स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

अनुक्रमणिका

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच आहे. ‘हा लेख वाचून वाचकांना योगशास्त्राकडे वळण्याची प्रेरणा मिळावी’, ही प्रार्थना !

१. पूर्वी समाजजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या
योगशास्त्राचे धडे सध्या भारतियांना गिरवावे लागणे

भारत ही योगशास्त्राची जन्मभूमी आहे. आंतरजालावर (इंटरनेटरवर) थोडा फेरफटका मारला, तर योगाच्या नावाखाली कल्पनेच्या किती भराऱ्या मारल्या जात आहेत आणि शास्त्र बाजूला ठेवून त्यात व्यापार घुसवायचे कसे प्रयत्न केले जात आहेत, हे आपल्याला कळू शकेल. ‘पॉवर योगा’ (हृदयाच्या गतीला जलद करणारा योगाभ्यास), ‘यिन योगा’ (संथ गतीने करण्यात येणारा योगाभ्यास), ‘रिस्टोरॅटिव्ह योगा’ (उशी किंवा ब्लँकेट यांच्या आधारावर करण्यात येणारा योगाभ्यास),  ‘नेकेड योगा (नग्न होऊन केला जाणारा योग)’, ‘बीअर योगा’ (योगासनांच्या वेळी किंवा नंतर दारू पिणे), ‘ॲन्टी-ग्रॅव्हिटी योगा’ (झुल्याच्या साहाय्याने नृत्य करताना केलेली योगासने), असे विविध प्रकार जगात कुठेतरी चालू होऊन योगशास्त्राच्या या जन्मभूमीत पोचतात आणि आपल्याकडे त्यांचा उदोउदो चालू होतो. हे आपण खपवून घेतो; कारण कवायती, आसने, नाक धरून केलेले प्राणायाम, घड्याळ लावून केलेले ध्यान आणि निद्राधीन होईपर्यंत घेतलेली योगनिद्रा यांच्या पलीकडे आपले स्वतःचे योगशास्त्राविषयीचे ज्ञान जातच नाही.

भारताची परंपरा अत्यंत उज्ज्वल आहे. आपले पुराणकालीन पूर्वज योगयुक्त जीवनशैली जगत होते. युद्धात मृत्यू आला नसेल, तर बहुतांश जणांचे प्राणोत्क्रमण हे योग मार्गाने आणि प्राणांचे नियमन करून झालेले असायचे. राजापासून सामान्य लोकांपर्यंत सहसा सर्वांना कुंडलिनी जागृत करता येत असे. राक्षसही दैनंदिन योगसाधना करत असत. इतके प्रचलित असलेले हे योगशास्त्र आता आपल्याला ‘ग, म, भ, न’ पासून शिकावे लागत आहे.

 

२. योग हे वार्धक्यात शिकण्याचे नव्हे, तर बालवयापासून अंगीकारण्याचे शास्त्र !

प्रतिदिन अर्धा घंटा केली जाणारी आसने आणि प्राणायाम ही योगाच्या अष्टांगातील केवळ २ अंगे आहेत. जसे भूमीत बीज पेरण्यापूर्वी तिची मशागत करून तिला सुपीक करावे लागते, तसे आसने आणि प्राणायाम साधण्यासाठी २४ घंटे यम-नियमांचे आचरण करावे लागते. आसने आणि प्राणायाम हे योगाचे अंतिम उद्दिष्ट नाही. त्याद्वारे धारणेपासून कैवल्यप्राप्तीपर्यंतचा प्रवास सुकर करायचा असतो.

स्वामी विवेकानंद यांच्या मते, ‘प्रत्येक जिवाला हा प्रवास करायचाच आहे.’ जितक्या लवकर हा मार्ग कळेल, तितके उत्तम, असा आपल्या पूर्वजांचा आग्रह होता. म्हणूनच तेव्हा ‘योग’ हे वार्धक्यात शिकण्याचे शास्त्र नव्हते. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, नारदमुनी असे कित्येक जण अगदी बालवयात योगाभ्यास करत होते.

 

३. भगवद्गीतेमध्ये योगशास्त्राचा उपदेश करण्यात येणे

भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथही योगशास्त्राचा उपदेश करणारा आहे. यातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ‘श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे …’ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी…’ असे स्पष्ट म्हटलेले आहे. कलियुगातील महत्त्वाकांक्षी, ‘करियर ओरिएंटेड’ (लक्ष्याच्या दृष्टीने वाटचाल) आणि बहिर्मुख वृत्तीच्या मनुष्याला त्याच्या धावपळीच्या आयुष्यात योगशास्त्राची आवश्यकता भासू लागली आहे. मनुष्याच्या सर्व कर्मांचे तन आणि मन यांवर होणारे परिणाम टाळण्यासाठी त्याला योगशास्त्राविना अन्य पर्याय दिसत नाही.

भगवद्गीतेत भगवंत सांगतात की, ‘योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४८), म्हणजे ‘हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर.’ त्यामुळे आधी योगस्थ व्हा. शरीर आणि मन यांनी स्थिर व्हा. स्वत:च्या देहातीत अस्तित्वाचा अनुभव घ्या. कैवल्याची अनुभूती घ्या, कैवल्यासाठी बाह्य साधनाची आवश्यकता नाही, हे ज्ञान करून घ्या आणि मग संगरहित होऊन कर्मप्रवृत्त व्हा ! आपला प्रवास नेमका उलटा चालू आहे. आपण आधी कर्मप्रवृत्त होतो आणि मग स्थैर्यासाठी योगशास्त्राच्या वळचणीला जातो.

 

४.  एकविसाव्या शतकातील मनुष्याच्या सर्व समस्यांवर ‘योग’ हाच उपाय !

भौतिक प्रगतीचा चढता आलेख, त्यातून शरिराला आलेली सुखासीनता, इंद्रियांना निरंतर प्राप्त होणारे विषय, वाढलेली स्वार्थी वृत्ती, नास्तिकता, दूरदृष्टीचा अभाव, हितकर गोष्टी यांहून सुखकर गोष्टी अंगीकारण्याकडे वाढलेला कल अशा अनेक कारणांमुळे आज वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात निराशा आणि मनोविकार यांचे प्रमाण वाढत आहे. कुटुंब अधिकाधिक लहान होत चालली आहेत. सामाजिक स्तरावर वैरभाव, भय, पर्यावरण असंतुलन यांचे थैमान माजले आहे. कायदे करूनही प्रश्न सुटत नाहीत.

अशा स्थितीत ‘योगशास्त्र’ हा मनुष्यासाठी मोठा आधार आहे. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात योगशास्त्राच्या मार्गाने गेली, तर तिचा इतरांना उपद्रव अल्प होईल आणि इतरांचा उपद्रव करून न घेता जगण्याची कला तिला आत्मसात होईल; मात्र यासाठी ‘अष्टांग योगा’चा अभ्यास आवश्यक आहे. त्यातील समाधी वगळता अन्य ७ अंगांचा (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा) नियमित सराव हवा !

 

५. पतंजलि मुनींनी सांगितलेला योग !

पतंजलि मुनींनी अष्टांग योगातील प्रत्येक अंगाचे मनुष्याला होणारे लाभ स्पष्ट केले आहेत. ते पाहिले, तरी २१ व्या शतकातील मनुष्याच्या सर्व समस्यांवर ‘योग’ हे किती चपखल उत्तर आहे, हे आपल्याला समजेल.

अ. योगाङ्गानुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र २८

अर्थ : योग अनुष्ठान केल्याने तन-मन यांतील अशुद्धी नष्ट होतात, अविवेक नष्ट होतो आणि ज्ञानज्योत प्रदिप्त होते.

आ. यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि ॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र २९

अर्थ : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगशास्त्राची ८ अंगे आहेत.

इ. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहाः यमाः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३०

अर्थ : अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (इंद्रियनिग्रह), अपरिग्रह (आवश्यकतेहून अधिक संचय न करणे) हे ५ यम आहेत.

ई. अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३५

अर्थ : वैयक्तिक पातळीवर कायिक, वाचिक आणि मानसिक अहिंसेचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणारे सर्व प्राणी वैरभावाचा त्याग करतात.

पूर्वी ऋषिमुनींच्या आश्रमात सर्व प्राणी प्रेमाने एकत्र रहात असल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. आजही डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘हेमलकसा’ प्रकल्पात हा वैरत्याग बघायला मिळतो; मात्र वैयक्तिक स्तरावर अहिंसा जितकी उपयुक्त आहे, तितकीच राष्ट्रीय स्तरावर ती सद्गुणविकृती ठरते. हा अनुभव आपण सहस्रो वर्षे घेत आहोत.

उ. सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३६

अर्थ : आयुष्यात सत्य प्रस्थापित केले, तर सर्व क्रिया यशस्वी होतात. सत्यावर आधारित कर्मांचे उपयुक्त फळ निश्चित मिळते.

ऊ. अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ।।

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३७

अर्थ : अन्य कुणा जिवाच्या अधिकाराचे धन, अन्न, पद इत्यादी हरण न करणे, म्हणजे अस्तेय ! अस्तेयाच्या पालनाने जगातील उत्तमोत्तम रत्ने उपलब्ध होतात.

प्रत्येक जिवाला त्याची वाटणी मिळणे, ही मोठी संधीच आहे.

ए. ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३८

अर्थ : इंद्रियनिग्रह केल्यास वीर्य, म्हणजे शक्तीचा लाभ होतो.

इंद्रियांचे चोचले पुरवण्यात मनुष्याच्या आयुष्याचा मोठा कालापव्यय होतो. इंद्रियांचे विषय प्राप्त करण्यासाठी पुष्कळ कष्ट करावे लागतात. त्यात श्रम आणि शक्ती वाया जाते. इतके करून दैववशात् ते विषय प्राप्त झाले नाहीत, तर राहिलेली शक्ती शोक करण्यात नष्ट होते. त्यामुळे इंद्रियनिग्रह हे कळीचे सूत्र आहे.

ऐ. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासम्बोधः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३९

अर्थ : अपरिग्रह सिद्ध झाल्यावर मनुष्याला त्याच्या अन्य जन्मांचे ज्ञान होऊ लागते.

इंद्रियनिग्रह केल्याने आवश्यकता अल्प झाल्या की, संचय करण्याची वृत्ती अल्प होते. संचय करणे, म्हणजे इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करणे होय. मनुष्याविना अन्य कोणताही प्राणी असा संचय करत नाही. संचयापोटी भय येते. संचय करणे बंद केले की, मनुष्याला त्याच्या अन्य जन्मांचे ज्ञान होऊ लागते. आपल्याच पाप-पुण्याची कल्पना येऊन विवेक जागृत होतो.

ओ. शौच, संतोष, स्वाध्याय, तप आणि ईश्वरप्रणिधान (ईश्वराचे अनुसंधान) हे ५ नियम आहेत.

औ. शौचात्स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४०

अर्थ : बाह्य आणि अभ्यंतर शुचिता पाळल्याने योग्याचे हृदय शुद्ध होते. मलमूत्रादी असलेल्या स्वशरिराची आणि अन्य शरिराची आसक्ती जाते. संसर्गाचा अभाव होतो. निरोगी रहाण्यासाठी शारीरिक शौच, आनंदी रहाण्यासाठी मानसिक आणि वाणीचे शौच यांचे महत्त्व आपण जाणतो. प्रत्येक व्यक्तीने अर्थशौचाचे पालन केले, तर समाजातील भ्रष्टाचार निश्चित अल्प होऊ शकतो.

अं. सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४१

अर्थ : मनाचे शौच पाळल्याने सौमनस्य (मनाची प्रसन्नता) निर्माण होते, चित्ताची एकाग्रता साधते, इंद्रिये आपल्या स्वाधीन राहू लागतात आणि या सर्व अनुकूल सामुग्रीमुळे आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होण्याची पात्रता साधकाच्या अंगी बाणते.

सर्व प्रकारचे शौच पाळले, तर मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते, इंद्रियसंयम प्राप्त होतो आणि मनुष्य आत्मदर्शनाला योग्य होतो.

क. सन्तोषादनुत्तमसुखलाभः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४२

अर्थ : समाधानामुळे सर्वाेत्तम सुखाची प्राप्ती होते.

विनाकारण, कुठल्याही भौतिक आधाराविना संतुष्ट रहाता येणे, हे परमोच्च सुख आहे. भगवंत याला ‘आत्मनि एव आत्मनः तुष्टः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५५) म्हणजे ‘स्वतः (आत्मा) स्वतःतच संतुष्ट होऊन रहातो’, असे म्हणतात. ही स्थितप्रज्ञ स्थिती आहे.

ख. कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात्तपसः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४३

अर्थ : तपाने मनातील अशुद्धी नाहीशी होते, म्हणजेच मन शुद्ध होते. त्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मन यांच्या सिद्धी उपलब्ध होतात.

तप केल्याने शरीर आणि इंद्रिय यांची शुद्धी होऊन ते सिद्ध होतात. कठोर तपानंतर सिद्धी प्राप्त होतात. याची अनेक उदाहरणे आपल्याला प्राचीन इतिहासात मिळतात.

ग. स्वाध्यायादिष्टदेवतासम्प्रयोगः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४४

अर्थ : स्वाध्यायामुळे इष्ट देवता प्रसन्न होतात. स्वाध्याय म्हणजे लोककल्याण करणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास आणि प्रचार ! इथे लोककल्याण हे कळीचे सूत्र आहे. प्राणिमात्रांच्या हिताच्या आड येणाऱ्या शास्त्रांना येथे स्थान नाही. स्वाध्यायामुळे इष्ट देवता संतुष्ट होतात.

घ. समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४५

अर्थ : ईश्वराच्या अनुसंधानामुळे समाधीसाठी मनुष्य सिद्ध होतो.

च. ततो द्वन्द्वानभिघातः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ४८

अर्थ : आसनांच्या अभ्यासाने शारीरिक (उदा. शीत आणि उष्ण) आणि मानसिक द्वंद्व (उदा. सुख आणि दुःख) सहन करण्याची क्षमता वाढते.

छ. ततः क्षीयते प्रकाशावरणम् ॥
धारणासु च योग्यता मनसः॥

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ५२ आणि ५३

अर्थ : प्राणायामाच्या सरावाने आपल्या प्रकाशरूपी अस्तित्वावर असलेले अज्ञानरूपी आवरण क्षीण होते. चंचल मनावर नियंत्रण मिळून ते धारणेला योग्य होते.

ज. प्रत्याहार – तत: परमावश्यतेन्द्रियाणाम् ।।

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ५५

अर्थ : प्रत्याहाराचा नियमित अभ्यास केल्याने इंद्रिये अत्यंत वश होतात. हे अत्यंत कठीण आणि श्रेष्ठ फळ आहे.

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (एम्.डी. आयुर्वेद, बी.ए. योगशास्त्र (सुवर्णपदक))

(साभार : ‘साप्ताहिक विवेक’)

Leave a Comment