आरती कशी करावी ?

उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.

एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने, म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धान्त सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.

उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरती पूर्वी अन् नंतर काय करावे आदींविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात. या लेखामुळे सर्वच कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरित्या कशा करावयाच्या याविषयी ज्ञान मिळेल.

आरती कशी करावी ? चलच्चित्रपट (How to offer Arati? Videos : 5)

 

 

१. आरतीचे महत्त्व

१ अ. कलियुगात मानवाला ‘देव आहे’, हे कळण्यासाठी आरती हे एक सोपे माध्यम असणे

‘आरती म्हणजे कलियुगात मानवाला देव बघण्यासाठी केलेला सोपा उपाय आहे; कारण कलियुगात देव आहे कि नाही इथपासूनच आरंभ होतो. आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली, तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.’ – श्री गणपति
(श्री. भूषण कुलकर्णी यांच्या माध्यमातून )

१ आ. देवता प्रसन्न होणे

देवता स्तुतीप्रिय आणि कृपाळू असल्याने तिची स्तुतीपर आरती म्हणणार्‍या भक्तावर ती प्रसन्न होते.

 

१ इ. आरतीचे रचनाकार उन्नत असल्याने त्यांच्या संकल्पशक्तीचा लाभ मिळणे

बहुतांश आरत्यांची रचना ही संतांनी किंवा उन्नत भक्तांनी केलेली आहे. उन्नतांचा संकल्प आणि आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक अन् पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.

 

१ ई. जिवाची सुषुम्नानाडी जागृत होऊन त्याचा भाव जागृत होणे

भक्तीमार्गानुसार साधना करणार्‍यात ईश्वराविषयी भक्तीभाव लवकर निर्माण होणे आवश्यक असते. प्राथमिक अवस्थेतील साधकात अमूर्त म्हणजे निर्गुण रूपातील ईश्वराप्रती भाव निर्माण होणे कठीण असते. याउलट मूर्त म्हणजे सगुण रूपातील, मानवी देह धारण केलेला ईश्वर साधकाला जवळचा वाटतो आणि त्याच्याप्रती साधकात भावही लवकर निर्माण होतो. आरती हे सगुणोपासनेचे एक सोपे माध्यम आहे.

‘आरतीच्या वेळी आरतीतील शब्दांचे सूक्ष्म-रूप हे समोरील देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा यांना हळुवारपणे स्पर्श करून आरती म्हणणार्‍या आणि ऐकणार्‍या जिवांकडे जाते. जिवांच्या सूक्ष्म-देहावर त्याचा परिणाम होतो. आरतीतील शब्द त्यांच्यासह असलेली सात्त्विकता जिवांच्या सूक्ष्म-देहावर प्रक्षेपित करतात. त्यामुळे आरती म्हटल्यावर हलके झाल्याचे जाणवते. आरतीतील शब्दांमुळे जिवांची सुषुम्नानाडी जागृत झाल्यामुळे त्यांचा भाव जागृत होतो.’ – ईश्वर
(कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १६.१.२००५, सायं. ७ ते रात्री १२.२२)

 

१ उ. अनुभूती आल्याने श्रद्धा वाढण्यास साहाय्य होणे

आरतीच्या वेळी साधकाचा देवतेविषयी भाव वाढत असल्याने त्याला अनुभूती येते. अनुभूतीमुळे त्याची देवावरची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.

 

१ ऊ. देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने चैतन्याचा लाभ होणे

आरतीच्या वेळी देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होत असल्याने त्या वेळी साधकाला देवतेची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. म्हणून देवळात इतर वेळी उपस्थित रहाण्याच्या तुलनेत आरतीच्या वेळी उपस्थित रहाणे अधिक लाभदायक असते.

 

१ ए. वायूमंडलाची शुद्धी होणे

‘आरतीतून निर्माण झालेल्या नादलहरींमुळे जिवाच्या भोवती असलेले वायूमंडल सात्त्विक बनून परिसराची शुद्धी होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.४.२००५, रात्री ९.०२)

 

खालील चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

२. आरती कधी करावी ?

२ अ. सकाळी आणि सायंकाळी, दोन वेळा आरती का करावी ?

सूर्योदयाच्या वेळी देवतांच्या लहरींचे आगमन होतांना प्रक्षेपित होणार्‍या तारक चैतन्याचे स्वागत करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या वेळी रज-तमात्मक लहरींचे उच्चाटन करण्यासाठी आरती करणे

‘सूर्योदयाच्या वेळी रात्रीच्या रज-तमात्मक वातावरणाचा लय होऊन ब्रह्मांडात देवतांच्या तेजतत्त्वात्मक लहरींचे आगमन होते. त्यांचे स्वागत म्हणून सूर्योदयाच्या वेळी आरती करावी. सूर्योदयाच्या वेळी देवतांच्या लहरींचे आगमन होत असतांना प्रक्षेपित होणार्‍या तारक चैतन्याचे स्वागत जिवाने आरतीच्या माध्यमातून करायचे असते, तर सूर्यास्ताच्या वेळी रज-तमात्मक लहरींचे उच्चाटन करण्यासाठी देवतांच्या मारक चैतन्याची आवाहनात्मक आराधना जिवाने आरतीच्या माध्यमातून करावयाची असते. यासाठी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी, दोन वेळा आरती करावी.

 

२ आ. सूर्यास्ताच्या वेळी आरती करण्यामागील शास्त्र काय ?

सूर्यास्ताच्या वेळी वाईट शक्तींच्या वाढलेल्या संचारावर मात करण्यासाठी देवतांच्या लहरी याव्यात, यासाठी आरती करणे

सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्रमाण घटू लागल्याने वायूमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते, तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा लाभ उठवून वाईट शक्ती वातावरणातील आपला संचार वाढवतात. अशा रज-तमात्मक वायूमंडलाचा त्रास होऊ नये, यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींतून देवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रह्मांडकक्षेत आणणे आवश्यक असते. आरतीमुळे वायूमंडलात देवतांच्या चैतन्यमय लहरींचे प्रमाण वाढून त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण घटते आणि जिवाच्या देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.६.२००५, सायं. ६.३३)

 

३. आरती करण्याची संपूर्ण कृती

आरती करतांना कोणकोणत्या कृती करायच्या असतात, ते पुढे दिले आहे.

अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.

शंख वाजवणे
शंख वाजवणे

१. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.

२. शंख वाजवतांना डोळे मिटून, ‘ऊर्ध्व दिशेकडून येणार्‍या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत’, असा भाव ठेवावा.

३. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णतः छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवावा.

४. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या ध्वनीकडे न्यावा आणि तिथेच सोडावा.

आ. शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा.

१. ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.

२. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.

३. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्र-दृष्ट्या योग्य असावा.

इ. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.

१. प्राथमिक अवस्थेतील साधक : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.

२. पुढच्या अवस्थेतील साधक : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.

ई. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.

१. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

२. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

उ. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.

१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.

२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.

ऊ. ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
ए. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
ऐ. कापूर-आरती ग्रहण करावी.

कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)

ओ. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
औ. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
अं . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
क. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
ख. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।

पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।

मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।

यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।

दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

 

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.

 

ग. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
घ. त्यानंतर तीर्थ प्राशन करून विभूती (उदबत्तीची राख) भ्रूमध्यावर लावावी.

 

शंखनाद करतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

खालील चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आरती कशी करावी?’

2 thoughts on “आरती कशी करावी ?”

Leave a Comment