भाव आणि भावाचे प्रकार

अनुक्रमणिका

संतांचा ईश्वराप्रती असलेला उत्कट भाव
संतांचा ईश्वराप्रती असलेला उत्कट भाव

व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे शिष्यभाव, कृतज्ञताभाव, शरणागतभाव, वात्सल्यभाव, बालकभाव, गोपीभाव, सख्यभाव, दास्यभाव, द्रौपदीभाव अशा भगवंत किंवा गुरु यांच्याशी नाते सांगणाऱ्या भावावस्था असतात.

१. भाव म्हणजे काय ?

भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणे. भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ. भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा.

देवाच्या अस्तित्वाची जाणीव सातत्याने होण्यासाठी साधक विविध प्रकारचे प्रयत्न करतात. आत्मनिवेदन, काही सेकंदाचे भावप्रयोग, काही मिनिटांच्या भावार्चना, कृतीला भाव जोडणे, श्रीकृष्ण किंवा गुरु यांच्याशी सतत बोलणे, प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करणे, ‘आता देवाला काय अपेक्षित आहे’, असा विचार करून कृती करणे, देवाचे किंवा गुरूंचे अस्तित्व सतत अनुभवायचा प्रयत्न करणे, स्वतःमध्येच गुरु किंवा देव यांचे अस्तित्व अनुभवणे, मानसपूजा किंवा आरती करणे असे विविध प्रकारे भाव ठेवून सनातनचे साधक भावजागृतीसाठी प्रयत्न करतात. भावजागृतीच्या या विविध प्रयत्नांनी ईश्वराशी अनुसंधान वाढवण्याची किंवा त्याचे अस्तित्व अनुभवण्याची जाणीव मनाला करून दिली जाते !

 

२. भाव कसा ओळखावा ?

‘साधकाचा ईश्‍वराप्रती खूप भाव असल्यास आणि तो व्यक्‍तही होत असल्यास त्याला ईश्‍वराची आठवण येऊन रडू येते. तो त्याच्या भेटीसाठी व्याकूळ होतो. त्याला ईश्‍वराचे अस्तित्व सतत जाणवते. सूक्ष्म-सुगंध, सूक्ष्म-दर्शने, सूक्ष्म-नाद इत्यादी अनुभूती येतात; परंतु या अनुभूती क्षणिक असतात. त्यामुळे साधकाचा भाव सातत्याने टिकून रहात नाही. साधक हा त्याच्या जीवनातील अनेक प्रसंगांत भावनेच्या पातळीवर राहूनच निर्णय घेत असतो आणि त्यानुसार कृती करत असतो.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.१२.२००४, सकाळी ८.४५)

३. भावाचे महत्त्व

न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये ।
भावे तु विद्यते देवो, तस्माद्भावो हि कारणम् ।।

अर्थ : देव लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या मूर्तीत नसतो. देव भावात असतो; म्हणून भाव महत्त्वाचा असतो.

‘अमृतप्राशनाने अमरत्व येते’, असे म्हणतात; पण अमरत्व जरी आले, तरी इच्छा-आकांक्षा या रहाणारच. त्यामुळे मायाजालात अडकूनच रहायला होते; पण जो जीव एकदा ‘भावा’चे अमृतप्राशन करतो, त्याची सर्व मोह-माया, जन्म-मरण यांच्या घोर चक्रातून मुक्ती होते. हे आहे भावाचे महत्त्व !

– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. भावाचे घटक आणि टक्के

१. प्रार्थना : २०
२. कृतज्ञता : १०
३. सेवा : १०
४. प्रीती : १०
५. आनंद : ३०
६. शांती : १०
७. इतर : १० टक्के

एकूण १०० टक्के

 

४. भाव कुणात निर्माण होतो ?

भाव निर्माण होण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी न्यूनतम ५० टक्के असायला लागते. पातळी ५० टक्के होण्यासाठी नामजप, सत्संग, सत्सेवा आदी साधनेतील घटक सातत्याने आचरणात आणावे लागतात. भाव निर्माण झाल्यानंतरही सतत भावावस्थेत रहाता येण्यासाठी साधना सतत करावी लागते.

 

५. भाव निर्माण होण्यातील अडथळे !

अज्ञान, कर्तेपणा, अहं, दोष आणि बुद्धीचा अनावश्यक वापर

संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘भावजागृतीसाठी साधना’

६. व्यष्टी साधनेसाठी साक्षीभाव,
तर समष्टी साधनेसाठी शरणागत भाव आवश्यक

‘साधकाची आध्यात्मिक उन्नती झाल्यावर त्याची मायेकडे असणारी ओढ अल्प होते आणि इतरांकडून अपेक्षाही अल्प होतात. त्यामुळे अशा साधकात साक्षीभाव निर्माण होतो आणि तो प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पहाण्यास शिकतो. व्यष्टी साधनेच्या दृष्टीने साक्षीभाव असणे अत्यंत योग्य आहे; परंतु समष्टी साधना करण्यासाठी साक्षीभाव सातत्याने जोपासणे योग्य नाही. साक्षीभाव जोपासल्याने समष्टीच्या हितासाठी आवश्यक अशी सेवा साधकाकडून होणार नाही. यासाठी साक्षीभावाच्याही पुढे जाऊन साधकाने स्वतःचे कर्तव्य निरपेक्षपणे पूर्ण करणे ईश्‍वराला अपेक्षित आहे. (याला ज्ञानोत्तर कार्य म्हणतात.) समष्टीसाठी सेवा करतांना समाज आणि वाईट शक्‍ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होण्याचा संभव असतो. यासाठी साधकाने ईश्‍वराला पूर्णपणे शरण जाऊन समष्टी सेवा करावी. शरणागत भावामुळे अतिशय अवघड असे कार्य साधकांकडून सहजतेने होऊ शकते; कारण शरणागत भाव जोपासणार्‍या साधकाच्या माध्यमातून साक्षात ईश्‍वरच कार्य करतो. यासाठी साधकाच्या दृष्टीने मायेपासून अलिप्त रहाण्यासाठी प्रथम साक्षीभाव येणे आवश्यक आहे आणि त्यानंतर समष्टी साधना परिणामकारक करण्यासाठी शरणागत भाव येणे आवश्यक आहे.’
– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २२.११.२००५, सकाळी ११.१५ ते ११.२०)

 

७. आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे आणि व्यक्‍त अन् अव्यक्‍त भाव

‘व्यक्‍त भाव म्हणजे ईश्‍वराशी द्वैत आणि अव्यक्‍त भाव म्हणजे ईश्‍वराशी अद्वैत. साधकाला हळूहळू अव्यक्‍त भावाकडे जायचे आहे.

१. प्राथमिक टप्प्याच्या साधकाचा भाव जागृत झाला की, त्याला अनुभूती येते.

२. पुढच्या टप्प्याला साधकाचा भाव सातत्याने जागृत होऊ लागला की, साधकाचा भाव कधी नामजपातून व्यक्‍त होतो, तर कधी डोळ्यांसमोर दिसणार्‍या प्रकाशातून व्यक्‍त होतो.

३. आणखी पुढच्या टप्प्याला हाच भाव श्‍वासात व्यक्‍त होऊ लागतो. त्या वेळी साधकाचे लक्ष श्‍वासावर असते.

४. पुढे पुढे साधक व्यक्‍त भावातून अव्यक्‍त भावाकडे जाऊ लागतो. त्या वेळी त्याचा भाव ना नामातून ना श्‍वासातून, कशातूनच व्यक्‍त होत नाही आणि त्याला येणार्‍या अनुभूतींचे प्रमाणही हळूहळू घटते.’

– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.१२.२००३, दुपारी १२.३३)

 

८. व्यक्त भावाची लक्षणे

भाव व्यक्त होण्याची ८ लक्षणे असून त्यांना `अष्टसात्त्विक भाव’ असे संबोधिले जाते. ती लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. स्तंभ (स्तंभित होणे)

२. स्वेद (घाम येणे)

३. रोमांच

४. वैस्वर्य (स्वरभंग)

५. कंप

६. वैवर्ण्य (वर्ण पालटणे)

७. अश्रूपात

८. प्रलय-चेष्टा निरोध (मूर्च्छा येणे)

बहुतांशी साधकांना देवाच्या आरतीच्या वेळी अथवा गुरु / ईश्वर यांचे स्मरण झाले असता वा त्यांच्या  संदर्भातील अन्य एखाद्या कारणामुळे डोळ्यांतून पाणी येते. हे भावाच्या वर दिलेल्या आठ लक्षणांपैकी ‘अश्रूपात’ हे लक्षण होय. आठही लक्षणे जेव्हा दिसून येतात, तेव्हा ‘अष्टसात्त्विक भाव’ जागृत झाला, असे म्हणतात.

अ. व्यक्त भाव निर्माण होण्यासाठी करावयाचे काही प्रयत्न

१. पूजापाठ, आरती, धार्मिक विधी, नमस्कार यांसारख्या धर्माचरणाच्या कृती

२. प्रार्थना : प्रार्थनेत भक्ताची असमर्थता व्यक्त होत असते आणि तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.

३. कृतज्ञता : प्रार्थना याचा दुसरा अर्थ शरणागती आणि शरणागतीची प्रक्रिया कृतज्ञता व्यक्त केल्याविना पूर्ण होत नाही; म्हणून प्रत्येक कृती केल्यावर कृतज्ञताव्यक्त करावी.

४. नामजप : भगवंताशी सतत अनुसंधान ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या नामाचा अखंड जप करणे.

५. देवाशी मध्ये मध्ये बोलणे : दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग, घटना घडत असतात. त्यांच्यामुळे आपल्या मनात येणारे विचार, प्रतिक्रिया, समस्या इत्यादी देवाला सांगाव्यात. ‘त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव’, असा भाव ठेवून प्रत्येक गोष्ट देवाला सांगितल्यामुळे देवाविषयीचे प्रेम वाढते आणि त्यामुळे देवाप्रती भाव वाढतो.

 

९. अव्यक्त (अप्रकट) भाव

अ. व्याख्या

‘आपल्यातील भाव जागृत असतो; परंतु तो कोणतीही भावना, विचार किंवा कृती यांद्वारे व्यक्त होत नाही. आपल्या अंतर्मनात त्याचे अस्तित्व असते. असा भाव म्हणजे अव्यक्त भाव.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १९.३.२००५, दुपारी १२.३०) आणि ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २५.७.२००५, सायंकाळी ६ ते ६.०४)

आ. अव्यक्त भाव निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे काही घटक

१. गुरुकार्याविषयी आत्यंतिक तळमळ असणे : ‘गुरूंच्या प्रत्यक्ष देहाची सेवा ही सगुणाची सेवा आहे, तर त्यांच्या समष्टी कार्याची सेवा (धर्मसेवा) ही निर्गुणाची सेवा आहे. साधकातील निर्गुणाच्या सेवेविषयी असलेल्या तळमळीतून अव्यक्त भाव निर्माण होतो.

२. प्रत्येक कर्म परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, म्हणजे ‘कर्म कौशल्याने, अर्थात परिपूर्ण करणे, हा योगच (साधनाच) आहे.’ केवळ सेवाच नव्हे, तर प्रत्येकच कर्म परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला की, अव्यक्त भाव लवकर निर्माण होतो.

३.‘दिसेल ते कर्तव्य’ या वचनानुसार समोर आलेले कर्म अपेक्षारहित भावाने चांगले होण्यासाठी प्रयत्न करण्याने अव्यक्त भाव निर्माण होतो.

४. अंतर्मनातून साधनेचे प्रयत्न असणे : साधना करतांना प्रत्येक कृतीतून मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग नकळत होत असणे, म्हणजे साधना अंतर्मनातून होत असणे होय.

संदर्भ : सनातन – निर्मित ‘भावाचे प्रकार आणि जागृती’

 

१०. भाव कसा असावा ?

१. ‘मी भगवंताचे ऐकत आहे’, असा भाव ठेवावा.

२. प्रार्थना करतांना ‘आपण देवाच्या चरणांजवळ बसून किंवा चरणांवर डोके ठेवून प्रार्थना करत आहोत’, असा भाव ठेवावा.

३. प्रार्थना करतांना आपल्यात देवाचे तत्त्व जागृत होते आणि चारही मुक्ती प्राप्त होतात. त्यामुळे ‘ही प्रार्थना मला मोक्षाला नेणार आहे’, असा भाव हवा.

४. प्रार्थना गोड स्वरात, संथ आणि एका लयीत करावी. त्यामुळे भावजागृती होऊन भाव टिकून रहातो.

– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी  ६६ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२०)

१. ‘मी श्रीकृष्णाशी बोलतांना ‘तो माझ्या समवेतच आहे’, असे वाटते.

२. मी एखाद्या दिवशी बोलायचे विसरले, तर ‘तो माझ्यावर रुसून दूर निघून गेला आहे’, असे वाटते. त्यानंतर त्याचा राग घालवण्यासाठी मला त्याची पुष्कळ मनधरणी करावी लागते.

३. काही चूक करून मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘तो माझ्याकडे रागावून पहात आहे’, असे जाणवते. जेव्हा मी सकाळी उशिराने उठते, तेव्हा तो माझ्याकडे रागाने पहातो.

४. मी नामजप करून श्रीकृष्णाच्या चित्रासमोर जाते. तेव्हा ‘तो माझ्याकडे पाहून मधुर हसत आहे आणि तो माझ्यावर पुष्कळ प्रसन्न आहे’, असे जाणवते.’

– कु. पूजा आचार्य, जिल्हा चिक्कमगळूर, कर्नाटक. (१७.११.२०१८)

 

११. श्रद्धेचे भक्तीत रूपांतर करणारा तो भाव होय !

‘भाव तेथे देव’ अशी म्हण आहे. ‘श्रद्धा तेथे देव’ अशी नाही. भाव हा श्रद्धा आणि भक्ती यांच्या दरम्यान असतो. श्रद्धा ही प्राथमिक स्वरूपाची म्हणता येईल. ‘जो विभक्त नाही तो भक्त’, ही अद्वैताची अवस्था आहे. श्रद्धेचे भक्तीत रूपांतर करणारा तो भाव होय ! बुद्धी हा भावाचा घटकच नाही. त्यामुळे भाव हा नेहमी ‘भोळा भाव’ असतो.

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘शिष्य’

 

१२. भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होते !

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘भावाचे प्रकार आणि जागृती’

 

१३. भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो

‘नाथा तुझ्या पायी जैसा ज्याचा भाव । तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या ॥’, असे भावाचे महत्त्व प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्णिले आहे.
ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणाऱ्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

१४. भावामुळे अहं न्यून होण्याचे प्रयत्न चालू होतात !

आपण आपले मन भावाच्या माध्यमातून ईश्वराला अर्पण करू शकतो. भावनिर्मितीमुळे आपले मन ईश्वरचरणी लीन होऊन आपली आध्यात्मिक उन्नती स्थुलातून सूक्ष्माकडे चालू होते. भावनिर्मिती झाल्यावर आपल्याला स्वतःतील ‘अहं’ची जाणीव अधिक प्रमाणात होऊ लागते. भावाच्या अस्तित्वासमवेतच आपल्याला स्वतःतील ‘अहं’च्या अस्तित्वाची जाणीवही होऊ लागते. भावामुळे आलेली आनंदाची अनुभूती अहं वाढल्याने घटते, हे साधकाला जाणवू लागते आणि त्याचे अहं-निर्मूलनाचे प्रयत्न वाढू लागतात.

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना खंड -१

Leave a Comment