विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

सोलापूर येथील श्री सिद्धेश्वराच्या चरणी निमंत्रणपत्रिका अर्पण !

  • श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे भावपूर्ण दर्शन
  • मुंबईत १७ मे या दिवशी होणार श्री राजमातंगी महायज्ञ !

सोलापूर – ‘सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी’, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी मुंबईच्या प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक पटांगणात ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी शिवयोग समाधी, तसेच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली. या वेळी त्यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांचे भावपूर्ण दर्शनही घेतले.

श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

देवस्थानचे पुरोहित श्री. महेश स्वामी आणि श्री. राजशेखर हब्बू यांनी संकल्प करून आरती केली. याप्रसंगी ‘श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यांसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांसह अन्य साधकही उपस्थित होते.

८२५ वर्षांची वारकरी परंपरेची प्रचीती देणारे सोलापुरातील श्री विठ्ठल मंदिर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आजोबा श्री. गोविंदपंत आणि त्यांची धर्मपत्नी भाग्यवंती नीराबाई हे मराठवाड्यातील आपेगाव येथील रहिवासी असून ते निष्ठावान वारकरी होते. पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पायी वारी करत होते. थोर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे तलाव खोदाईचे श्रमदान चालू होते.

पुजार्‍यांकडून श्री विठ्ठलाचा प्रसाद घेतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्री सिद्धेश्वर महाराजांनी त्या वृद्ध दांपत्याची विचारपूस केली. तेव्हा गोविंदपंतांनी सांगितले, ‘‘आम्ही श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जात आहोत.’’ त्यांच्या भक्तीभावाने प्रभावित होऊन श्री सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना तेथेच विठ्ठलदर्शन घडवले. या ठिकाणी आजही श्री विठ्ठलाची सुंदर मूर्ती भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे. हे श्री विठ्ठल मंदिर श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या परिसरातच आहे. श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि ‘श्री राजमातंगी यज्ञ निर्विघ्न पार पडण्यासह हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी प्रार्थना केली.

श्री सिद्धेश्वर महाराजांचा कार्य परिचय !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष, म्‍हणजे श्री सिद्धेश्वर महाराज ! १२ व्‍या शतकात सिद्धेश्वर महाराजांनी ‘सोलापूर’ गाव वसवले. सामाजिक सुधारणा करतांना त्‍यांनी परिश्रमाला प्रतिष्‍ठा प्राप्‍त करून दिली. त्‍यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले. पाण्‍याचे दुर्भिक्ष्य नष्‍ट करण्‍यासाठी सामूहिक श्रमातून तलावाची निर्मिती केली. विविध नद्यांतून पाणी आणून तलावात ओतले. सोन्‍नलगीच्‍या पंचक्रोशीत ६८ लिंगांसह अष्‍टविनायक आणि अष्‍टभैरव यांची प्रतिष्‍ठापना केली. त्‍यांनी श्री बसवेश्वर यांची शिकवण आणि उपदेश यांचा प्रसार केला.

श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी ठेवण्यात आलेली श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका

श्री सिद्धरामेश्वर सवंगड्यांसह गुरे राखण्‍यास गेल्‍यानंतर श्रीशैलहून मल्लिकार्जुन एका जंगमाच्‍या (लिंगायत समाजातील स्वामी) रूपात सिद्धरामेश्वर यांच्‍या समोर आले. ‘हे जंगम साक्षात् परमेश्वर आहेत’, हे सिद्धरामेश्वर यांनी त्‍वरित ओळखताच मल्लिकार्जुनांनी त्‍यांना प्रत्‍यक्ष दर्शन दिले होते.

 

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री भवानीदेवीच्या चरणी निमंत्रणपत्रिका अर्पण !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भवानीदेवीचे घेतले भावपूर्ण दर्शन आणि देवीला अभिषेक !

श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या बाहेर ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ची निमंत्रणपत्रिका घेऊन श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

तुळजापूर, १२ मे – ‘सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी’, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी मुंबईच्या प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक पटांगणात ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ मे या दिवशी तुळजापूर येथील भवानी मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांनी येथील श्री भवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि देवीला अभिषेक करून तिची ओटी भरली. यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी देवीच्या चरणांशी यज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली. याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

तुळजापूर येथील भवानी शंकर मंदिरातील पुजार्‍यांना झालेला देवीचा स्वप्नदृष्टांत

श्री भवानी शंकर मंदिरात दर्शनाच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि समवेत पुजारी श्री. उमेश इनामदार

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भवानीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरासमोरच असलेल्या भवानी शंकर मंदिराचे दर्शन घेतले. त्यांना पहाताच भवानी शंकर मंदिरात पौरोहित्य करणारे पुजारी श्री. उमेश इनामदार यांनी त्यांना १२ मे या दिवशी पहाटे देवीकडून झालेला स्वप्नदृष्टांत सांगितला. श्री. उमेश इनामदार म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही येणार, हे आम्हाला ठाऊक नव्हते; पण आज पहाटे ३ वाजता साक्षात् देवी माझ्या स्वप्नात आली. देवीने डोळे उघडले आणि तिच्या शेजारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या आज नेसलेल्या साडीमध्ये (पिस्ता रंगाची काठापदराची साडी) दिसल्या. त्यांच्या हातातून देवीच्या चरणांवर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडत होता. ती स्त्री कोण होती ?, हे मला तेव्हा कळले नाही; पण जेव्हा तुम्ही (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) मंदिरात दर्शनासाठी आलात, तेव्हा पहाटेच्या स्वप्नदृष्टांताचा उलगडा झाला, त्या याच होत्या, याचा उलगडा झाला.’’

 

श्री सिद्धिविनायकाच्या चरणी निमंत्रणपत्रिका अर्पण !

जागृत आणि स्वयंभू श्री सिद्धिविनायक

मुंबई, १० मे (वार्ता.) – येथील जागृत आणि स्वयंभू श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सनातनच्या साधकांनी गणेशाच्या चरणी श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली. भारताच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी होणारा हा महायज्ञ निर्विघ्न पार पडावा, यासाठी साधकांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून ‘श्रीं’चे आशीर्वाद घेतले.

डावीकडून श्री. सागर चोपदार, श्री. सदानंद सरवणकर यांना निमंत्रण देतांना अभय वर्तक, बाजूला सौ. मनाली नाईक, सौ. कल्पना कार्येकर

या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, सनातनच्या साधिका सौ. मनाली नाईक, सौ. कल्पना कार्येकर, श्री. रवींद्र नलावडे, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार उपस्थित होते.

डावीकडून श्री. सागर चोपदार, सौ. कल्पना कार्येकर, सौ. मनाली नाईक, श्री. अभय वर्तक, निमंत्रण स्वीकारतांना आचार्य पवन त्रिपाठी आणि श्री. भास्कर शेट्टी

‘श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासा’चे अध्यक्ष श्री. सदानंद सरवणकर, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, विश्वस्त श्री. भास्कर शेट्टी यांना महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले.

Leave a Comment