विठ्ठलाची आरती

Article also available in :

विठ्ठल Vitthal

विठ्ठल

पूजेच्या वेळी किंवा पूजेत नैवेद्यादी समर्पणाचा उपचार पूर्ण झाल्यानंतर शेवटी आरती, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. आरतीमध्ये देवतेचे माहात्म्यवर्णन आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. भक्तीमार्गात आरतीला महत्त्वाचे स्थान आहे. श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला लक्षावधी वारकरी आणि भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. श्री विठ्ठलाची आरती येथे दिली आहे. तिचा अर्थ समजून घेऊन ती म्हटली जावो आणि प्रत्येकाची भावजागृती होवो, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना !

 

विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।। – संत नामदेव

 

अन्वय, अर्थ आणि भावार्थ

विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून पंढरपूरला विटेवर उभा आहे । (टीप १)
(त्याच्या) वामांगी (डावीकडे) रखुमाई (रुक्मिणी) (उभी असून) दिसे दिव्य शोभा (त्याचे रूप अत्यंत शोभायमान आहे) ।
परब्रह्म (विठ्ठल) पुंडलिकासाठी (पुंडलिकाच्या मिषाने सार्‍या भक्तांसाठी) पंढरीला येऊन राहिले आहे ।
त्याच्या चरणाशी भीमा (चंद्रभागा) वहात असून तीही भक्तगणांचा उद्धार करत आहे ।। १ ।।

हे देवा पांडुरंगा, तुझा जयजयकार असो !
हे रखुमाई आणि राई यांच्या वल्लभा (पती), (हे) जिवलगा (प्राणाहून प्रिय असलेल्या) (मला) पाव (प्रसन्न हो, ही तुझ्या चरणी प्रार्थना !)
(देवांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या शक्ती होत. या तारक आणि मारक अशा दोन प्रकारच्या असतात.
विठ्ठल हा उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी स्थितीचा देव असल्याने त्याच्या दोन्ही शक्ती, म्हणजे पत्नी, उत्पत्ती आणि स्थिती यांच्याशी संबंधित आहेत.) ।। धृ० ।।

विठ्ठलाने तुळशीची माळ गळ्यात घातली आहे आणि दोन्ही कर (हात) कटी (कमरेवर) ठेवलेले आहेत ।
कासे (कमरेला) पीतांबर परिधान केले असून लल्लाटी (कपाळावर) कस्तुरीचा टिळा लावला आहे ।
(विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परब्रह्माच्या) भेटीकरता देव सुरवर (श्रेष्ठ देवदेवता) नित्य येत असतात ।
गरुड आणि हनुमंत नेहमी हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात ।। २ ।।

हे अनुक्षेत्रपाळा (पंढरपूर या क्षेत्राचे पालन करणार्‍या विठ्ठला), धन्य वेणूनाद (तुझ्या वेणुनादाने (बासरीच्या सुरांनी) सर्व भक्तगण धन्य धन्य होतात.) ।
विठ्ठलाच्या गळ्यात सुवर्णाची कमळे आणि वनमाळा (तुळस आणि फुले यांची माळ) आहेत ।
राई रखुमाबाई राणीया सकळा (राई आणि रखुमाई यांच्यासह इतर सर्व राण्या) ।
(अशा या भक्तांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणार्‍या) सावळ्या विठ्ठलराजाला आरती ओवाळतात ।। ३ ।।

ओवाळू आरत्या (पांडुरंगाला आरती ओवाळण्यासाठी) कुर्वंड्या येती (भक्तगण कुरवंड्या, म्हणजे दिवे लावलेले लहान द्रोण घेऊन येतात) ।
आरती ओवाळून चंद्रभागेमाजी (चंद्रभागेत) सोडून देतात ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती (मिरवणुकीने, पताका (ध्वज) घेऊन आलेले वैष्णव (विठ्ठलभक्त) देहभान हारपून नाचतात.) ।
या पंढरीचा महिमा किती म्हणून वर्णावा ? (तो शब्दांतून वर्णन करणे अशक्यच आहे.) ।। ४ ।।

(हे पांडुरंगा,) दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी या एकादश्यांना जे भक्तजन तुझ्या दर्शनाला पंढरपूरला येतात, चंद्रभागेत भक्तीभावाने स्नान करतात, दर्शनहेळामात्रे (तुझ्या केवळ कृपाकटाक्षाने) त्यांना मुक्ती मिळते. (एवढे त्याचे सामर्थ्य आहे, महिमा आहे !) ।
हे केशवा, तुला नामदेव भावपूर्वक (आरती) ओवाळत आहेत. (तुझी कृपा असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे !) ।। ५ ।।

टीप १सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे मानलेली आहेत. यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असेही म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात; म्हणजेच सुमारे ७१ चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो. त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील ५० ब्राह्मवर्षे संपून ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलीयुग हे अठ्ठाविसावे युग आहे. विठ्ठल अठ्ठावीस युगे आहे, म्हणजेच वैवस्वत मन्वंतरापासून तो आहे. (मूळ स्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment