अनुक्रमणिका
- १. ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘रामराज्य’ यांविषयी विवेचन
- २. ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्य !
- ३. मेरुतंत्र नावाच्या ग्रंथात ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.
- ४. गुरुकुल पद्धतीद्वारे साधकांना मार्गदर्शन झाल्याने मानवाने सहस्रो वर्षे आनंदाने भौतिक आणि पारमार्थिक जीवन जगून मोक्षप्राप्ती करून घेणे
- ५. हिंदु राष्ट्रातील कार्य रामराज्याप्रमाणेच भेदभावरहित असणे
१. ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘रामराज्य’ यांविषयी विवेचन

हिंदूंचे कल्याण करणारे ते ‘हिंदु राष्ट्र’ ! मात्र हिंदूंचे खरे कल्याण ‘हिंदु राष्ट्र’ हे ‘रामराज्य’ होण्यात आहे ! काही राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधव हिंदु राष्ट्राकडे एका सीमित दृष्टीकोनातून पहातात, तर काही जण ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘रामराज्य’ हे एकाच अर्थाचे समजतात. या पार्श्वभूमीवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांनी ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘रामराज्य’ यांविषयी आध्यात्मिक स्तरावर केलेले विवेचन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना योग्य दृष्टीकोन देईल.
१ अ. हिंदु राष्ट्र – हिंदूंच्या हिताला प्राधान्य देणारी राज्यव्यवस्था !
‘भारत हिंदूबहुल असूनही आज धर्मांधांकडून हिंदू आणि हिंदूंचे उत्सव यांवर होणारी आक्रमणे, शासन अधिग्रहित देवळांच्या निधीतून अहिंदूंना देण्यात येणारे साहाय्य, शासन स्तरावर शाळांतून न दिल्या जाणार्या धर्मशिक्षणामुळे नैतिक अधःपतनाकडे झुकलेली हिंदूंची भावी पिढी इत्यादी समस्या हिंदूंसमोर आहेत. हे पालटण्यासाठी हिंदूंच्या हिताला प्राधान्य देणारी धर्माला अनुकूल असलेली राज्यव्यवस्था हवी. हेच ‘हिंदु राष्ट्र’ होय.
१ आ. रामराज्य – सत्त्वगुणी राज्यकर्ते आणि सत्त्वगुणी प्रजा यांचे राष्ट्र !
आपल्याला केवळ संवैधानिक पालट करून किंवा व्यवस्थेत पालट करून भारतदेश ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून ओळखला जावा एवढेच अपेक्षित नाही, तर आपल्याला भारतात रामराज्यासारखी लोककल्याणकारी आदर्श राज्यव्यवस्थाही हवी आहे. सत्त्वगुणी लोकांचे (सत्त्वगुणी राज्यकर्ते आणि सत्त्वगुणी प्रजा यांचे) राष्ट्र, हे खर्या अर्थाने ‘रामराज्य’ आहे. रामराज्याचा राजा साक्षात् भगवंत होता आणि प्रजाही सात्त्विक होती. सत्त्वगुणी म्हणजे सात्त्विक होण्यासाठी नियमितपणे साधना करावी लागते.
आदर्श राज्याचे नाव घेतले की, आजही रामराज्यच डोळ्यांसमोर येते. रामराज्यात प्रभु श्रीरामाप्रती श्रद्धा असल्यानेच सर्व अधिकारी, मंत्री इत्यादी सुशासन करू शकत होते. आपल्यालाही ‘हिंदु राष्ट्रा’चे असेच सात्त्विक आणि आदर्श ‘रामराज्या’त रूपांतर करायचे आहे.
१ इ. ‘हिंदु राष्ट्रा’चे ‘रामराज्या’त रूपांतर होण्याची प्रक्रिया
येणारा काळ हा जगभर युद्धे, महामारी, पूर, भूकंप आदी आपत्तींचा काळ असणार आहे. हा आपत्काळ संपल्यावर भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल.
आपत्काळानंतर स्थापन होणार्या हिंदु राष्ट्रातील बहुतांशी हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयी केवळ भावनिक स्तरावरील आस्था असेल. ते साधना करणारे नसतील. अशा मानसिक स्तरावरील हिंदु राष्ट्राचे रामराज्यामध्ये रूपांतर होण्यासाठी अनुमाने ८० वर्षांचा कालावधी लागेल. त्या काळातील नवीन पिढ्या साधना करून सात्त्विक होतील. त्यानंतर रामराज्य येईल. ही प्रक्रिया सध्याच्या हिंदु राष्ट्र आणण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत ५० टक्के सोपी असेल. सध्या केवळ पाव ते अर्धा टक्के लोक साधना करतात. रामराज्य येण्यासाठी ५० टक्के लोकांनी तरी साधना करणे आवश्यक आहे; कारण ‘रामराज्य’ म्हणजे ‘सात्त्विक लोकांचे राज्य’ !’
हे स्थापन होणारे राज्य ‘कलियुगातील रामराज्य’ असणार. त्यावर कलीचा प्रभाव हा असणारच. या रामराज्याच्या काळात राज्यकर्ते आणि प्रजा हे दोघेही श्रीरामाप्रमाणे पूर्णतः सात्त्विक नसल्यामुळे ते संपूर्णतः आदर्श रामराज्य होण्यासाठी सर्वांनी आदर्श साधना करणे आवश्यक आहे.
‘त्रेतायुगातील रामराज्य हे पौर्णिमेचा चंद्र, असे समजल्यास आता येणारे रामराज्य हे केवळ शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेचा चंद्र, या प्रमाणात असेल !’’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.४.२०२६)
१ ई. ‘हिंदु राष्ट्रा’चे ‘रामराज्या’त रूपांतर करणे, हे ध्येय असणे
‘वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या हिंदूंमध्ये साधना करणार्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्यांच्याद्वारे स्थापन होणारे राष्ट्र हे ‘हिंदु राष्ट्र’ असेल. यासाठीच ग्रंथात अधिकतर ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द वापरला आहे. मात्र सर्वच हिंदूंनी साधना समजून घेऊन ती आचरणात आणून ‘हिंदु राष्ट्रा’चे ‘रामराज्या’त रूपांतर करणे, हेच गुरुदेवांना अपेक्षित आहे. गुरुदेवांच्या मार्गदर्शनातील हिंदु राष्ट्राचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन धर्मसेवकांनी रामराज्याच्या निर्मितीत सहभागी व्हावे.’ – (पू.) संदीप आळशी
२. ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्य !

‘अखिल मानवजातीच्याच नव्हे, तर सर्व सजीव प्राण्यांच्याही उद्धारासाठी लाभदायक असणारे ‘हिंदु राष्ट्र !’, ही नेमकी संकल्पना समजून न घेता विरोधक, धर्मद्रोही आणि त्यांचे लांगूलचालन करणार्या वृत्तवाहिन्या त्याच्या विरोधात बोलत आहेत अन् सर्वसामान्य हिंदूंनाही भडकवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे नेमके काय ?, हे पुढे दिले आहे.
२ अ. साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारे ते ‘हिंदु’!
मानवाचा जन्म साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठीच झाला आहे, जेणेकरून त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांत पुन्हा अडकावे लागू नये. यासाठी हिंदु धर्मामध्ये जिवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणार्यांना ‘हिंदू’ म्हटले आहे.
३. मेरुतंत्र नावाच्या ग्रंथात ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.
३ अ. विश्वातील सर्व सजीव प्राण्यांचा उद्धार करण्यासाठी निर्माण होणारे ते हिंदु राष्ट्र !
‘हीनं दूषयति इति हिन्दुः।’, म्हणजेच ‘जो स्वतःतील दोष आणि अहं दूर करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे, तो हिंदू !’ अशा प्रकारे साधना करणारा साधक हा सर्व जिवांचे कल्याण करणाराच असतो. अशा प्रकारे विश्वातील सर्व सजीव प्राण्यांचा उद्धार करण्यासाठी निर्माण होणारे ते ‘हिंदु राष्ट्र’ ! यात सर्व जीव साधक म्हणूनच कार्यरत रहातील.
४. गुरुकुल पद्धतीद्वारे साधकांना मार्गदर्शन झाल्याने मानवाने सहस्रो वर्षे आनंदाने भौतिक आणि पारमार्थिक जीवन जगून मोक्षप्राप्ती करून घेणे
भारतात पूर्वी अशा प्रकारे गुरुकुल पद्धतीद्वारा साधकांना मार्गदर्शन करून आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध केले जात असे. ऋषींनी भगवंताच्या आदेशानुसार या पद्धतीनुसार ४ वेद, ४ आश्रम, ४ वर्ण आणि ४ पुरुषार्थ यांची सांगड घालून समाजाची पायाभरणी केली. त्यामुळे मानवाने सहस्त्रो वर्षे आनंदाने भौतिक आणि पारमार्थिक जीवन जगून मोक्षप्राप्ती करून घेतली.
५. हिंदु राष्ट्रातील कार्य रामराज्याप्रमाणेच भेदभावरहित असणे
रामाने राज्य करतांना ‘प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, यासाठीच राज्य केले. रामराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळे आजही रामराज्याचे गुणगान गायले जाते. याप्रमाणेच हिंदु राष्ट्रातील कार्य रामराज्याप्रमाणेच असणार आहे.’
– प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.५.२०१६)
दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !
भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !
राष्ट्राची समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे...