परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार आणि कार्यासाठी दिलेले आशीर्वाद

विश्‍वभर अध्यात्मप्रसार

सर्वव्यापी अध्यात्मशास्त्र, ईश्‍वरप्राप्तीसाठीचे शिक्षण देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा शुभारंभ करतांना प.पू. डॉ. आठवले (वर्ष २०१४)

प.पू. भक्तराज महाराज यांनी मला वर्ष १९९२ ते १९९५ या काळात धर्मप्रसार करण्याचा आशीर्वाद दिला. प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढतच आहे.

१. वर्ष १९९२ : प.पू. बाबांनी मला सांगितले, आता महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करा.

२. वर्ष १९९३ : प.पू. बाबांनी सांगितले, आता भारतभर धर्माचा प्रसार करा.

३. वर्ष १९९५ : प.पू. बाबांनी सांगितले, आता जगभर धर्माचा प्रसार करा.या कार्यासाठी जणू आशीर्वाद म्हणून बाबांनी ख्रिस्ताब्द १९९३ मध्ये स्वतःच्या मोटारीचा झेंडा मला दिला आणि सांगितले, हा झेंडा लावून सर्वत्र प्रसार करायला फिरा ! 

या वेळी मी म्हटले, ‘‘बाबा, अमेरिकेत (अन्य देशांत) जाण्याचा खर्च कसा करणार आणि तिथे आपल्या ओळखीचेही कोणीच नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. तुम्ही नको जायला. अमेरिकाच तुमच्याजवळ येईल !’’

प.पू. बाबांचे बोल आज खरे झाले आहेत. मी कुठेही जात नाही; परंतु जगभरातील ३३ देशांतील साधक साधनेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. ते साधना आणि सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात येत असतात. जसे प.पू. बाबांनी सांगितले, तसेच घडत आहे. अगदी शब्दप्रमाण !   – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. भक्तराज महाराजांनी प.पू. डॉक्टरांना एकदा म्हटले, ‘‘अध्यात्मावरची छोटी छोटी पुस्तके लिहा. माझ्या गुरूंनी मला ‘तू किताबोंके उपर किताबे लिखेगा’, असा आशीर्वाद दिला होता; पण मी भजनांचे एकच पुस्तक लिहिले. तो आशीर्वाद मी तुम्हाला देतो.’’ आज त्या आशीर्वादाचा वटवृक्ष झाला आहे. मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे सध्या अनुमानाने ८,००० ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, इतके ज्ञान संग्रही आहे. याचे ग्रंथसंकलन पुढील ५० वर्षे, म्हणजे पुढील २ पिढ्या चालेल !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक
अधिकार स्पष्ट करणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वाद !

१. वर्ष १९८९ – प.पू. भक्तराज महाराज यांनी इतरांना नाम देण्यास सांगणे

‘वर्ष १९८९ मध्ये बाबांनी मला (डॉ. जयंत आठवले यांना) सांगितले, ‘‘आता लोकांना नाम देत जा !’’

२. वर्ष १९९१ – तो तर जीवनमुक्त आहे. !

माझ्या देखत बर्‍याचदा बाबा इतरांना म्हणाले, ‘‘तो तर जीवनमुक्त आहे.’’

३. वर्ष १९९२ – प.पू. बाबांनी डॉक्टरांना इतरांना नमस्कार करू देण्यास सांगणे

मुंबई येथे गुरुपौर्णिमेच्या वेळी दर्शनाला येणारे भक्त बाबांना नमस्कार करून शेजारी उभे असलेल्या मलाही नमस्कार करत होते. मी त्यांना ‘नमस्कार करू नका’, असे सांगू लागलो. तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘त्यांचा भाव आहे, तर करू दे.’’

४. वर्ष १९९३ – लोक याला (डॉक्टरांना) पूजतील !

बाबांनी माझ्याविषयी कु. सीमा गरुड यांना सांगितले, ‘‘लोक याला पूजतील !’’

५. वर्ष १९९५ – डॉक्टरांंची प्रगती करणारच !

मी बाबांनी बोललेले नेहमी लिहून घ्यायचो. बाबांचे इतर शिष्य मला हसायचे. या संदर्भात बोलतांना एकदा बाबा म्हणाले, ‘‘कुणी झाडाची पाने तोडतो, कुणी फांद्या तोडतो, कुणी झाडावर कुर्‍हाड चालवतो; पण माळी त्या झाडाला पाणी घालून वाढवतोच.’’ म्हणजे इतरांनी टीका केली तर, करू दे. बाबा मला शिकवून वाढवणारच ! (याच काळात माझ्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यावर वर्तमानपत्रांतून राजकारणी आणि बुद्धीप्रामाण्यवादी टीका करत होते.)

६. २०.३.१९९५ – डॉक्टरांचे लिखाण चिरंतन टिकणारे असेल !

मी : ‘जीवनात ध्येय नसले, तर जीवन जगायचे कशाला’, असा विचार मनात येतो; पण निराशा नाही, तर तृप्तीची, आनंदाचीच अनुभूती आहे.

