भक्तीयोगाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

अनुक्रमणिका

‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.

१. विविध योगमार्गांचे आध्‍यात्मिक महत्त्व !

१ अ. विविध योगमार्गांचा कर्मावर होणारा परिणाम

ज्ञानयोगामुळे परिपूर्णता, ध्‍यानयोगामुळे कर्मात एकाग्रता आणि अचूकता, कर्मयोगामुळे चिकाटी आणि कृतीशीलता अन् भक्‍तीयोगामुळे भावपूर्णता.

२. भक्‍तीयोगाचे आध्‍यात्मिक महत्त्व

‘भक्‍तीच्‍या माध्‍यमातून भगवंताशी अनुसंधान साधणे’, हे भक्‍तीयोगाचे वैशिष्‍ट्य आहे. भक्‍तीयोगी संतांमध्‍ये भगवंताविषयी भाव आणि भक्‍ती, सेवावृत्ती, त्‍याग, प्रीती, परेच्‍छेने वागणे, अहं अल्‍प असणे इत्‍यादी गुणवैशिष्‍ट्ये प्रकर्षाने आढळतात.

२ अ. भक्तीमार्गी जिवातील भावाचे रूपांतर भक्तीत आणि प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत झाल्यामुळे त्याच्या साधनेचा प्रवास सकाम साधनेकडून निष्काम साधनेकडे होऊन त्याला संतपद लवकर प्राप्त होणे

भक्तीयोगाने साधना करणार्‍या जिवामध्ये भगवंताप्रती बालकभाव, समर्पणभाव, दास्यभाव, सख्यभाव, सेवाभाव इत्यादी अनेक प्रकारचे भाव असतात. या भावामुळे त्याची पातळी अल्प असली, तरी भावामुळे त्याच्यावरील मायेचे किंवा अज्ञानाचे आवरण दूर होऊन तो भगवंताच्या अनुसंधानात चटकन आणि सहजतेने राहू शकतो. त्याचप्रमाणे भक्तीमार्गी जिवामध्ये प्रेमभावही असतो. त्यामुळे तो स्वत:च्या कोशात न अडकता इतरांचा विचार अधिक प्रमाणात करत असतो. अशा प्रकारे भक्तीमार्गी जीव इतरांचा विचार करून समष्टी रूपी ईश्वराच्या अनुसंधानात रहात असतो. भाव आणि प्रेमभाव या दोन्ही गुणांमुळे भक्तीमार्गी जिवाची व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे होऊन त्याचा अहं लवकर न्यून होऊ लागतो. परिणामी त्याच्यातील भावामुळे त्याला ईश्वराच्या चैतन्यलहरी आणि प्रेमभावामुळे ईश्वराच्या आनंदलहरी अधिक प्रमाणात ग्रहण करता येतात. त्याच्यातील भावामुळे ‘प्रत्येक कर्माचे कर्तेपणा स्वत:कडे घेणे’ आणि प्रेमभावामुळे ‘इतरांकडून अनेक अपेक्षा करणे’, हे अहंचे सूक्ष्म पैलू गळून पडतात. त्यामुळे भक्तीमार्गी जिवाची सकाम साधना संपुष्टात येऊन त्याची निष्काम साधना चालू होते. त्यामुळे त्याच्यातील व्यष्टी साधनेच्या स्तरावरील भावाचे रूपांतर भक्तीत आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत होऊन तो लवकर संतपद प्राप्त करतो. भक्तीमार्गी जिवातील भाव आणि भक्ती या गुणांमुळे तो भगवंताच्या सूक्ष्म रूपाशी अन् प्रेमभाव आणि प्रीती या गुणांमुळे तो भगवंताच्या व्यापक रूपाशी लवकर एकरूप होतो. त्यामुळे भगवंताला असा भक्त अतिशय प्रिय असतो.

उदा. प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील निस्सीम भक्तीमुळे त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला भरवलेला पेढा त्याने त्वरित ग्रहण केला. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्यातील निस्सीम भक्तीमुळे जेव्हा ते देवघरातील पितळ्याच्या मूर्तीच्या बाळकृष्णाला लोणी भरवत होते, तेव्हा पितळ्याच्या मूर्तीतील बाळकृष्णाने त्याचा उजवा हात वर उचलला. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्यातील प्रीतीमुळे त्यांना वाळवंटात पाण्यासाठी तडफडत पडलेल्या गाढवातील भगवंताच्या अंशाची अनुभूती आली आणि त्यांच्यामध्ये करुणाभाव जागृत झाला. त्यामुळे त्यांनी काशीहून आणलेल्या गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. तसेच जेव्हा एक कुत्रा भाकरीचा तुकडा घेऊन पळाला, तेव्हा ‘कुत्र्यातील भगवंताच्या अंशाला कोरडी भाकर खावी लागू नये’, म्हणून त्याला तूप देण्यासाठी संत नामदेव तुपाची बुदली घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावत गेले.

२ आ. भक्तीमार्गी जिवामध्ये असलेल्या सेवावृत्तीमुळे सेवकभाव आणि दास्यभाव जागृत झाल्यामुळे त्यांचा अहं न्यून होणे

प्रगट (स्थूल आणि व्यक्त) आणि अप्रगट (सूक्ष्म आणि अव्यक्त) असे अहंचे दोन प्रमुख प्रकार आहेत. अन्य योगमार्गीयांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवामध्ये सेवाभाव अधिक प्रमाणात असतो. तसेच तो इतरांची, गुरूंची आणि देवाची सेवा मनोभावे करत असतो. त्यामुळे त्याचा ‘प्रगट’ स्वरूपातील अहं लवकर न्यून होतो. जस जशी त्याची पातळी वाढत जाते, तस तसे त्याच्यातील सेवाभावाचे रूपांतर ‘दास्यभक्ती’त किंवा ‘सेवाभक्ती’त होऊन त्याच्यातील ‘अप्रगट’ स्वरूपातील अहं लवकर न्यून होतो. अशा प्रकारे अन्य योगमार्गी जिवांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवांचा अहं लवकर न्यून होतो. काही वेळा भक्तीमार्गी जिवावरील अविद्येचे आवरण दूर न झाल्याने त्याला ‘आपण श्रेष्ठतम भक्ती करतो’, असा भक्तीचा सूक्ष्म अहं निर्माण होऊ शकतो; परंतु त्याच्यावरील श्रीगुरुकृपेमुळे त्याचा सूक्ष्म अहंही नष्ट होतो.

२ इ. समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामुळे भक्तीमार्गी जिवामध्ये भगवंताप्रतीचा संपूर्ण शरणागतभाव जागृत होऊन त्याच्या अहंचा लय होणे

भक्तीमार्गी जीव भगवंताला लवकर शरण जाऊन त्याची काया, वाचा आणि मन यांनी केलेली सर्व कर्मे तो भगवंताला सहजरित्या अर्पण करतो. त्यामुळे या कर्मांच्या कर्तेपणाचा अहंकार न्यून होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेने होत असल्यामुळे त्याच्याकडून झालेल्या चांगल्या कर्माचा कर्तेपणा तो स्वत:कडे न घेता त्याचे श्रेय भगवंताला देतो. त्यामुळे त्याचा भगवंताविषयी कृतज्ञताभाव निर्माण होतो. समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामुळे भक्तीमार्गी जीव स्वत:चा मान, प्रतिष्ठा, प्रतिमा, कर्तेपणा इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला संपूर्ण शरण जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये संपूर्ण शरणागतभाव निर्माण होऊन त्यांच्या अहंचा लय होतो, उदा. संत तुकाराम महाराज गरिबीत आयुष्य जगत असूनही ते भगवंताप्रती कृतज्ञ होते. त्यांचे प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित होते. जेव्हा देहू येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांच्या कीर्तनात रंगलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोगल सैनिक आले, तेव्हा संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला संपूर्ण शरण गेले. तेव्हा त्यांची आर्तभावाने झालेली प्रार्थना ऐकून श्री विठ्ठल त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने शिवरायांची अनेक रूपे निर्माण केली. त्यामुळे मोगल सैनिकांना शिवाजीचे मूळ रूप कुठे आहे ? हे कळले नाही आणि खर्‍या शिवाजी महाराजांना मोगल सैनिकांच्या वेढ्यातून बाहेर पडता आले. या उदाहरणावरून सर्व प्रकारच्या भावांमध्ये शरणागतभाव सर्वश्रेष्ठ असल्याची प्रचीती आली.

२ ई. भक्तीमार्गी जिवाला परेच्छेने वागायची सवय लागल्यामुळे त्याचा मनोलय लवकर होऊन त्याने संतपद लवकर प्राप्त करणे आणि उर्वरित आयुष्य ईश्वरेच्छेने जगणे

भक्तीमार्गी जीव स्वेच्छा न जोपासता परेच्छेने वागण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे त्याचा मनोलय लवकर होऊन त्याची वाटचाल संतपदाकडे होते. संतपद प्राप्त केल्यावर भक्तीमार्गी जिवाला त्याच्यातील भक्तीमुळे ईश्वरेच्छेचे ज्ञान लवकर प्राप्त होते आणि तो त्याचे उर्वरित आयुष्य पूर्णपणे ईश्वरेच्छेने जगू लागतो.

२ उ. भक्तीयोगातील विविध टप्पे

देवावरील विश्वास, श्रद्धा, व्यक्त भाव, अव्यक्त भाव, सगुण भक्ती, निर्गुुण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे विविध आध्यात्मिक टप्पे आहेत.

२ ऊ. भक्तीयोगातील साधनेचे प्रकार आणि स्तर

भक्तीयोगातील साधनेचे ‘कर्मकांड, उपासनाकांड आणि भक्तीकांड’, असे विविध स्तर अन् प्रकार आहेत. त्याचप्रमाणे भक्तीयोगांतर्गत सकाम साधना आणि निष्काम साधना असेही दोन प्रमुख प्रकार आहेत. ३० ते ४५ टक्के पातळीचा भक्तीयोगी साधक कर्मकांडांतर्गत ‘मंत्रयोग’ अशी सगुण स्तरावरील साधना करत असतो. त्यामुळे त्याच्या साधनेचा प्रवास स्थूलातून सूक्ष्माकडे चालू होतो. जेव्हा त्याची पातळी आणखी वाढून ती ५० टक्के होते, तेव्हा तो उपासनाकांडाच्या अंतर्गत नामसंकीर्तनयोगानुसार नामजप करू लागतो. जेव्हा त्याची पातळी वाढून ती ७० टक्के होते, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रवास उपासनाकांडाकडून भक्तीकांडाकडे चालू होतो. तेव्हा त्याच्या साधनेचा प्रवास सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे चालू होतो. या पातळीला प्रथम तो भगवंताची सगुण भक्ती करू लागतो. त्यामुळे त्याला सगुण स्थूलदेहधारी संत किंवा गुरु आणि भगवंताचे सगुण रूप अधिक आवडू लागते. त्यामुळे त्याला सलोकमुक्ती, सरूप मुक्ती इत्यादी विविध प्रकारच्या मुक्ती मिळू लागतात. त्यानंतर त्याच्या सगुण भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीगुरु त्याच्यावर कृपावंत होतात. त्यामुळे त्याच्या भक्तीची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे चालू होते आणि तो निष्काम आणि निर्गुण भक्ती करू लागतो. अशा प्रकारे भक्तीमार्गी संतांची साधनेतील वाटचाल मुक्तीकडून मोक्षाकडे चालू होते.

संदर्भ – सनातनचा ग्रंथ : ‘भाव आणि भावाचे प्रकार’

 

३. भक्तीयोग आणि ज्ञानयोग

भक्तीयोगात मनाला आनंद जाणवतो, तर ज्ञानयोगात मिळालेल्या ज्ञानामुळे बुद्धीला आनंद जाणवतो.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.६.२०२३)

 

४. भक्तीयोगाचे अनन्यसाधारण महत्त्व

महर्षि व्यासांनी ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ग्रंथांची निर्मिती करून वेदांचे चार भागात विभाजन केले, ‘महाभारत’ हा जगातील सर्वांत मोठा काव्यरूपी ग्रंथ लिहिला.

श्लोक : ‘व्यासोच्छिष्ठम् जगत् सर्वम् ।’

अर्थ : याचा अर्थ ‘महर्षि व्यासांनी सर्व जग उष्टे केले आहे.’ अर्थात् त्यांनी इतक्या विविध विषयांवर लिखाण केले आहे की, त्यापेक्षा अधिक कुणी काही लिहूच शकत नाही. असे महर्षि व्यासांचे महत्त्व असल्यामुळे महर्षि व्यास संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत.

असे असूनही महर्षि व्यासांना मन:शांती लाभत नव्हती. तेव्हा देवर्षि नारदांनी त्यांना ज्ञानयोगाच्या तात्त्विक ज्ञानामुळे केवळ बौद्धिक समाधान मिळते; परंतु भक्ती केल्यामुळे मन:शांती मिळते’, हा मोलाचा उपदेश केला. त्यानुसार महर्षि व्यासांनी भक्तीरंगात रंगलेल्या श्रीविष्णूच्या लीलांचे वर्णन करणारा ‘श्रीमद्भागवत’ हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. तसेच विविध देवतांच्या लीलांचे वर्णन करणारी १८ पुराणेही लिहिली होती. भक्तीमय वाङ्मयाच्या निर्मितीमुळे महर्षि व्यासांच्या मनातील कोरडेपणा संपुष्टात येऊन त्यामध्ये परम पवित्र असणार्‍या भक्तीच्या झर्‍याचा उगम झाला आणि त्यांना मन:शांती लाभली. या उदाहरणातून भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येते.

कु. मधुरा भोसले

 

५. भक्तीयोगाला श्रीगुरुकृपेची जोड मिळाल्याने भक्तांना झालेला सूक्ष्म अहंकार श्रीगुरुकृपेने किंवा देवरूपी गुरुतत्त्वाने नष्ट होणे !

भक्तीमार्गाने साधना करणार्‍या जिवाला भक्तीचा अहंकार होऊ शकतो, तसेच तो गुरु किंवा देव यांच्या सगुण रूपात अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे भक्तीमार्गी जिवावर जेव्हा श्रीगुरूंची कृपा होते, तेव्हा त्याचा सूक्ष्म अहंकार नष्ट होतो.

५ अ. श्रीविष्णूने नारदाला वानरमुखी बनवून त्याचा अहंकार नष्ट करणे

एकदा नारदाला त्याच्या ब्रह्मचर्यव्रताचा अहंकार झाला होता. तो नष्ट करण्यासाठी श्रीविष्णूने एक लीला केली. श्रीविष्णूच्या कृपेमुळे देवर्षि नारदाच्या मनात ‘विश्वमोहिनी’ या राजकुमारीचे स्वयंवर जिंकून तिच्याशी विवाह करण्याचे विचार प्रबळ झाले. त्यासाठी त्याला अन्य राजकुमारांपेक्षा सुंदर रूप प्राप्त होण्यासाठी त्याने श्रीविष्णूला प्रार्थना केली. श्रीविष्णूने त्याच्यावर कृपा केली आणि त्याचे गर्वहरण करण्यासाठी त्याला वानरमुख प्रदान केले. त्यामुळे स्वयंवराच्या ठिकाणी नारदाची सर्वांनी उपेक्षा करून त्याची टिंगल केली. त्यानंतर तो रागारागाने वैकुंठात आल्यावर श्रीविष्णूने त्याला वानरमुख देण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर त्याचा राग शांत झाला आणि तो निरहंकारी झाला.

५ आ. श्रीकृष्णाच्या कृपेने गोपींचा सूक्ष्म अहं नष्ट होणे

रासलीलेच्या वेळी श्रीकृष्णाने प्रत्येक गोपीसमवेत एक रूप धारण करून प्रत्येक गोपीसह रासलीला केली. त्यामुळे प्रत्येक गोपीला वाटले की, श्रीकृष्ण केवळ तिच्या समवेतच होता. गोपींना अहंकार झाल्याचे लक्षात येताच, त्यांच्या समवेत असणारे श्रीकृष्णाचे रूप लुप्त झाले. गोपी श्रीकृष्णाला संपूर्ण वृंदावनात शोधू लागल्या; परंतु त्यांना श्रीकृष्ण कुठेच दिसला नाही. शेवटी त्या थकून यमुनाकिनारी बसून विलाप करू लागल्या आणि आर्ततेने श्रीकृष्णाला आळवू लागल्या. त्यानंतर श्रीकृष्ण त्यांच्यावर कृपावंत झाला आणि त्याने पुन्हा प्रत्येक गोपीसमवेत रूप धारण केले अन् उर्वरित रासलीला पूर्ण केली.

५ इ. गुरुदेव विसोबा खेचर यांच्या कृपेमुळे संत नामदेवाचे गर्वहरण होणे

एकदा सर्व विठ्ठलभक्त संत हे संत गोरोबांच्या घरी जमतात. तेव्हा ‘प्रत्येक संत साधनेत कितपत मुरलेला आहे ?’, हे पहाण्यासाठी संत गोरा कुंभार ज्याप्रमाणे भट्टीत भाजून निघालेले मडके नीट भाजले आहे का ? हे पडताळण्यासाठी त्याच्यावर काठी ठोकून पहातात, तसे ते प्रत्येक संताच्या डोक्यावर काठी ठोकून पहात होते. इतर संतांच्या संदर्भात संत गोरोबांनी ‘तुमचे मडके पक्के आहे,’ असे सांगितले; परंतु संत नामदेवांना ते थेठ विठ्ठलाशी बोलतात याचा त्यांना सूक्ष्म अहं असल्यामुळे संत गोरोबांनी सांगितले ‘तुमचे मडके कच्चे आहे.’ तेव्हा संत नामदेवांना पुष्कळ राग आला आणि ते तेथून निघून थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा श्री विठ्ठलाने त्यांना सांगितले, ‘‘ संत गोरोबांचे निदान योग्य आहे. तुला भक्तीचा अहंकार झाला आहे. तो दूर करण्यासाठी तू औंढा नागनाथ येथील शिवमंदिरात जा.’’ त्याप्रमाणे तेथे संत नामदेवांची भेट संत विसोबा खेचर यांच्याशी झाली आणि त्यांनी संत विसोबांना त्यांचे गुरु मानले. त्यानंतर संत नामदेवांवर गुरुदेव विसोबा खेचर यांची कृपा झाल्यामुळे संत नामदेवांचा भक्तीचा सूक्ष्म अहंकार नष्ट झाला.

५ ई. शिवाच्या सगुण रूपात अडकलेल्या संत नरहरी सोनार यांच्यावर झालेल्या शिवकृपेने त्यांचा सूक्ष्म अहंकार गळून पडणे आणि त्यांची श्री विठ्ठलावर भक्ती जडणे

संत नरहरी सोनार हे पंढरपुरातील संत परम शिवभक्त होते. त्यांना वाटत होते की, या जगात केवळ शिवच सर्वस्व आहे. त्यामुळे ते अन्य कोणत्याच देवाचे दर्शन घेत नव्हते आणि त्यांना मानत नव्हते. संत नरहरी सोनार यांचा हा सूक्ष्म अहं नष्ट करण्यासाठी शिवकृपेने एक लीला झाली. एका व्यक्तीने श्री विठ्ठलाला सोन्याचा कडदोरा अर्पण करण्याचा नवस केला होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी संत नरहरी सोनार यांच्याकडे येतो. हा नवस फेडण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीच्या कंबरेचे माप घेणे आवश्यक होते ; परंतु नरहरी यांचा पण होता की, ते शिवाशिवाय अन्य कोणत्याच देवाचे दर्शन घेणार नाहीत. त्यामुळे त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि ते श्री विठ्ठलाच्या मंदिरात गेले. तेथे जेव्हा ते श्री विठ्ठलाच्या कंबरेचे माप दोरीने घेत होते, तेव्हा त्यांना असे जाणवले की, ते शिवपिंडीलाच स्पर्श करत आहे. असे ३ – ४ वेळा झाल्यावर त्यांनी डोळ्यांची पट्टी बाजूला केली, तेव्हा श्री विठ्ठल दिसत होता आणि डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर पुन्हा शिवपिंडी दिसायची. त्यानंतर त्यांना शिवकृपेने ज्ञान झाले की, ‘शिव आणि विष्णु (श्रीविष्णूचे एक रूप श्री विठ्ठल) हे निराळे नसून एकच आहेत. त्यानंतर संत नरहरी सोनार यांचा सूक्ष्म अहंकार गळून पडला आणि त्यांची श्री विठ्ठलावर भक्ती जडली.

 

६. भक्तीयोगाला श्रीगुरुकृपायोगाची सांगड घातल्यास भक्तीमार्गी जिवाच्या संपूर्ण जीवनाचे परम कल्याण होणे

अशा प्रकारे वरील उदाहरणांतून लक्षात येते की, भक्तीमार्गी जीव जरी भाव किंवा भक्ती यांच्या बळावर भगवंताशी थेट अनुसंधान साधून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करत असला, तरी भक्तीमार्गियांचा सूक्ष्म अहंकार नष्ट होण्यासाठी त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच कलियुगात ‘नामची एक आधार’ असणारा भक्तीमार्ग साधनेच्या दृष्टीने श्रेष्ठ असला, तरी त्याला श्रीगुरुकृपायोगाची जोड मिळाली, तरच भक्तीमार्गी जीव मोक्षप्राप्ती करू शकतो; अन्यथा त्याला भक्तीचाच सूक्ष्म अहं होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती खुंटते किंवा अधोगती होऊ शकते. यावरून कलियुगामध्ये ‘श्रीगुरुकृपायोगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे’, हे आपल्या लक्षात येते.

 

७. अन्य योगमार्गांच्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करून संतपद गाठलेले अधिक प्रमाणात असण्यामागील विविध आध्यात्मिक कारणे

अशा प्रकारे भक्तीमार्गी साधकाचा प्रवास अनेकातून एकात येणे(अनेक देवांच्या उपासनेतून एका देवाची उपासना करणे), स्थूलातून सूक्ष्माकडे जाणे (कर्मकांडातून उपासनाकांडाकडे आणि उपासनाकांडातून भक्तीकांडाकडे), भक्तीच्या माध्यमातून मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय लवकर होणे, सकाम साधनेतून निष्काम साधनेकडे वाटचाल करणे (सापेक्ष म्हणजे ‘सकाम’ भक्ती न करता निरपेक्ष, म्हणजे ‘निष्काम’ भक्ती करणे) आणि सगुणातून निर्गुणाकडे जाणे (गुरु किंवा देव यांच्या सगुण रूपात न अडकता त्यांच्या निर्गुणरूपाकडे, म्हणजे तत्त्वरूपाकडे वाटचाल होते. बालकाप्रमाणे ‘निरागसभाव’ किंवा ‘भोळाभाव’ हा भक्तीयोगाचा स्थायीभाव आहे. या भावावस्थेत भक्त बुद्धीने विचार न करता केवळ भावाच्या स्तरावर विचार करत असतो. त्यामुळे त्याची वृत्ती, विचार आणि कृती यांमध्ये कोणत्याही अपेक्षा नसून त्याची वृत्ती, विचार आणि कृती निरपेक्ष अन् शुद्ध असतात. त्यामुळे भक्ताचा भोळाभाव पाहून भगवंत त्याच्यावर कृपा करून त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊन त्याला संतपद बहाल करतो.

 

८. श्रीगुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना

श्रीगुरुकृपेनेच भक्तीयोगाचे आध्यात्मिक स्तरावरील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘आम्हा अज्ञानी जिवांवर श्रीगुरूंची कृपा अशीच अखंड राहो’, हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ८.६.२०२३)

Leave a Comment