भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेवराई (जिल्हा बीड) येथे धर्मप्रेमी आणि व्यापारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

गेवराई (जिल्हा बीड) – हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करणे आवश्यक आहे. सध्या जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतमातेला वाचवायचे असल्यास हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. येथील गजानन मंगल कार्यालयात नुकत्याच झालेल्या धर्मप्रेमी आणि व्यापारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृती करणारे अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. या बैठकीला सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे, सनातन संस्थेच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उल्का जठार, सौ. सुनीता पंचाक्षरी, श्री. मंगेश बारस्कर आदी उपस्थित होते. या वेळी अनेक व्यापारी त्यांच्या कामाची व्यस्तता असूनही मार्गदर्शनासाठी आवर्जून उपस्थित होते. 

क्षणचित्रे

१. मार्गदर्शन ऐकल्यानंतर उपस्थित धर्मप्रेमींनी युवावर्गासाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग, महिला आणि पुरुष यांच्यासाठी धर्मशिक्षणवर्ग आणि बालसंस्कारवर्ग आदी वर्ग चालू करण्याची मागणी केली.

२. बैठकीला आलेले धर्मप्रेमी श्री. शाम गायकवाड म्हणाले की, यापूर्वी मी पुष्कळ समाजकार्य केले आहे; मात्र यापुढे केवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यासाठीच पूर्ण आयुष्य वाहून घेणार आहे.

 

विशेष

१. गजानन मंगल कार्यालयाचे मालक श्री. बाळासाहेब मोटे यांनी ‘हे मंगल कार्यालय सनातन संस्थेच्या कार्यक्रमांसाठी नियमित उपलब्ध करून देऊ’, असे आवर्जून सांगितले.

२. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गेवराई येथील धर्मप्रेमी सर्वश्री शाम गायकवाड, केशव पंडित, बाळासाहेब मोटे यांनी पुष्कळ परिश्रम घेतले.

 

अनुभूती

१. धर्मप्रेमी श्री. बाळासाहेब मोटे यांच्या शेतामधील हनुमान मंदिरात पू. (कु.) दीपाली मतकर यांनी सामूहिक प्रार्थना करवून घेतली, तेव्हा वातावरणात चैतन्य जाणवले आणि श्री. मोटे यांना पू. दीपालीताईंच्या ठिकाणी देवीचे दर्शन झाले.

२. श्री. शाम गायकवाड यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘गेवराईमधील सर्वांनी साधनेला प्रारंभ केल्यास सर्वप्रथम गेवराईमध्ये हिंदु राष्ट्र येईल’, असे म्हणताच क्षणी माझ्या अंगावर रोमांच आले.’’

कुटुंबातील प्रत्येक स्त्रीने धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कुटुंबातील प्रत्येक स्त्री धर्मशिक्षित झाल्यास ती राजमाता जिजाऊ आणि रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे देश अन् कुटुंब यांचे रक्षण करील. त्यासाठी स्त्रियांनी धर्माचरणासह स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा प्रयत्न करायला हवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment