निसर्गाच्या होणार्‍या सर्वनाशाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य विचारधन

स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन पिढ्यांत भारतीय पर्यावरणाचा सर्वनाश
करून पुढील कित्येक पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे स्वार्थी राज्यकर्ते !

‘पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीव घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्‍या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते; मात्र स्वातंत्र्यानंतर ‘निधर्मी’ भारतात त्यांची विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल चालू झाली. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

 

१. वृक्षांचा नाश (भूमी आणि वायू प्रदूषित होण्याचे कारण)

एकेकाळी भारतात सर्वत्र वनराई असायच्या. लाकडाच्या मोहापायी राज्यकर्त्यांनी इतकी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे की, देश उजाड झाला आहे. वृक्षांमुळे वायूचे शुद्धीकरण व्हायचे. आता वृक्षच नसल्यामुळे प्रदूषित हवाच घ्यावी लागते. वृक्षांमुळे निर्माण होणार्‍या गारव्याने पृथ्वीवरील वायूमान थंड असायचे. आता ते तापमान ‘ग्लोबल वार्मिंग’च्या रूपात वाढत आहे. वृक्षांचा नाश केल्याने देशातील भूमीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.

 

२. नद्यांचा नाश (अशुद्ध पाणी)

सर्वत्रच्या नद्यांमध्ये सोडले जाणारे कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी आणि नगरांचे मैल्याचे सांडपाणी यांमुळे नद्यांचे मोठ्या गटरांत रूपांतर झाले आहे. नद्या प्रदूषित बनल्याने शुद्ध पाणीही मिळणे कठीण झाले आहे.

 

३. भूमीचा नाश

३ अ. भूमी नापीक होणे

राज्यकर्त्यांनी रासायनिक खतांना प्रोत्साहन दिल्याने कृषीभूमी काही काळानंतर नापीक होत आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या वस्तूंना प्रोत्साहन दिले गेल्याने सर्वत्र सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. एका प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यास १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी व्यय होतो. या काळात त्या प्लास्टिकचे विघटन होऊन मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक बाहेर पडतात. त्यामुळे त्या भागातील भूमी नापीक होण्याची प्रक्रिया चालू होते. नद्यांंमध्ये फेकलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या कचर्‍याचा परिणाम नदीच्या जलराशीतील प्राण्यांवर होतो. प्लास्टिकयुक्त पाणी शेतीला दिले गेल्यास त्या भूमीच्या धारणक्षमतेवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

३ आ. खनिज संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर

अरब देशांतील तेल संपुष्टात येणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील खनिज संपत्तीही आगामी काळ लक्षात घेऊन खाणींचे नियोजन न केल्याने संपुष्टात येणार आहे.

 

४. गोधनाचा नाश

वर्ष १९४७ मध्ये ९० कोटींहून अधिक असलेले गोधन आता केवळ १ कोटी उरले आहे. गायींची पशूवधगृहात कत्तल करून त्यांचे मांस विकून अब्जावधी रुपये कमावणारे राजकारणी पुढील पिढीला गायीचे चित्र दाखवून ‘हिला गाय म्हणतात’, असे सांगतील आणि विदेशातून दुधाची भुकटी आयात करतील !

 

५. पक्ष्यांचा नाश

घराघरांवर आणि नगरांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘मोबाईलच्या टॉवर्स’मधून बाहेर पडणार्‍या विकिरणांच्या (‘रेडीओ फ्रिक्वेन्सी रेज’च्या) तरंगांमुळे चिमण्यांची प्रजाती नष्ट होत आहे. एकेकाळी सर्वाधिक चिमण्यांचा देश असलेल्या भारतात आज हा पक्षीच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

या नाशांमुळे पुढे येणारा सर्वनाश टाळायचा असेल, तर ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेला पर्याय नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

हिंदूंनो, पर्यावरण रक्षणासह रज-तमाचे प्रदूषणही नष्ट करा !

पृथ्वीच्या र्‍हासाचा प्रारंभ भौतिकवादामुळेच झाला. १०० वर्षांपूर्वी पर्यावरणाची समस्याच नव्हती; कारण तेव्हा विज्ञानाचा अतिरेक नव्हता. हिंदु धर्माने ‘निसर्गातही ईश्‍वर पहा’, असे शिकवले असल्याने पूर्वीपासून वसुंधरेकडे ‘पृथ्वीदेवता’ म्हणून पाहिले जात. त्यामुळे पर्यावरणाची हानी करण्याचा विचारही कोणाच्या मनात शिवत नसे. या उदात्त शिकवणीमुळे आजही हिंदु समाज वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो. गोमाता, नंदी, नाग या प्राण्यांना दैवते मानतो. विज्ञानवादी मंडळी मात्र अशा कृतींना ‘अंधश्रद्धा’ म्हणून हिणवत आहेत. त्यांच्या भौतिकवादामुळे निसर्गाकडे देवता म्हणून पहाण्याचा दृष्टीकोनच क्षीण झाला आहे. त्यामुळे वसुंधरेच्या रक्षणासाठी खर्‍या अर्थाने आपणाला काही करायचे असेल, तर प्रथम वैैज्ञानिकतेच्या आडून होणारे विज्ञानवाद्यांचे हिंदु धर्मावरील आक्रमण आपणाला रोखायला हवे.

हिंदूंनो, प्रदूषणामुळे होणारी हानी दिसणारी असते; पण त्याहूनही भयानक संकट म्हणजे न दिसणारे रज-तमाचे प्रदूषण. आज मानव धर्मपालनापासून दूर गेल्यामुळे भोगवाद, स्वार्थ, सत्तालोलुपता यांनी थैमान घातले आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पाश्‍चात्त्यीकरण यांचा अतिरेक, हे सर्व सूक्ष्म स्तरावर होणार्‍या रज-तमाच्या प्रदूषणाचे दृश्य परिणाम आहेत. अतिरेकी आणि पृथ्वी ५० वेळा नष्ट होईल, इतकी अण्वस्त्रे निर्माण करण्याची तंटेखोर प्रवृत्ती निर्माण होण्यामागे हेच प्रदूषण कारणीभूत आहे. अणुबाँबहूनही अधिक हानी करणारे हे सूक्ष्मातील प्रदूषण रोखण्यासाठी स्थुलातील नव्हेत, तर आध्यात्मिक स्तरावरीलच उपाय करायला हवेत ! ‘जागतिक तापमान वाढी’वर ‘वृक्षतोड थांबवणे आणि झाडे लावणे’, हा उपाय आहे, तसाच रज-तमाचे प्रदूषण रोखण्यासाठी समाजाची सात्त्विकता वाढवणे, हाच एकमेव उपाय आहे आणि सात्त्विकता वाढवण्याचा ‘धर्माचरण’ हा एकच मार्ग आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदूने हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार करायला हवा. हा निर्धार करण्याची सद्बुद्धी प्रत्येक हिंदूला होवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment