर गुरूंच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले. अंध आणि बहिरे असूनही वयाच्या ७४ व्या वर्षी म्हणजे आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा), कलियुग वर्ष ५१०९ अर्थात् २९ जुलै २००७ या दिवशी संत झाले. गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवा, साधना नेटाने करा, आज्ञापालन करा, स्वतःमधील दोष काढून टाका, मनात नकारात्मक विचार आणू नका, असा उपदेश ते साधकांना करत असतात. माघ शु. षष्ठी, कलियुग वर्ष ५११६ म्हणजे २५ जानेवारी २०१५ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

५ वे संत पू. सत्यवान कदम

यांनी गुरुंची सगुण सेवा केली आणि फेब्रुवारी २००८ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी म्हणजे माघ पौर्र्णिमा, कलियुग ५१०९ अर्थात् २१ फेब्रुवारी २००८ या दिवशी संत झाले. सेवाभाव, साक्षीभाव आणि वैराग्यभाव यांचा त्रिवेणी संगम यांच्या साधनेत आढळतो. सेवाभाव ठेवल्यावर आनंदप्राप्ती कशी होते, हे त्यांनी साधकांना शिकवले. देशभर प्रवास करून त्यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेला योग्य दिशा मिळाली.

६ वे संत पू. राजेंद्र शिंदे

प्रसारसेवक म्हणून समष्टी सेवा करतांना वयाच्या ४८ व्या वर्षी म्हणजे आश्विन कृ. १४, कलियुग वर्ष ५११२ अर्थात् ५ नोव्हेंबर २०१० या दिवशी संत झाले. आता संपूर्ण भारत अन् विदेश यांमधील साधकांना गुरुकार्य अन् साधना यांविषयी मार्गदर्शन करतात. साधकांनी स्वतःच्या वेळेचे नियोजन करून सेवा कशी करावी, गुरुपौर्णिमा महोत्सव सुसूत्रीतपणे कसा साजरा करावा, सभांचे नियोजन कसे करावे, यांविषयी साधकांना मार्गदर्शन करतात.

७ वे संत पू. पद्माकर होनप

यांनी श्रद्धा आणि आज्ञापालन या गुणांद्वारे साधना करून १३ वर्षांच्या अल्प कालावधीत म्हणजे ज्येष्ठशु. दशमी, कलियुग वर्ष ५११३ अर्थात ११ जून २०११ या दिवशी संतपद प्राप्त केले. निर्मळता, प्रेमभाव आणि व्यष्टी साधनेतील सातत्य हे यांच्या साधनेचे वैशिष्ट्य होते. आनंदी जीवनासाठी साधनेला पर्याय नाही, ही गोष्ट ते साधकांना सोप्या भाषेत समजावून सांगतात. कितीही प्रसंग आले, तरी आपण देवाशी अनुसंधान टिकवून ठेवले पाहिजे, ही गोष्ट ते साधकांना शिकवतात. देहत्याग : ३० ऑक्टोबर २०२२

८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकर

पू. श्रीमती कुवेलकर यांना घरातील उत्तरदायित्वामुळे सेवेसाठी बाहेर जाता यायचे नाही. यांनी १८ वर्षे घरी राहून केवळ व्यष्टी साधना केली आणि कार्तिक शु. २, कलियुग वर्ष ५११३, अर्थात् २८ ऑक्टोबर २०११ या दिवशी वयाच्या ७८ व्या वर्षी संतपद प्राप्त केले. संसारात राहून साधना करणार्‍यांसमोर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. संसारात राहून ईश्वरप्राप्ती करून घेता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. साधनेतील सातत्याने प्रगती साध्य करता येते, याचे उदाहरण म्हणजे पू. कुवेलकरआजी होय !

९ वे संत पू. सदानंद (बाबा) नाईक

लिहिता-वाचता न येताही अध्यात्मात प्रगती करता येते, हे यांनी दाखवून दिले. आश्रमात बांधकाम विभागात सेवा करून साधनेची तळमळ, नम्रता, चिकाटी आणि समष्टी भाव यांद्वारे साधना चालू ठेवली. कार्तिक शु.२, कलियुग वर्ष ५११३, अर्थात् २८ ऑक्टोबर २०११ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले. साधकांनी साधनेत प्रगती करावी, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. स्वभावदोषांचे निर्मूलन करण्याच्या संदर्भात त्यांनी साधकांना उपयुक्त माहिती दिली.

१० वे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

एका कानाने न्यून ऐकू येत असूनही अतिशय तळमळीने साधना केली. प.पू. डॉक्टरांच्या लिखाणाचे चांगल्या पद्धतीने विस्तारीकरण करण्याची सेवा परिपूर्णरित्या केली. सेवेतील अचूकतेवर त्यांनी अधिक भर दिला. सेवेतील तळमळ, नम्रता, प्रेमभाव अशा गुणांसह साधना करत असतांना कार्तिक शु.२, कलियुग वर्ष ५११३, अर्थात् २८ ऑक्टोबर २०११ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले.

११ वे संत पू. संदीप आळशी

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या पू. संदीप आळशी यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी, म्हणजे ऑक्टोबर २०११ मध्ये संतपद प्राप्त केले. हे आजपर्यंतच्या सनातनच्या इतिहासातील सर्वांत लहान वयातील संत आहेत. ग्रंथनिर्मितीची सेवा करतांना वेळेचे नियोजन, साधकांच्या सेवेचे नियोजन, ग्रंथातील मजकुराची यथार्थ मांडणी यांकडे कटाक्षाने लक्ष दिले. नम्रता, प्रेमभाव, साधकांना प्रोत्साहन देणे या गुणांसह सेवा करतांना कार्तिक शु.२, कलियुग वर्ष ५११३, अर्थात् २८ ऑक्टोबर २०११ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले.

१२ व्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर

साधनेची तळमळ आणि प्रीती या गुणांद्वारे तीव्र आध्यात्मिक त्रासांवर मात करून संत होता येते, हे यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केले. साधकांच्या जलद प्रगतीचा ध्यास, साधकांचे स्वभावदोष जाऊन त्यांनी साधनेत सातत्य राखावे यासाठी प्रयत्नरत असणार्‍या आणि संधी मिळेल त्याप्रमाणे साधकांना साधनेत प्रोत्साहन देणार्‍या अनुताई कार्तिक शु.२, कलियुग वर्ष ५११३, अर्थात् २८ ऑक्टोबर २०११ या दिवशी संत झाल्या.

१३ वे संत पू. महादेव नकाते

विकलांग अवस्थेतही अल्प अहं, सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाणे, परेच्छेने वागणे, तळमळ या गुणांमुळे केवळ ५ महिन्यांत ९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली जाऊ शकते, हे यांनी दाखवून दिले. समष्टीभावामुळे साधकांच्या साधनेतील प्रगतीकडे त्यांनी फार लक्ष दिले. साधकांच्या साधनेचा आढावा घेणे, अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि साधकांनी साधनेतील सातत्य टिकवण्याकडे लक्ष पुरवणे, असे करत असतां नकातेकाका पौष शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११३ अर्थात् २८ डिसेंबर २०११ या दिवशी संत झाले.

१४ व्या संत पू. द्वारावती रेडकर

पू. आजींमध्ये प्रेमभाव, तळमळ, वक्तशीरपणा, इतरांचा विचार करणे अशा अनेक गुणांचा संगम आहे. पू. आजींची एकूणच दिनचर्या बघितली, तर ती तरुणांनाही लाजवणारी आहे. साधकांच्या साधनेविषयी आपुलकीने विचारपूस करणे, साधकांना साधनेत प्रोत्साहन देणे, साधकांना येणार्‍या अडचणींवर उपाय सुचवणे, असे करत असल्यामुळे आजी सर्वांच्या लाडक्या आहेत. साधनेतील सातत्य आणि देवाशी अखंड अनुसंधान ठेवले जात असतांना आजी चैत्र शु. अष्टमी, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् ३१ मार्च २०१२ या दिवशी संतपदाला पोहोचल्या.

१५ वे संत पू. रत्नाकर मराठे (देहत्याग)

पार्कीन्ससारखा दुर्धर रोग, तसेच गुडघ्याचा आजार असतांनाही त्यांची सेवेची तळमळ तरुणांनाही मागे टाकणारी होती. या स्थितीतही ते विदर्भातील ९ जिल्ह्यांत साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असत. सर्व साधकांची जलद प्रगती व्हावी याकडे त्यांचा कटाक्ष होता. सर्व साधकांविषयी त्यांना प्रेम वाटत असे. त्यामुळे साधक कितीही दूर असले, तरी त्यांच्याशी ते संपर्क साधून होते. त्यांना चैत्र कृ. २, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् ८ एप्रिल २०१२ या दिवशी संतपद प्राप्त झाले आणि चैत्र कृ. ३, कलियुग वर्ष ५११४ अर्थात ९ एप्रिल २०१२ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

१६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडे

पू. देशपांडेआजोबा म्हणजे दैवी गुणांचा समुच्चय ! त्यांच्यातील शरणागत भाव साधकांसाठी आदर्श आहे. धर्मासाठी अखेरच्या क्षणापर्यंत तन, मन, धन अर्पण करून लढले पाहिजे, हा त्यांचा संदेश आहे. आज्ञापालन, प्रेमभाव, नामजप, प्रार्थना ही साधनेतील पथ्ये कटाक्षाने पाळली पाहिजेत, असे मार्गदर्शन ते करतात. चैत्र कृ. १४, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् २० एप्रिल २०१२ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले.  वैशाख कृ २, कलियुग वर्ष ५१२५ अर्थात ७ मे २०२३ या दिवशी सकाळी १०.१५ वाजता त्यांनी देहत्याग केला.

१७ वे संत पू. उमेश शेणै

‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करून संत होता येते, हे सिद्ध करणारे पू. उमेश शेणै हे कर्नाटक राज्यातील पहिले संत होत. मिळालेली सेवा परिपूर्ण होईपर्यंत स्वस्थ न बसणे, प्रत्येक प्रसंगात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे, परिस्थितीची तक्रार न करता परिस्थितीचा स्वीकार करणे, हे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. साधकांच्या साधनेविषयी ते फार सतर्क असतात. साधकांच्या साधनेत खंड पडू नये म्हणून प्रयत्नरत असतात. सनातनने सांगितलेली साधना प्रामाणिकपणे करा, असे ते साधकांना मार्गदर्शन करतात. त्यांना वैशाख शु. ६, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् २७ एप्रिल २०१२ या दिवशी संतपद प्राप्त झाले.

१८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे

आज्ञापालन आणि प्रेमभाव या गुणांनी श्रीगुरूंचे मन जिंकून दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. इंगळेकाका सनातनचे १८ वे संत झाले. इतरत्रच्या साधकांना दैनिकातून प्रतिदिन आणि सत्संगातून आठवड्यातून एकदा मार्गदर्शन मिळते. छत्तीसगड राज्यात त्यापैकी काहीही न मिळता जे काही एक-दोन महिन्यांतून एकदा मार्गदर्शन मिळेल, त्याच्या आधारावर त्यांनी संतपद साध्य केले. धर्मप्रसार आणि अध्यात्मप्रसार यांची तळमळ, तसेच श्रीगुरूंच्या वर नितांत श्रद्धा असलेले इंगळेकाका वैशाख शु. नवमी, कलियुग वर्ष ५११४ अर्थात ३० एप्रिल २०१२ या दिवशी संतपदी विराजमान झाले. देहत्याग : २९ सप्टेंबर २०२२

१९ वे संत अज्ञात

या संतांच्या पुढील साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचे नाव जाहीर करू नये असे सांगितले आहे.

२० व्या संत पू. आशालता सखदेव

प.पू. डॉक्टर आठवले यांच्यावरील अढळ श्रद्धेमुळे संत झाल्या. पहिल्यापासूनच शांत स्वभावाच्या असलेल्या सखदेवआजी सूक्ष्मातून प्रत्येक गोष्ट प.पू. गुरुदेवांना सांगत असतात. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी मन लावून साधना करा, असा संदेश त्यांनी दिला. त्यांना वैशाख कृ. ५, कलियुग वर्ष ५११४ अर्थात १० मे २०१२ या दिवशी संतपद प्राप्त झाले. देहत्याग : वर्ष २०१६

२१ व्या संत पू. सीताबाई मराठे (देहत्याग)

वैशाख कृष्ण पक्ष ९, कलियुग वर्ष ५११४ (१४.५.२०१२) या दिवशी श्रीमती सीताबाई मराठेआजी ‘पू. सीताबाई मराठेआजी’ झाल्या. त्यांची पातळी ७१ टक्के आहे.

 

२२ वे संत पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सदैव अंतर्मुख असणारे, शांत, मितभाषी आणि अजातशत्रू अशा विविध गुणांनी युक्त असलेले आधुनिक वैद्य (डॉ.) पिंगळेकाका संतपदाला पोहोचले. तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्रासाशी लढत लढत त्यानी स्वतःची प्रगती करून घेतली. त्यांनी साधकांना साधनेत योग्य दृष्टीकोन देणारे मार्गदर्शन केले. परिपूर्ण सेवा हे त्यांचे एक वैशिष्ट्य ! वैशाख कृ. ९, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् १४ मे २०१२ या दिवशी त्यांना संतपद प्राप्त झाले.

२३ वे संत पू. विनायक कर्वे

ग्रंथप्रदर्शन कक्षावर ग्रंथवितरण, सत्संग घेणे, गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवणे अशी सेवा करणारे श्री. विनायक कर्वेमामा संत झाले. नम्रता, सेवाभाव, आज्ञापालन आणि सकारात्मकता हे त्यांच गुण आहेत. प्रवासी बसने किंवा आगगाडीने प्रवास करतांना ग्रंथवितरण करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ! सेवाभाव आणि अध्यात्मप्रसाराची तळमळ या गुणांनी परिपूर्ण असलेले कर्वेमामा वैशाख कृ. १०, कलियुग ५११४ अर्थात् १५ मे २०१२ या दिवशी संतपदाला पोहोचले.

२४ वे संत पू. नंदकुमार जाधव

नम्रता, आज्ञापालन, गुरुकार्याची तळमळ, प्रेमभाव, वक्तशीरपणा, मायेत न अडकणे या गुणवैशिष्ट्यांमुळे अकलूज, जिल्हा सोलापूर येथील श्री. नंदकुमार जावधकाका (वय ६२ वर्षे) संतपदावर पोहोचले. अतिशय कठीण प्रसंगांकडेही साक्षीभावाने पाहून त्यांनी आपले संतत्व सिद्ध केले, असे प.पू. डॉक्टरांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे. स्थितप्रज्ञता हा त्यांचा एक गुण असल्याचेही प.पू. डॉक्टरांनी म्हटले आहे. प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी, अशी त्यांची तळमळ असते. इतरांनी सांगितलेली सेवा, ‘प्रत्यक्ष गुरुदेवांनीच ती सांगितली आहे’, असा त्यांचा भाव असतो.

२५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे

आठवर्षे अतिशय कठीण काळात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या समूह संपादकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री. पृथ्वीराज हजारे ‘गुरुपौर्णिमा २०१२ महोत्सवा’च्या दिवशी संतपदावर पोहोचले. राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील प्रेमामुळे त्यांना चार वेळा अटक झाली. साधेपणा आणि वक्तशीरपणा हे त्यांचे मुरलेले गुण आहेत. सातत्याने चिकाटीने रात्रंदिवस सेवा करणे, हा त्यांचा स्थायीभाव आहे. सनातनवर येणार्‍या संभाव्य बंदीच्या काळात आणि त्यांना चार वेळा झालेल्या अटकेच्या वेळीही ते स्थिर होते.

२६ वे संत पू. भाऊ (सदाशिव) परब

अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, नुसत्या अस्तित्वाने साधकांकडून साधनेचा निश्चय आणि त्या दिशेने प्रयत्न करून घेणारे, नुसत्या आठवणीने साधकांना आधार वाटणारे असे गोव्याचे श्री. भाऊ (सदाशिव) परब निज भाद्रपद कृ. ९, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् ९.१०.२०१२ या दिवशी संतपदावर विराजमान झाले. ‘सर्वांठायी ईश्वर’, या भावाने भाऊ साधना करतात. त्यांच्या बोलण्यात तत्त्वनिष्ठता असते.

२७ वे संत पू. (डॉ.) वसंत आठवले (देहत्याग)

उच्चविद्याविभूषित प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. वसंत आठवले (वय ८० वर्षे) हे अप्पाकाका म्हणून सर्वांना परिचित आहेत. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे ते ज्येष्ठबंधू. ते ग्रंथ लिखाणाची सेवा करतात. अभ्यासू वृत्ती आणि सेवेतील चिकाटी ही त्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. सेवा करतांना कर्तेपण स्वतःकडे न घेणे, नम्रता, तत्परता, सेवा परिपूर्ण करणे, मधुरभाषी असे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष, चतुर्थी, कलियुग वर्ष ५११४ (१६.१२.२०१२) या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. कार्तिक शुक्ल सप्तमी, कलियुग ५११५ म्हणजे ९ नोव्हेंबर २०१३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

२८ वे संत पू. सुदामराव शेंडे

वयाच्या ७४ व्या वर्षीही ५०-५५ वर्षे वयाच्या व्यक्तीची भगवद्स्फूर्ती लाभलेले आणि सेवामग्नता आणि अविचल साधना यांचे मूर्तरूप असलेले श्री. सुदामराव शेंडे पौष शुक्ल पक्ष ७, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् १८ जानेवारी २०१३ रोजी संतपदाला पोहोचले. अध्यात्मात श्रद्धा महत्त्वाची आहे, तर अढळ श्रद्धेला आज्ञापालनाची जोड असली की, गुरुकृपा होते आणि गुरुकृपेने अशक्य ते शक्य होते. पू. शेंडेआजोबांच्या प्रगतीतून हेच अधोरेखित होते.

२९ व्या संत पू. (सौ.) निर्मला होनप (देहत्याग)

सौ. होनपकाकू यांची झपाट्याने उन्नती होऊन चैत्र कृष्ण पक्ष ४, कलियुग वर्ष ५११४ अर्थात् २९ एप्रिल २०१३ या दिवशी त्यांची पातळी ७१ टक्के झाली, म्हणजे त्या संत झाल्या. त्या सनातनच्या २९ व्या संत आहेत.

 

३० व्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ

प्रतिदिन १९ – २० घंटे सेवा करणे, सर्वांना घरच्याप्रमाणे जवळीक आणि आधार वाटणे अन् साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतीलच नाही, तर कौटुंबिक अडचणीही सोडवणे, हे सौ. बिंदा सिंगबाळ यांचे गुण आहेत. श्रीकृष्णाप्रतीच्या उत्कट भावामुळे त्यांच्याकडे पाहूनच साधकांचा भाव जागृत होतो. रामनाथी आश्रमात व्यवस्थापन विभागात सेवा करत त्यांनी सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ज्येष्ठशुक्ल पक्ष चतुर्थी (१२.६.२०१३) या दिवशी ३० वे स्थान प्राप्त केले.

३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसे

बालपणापासून धर्माचरण, व्रत-वैकल्ये करत अखंड साधना करणार्‍या फलटण, (जिल्हा सातारा) येथील श्रीमती सरस्वती कापसेआजी ८३ व्या वर्षी संतपदावर आरूढ झाल्या. आषाढ शुक्ल पक्ष ९, कलियुग वर्ष ५११५ (१७.७.२०१३) या दिवशी त्या संत झाल्याचे घोषित करण्यात आले आणि त्या सनातनच्या ३१ व्या संत ठरल्या. त्यांच्यात अनेक दैवी गुण आहेत. धर्माचरण, विठ्ठलभक्ती, भावावस्था, प्रेमभाव, अखंड अनुसंधान ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. संत आणि साधक फलटण येथे गेल्यानंतर आजींच्याच घरी रहातात.

सनातनचे ३२ वे संत पू. (कु.) सौरभ जोशी

कु. सौरभ जोशी हे १७ वर्षांचे बालसाधक सर्व दृष्टींनी विकलांग असूनही श्रावण कृष्ण पक्ष दशमी (३१.८.२०१३) या दिवशी सनातनचे ३२ वे संत म्हणून संतपदी विराजमान झाले. सौरभ यांना स्वतःचे काहीच करता येत नाही. त्यांना कुशीवरही वळता येत नाही. जन्मापासून एकाच स्थितीत झोपल्यामुळे त्यांना असह्य वेदना होत असतात. असे असूनही ते सतत आनंदी असतात. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विकलांग अवस्थेतही अंतर्मनातून साधना करून उन्नती करता येते, हे पू. सौरभ यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. बाळाप्रमाणे भासणारे पू. सौरभदादा हे देही असून ‘विदेही’ अवस्थेत आहेत. अध्यात्मात ‘विदेही’ अवस्था प्राप्त होणे, ही उच्च कोटीतील अवस्था आहे.

सनातनच्या ३३ व्या संत (पू.) सौ. अंजली गाडगीळ

जिज्ञासा, सतत शिकण्याची वृत्ती, इतरांना साधनेत साहाय्य करण्याची तळमळ, इतरांशीच नव्हे, तर बाहेरच्या संतांशीही संपर्क साधणे, गुरूंना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास इत्यादी अनेक दैवी गुण असलेल्या सौ. अंजली गाडगीळ या श्रावण कृष्ण पक्ष दशमी (३१.८.२०१३) या दिवशी सनातनच्या ३३ व्या संत झाल्या. पू. सौ. अंजलीताई देवस्थानांचे चित्रीकरण, संत आणि भक्त यांच्या भेटीगाठी आदी सेवांच्या निमित्ताने अविश्रांत भ्रमंती करत असतात. कोणत्याही ग्रंथातील कोणत्याही विषयावरील शंका त्यांना विचारल्यावर बहुतांश वेळा पुढच्याच क्षणाला उत्तर देण्याइतपत त्यांचा विषयाचा अभ्यास आहे.

सनातनच्या ३४ व्या संत पू. (कु.) स्वाती खाड्ये

प्रत्येक जिल्ह्यात जाऊन साधकांना घडवणारी प्रसारातील साधकांची आध्यात्मिक आई म्हणजे पू. (कु.) स्वातीताई ! प्रत्येक नवीन गोष्ट विचारून करणे, तत्त्वनिष्ठता, सतत उत्साही आणि आनंदी असणे, सकारात्मकता, तत्परता, प्रांजळपणा, प.पू. डॉक्टरांवर अढळ श्रद्धा आणि गुरूंना अपेक्षित अशी कृती करण्याचा ध्यास, क्षात्रवृत्ती आणि प्रेमभाव यांचा अपूर्व संगम, समष्टीची तळमळ, नेतृत्व इत्यादी असंख्य दैवी गुण असलेल्या
पू. (कु.) स्वाती खाड्ये या आश्विन कृष्ण नवमी, २८ ऑक्टोबर २०१३ या दिवशी सनातनच्या ३४ व्या संत (सर्वांत लहान वयाच्या समष्टी संत) झाल्या.

सनातनचे ३५ वे संत पू. (वैद्य) विनय भावे

व्यष्टी साधनेत प्रगती करण्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग आणि साधनेची तळमळ असावी लागते. पू. विनय भावेकाकांमध्ये असलेल्या या गुणांमुळेच त्यांची साधनेत उन्नती होऊन ते सनातनचे ३५ वे संत (व्यष्टी संत) म्हणून आश्विन कृष्ण नवमी, २८ ऑक्टोबर २०१३ या दिवशी संतपदी विराजमान झाले. इतरांना साहाय्य करणे, त्यागी वृत्ती, साक्षीभाव, अंतर्मुखता, मनमिळाऊपणा इत्यादी गुणांबरोबरच ‘माझ्यावर प.पू. डॉक्टरांची मालकी आहे आणि मी त्यांचा सेवक आहे’ असा पू. भावेकाकांचा कार्य करतांना भाव असतो. उत्कृष्ट वैद्य असलेल्या पू. भावेकाका यांना वर्ष २०१३ या वर्षी रायगड जिल्हा परिषदेचा ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळाला. (देहत्याग)

सनातनच्या ३६ व्या संत पू. श्रीमती शालिनी नेने

साधनेसाठी वयाची, स्थळाची कोणतीच आडकाठी नसून भाव असल्यास साधनेतील अत्युच्च शिखरही गाठता येते, हा आदर्श सर्वांपुढे ठेवणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांनी दत्तजयंतीच्या शुभदिनी (१६ डिसेंबरला) सनातनच्या संतरत्नांत ३६ वे (व्यष्टी संत) स्थान प्राप्त केले ! आजी ९० वर्षांच्या असून आणि वृद्धाश्रमात रहात असूनही नियमित साधना करतात. आजींमध्ये पराकोटीची नम्रता असून अहं नसणे, प्रेमभाव, इतरांना समजून घेणे, परिस्थिती स्वीकारणे इत्यादी आध्यात्मिक गुण पूर्वीपासूनच होते. ‘प.पू. डॉक्टर सगळीकडे असतात आणि सगळे करवून घेतात’, असा त्यांचा भाव आहे.

सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगे

धार्मिक वृत्ती, प्रेमळ स्वभाव आणि सतत नामस्मरणाच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान साधणार्‍या नगर येथील पू. (सौ.) पद्मावती बाळासाहेब केंगेआजी (वय ८० वर्षे) या मार्गशीर्ष पौर्णिमा, १७ डिसेंबर या दिवशी सनातनच्या ३७ व्या संत (व्यष्टी संत) बनल्या. पू. आजींच्या मनात प.पू. डॉक्टर आणि सर्व संत यांच्या प्रती पुष्कळ आदर आहे. आजींना साधकांप्रती पुष्कळ ओढ आहे. या वयातही त्या साधकांना चहा किंवा जेवण करून देणे, या सेवा करतात. घरात काम असले, तरी त्या दोन्ही सुनांना प्रथम सेवेला प्राधान्य देण्यास सांगतात. पू. आजी नियमितपणे दैनिक सनातन प्रभात वाचतात आणि सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा करतात.

सनातनच्या ३८ व्या संत पू. (श्रीमती) हेमलता दास

सतत अनुसंधानात रहाणार्‍या आणि ईश्वराविषयी अधिकाधिक बोलणार्‍या कोलकाता येथील पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ७६ वर्षे) यांनी मार्गशीर्ष कृ. १३, दिनांक ३० डिसेंबर २०१३ या दिवशी सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ३८ वे स्थान (व्यष्टी संत) प्राप्त केले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना गुरुमंत्राची दीक्षा मिळाली. ठराविक संख्येत करावयाचा त्या गुरुमंत्राचा जप त्या इतकी वर्षे नियमितपणे करत आहेत. धर्मांधांविषयीची चीड, हिंदूंच्या दुःस्थितीविषयीची संवेदनशीलता, उत्तम स्मरणशक्ती, जिज्ञासा, सर्वांमध्ये मिळून मिसळून रहाणे, निर्भयता इत्यादी अनेक गुण त्यांच्यात आहेत.

सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे

अखंड नामजप करणार्‍या आणि देवाच्या सतत अनुसंधानात असणार्‍या राहता (जि. नगर) येथील श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी (८९ वर्षे) या २५.१.२०१४ या दिवशी सनातनच्या ३९ व्या संत (व्यष्यी संत) म्हणून संतपदावर आरूढ झाल्या ! ४० वर्षांपासून अखंड नामजप करणे, ध्यानीमनी सतत श्रीकृष्ण असणे; तसेच आदर्श आचरण, ईश्वरावरील दृढ श्रद्धा इत्यादी दैवी गुण त्यांच्यात आहेत. ‘प.पू. कलावती आई, प.पू. गोदावरी माताजी, प.पू. डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळेच आध्यात्मिक प्रगती झाली’, असा पू. आजींचा भाव आहे. देहत्याग : २७ जानेवारी २०२२

सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभाेलकर

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातील श्री. गुरुनाथ दाभोलकर (वय ७५ वर्षे) यांनी ५ मे २०१४ या दिवशी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केले. सर्वांवर निरपेक्ष प्रीतीची उधळण करणारे सनातनचे ४० वे संतरत्न पू. गुरुनाथ दाभोलकरकाकांनी बांधणी विभागात सेवा करणे, साधकांवर उपाय करणे यांसारख्या विविध सेवा केल्या आहेत. त्यांच्यात मनमोकळेपणा, प्रांजळपणा, एकाग्रता, चिकाटी, काटकसरीपणा, तत्परता, दिलेली कोणतीही सेवा परिपूर्ण करणे, आज्ञापालन, अशी अनेक आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आहेत. सर्वच साधकांशी काकांची जवळीक असल्याने सर्वांना पू. दाभोलकरकाकांचा आधार वाटतो.

सनातनच्या ४१ वे संत पू.(श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई

निरागसता, निर्मळता, सहजता, व्यापकता, प.पू. डॉक्टरांप्रतीचा उत्कट भाव, क्षात्रवृत्ती इत्यादी आध्यात्मिक गुण असलेल्या श्रीमती प्रमिला रंगनाथ प्रभुदेसाई १० मे २०१४ या दिवशी सनातनच्या ४१ व्या संत बनल्या. ‘भाव तेथे देव’ अशी एक म्हण आहे. तिचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. प्रभुदेसाई आजी ! त्यांना पाहूनच आपला भाव जागृत होतो. पू. आजी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठतात. नामजपादी साधना करून दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतात. पू. आजी देवाजवळ ‘आमचे (हिंदु) राष्ट्र येऊ दे. प.पू. डॉक्टरांना अन् सर्व साधकांना ते पहाता येऊ दे. प.पू. डॉक्टरांची प्राणशक्ती वाढू दे’, अशी प्रार्थना प्रतिदिन करतात.

सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर

१० मे २०१४ या दिवशी श्री. अशोक पात्रीकर यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या मांदियाळीत ४२ वे स्थान प्राप्त केले. पू. पात्रीकर काकांनी दैनिक सनातन प्रभात, अध्यात्मप्रसार, ग्रंथ-विभागात संकलनाची सेवा इत्यादी विविध सेवा केल्या आहेत. पू. काकांमध्ये अनेक गुणांचा समुच्चय आहे. शिस्त, नम्रता, स्थिरता, सातत्य, व्यापकपणा, सेवेतील पालट त्वरित स्वीकारणे, पुढाकार घेऊन कृती करणे, प्रेमभाव, गुरूंप्रती अव्यक्त भाव, अल्प अहं इत्यादी अनेक गुण त्यांच्यात आहेत. सर्व कुटुंबियांना साधनेकडे नुसते वळवणे असे न करता त्यांच्याकडून जीव झोकून साधना करवून घेता येते, हे पू. पात्रीकर काकांंनी सिद्ध करून दाखवले आहे.

सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रिय

१० सप्टेंबर २०१४ या दिवशी रुग्णाईत असूनही अंतर्मनाने साधना करणारे श्री. महेंद्र क्षत्रिय यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या मांदियाळीत ४३ वे स्थान प्राप्त केले. पू. क्षत्रीयकाकांचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. डॉ. जयंत आठवले हे १९९६-९७ मध्ये नाशिक येथे सत्संग घ्यायचे, त्या वेळी पू. क्षत्रीयकाका हे सत्संगात जाणारे पहिले साधक होते. त्याचप्रमाणे आताही ते नाशिक जिल्ह्यातील पहिले संत झाले आहेत. पू. क्षत्रीयकाका १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मागदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते रुग्णाईत होते. रुग्णाईत असतांनाही अंतर्मनाने केलेल्या साधनेच्या बळावर त्यांनी संतपद गाठले आहे.

सनातनच्या ४४ व्या संत श्रीमती राधा प्रभु

१२ सप्टेंबर या दिवशी श्रीमती राधा प्रभु यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या मांदियाळीत ४४ वे स्थान प्राप्त केले.

 

 

सनातनच्या ४५ व्या संत सौ. सूरजकांता मेनराय

पू. (सौ.) मेनराय यांना तीव्र शारीरिक त्रास आहेत. दिवसातून ४ वेळा त्यांना इन्सुलिनची इंजेक्शने घ्यावी लागतात, तसेच रात्री झोपेत त्या कोमामध्ये जाऊ नयेत, यासाठी त्यांना औषधे द्यावी लागतात. अशा स्थितीत सतत आनंदी राहून त्या तळमळीने साधना करत आहेत. शारीरिक क्षमता नसतांनाही सेवा अधिकाधिक करूया, असा सतत त्यांना ध्यास असतो. आपल्याकडून काहीच सेवा होत नाही, असे वाटून त्यांना खंत वाटते. प.पू. डॉक्टरांविषयी त्यांचा भाव उत्कट आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना राग किंवा प्रतिक्रिया येत नाहीत, हे त्यांचे निराळे वैशिष्ट्य आहे. १०.३.२०१५ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय !

पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय यांना कोणी चुका केलेल्या आवडत नाहीत. कोणावर अन्याय झालेला त्यांना सहन होत नाही. त्यांचा नामजप सतत चालू असतो. या वेळी पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय वापरत असलेली काठी पाहून काय वाटते ? याविषयी प्रयोग करून घेण्यात आला. ते वापरत असलेल्या काठीत चैतन्य आले आहे,काठीकडे पाहिल्यानंतर मन निर्विचार होते, असे उपस्थित साधकांनी सांगितले. ही काठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या काठीप्रमाणे दिसते, असेही एका साधकाने या वेळी सांगितले. १०.३.२०१५ या दिवशी ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सनातनचे ४७ वे संत पू. रघुनाथ वामन राणे

‘पू. रघुनाथ वामन राणेआजोबा ( ७६ वर्ष) या वयातही अनेक शारीरिक त्रास आहेत. तपोधाम आश्रमातील सेवा कष्टाच्या आहेत. आजोबा वयोवृद्ध असूनही त्यांची त्याविषयी कोणतीच तक्रार नसते. ते सर्व सेवा आनंदाने करतात. त्यांचे पाय सुजले आहेत. प्रकृती बरी नसल्याने त्यांना बोलताही येत नाही, तरीही प.पू. गुरुदेवांनी अपेक्षित अशी सेवा करून पू. राणेआजोबा गुरुदेवांचे शिष्य झाले आहेत. गुरुदेवांनी दिलेली सेवा अधिकाधिक चांगली करण्याचा त्यांना ध्यास असतो. गुरुदेवांनी सेवेसाठी पाठवले आहे, तर सतत सेवा करायची आहे, असा त्यांचा भाव असतो. पू. राणेआजोबा सतत भावावस्थेत असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपलाही भाव जागृत होतो. १५.३.२०१५ या दिवशी ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सनातनच्या ४८ व्या संत पू. श्रीमती निर्मला दाते

प्रेमाचा अखंड झरा आणि उत्साह यांमुळे इतरांना साहाय्याची तळमळ असणार्‍या पुणे जिल्ह्यातील सर्वांच्या लाडक्या श्रीमती निर्मला दातेआजी (वय ८१ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळीगाठून २० मार्च २०१५ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. पू. दातेआजी यांचे घर म्हणजे साधकांचे हक्काचे घर असून प्रेमभावाने आपण सर्वकाही जिंकू शकतो, ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. इतरांची काळजी घेतांना लहान-लहान सूत्रांकडे त्यांचे लक्ष असते. त्यांनी त्यांच्या सुनांना मुलींप्रमाणे जपले. त्यागी वृत्ती आणि प.पू. डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा यांमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली.

P_Prabhudesai_Aji_150 सनातनच्या ४९ व्या संत पू. कला प्रभुदेसाईआजी

मुळातच धार्मिक वृत्तीच्या श्रीमती कला प्रभुदेसाईआजींनी त्यांच्या पूर्वायुष्यात कर्मकांडानुसार साधना केली. कौटुंबिक जीवनात परेच्छेने वागून, तसेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून अध्यात्मातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पुढे वयाच्या ६५ व्या वर्षी आजींनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. घरोघरी जाऊन सनातन प्रभातचे वर्गणीदार बनवणे, धर्मकार्यासाठी समाजाकडून अर्पण घेणे, सनातन-निर्मित ग्रंथांचा अभ्यास करून ते वितरित करणे आदी सेवा त्यांनी तळमळीने केल्या. आपल्या वसाहतीच्या (सोसायटीच्या) प्रवेशद्वारावर दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण लिहून फलक प्रसिद्धीची सेवा त्यांनी ३ वर्षे अविरतपणे केली. यावरूनच त्यांच्यातील ईश्वरप्राप्तीची तळमळ आणि श्रद्धा दिसून येते. पू. कला प्रभुदेसाईआजी यांनी ३१ जुलै २०१५ या दिवशी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

P_Mai_150सनातनच्या ५० व्या संत पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

सर्वांना निरपेक्ष प्रेम देणार्‍या, सर्वांना आपल्याशा वाटणार्‍या आणि सर्व साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या सौ.  लक्ष्मी नाईक (माई) ३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदाला पोहोचल्या. माई खर्‍या अर्थाने धर्मपत्नी आहेत. पती-पत्नींनी सप्तलोक ओलांडून मोक्षापर्यंत एकत्र जाणे, हा विवाहातील सप्तपदीचा अर्थ आहे. त्या अर्थानुसार त्यांची वाटचाल चालू आहे. संतांच्या पत्नींनी संतपद गाठले, अशी उदाहरणे क्वचितच आढळतात.  माईंनी तो आदर्श सर्व साधिकांपुढे ठेवला आहे. संतांच्या पत्नीची भूमिका निभावणे खूप
कठीण असते. ती माईंनी सहजतेने निभावली. त्या माहेरच्या कुटुंबाचीही योग्य तर्‍हेने काळजी घेतात. त्यांचे व्यवहाराविषयीचे सहज बोलणेही आध्यात्मिक भाषेत असते.

P_Joshi_Ajobai_150सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा

वयाच्या ७३ व्या वर्षी आबा आश्रमात रहायला आले आणि अल्पावधीतच आश्रमजीवनाशी समरस झाले. प्रेमभावाला तत्त्वनिष्ठतेची जोड देणारे आबा मिरज आश्रमातील साधकांना साधनेत साहाय्य करून तेथील साधकांचा आधारस्तंभ बनले आहेत. कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी आनंदी रहाणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ! प्रकृती बरी नसतांनाही अधिकाधिक वेळ सेवा करण्याची त्यांची तळमळ असते. अशा विविध गुणांचा समुच्चय असणार्‍या श्री. जयराम जोशीआजोबा यांनी ३१ जुलै २०१५ या दिवशी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

P_Desai_Aji_150सनातनच्या ५२ व्या संत पू.  (सौ.) मालिनी देसाई

घरात येणार्‍या प्रत्येकाचे प्रेमाने आदरातिथ्य करणार्‍या पू.  (सौ.) मालिनी देसाई म्हणजे प्रेमभावाचे मूर्तीमंत रूपच ! स्वतःच्या प्रेमळ आचरणाने प्रथम भेटीतच साधकांना प्रेमात आकंठ न्हाऊ घालणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ! रामनाथी आश्रमात आल्यानंतर पू.  (सौ.) देसाई आश्रमातील साधकांशी आपुलकीने बोलतात. त्यांच्यात व्यक्त भाव आहे. अशा विविध गुणांनी युक्त असलेल्या सौ. मालिनी देसाई यांनी  ३१ जुलै २०१५ या मंगलदिनी ७१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आहे.

P_Desai_Ajoba_150सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई

पू. सीताराम देसाई मितभाषी असून त्यांच्या प्रेमळ दृष्टीने ते साधकांना आपलेसे करून घेतात. स्थिरता हा त्यांचा स्थायीभाव आहे. नम्र आणि अव्यक्त भाव असणारे पू. देसाई यांनी ३१ जुलै २०१५ या मंगलदिनी ७१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला असून ते संतपदी विराजमान झाले आहेत.

 

P_Kher_Aji_150सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

वक्तशीर, स्थिर, आनंदी, आसक्त नसणे आणि प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा अन् सतत अनुसंधानात असल्याने गुरु हेच अवघे विश्‍व असलेल्या रत्नागिरी येथील श्रीमती मंगला खेरआजी (वय ८३ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केल्याचे १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी घोषित करण्यात आले.

 

P_Shahaneaji_150सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणेआजी

नामजपाच्या माध्यमातून सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या आणि सर्वांवर प्रेम करणार्‍या राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी (वय ९३ वर्षे) या संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर २०१५ या दिवशी घोषित करण्यात आले. त्या सनातनच्या ५५ व्या संत आहेत.

 

P.-Shri-Shankar-Gunjekar---1सनातनचे ५६ वे संत पू. शंकर लक्ष्मण गुंजेकर

तळमळ, चिकाटी, प्रीती आणि गुरूंवर अपार श्रद्धा असणारे अन् भावपूर्ण सेवा करणारे पू. शंकर लक्ष्मण गुंजेकर (वय ५० वर्षे) हे १६ जानेवारी २०१६ या दिवशी सनातनच्या संतरूपी शृंखलेत ५६ वे संतरत्न म्हणून विराजमान झाले. घरची परिस्थिती हालाखीची असतांनाही देवावर अतूट श्रद्धा ठेवून या परिस्थितीतही सतत आनंदी असतात. ते २४ घंटे देवाच्या अनुसंधानात असतात.

patil_Aajiसनातनचे ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटील

प.पू. डॉक्टरांच्याप्रती अखंड शरणागत भाव असणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्याविषयी पुढील उद्गार काढले, “पू. आनंदी पाटीलआजी या सनातनच्या ५७ व्या संत आहेत. त्या सनातनच्या ५७ व्या संत असल्या, तरी त्यांनी अनेक घटकांच्या संदर्भात उच्चांक गाठला आहे, उदा. त्या नावाप्रमाणे सतत आनंदी असतात. त्यांच्याइतके स्वतः आनंदात राहून इतरांना सतत आनंद देणार्‍या त्या एकमेव संत आहेत. उतारवयात साधना करणे कठीण असते. तेव्हा त्यांनी साधनेला आरंभ करून संतपद गाठले. हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य आहे. त्यांनी नातू, पणतू या पुढच्या पिढ्यांपर्यंत साधनेचे संस्कार केले आहेत. हे त्यांचे तिसरे वैशिष्ट्य आहे.”

P_Kale_aaji_150 सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे

निरपेक्ष प्रेम करणे, प्रांजळपणे मनाची प्रक्रिया मांडणे यांसह घरातील सदस्य, तसेच साधक यांच्याकडून अपेक्षा करणे, या स्वभावदोषावर मात करून स्वतःमध्ये स्वीकारण्याची वृत्ती वाढवून पू. (श्रीमती) काळेआजी (वय ८१ वर्षे) यांनी अल्पावधीत प्रगती करुन १७ मार्च २०१६ या दिवशी सनातनच्या संतरूपी शृंखलेत ५८ व्या संतरत्न म्हणून स्थान प्राप्त केले.

P_Parab_Aajii_150सनातनच्या ५९ व्या संत पू. (श्रीमती) कै. देवकी वासू परबआजी (देहत्याग)

कै. देवकी वासू परबआजी (पेडणे, गोवा) सतत प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करायच्या. त्यांचे २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता निधन झाले. देहत्यागापूर्वी काही दिवसांपासून आजी सतत प.पू. डॉक्टरांना हाका मारत होती. त्यांना असह्य वेदना होऊन ती सतत तळमळत होती, तरीही तिच्या तोंडवळ्यावर त्रास दिसत नव्हता कि डोळ्यांत अश्रू नव्हते. कर्करोगासारखा असाध्य आणि वेदनादायी आजार असतांनाही व्यष्टी साधना करून पू. आजी संतपदावर आरूढ झाल्या ! आजारपणामुळे साधना करू शकत नाही, असे म्हणणार्‍या सर्वांपुढे पू. आजींनी एक आदर्श ठेवला आहे.

P_Rekhatai_150सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर

रामनाथी आश्रमातील संपूर्ण अन्नपूर्णा विभाग (स्वयंपाकघर) सांभाळत असतांनाच साधकांनाही साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणार्‍या आणि सतत देवाच्या अनुसंधानात राहून साधकांपुढे आदर्श ठेवणार्‍या कु. रेखा काणकोणकर (वय ३८ वर्षे) या  १५ एप्रिल २०१६ या दिवशी सनातनच्या ६० व्या संत ठरल्या. कु. रेखा काणकोणकर ह्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून वयाच्या २३ व्या वर्षी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. मुळात व्यष्टी प्रकृती असूनही अखंड शिकण्याची स्थिती, सेवेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं यांमुळे त्या अल्पावधीत रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाचे दायित्व समर्थपणे सांभाळू लागल्या.

पुढील सूची वाचण्यासाठी ‘क्लिक’ करा !

सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – २)

Leave a Comment