हिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) आणि त्याचे लाभ !

१. प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जाणे !

‘हरिवंश’ पुराणात एक कथा येते. हैहय आणि तालजंघ वंशातील राजांनी शक, यवन, कांबोज, पारद इत्यादी राजांच्या साहाय्याने बाहू राजाचे राज्य हिरावून घेतले. बाहू राजा त्याच्या पत्नीसह वनात निघून गेला. तेथे बाहू राजाचा मृत्यू झाला. और्व महर्षींनी राजाच्या गर्भवती पत्नीचे रक्षण करत तिला स्वतःच्या आश्रमात आणले. तेथे तिने एका पुत्राला जन्म दिला, जो पुढे सगर राजाच्या नावाने प्रसिद्ध झाला. सगर राजाने और्व मुनींकडून शस्त्र आणि शास्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले.

कालांतराने सगर राजाने हैहयांना मारून टाकले आणि शक, यवन, कांबोज, पारद इत्यादी राजांनाही ठार करण्याचा निश्‍चय केला. शक, यवन इत्यादी राजे वसिष्ठ ऋषींना शरण आले. वसिष्ठ ऋषींनी काही अटींवर त्यांना अभयदान दिले आणि सगर राजाला आज्ञा केली की, त्याने यांना मारू नये. सगर राजा आपली प्रतिज्ञा सोडू शकत नव्हता आणि वसिष्ठ ऋषींची आज्ञासुद्धा टाळू शकत नव्हता; म्हणून त्याने त्या राजांचे शेंडीसहित मुंडन करून त्यांना सोडून दिले.

प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जात होते. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.

 

२. आधुनिक विज्ञानही आता शेंडीचे महत्त्व स्वीकारते !

२ अ. डॉ. हाय्वमन

‘‘मी अनेक वर्षे भारतात राहून भारतीय संस्कृतीचे अध्ययन केले आहे. येथील निवासी प्रदीर्घ काळापासून डोक्याला शेंडी ठेवतात, जिचे वर्णन वेदांमध्येही मिळते. दक्षिण भारतात तर अर्ध्या डोक्यावर गोखुरासारखी शेंडी ठेवतात. त्यांच्या बुद्धीची विलक्षणता पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. निश्‍चितच बौद्धिक विकासात ही शेंडी पुष्कळ साहाय्यक ठरते. शेंडी ठेवणे अत्यंत लाभदायी आहे. माझा हिंदु धर्मावर प्रगाढ विश्‍वास आहे आणि मी शेंडी ठेवण्याचा समर्थक आहे.’’

२ आ. प्रसिद्ध विद्वान डॉ. आय.ई. क्लार्क (एम्.डी.)

‘‘मी जेव्हापासून प्राचीनकाळच्या विज्ञानाचा शोध घेतला, तेव्हापासून माझा विश्‍वास बसला की, हिंदूंचे प्रत्येक नियम वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत. शेंडी ठेवणे हिंदूंचा धर्मच नव्हे, तर सुषुम्नेच्या केंद्रांच्या रक्षणासाठी ऋषी-मुनींच्या शोधाचा विलक्षण चमत्कार आहे.’’

२ इ. पाश्‍चात्त्य विद्वान अर्ल थॉमस

थॉमस लिहितात, ‘‘सुषुम्नेचे रक्षण हिंदु लोक शेंडी ठेवून करतात. या उलट इतर देशांतील लोक डोक्यावर लांब केस ठेवून किंवा टोपी घालून करतात. यापैकी शेंडी ठेवणे सर्वांत लाभदायी आहे.’’

 

३. शेंडीमुळे मनुष्याचे रक्षण होणे

मानवी शरीर प्रकृतीने इतके सुदृढ बनवले आहे की, ते मोठमोठे आघात सहन करूनही जिवंत रहाते; परंतु शरिरात काही अशीही स्थाने आहेत, ज्यांच्यावर आघात झाल्याने मनुष्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. यांना ‘मर्म-स्थान’ म्हटले जाते. शिखेच्या अधोभागातही मर्मस्थान असते, ज्याविषयी सुश्रुताचार्य यांनी लिहिले आहे की,

मस्तकाभ्यन्तरो परिष्टात् शिरा संधि सन्निपातो ।
रोमावर्तो धिपतिस्तात्रापि सद्यो मरणम् ॥

अर्थ : डोक्यावर जेथे केसांचा भोवरा असतो, त्याखाली आतील भाग नसा आणि सांध्यांशी संबंधित असतो, त्याला ‘अधिपतिमर्म’ म्हटले जाते. तेथे मार लागल्यास तत्काळ मृत्यू होतो. (सुश्रुत संहिता, शारीर स्थानम् ः ६.२८)

सुषुम्नेच्या मूळ स्थानाला ‘मस्तुलिंग’ म्हणतात. मेंदूशी कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा या पंचज्ञानेंद्रियांचा संबंध आहे आणि हात, पाय, गुदद्वार, गुप्तेंद्रिय इत्यादी कर्मेंद्रियांचा मस्तुलिंगाशी संबंध आहे. मेंदू आणि मस्तुलिंग जितके सामर्थ्यशाली असतात, तितकेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचे सामर्थ्य वाढते. मेंदूला शीतलता हवी असते, तर मस्तुलिंगाला उष्णता ! मेंदूला शीतलता प्रदान करण्यासाठी मुंडण करणे आणि मस्तुलिंगाला उब देण्यासाठी गोखुराच्या मापाचे केस ठेवणे आवश्यक असते. केस कुवाहक आहेत; म्हणून शेंडीचे लांब केस बाह्य अनावश्यक उष्णता अथवा थंडीपासून मस्तुलिंगाचे रक्षण करतात.

 

४. शेंडी ठेवल्याने होणारे इतर लाभ

अ. शेंडी ठेवल्याने, तसेच शेंडीच्या नियमांचे यथोचित पालन केल्याने सद्बुद्धी आणि सद्विचार यांची प्राप्ती होते.

आ. आत्मशक्ती प्रबळ बनून रहाते.

इ. मनुष्य धार्मिक, सात्त्विक आणि संयमी बनून रहातो.

ई. लौकिक आणि पारलौकिक कार्यात यश मिळते.

उ. सर्व देवता मनुष्याचे रक्षण करतात.

ऊ. सुषुम्नेच्या रक्षणाने मनुष्य निरोगी, बलवान, तेजस्वी आणि दीर्घायु होतो.

ए. नेत्रदृष्टी सुरक्षित रहाते.

 

५. हिंदूंनो, आपल्या महान धर्माचा त्याग करू नका !

अशाप्रकारे धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक सर्वच दृष्टीकोनांतून शेंडीचे विशेष महत्त्व लक्षात येते; परंतु आजकाल हिंदु लोक पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाने ‘फॅशनेबल’ दिसण्याच्या स्पर्धेत शेंडी ठेवत नाहीत आणि आपल्याच हातांनी हिंदु धर्म अन् संस्कृती यांचा त्याग करतात. लोक हसतील, मूर्ख म्हणतील, तर ते सहन करा; पण धर्माचा त्याग करू नका ! प्रत्येक मानवाचे कल्याण इच्छिणारी आपली हिंदु संस्कृती नष्ट होत आहे. हिंदू स्वतःच स्वतःच्या संस्कृतीचा नाश करू लागले, तर रक्षण कोण करेल ?’

संदर्भ : ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६

Leave a Comment