बाबा : आता कोठे सूक्ष्म आनंद अनुभवता आहात. गुरुपौर्णिमेपर्यंत काय होते, ते बघा. त्यानंतर लिखाण आपोआप होईल आणि चिरंतन टिकणारे असेल !

७. २९.३.१९९५ : डॉक्टर, तुम्ही तर परमतत्त्व आहात !

मी : तुम्ही अतिशय अत्यवस्थ होता, तेव्हा मला वाईट वाटले नाही. तुमच्यासाठी इतरांप्रमाणे देवाकडे काही मागितले नाही कि तुम्ही बरे झाल्यावर सुख वाटले नाही.

बाबा : तुम्ही परमतत्त्व आहात. पहात रहा ! – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

८. तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले !

प.पू. भक्तराज महाराज प.पू. डॉक्टरांना एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही मला तन-मन-धन दिले. तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले.’’ तेव्हापासून माझ्या लक्षात आले की, आता मनात काही प्रश्‍नच उरले नाहीत.

९. वर्ष १९९० – मी पद्यात सांगितलंय, तेच डॉक्टर गद्यात सांगतात !

नरसोबाच्या वाडीला गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री परंपरेनुसार बाबांचे तेथील सभागृहात भजन होते. काही वेळाने मी, माझी पत्नी सौ. कुंदा आणि माझा भाऊ यांसह तिथे पोहोचलो. सभागृह संपूर्ण भरले होते; म्हणून आम्ही सगळे मागेच बसलो. एवढ्यात बाबांना माझी आठवण झाली. ‘डॉक्टर कुठे आहेत ? त्यांचे भाऊ कुठे आहेत ? कुंदाताई कुठे आहे ?’, अशी त्यांची विचारपूस चालू झाली. आम्ही उठून उभे राहिलो. बाबांनी आम्हाला पुढे येऊन बसायला सांगितले आणि माझी ओळख करून देतांना म्हणाले, ‘‘मी पद्यात सांगितलंय, तेच हे गद्यात सांगतात !’’

 

प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आशीर्वादस्वरूप दिलेल्या वस्तू

९.२.१९९५ – प.पू. भक्तराज महाराज यांनी सनातन संस्थेचे
कार्यालय गोव्यात असेल, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे होणे !

१. श्रीकृष्ण-अर्जुन असलेला रथ
अमृत महोत्सवाच्या वेळी प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेला चांदीचा श्रीकृष्णार्जुनाचा रथ (वर्ष १९९५)

८ आणि ९.२.१९९५ या दिवशी देवदुर्लभ असा प.पू. बाबांच्या अमृत महोत्सवाचा सोहळा झाला. त्यासाठी आम्ही सर्वांनी पुष्कळ श्रम घेतले होते. सोहळा झाल्यावर बाबांनी मला बोलावून घेतले आणि श्रीकृष्ण-अर्जुनाचे महत्त्व सांगितले. नंतर माझ्या हातात श्रीकृष्ण-अर्जुन असलेला चांदीचा एक रथ दिला आणि म्हणाले, ‘‘गोव्याला आपले कार्यालय होईल. तिकडे ठेवा !’’ ही गोष्ट पुढे मी विसरलो. पुढे सनातन संस्थेच्या सार्वजनिक (जाहीर) सभांसाठी आम्ही रथावरील श्रीकृष्ण-अर्जुनाचे चित्र व्यासपिठावर लावण्यासाठी करून घेतले. तेव्हा इतरांनी मला या प्रसंगाची आठवण करून दिली. ‘सनातन संस्थे’चे मुख्य कार्यालयही (आश्रमही) आता गोव्यातच आहे.- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भ्रमण कार्याची साक्षीदार असणारी ‘टेम्पो ट्रॅव्हलर ’ !
वर्ष १९९२ पासून या गाडीतून प.पू. भक्तराज महाराज यांनी सहस्रो कि.मी. भ्रमण केले. वर्ष २००७ पासून ही गाडी सनातन आश्रम, पनवेल येथे आहे. या चैतन्यदायी गाडीमुळे आध्यात्मिक उपाय होतात.
३. अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी स्वत:च्या मोटारीचा ध्वज देणे

१९९३ मध्ये ‘माझी गाडी जुनी झाल्यामुळे आणि नवीन गाडी घ्यायला पैसे नसल्यामुळे प्रसारासाठी सर्वत्र जाणे मला कठीण आहे’, असे प.पू. बाबांना सांगितल्यावर त्यांनी त्यांची अ‍ॅम्बॅसेडर गाडी मला दिली. या कार्यासाठी जणू आशीर्वाद म्हणून बाबांनी १९९३ मध्ये स्वतःच्या मोटारीचा झेंडा मला दिला आणि सांगितले, ‘‘हा झेंडा लावून सर्वत्र प्रसार करायला फिरा !’’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेवर कृपाछत्र धरणारे श्रीमद् सदगुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात