दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

‘भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती. तरीही त्या रागाने त्या दोन विकारांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे परिणाम केल्याचे दिसून आले. याची माहिती येथे दिली आहे.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. अपचन आणि पित्त हे विकार दूर करणारा राग वृंदावनी सारंग

१ अ. अपचन

अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी वृंदावनी सारंग या रागाने मणिपुर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम करून तेथे उष्णता निर्माण केली. तसेच त्याने अन्ननलिका आणि ओटीपोट यांवरही परिणाम करून संपूर्ण पचन संस्थेवर आध्यात्मिक उपाय केले. त्याने हे कार्य सूर्यनाडीच्या माध्यमातून केले.

१ आ. पित्त

वृंदावनी सारंग या रागाने पित्तविकार दूर करण्यासाठी मणिपुर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम न करता आज्ञाचक्र अन् मुख्यत्वे विशुद्धचक्र यांवर परिणाम केला; कारण पित्तविकारामध्ये घशात जळजळते. त्या रागाने हे कार्य सूर्यनाडीच्या माध्यमातूनच केले.

श्री. प्रदीप चिटणीस

 

२. पित्त आणि थकवा दूर करणारा राग ललत

२ अ. पित्त

ललत रागाने अनाहतचक्रावर परिणाम करून, तसेच सुषुम्ना नाडी कार्यरत करून पित्ताचा छातीतील जळजळण्याचा त्रास दूर केला. तसेच त्या रागाने मणिपुरचक्रावरही परिणाम करून पित्ताच्या उगमस्थानावरही आध्यात्मिक उपाय केले.

२ आ. थकवा

ललत रागाने सुषुम्ना नाडी कार्यरत करून प्रथम अनाहत, त्यानंतर मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार आणि शेवटी सहस्रार या चक्रांवर परिणाम करून त्यांना चैतन्य अन् थंडावा दिला.

 

३. थकवा आणि उच्च रक्तदाब दूर करणारा राग यमन

३ अ. थकवा

यमन रागाने अनाहत आणि मणिपुर या चक्रांना शक्ती दिली. तेथून ती स्पंदने अनुक्रमे हातांना आणि पायांना मिळाली. तसेच यमन रागाची स्पंदने देहाच्या पुढील आणि मागील बाजूंमध्येही प्रवाहित झाल्याचे जाणवले. हे कार्य यमन रागाने सुषुम्ना नाडी कार्यरत करून केले.

३ आ. उच्च रक्तदाब

यमन रागाने उच्च रक्तदाब न्यून करण्यासाठी आज्ञा आणि अनाहत या चक्रांना थंडावा देऊन अनुक्रमे बुद्धी अन् मन यांना शांत केले. तसेच त्याने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या मणिपुरचक्रालाही थंडावा देऊन अकार्यरत केले. या प्रक्रियेतही सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. अशा प्रकारे उद्देशानुरूप भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांचे त्या त्या चक्रांवर आणि शरिराच्या भागांमध्ये आपोआपच आध्यात्मिक उपाय होतात. दोन विकारांवर उपाय करणारा राग एकच असला, तरी तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रक्रियेतील एक साम्य म्हणजे त्या दोन विकारांचे निर्मूलन करतांना त्या दोन्ही वेळी तो राग व्यक्तीची एकच नाडी कार्यरत करतो. त्या दोन विकारांपैकी एका विकारावर उपाय करतांना त्या रागाने व्यक्तीची समजा सुषुम्ना नाडी कार्यरत केली, तर दुसर्‍या विकारावर उपाय करतांना व्यक्तीची सुषुम्ना नाडीच कार्यरत होते.’

 

४.उच्च रक्तदाबाचा त्रास दूर होण्यासाठी उपयुक्त असलेले ३ राग

४ अ. राग यमन

४ अ १. रागगायन आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत (उजव्या नाकपुडीने श्‍वास चालू) होती.
४ अ २. यमन राग प्रथम बुद्धीला शांत करत असणे

यमन राग आरंभ झाल्यावर प्रथम २ – ३ मिनिटे मला त्या रागाची स्पंदने अनाहतचक्रावर जाणवून नंतर ती आज्ञाचक्रावर जाणवू लागली. त्यामुळे मला डोक्यामध्ये थंडावा जाणवू लागला आणि माझे ध्यान लागणे आरंभ होऊन माझी मान खाली झुकू लागली. याचा अर्थ यमन राग प्रथम बुद्धीला शांत करतो.

४ अ ३. यमन रागाने मनालाही शांत करणे

मला अनाहतचक्रामध्ये थंडावा जाणवू लागला. माझी चंद्रनाडी कार्यरत होऊ लागली. ‘बुद्धीनंतर यमन राग मनाला शांत करतो’, असे जाणवले.

४ अ ४. यमन रागाने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या मणिपूरचक्राला थंडावा देऊन अकार्यरत करणे

काही वेळाने यमन रागाची थंड स्पंदने मणिपूरचक्रापर्यंत जाणवू लागली. यमन रागाने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या चक्राला थंडावा देऊन अकार्यरत केले.

४ अ ५. सुषुम्ना नाडी कार्यरत होणे

त्यानंतर मला थंड स्पंदने डोक्यामध्ये जाणवू लागली आणि तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४ अ ६. यमन रागामुळे उच्च रक्तदाब अल्प होण्याचे कारण

यमन रागामधील गायन तार आणि मध्यम सप्तकांतील आहे. त्यामुळे त्यामध्ये शक्ती आहे. त्या शक्तीमुळे शरिराला थोडे जडत्व येते. तसेच यमन रागामुळे मन आणि बुद्धी यांना थंडावाही मिळतो. ‘जडत्व आणि थंडावा यांमुळे उच्च रक्तदाब अल्प होतो’, असे वाटले.

४ आ. राग गोरखकल्याण

४ आ १. गोरखकल्याण राग आरंभ झाल्यावर चंद्रनाडी कार्यरत होणे, म्हणजे शरिराला शीतलता मिळणे

गोरखकल्याण राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी चालू होती. राग आरंभ झाल्यावर लगेचच चंद्रनाडीला आरंभ झाला. चंद्रनाडी कार्यरत होणे म्हणजे शरिराला शीतलता प्रदान करणे. उच्च रक्तदाब अल्प होण्यासाठी शीतलता महत्त्वाची आहे.

४ आ २. अनाहतचक्र आणि विशुद्धचक्र यांच्यामध्ये रागाची स्पंदने जाणवू लागली.
४ आ ३. गोरखकल्याण राग आरंभ झाल्यापासून ४ – ५ मिनिटांनी माझी सुषुम्ना नाडी आरंभ झाली.
४ आ ४. रागाची स्पंदने विशुद्धचक्रावर जाणवू लागली.
४ आ ५. डोक्यामध्ये थंडावा जाणवून बुद्धी शांत होणे आणि श्‍वास थोडा संथ होऊन मन शांत होणे

आणखी ३ – ४ मिनिटांनी मला रागाची स्पंदने डोक्यामध्ये जाणवू लागली आणि तेथे थंडावा जाणवू लागला. तेव्हा श्‍वास थोडा संथ झाला आणि मनाला शांत वाटू लागले.

४ आ ६. मणिपूरचक्रापर्यंत गोरखकल्याण रागाची स्पंदने पोहोचून संपूर्ण शरिरात थंडावा जाणवू लागणे आणि आणखी शांत वाटू लागणे

त्यानंतर गोरखकल्याण रागाची स्पंदने अनाहतचक्रावर पुन्हा जाणवू लागली. तेथे थंडावा जाणवू लागला. पुढे ती स्पंदने मणिपूरचक्रापर्यंत पोहोचून तेथेही थंडावा जाणवू लागला. तेव्हा संपूर्ण शरिराला थंड वाटू लागले आणि आणखी शांत वाटू लागले. शरीर हलके झाले.

४ आ ७. मान खाली झुकून माझे ध्यान लागू लागले.

४ इ. राग जोग

४ इ १. जोग राग आरंभ होऊन ७ मिनिटांनंतर सुषुम्ना नाडी कार्यरत होणे

जोग राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्यावर माझी चंद्रनाडी कार्यरत होऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होण्याकडे प्रवास आरंभ झाला. राग आरंभ होऊन ७ मिनिटांनंतर सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४ इ २. जोग रागाने आज्ञाचक्रावर परिणाम करून बुद्धीला शांत केल्याचे जाणवणे

माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने चक्राकार असल्याचे जाणवले. ‘या रागाने बुद्धीला शांत केले’, असे जाणवले. बुद्धी शांत झाली की, मनही आपोआपच शांत होते. तसे झाले की, उच्च रक्तदाब अल्प होतो.

४ ई. यमन, गोरखकल्याण आणि जोग या रागांच्या परिणामांचा सारांश

४ ई १. राग यमन आणि गोरखकल्याण यांमध्ये असलेले समानत्व अन् भेद

राग यमन आणि गोरखकल्याण या दोघांनी प्रथम अनाहतचक्र, त्यानंतर आज्ञाचक्र आणि शेवटी मणिपुरचक्र यांना थंडावा देऊन मन अन् बुद्धी यांना शांत केले. या दोन्ही रागांमध्ये भेद एवढाच की, यमन रागामध्ये शक्तीची, म्हणजे तेजतत्त्वाची स्पंदने अधिक आहेत, तर गोरखकल्याण रागामध्ये वायूतत्त्वाची स्पंदने अधिक आहेत. त्यामुळे गोरखकल्याण राग चालू असतांना शेवटी ध्यान लागले; पण यमन रागाच्या वेळी तसे झाले नाही.

४ ई २. जोग रागाने केवळ बुद्धीला शांत केले.
४ ई ३. सुषुम्ना नाडीचे कार्य

तिन्ही रागांनी सुषुम्ना नाडी कार्यरत केली. सुषुम्ना नाडी चालू असणे म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही नाकपुड्यांनी समान श्‍वास चालू असणे. सुषुम्ना नाडीमध्ये सर्वच कार्य करण्याची आणि समतोलत्व प्रदान करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ती कार्यरत झाल्यावर उच्च रक्तदाबावर लगेच नियंत्रण येते.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१.१०.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment